‘चाकाखाली कुत्र्याचे पिल्लू आले, तर दु:ख वाटणारच ना?’ हे मोदींचे २०१३चे विधान लखीमपूर खिरीलाही लागू पडते का?
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Sat , 16 October 2021
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi गोधरा Godhra शेतकरी मोर्चा Farmers' Protest लखीमपूर Lakhimpur लखीमपूर हिंसाचार Lakhimpur violence भाजप BJP

‘रायटर्स’ या ब्रिटिश वृत्तसंस्थेने दिलेली १२ जुलै २०१३ची ती बातमी अजूनही सहज शोधता येते. “मोदीज ‘पपी’ रिमार्क ट्रिगर्स न्यू कॉन्ट्रोव्हर्सी ओव्हर २००२ रायटस’ असे तिचे शीर्षक आहे. सृती गोट्टीपती आणि अ‍ॅनी बनर्जी यांच्या नावे ती आहे. रायटर्सलाच ती मुलाखत देताना गोधरामधील जातीय दंगल आणि मोदींचे त्या वेळचे गुजरात सरकार या अनुषंगाने मोदींना एक प्रश्न विचारण्यात आला होता. दंगलीत हिंसाचार चालू असताना खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्याला अटकाव करायला फार काही धडपड केली नाही, असा त्यांच्यावर काँग्रेसने आरोप केलेला होता. त्यावर बोलताना मोदी म्हणाले होते की, ‘कुणी एक व्यक्ती मोटार चालवत आहे. आणि आपण पाठीमागे बसलो आहोत. तेव्हा कुत्र्याचे एखादे पिल्लू जर चाकांखाली आले तरी त्याने दु:ख होणार की नाही? होईलच अर्थात. मी मुख्यमंत्री असलो काय, नसलो काय, मी एक माणूस आहे. कुठे काही वाईट घडत असेल तर त्याने दु:खी होणे स्वाभाविक असते!’ (तुम्हाला त्या हिंसाचाराचा खेद वाटला हेता काय असा त्या प्रश्नाचा आशय होता.)

ही अशी त्या दंगलीत मारली गेलेली सुमारे एक हजार माणसे आणि एखादे कुत्र्याचे पिल्लू यांची मोदींनी केलेली तुलना अनेकांना खटकली. तेव्हाचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले होते की, खुलासा, पश्चात्ताप अथवा जबाबदारी अशा कोणत्याच कारणाने आपला दंगलीशी संबंध नसल्याचे ज्याला वाटते, ते देशासाठी अन मानवतेसाठी अत्यंत क्लेशदायक आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

नंतर मुख्यमंत्री मोदी यांच्या कार्यालयाने एक खुलासा केला. त्यात विपर्यास हा मुद्दा ठळक होता. एखाद्या कुत्र्याला झालेली इजासुद्धा माणसाला दु:ख देते याचा अर्थ ते (मोदी) किती अत्युच्च संवेदनांचे धनी आहेत ते स्पष्ट करते, असे त्या खुलाशात म्हटले होते.

त्या उपमेचे विश्लेषण करताना आपल्याला असे म्हणता येईल की, कुत्र्याचे पिल्लू अजाणता, अनवधानाने किंवा सहज रस्त्यावर धावले अन मोटारीच्या चाकाखाली आले. दंगल, हिंसाचार, रक्तपात अजाणता, अनवधानाने अथवा सहज मानता येतो का? फक्त मुसलमान वेचून ठार करणे आपोआप, चुकून किंवा सहज कसे काय होईल? वेगाचे नियंत्रण करता न आल्याने अनेकदा कित्येक प्राणी रस्त्यावर वाहनांखाली येऊन मरतात. वाहन आणि सरकार यांची तुलना तरी कशी काय करता येईल?

लखीमपूर खिरी येथे शेतकरी मोर्च्यावर आपले वाहन घालून चार जणांच्या मृत्युला कारण ठरणाऱ्यांचा निषेध करणे, ‘सोडा अरेरे! फार वाईट, अतिभयंकर’, असेही शब्द पंतप्रधानांच्या तोंडून बाहेर पडले नाहीत, ते का, हा प्रश्न नक्कीच फजूल आहे. कारण आठ वर्षांपूर्वीच्या त्या विधानांतूनच एका सत्ताधाऱ्याची मनोवृत्ती, शब्दयोजना आपल्याला समजली आहे. म्हणून चि. आशीष मिश्र याला कोठडीत ठेवायचा आदेश मिळूनही पंतप्रधान काही बोललेले नाहीत, बोलणारही नाहीत.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

सरकार चालवणे आणि मोटार चालवणे यात साम्य शोधणारा माणूस आहे कसा याचा विचार करू. सरकार कोणावर अन्याय करणार नाही, असा ते चालवणारा सांगत असतो. तद्वत मोटार कोणाच्या अंगावर जाणार नाही, याची हमी तिचा चालक देत असतो. तरीही सरकारवर अन्याय केल्याचे आरोप होत असतात. विसर, दुर्लक्ष किंवा नजरचूक याहीपेक्षा हितसंबंधांचे राजकारण हे कारण या आरोपामागे असते. मोटारचालकाला झोप येणे, निर्णयास क्षणाचा विलंब होणे किंवा रस्त्याकडे लक्षच नसणे, अशी कारणे देता येतात. पण त्याची शिक्षा टळत नाही. मुद्दाम वाहन धडकवल्यास आणखी गंभीर गुन्हा दाखल होऊन शिक्षा मोठी होणेही चुकत नाही. म्हणजे वाहनचालक दोषी ठरतोच.

मग सरकार चालवणारा दोष का स्वीकारत नाही? किंवा जबाबदारी का शिरावर घेत नाही? कधी काळी रेल्वे अपघात घडून प्रवासी ठार झाले की, रेल्वेमंत्री राजीनामा देत. दिवसभरात पाचदा पोशाख बदलल्याची बातमी पसरल्यानंतर शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजीनामा सोनिया गांधींनी घेतला होता. आताचे गृहराज्यमंत्री अशोक मिश्र ना राजीनामा देत आहेत, ना तो त्यांना मोदी मागत आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

अवघा भारतीय जनता पक्ष लखीमपूर खिरी प्रकरणी मिश्र यांचे चुकल्याचे म्हणाला नाही. पक्षाध्यक्ष तर गपगुमान राहिले आहेत. चि. आशीष मिश्र यालाही ‘पोलिसांच्या हवाली हो’ असे कुणी सांगेना. अखेर सर्वोच्च न्यायालायच्या हस्तक्षेपाचा आणि काही चित्रपट्टीकांचा परिणाम झाला.

फादर स्टॅन स्वामी यांना वारंवार जामीन नाकारणाऱ्या न्यायव्यवस्थेतल्या किती जणांनी स्वामींच्या निधनावर क्षमा, दिलगिरी, चुटपूट व्यक्त केली? म्हणजे सध्याच्या कोणत्याच लोकशाही संस्था संवेदनशील नाहीत, असे आपल्याला म्हणता येते. न्यायमूर्तींचे एकवेळ असे म्हणू नकी, त्यांना अखेर समोर मांडल्या गेलेल्या साक्षीपुरावे, युक्तीवाद या आधारावर निर्णय करावा लागतो. राज्ययंत्र चालवणारा मात्र सारे काही आपल्यामुळे चालतेय, असा दावा करत असताना, शिवाय तो करवून घेत असताना, काखा वर करून चालत नसते.

मोदी असा कातडीबचाव करत होते की, वाहन ते चालवत नसतानाही त्यांना दु:ख झाले. अगदी त्याच धर्तीवर शेतकरी मोर्च्यावर वाहन चढवून चौघांना ठार मारण्याच्या कृत्याचे दु:ख का नाही झाले? चि. आशीष वाहनात नव्हता, ते तो चालवत नव्हता, ते कुस्त्यांच्या खेळांपाशी होता इत्यादी दावे कुणाला सिद्ध करता आलेले नाहीत. त्याला अखेर अटकेत ठेवण्याची नामुष्की भाजपवर येऊन कोसळली.

मोदींनी खरे तर चालकाची उपमा द्यायला हवी होती. इंजिन चालक रुळांवर झालेल्या वा झोपलेल्या माणसांच्या मृत्यूस जबाबदार धरला जात नसतो. पण रेल्वेचालक तसा कष्टकरी अन कम दर्जाचा! मोटार कशी डौलदार, महागडी आणि ताकदीची प्रतीक असते. ती मोदींनी भावलीय.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

त्यांनी एक चारचाकी रस्ता, ताकद आणि बचाव यांची प्रतीक म्हणून केलेली भलामण त्यांच्याच एका कार्यकर्त्यालाही पटली. याचा अर्थ असा की, सध्या मोदी सरकार कला, माध्यमे, क्रीडा, राजकारण, अर्थव्यवस्था, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, बांधकाम इत्यादी देशाच्या साऱ्या महत्त्वाच्या क्षेत्रांत असाच भरधाव, बेधडक अन बेपर्वा शिरकाव करत आहे. तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, त्यात संघाची माणसे दांडगाई करताना आढळतील. त्यांची मर्जी जशी असेल तशी त्या क्षेत्राची उलटापालट करताना ते दिसतील. चर्चा, वाद, तर्क, प्रश्न यांना शाखांत प्रवेशच नसल्याने सारे स्वयंसेवक बेबंदशाही अमलात आणत असल्याचे दृश्य तुम्हाला दिसेल. ‘राष्ट्रसेवक’ म्हणून घेण्यापेक्षा ‘स्वयंसेवक’ म्हणवून घेणे या मंडळीस का आवडते, ते आता देशाला समजते आहे.

आम्हाला आमचे ध्येय गाठताना वाटेत जे जे अडथळे येतील, ते सगळे चूर चूर करत आम्ही पुढे जातच राहू, अशी घमेंड मिरवणाऱ्या या परिवाराच्या एका सदस्याने खरोखर चार शेतकरी चिरडत त्याचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला. केवढी ही प्रखर निष्ठा! आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनाची किती सहीसही अंमलबजावणी ही!! पिल्ले आणि माणसे, कुणीही चाकांखाली येवो, आम्ही राष्ट्रसेवेचा रस्ता सोडणार नाही, हा धडा आता बौद्धिकांत दिला जाणार…

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा