जालियानवाला बागेविषयीच्या पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या राजकारणामागे येऊ घातलेल्या पंजाबच्या विधानसभा निवडणुका आहेत
पडघम - देशकारण
अनिल सिन्हा
  • जालियानबाला बागेतली ती ऐतिहासिक अरुंद गल्ली... उजवीकडे आधीची आणि डावीकडे नूतनीकरणानंतरची
  • Wed , 08 September 2021
  • पडघम देशकारण जालियानबाला बाग jallianwala bagh भगतसिंग Bhagat Singh धर्मांध दंगली COMMUNAL RIOTS

जालियानवाला बाग स्मारकाचं नुतनीकरणावरून राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांच्यासारख्या नेत्यांना राग येणं स्वाभाविक आहे. काँग्रेसने तर या बागेचं अस्तित्व नष्ट करण्याचे ब्रिटिशांचे प्रयत्न ते भारतावर राज्य करत असतानाही यशस्वी होऊ दिले नव्हते. या बागेत १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या नरसंहाराची आठवण कायम राहण्यासाठी काँग्रेसने देशपातळीवर निधी जमवला होता आणि मालकाकडून ती बाग विकत घेऊन एका ट्रस्टकडे सोपवली होती. स्वातंत्र्यानंतर तिथं स्मारक उभारण्यात आलं. हे विशेष म्हणावं लागेल की, ब्रिटिशांच्या सत्ताकाळातच काँग्रेसने त्यांच्या अन्याय-अत्याचाराची आठवण देणाऱ्या या स्थळाचं संरक्षण करण्यात यश मिळवलं होतं. येचुरी यांचा कम्युनिस्ट पक्ष आणि नौजवान भारत सभा यांसारख्या इतर संघटनांचाही या हुतात्म्यांच्या या गौरवशाली स्मारकात वाटा आहे. कारण कम्युनिस्ट शहिद भगतसिंग या स्मारकामुळे इतके प्रभावित झाले होते की, त्यांनी तेथील थोडीशी मातीशी आपल्याजवळ बाळगली होती. ती कितीतरी दिवस त्यांच्याजवळ होती. भगतसिंगांचे अनेक साथीदार कम्युनिस्ट पक्षात सामील झालेले होते.

जालियानवाला बागेविषयीच्या पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या राजकारणामागे येऊ घातलेल्या पंजाबच्या विधानसभा निवडणुका आहेत. ते इतर निवडणुकांप्रमाणे पंजाबमध्येही स्थानिय लोकांच्या भावनांचा वापर करू पाहत आहेत. ऐतिहासिक व्यक्ती किंवा ऐतिहासिक स्मृती यांच्या नावावर लोकांना मोहित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत त्यांनी अशाच प्रकारे सुभाषचंद्र बोस आणि रवीन्द्रनाथ टागोर यांचा वापर केला होता, हे आपण पाहिलेलं आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

इतिहासकार आणि विद्वानांना वाटतंय की, जालियानवाला बागेच्या नुतनीकरणामागे अज्ञान आहे. त्यांना वाटतंय की, ही व्यापारी प्रभावाखाली येऊन केलेली इतिहासाची मोडतोड आहे.

पण हे एवढंच प्रकरण आहे?

अज्ञान आणि मोडतोड या दृष्टीकोनातून पाहणाऱ्या इतिहासकार आणि राजकीय नेत्यांचा राग मुख्यत्वेकरून ऐतिहासिक पुराव्यांबाबत आहे. बागेत प्रवेश करताना लागणाऱ्या अरुंद गल्लीचं रूप बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. हीच अरुंद गल्ली बंद करून जनरल डायरने गोळ्यांचा वर्षांव करून शेकडो भारतीयांचा बळी घेतला होता. गोळीबारानंतर जखमी झालेल्या अनेकांनी या गल्लीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता, काहींवर तर तिथेच मृत्युने झडप घातली होती.

या गल्लीच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर भित्तीचित्रं काढली आहेत, खाली फरशा बसवल्या आहेत आणि वर फायबरचं छत टाकलंय. त्यामुळेही लोकांमध्ये नाराजी झाले आहे. विद्वानांचं म्हणणं आहे की, भित्तीचित्रांमध्ये जे दाखवलं गेलं आहे, त्याचा वास्तवाशी कुठलाही संबंध नाही. उलट ती चित्रं नरसंहाराशी जोडल्या गेलेल्या संवेदना नष्ट करणारी आहेत.

जीव वाचवण्यासाठी लोकांनी ज्या विहिरीत उड्या टाकल्या होत्या, तिच्याभोवती काचांचं संरक्षण करण्यावरूनही नाराजी आहे. लोकांचं म्हणणं आहे की, ‘लाइट अँड साउंड’ कार्यक्रम आणि सुशोभीकरणामागचा उद्देश पूर्णपणे या बागेचं पर्यटनस्थळ करणं हा आहे. त्यामुळे ‘स्मारका’ऐवजी जालियानवाला बाग ‘पिकनिक स्पॉट’ म्हणून ओळखली जाऊ लागेल.

जालियानवाला बाग नरसंहारावर संशोधन करणारे लंडनस्थित इतिहासाचे प्राध्यापक के. एम. वॅगनर यांनी तर असंही म्हटलंय की, नरसंहाराची आठवण उजागर करणारं अगदी शेवटचं चिन्ह पूर्णपणे नष्ट करण्यात आलंय. काही लोक या प्रकाराकडे इतिहासाला ग्लॅमरस आणि रंजक करण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहत आहेत.

काही जण जपानमधील हिरोशिमा आणि जर्मनीतील छळछावण्यांचं संरक्षणाचं उदाहरण देत आहेत. तिथं प्रत्यक्षातल्या रचनेत अशा प्रकारे कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. तिथं गेल्यावर तुम्हाला त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अ-मानवीय घटनांची वेदना पाहायला मिळते.

पण ही चूक खरोखरच ऐतिहासिक वारश्याच्या संरक्षणाची समज नसल्यामुळे आणि व्यावसायिक दृष्टीकोनामुळे झाली आहे का? काही लोक तर स्वत:ला निष्पक्ष टीकाकार आणि काँग्रेसपेक्षा वेगळं दाखवण्याच्या धडपडीत १९६१मध्ये पंडित नेहरू यांच्या काळात बनवलेल्या या स्मारकालाच एक प्रकारची इतिहासाची मोडतोड मानू लागले आहेत. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की, या स्मारकाचा आराखडा अमेरिकन आर्किटेक्ट बेंजामिन पोल्क यांनी बनवला होता, त्यांची तुलना सध्याच्या नुतनीकरणामध्ये सामील असलेल्या लोकांशी केली जाऊ शकत नाही. तेव्हा या आंदोलनाचे एक नेते सैफुद्दीन किचलू हयात होते आणि स्मारकाच्या ट्रस्टचे सदस्यही होते.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आत्ताचे नुतनीकरण अहमदाबादच्या ज्या कंपनीनं केलं आहे, ती कॉमिक बुक आणि गेम्स तयार करण्याचे काम करते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या कंपनीला डायनासोर म्युझियम, बापू म्युझियम यांसारखी अनेक म्युझियम बनवण्याचं काम देण्यात आलं होतं. मोदींना कॉर्पोरेट जगतात प्रस्थापित करणाऱ्या ‘व्हायब्रंट गुजरात’ या मोहिमेचं ‘महात्मा गांधी कन्व्हेंशन सेंटर’ हे आयोजनस्थळ काचा, प्रकाश आणि थ्रीडी दृश्यांच्या साहाय्यानं सजवून गांधींनी बाजारात उभं करण्याचं कामही याच कंपनीला देण्यात आलं होतं. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कंपनीला दिल्लीच्या पोलीस म्युझियम आणि पुण्याच्या आगाखान पॅलेसचंही काम मिळालं.

संघपरिवाराने जालियानवाला बागेतल्या नरसंहाराच्या कहाणीला सफाईदारपणे हिंदुत्वाचा रंग दिला आहे, या सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्याकडे नुतनीकरणावर टीका करणाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्याचबरोबर संघपरिवाराने तत्कालीन इतिहासाची मोडतोड केली आहे आणि स्वातंत्र्य आंदोलनातली काँग्रेसची भूमिका कमीत कमी कशी दिसेल, याचा प्रयत्न केला आहे. या नुतनीकरणातला ‘लाइट अँड साउंड’ कार्यक्रम त्याच एकमेव उद्देशातून बनवण्यात आलाय. त्यात रॉलेट अक्टविरोधी आंदोलनात दिसलेली हिंदू-मुस्लीम एकता, काँग्रेसच्या नेतृत्वातून पुढे आलेली प्रतिकाराची लाट आणि ब्रिटिश सरकारचं दमन, याऐवजी धार्मिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. रॉलेट अक्ट विरोधी आंदोलनात हिंदू-मुस्लीम एकतेचं अभूतपूर्व रूप पाहायला मिळालं होतं, याचा त्यात साधा उल्लेखही नाही.

पहिल्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनानं नवं रूप घेतलं होतं, त्याचाही या कार्यक्रमात उल्लेख नाही. महायुद्धावरून परतलेल्या सैनिकांमुळे पंजाबमध्ये स्पॅनिश फ्लू आणि बेरोजगारी यांनी लोकांना जेरीला आणलं होतं. हा वाढता असंतोष आणि काँग्रेससारख्या सुशिक्षितांचा पक्ष सर्वसामान्य लोकांचा कसा बनला, हे सांगण्याऐवजी रासबिहारी बोस आणि गदर पार्टीची कहाणी दाखवण्यात आलीय. उघड आहे की, काँग्रेसची प्रमुख भूमिका नामशेष करण्यासाठी हा सगळा बनाव रचण्यात आलाय. अहिंसा आणि सत्याग्रहाचे गांधीजींचे विचारच स्वातंत्र्यलढ्याची मुख्य विचारधारा होती, हे नाकारण्याचाही प्रयत्न यामागे दिसतो. गांधीजींचं नाव घेऊ घेत त्यांच्या विचारांचं समूळ निर्मूलन हा संघपरिवाराचा अजेंडाच आहे.

या कार्यक्रमात लोक वैशाख पौर्णिमेनिमित्त बागेत जमले होते आणि त्यांना अमृतसरमध्ये मार्शल लॉ लागू झालाय याविषयी माहिती नव्हती, हे साम्राज्यवादी इतिहासकारांचंच मत अधोरेखित करण्यात आलंय.

भारत-पाक फाळणीविषयीच्या म्युझियमसाठी ट्रस्ट चालवणाऱ्या आणि जालियानवाला बाग नरसंहारावर संशोधन करणाऱ्या किश्वर देसाईंनी या बागेला आधीच्या स्वरूपातच ठेवण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, नरसंहाराच्या तीन दिवस आधी, म्हणजे १० एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमध्ये ब्रिटिश भारतीयांना मारत होते आणि ठिकठिकाणी चिता जळत होत्या. शहरभर कर्फ्यु होता आणि सगळे रस्ते बंद करण्यात आले होते. त्यांनी पुढे असंही म्हटलंय की, लोकांना हे माहीत होतं की, ते एका राजकीय सभेला जात आहेत आणि त्यात जोखीम आहे. त्या म्हणतात – भित्तीचित्रांत दाखवलेली वैशाख पौर्णिमेसाठी आलेल्या हसऱ्या स्त्री-पुरुषांची चित्रं चुकीची आहेत. त्याचं म्हणणं आहे की, एखादी मुलगी बागेत आल्याचा आणि महिलांच्या सभेत सामिल झाल्याचा कुठलाही पुरावा नाही.

इतिहासकार के. एम. वॅगनर यांनी म्हटलंय की, बागेत जमलेले लोक अहिंसेच्या मार्गानं आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत होते.

प्रत्यक्षात वाढत चाललेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते सैफुद्दीन किचलू आणि डॉ. सत्यपाल यांना अटक करण्यात आली होती. १३ एप्रिलची सभा त्यांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी बोलावण्यात आली होती.

‘लाइट अँड साउंड’ कार्यक्रमात नरसंहारानंतरच्या घटना केवळ क्रांतिकारी शब्दांत सांगून त्यालाही जातीय रंग दिला गेलाय. त्यात खिलाफत, असहकार आंदोलन या आंदोलनांविषयी आणि रॉलेट अक्ट, प्रेस अक्ट आणि जनतेच्या अधिकारांचं हनन करणाऱ्या इतर कायद्यांच्या वापसीविषयी काहीच नाही. १९१९मध्ये पंजाबचे गव्हर्नर राहिलेल्या आणि जनतेवर जुलूम करणाऱ्या मायकेल ओडायरची १९४० साली लंडनमध्ये हत्या करणाऱ्या शहीद उधमसिंग यांना या कार्यक्रमात ‘शहीद शीख’ असं संबोधण्यात येतं.

पंतप्रधानांच्या भाषणातून भाजपचं सांप्रदायिक आख्यान जास्त स्पष्टपणे अधोरेखित झालं. ते जालियानवाला बागेबरोबरच भारत-पाक फाळणीचीही आठवण करून देतात आणि सांगतात की, पंजाबला काय काय सहन करावं लागलं. त्याच वेळी ते अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणण्यासाठी चालवल्या जात असलेल्या ‘ऑपरेशन देवीशक्ती’ची माहिती देतात आणि ‘नागरिकता दुरुस्ती कायद्या’चं नाव न घेता म्हणतात की, अशा परिस्थितीत पिडल्या गेलेल्या आपल्या लोकांसाठी नवे कायदे बनवले आहेत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

नुतनीकरणाच्या विरोधात राहुल गांधींची प्रतिक्रिया आल्यानंतरही पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगांनी स्मारकाच्या नुतनीकरणाचं समर्थन केलं आहे. ते या स्मारकाच्या ट्रस्टचेही सदस्य आहेत. उघड आहे की, ते जातीय भावना पसरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपला यावरून भांडवल करण्याची संधी देण्याच्या विरोधात आहेत.

जातीय राजकारणाला मोडीत काढण्याचा सेक्युलर मार्ग त्यांच्याकडे नाही.

स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची मोडतोड करण्याची आणि तो हिसकावून घेण्याची संघपरिवाराची मोहीम हाणून पाडण्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडे कुठलंच धोरण नाही. मोदी गुजरातचे मार्केटिंग मॅनेजर आणि कॉर्पोरेटसच्या मदतीनं हे अभियान पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://hindi.newsclick.in या पोर्टलवर ३ सप्टेंबर २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

https://hindi.newsclick.in/Jallianwala-Bagh-Modi-RSS-Agenda-of-Communalization

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

जलियाँवाला बाग हत्याकांड : भारतातल्या ब्रिटिश साम्राज्याच्या शेवटाची सुरुवात…

भगतसिंगांनी ९२ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख - ‘धर्मांध दंगली व त्यावरील उपाय’

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा