महाराष्ट्रातल्या महापुरामागे ‘जागतिक तापमावाढ’ व ‘हवामान बदल’ आहे…
पडघम - राज्यकारण
कुंडलिक विमल वाघंबर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 26 July 2021
  • पडघम राज्यकारण तापमानवाढ हवामान बदल पूर महापूर पाऊस

गेल्या काही दिवसांत सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, चिपळूण, महाड इत्यादी भागांत प्रचंड पाऊस पडल्याने महापूर आलेला आहे. १००पेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला, हजारो लोक बेघर झाले अन हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. हे डोळ्यांना दिसणारे नुकसान आहे, न दिसणारे नुकसान यापेक्षा कितीतरी अधिक आहे. आता या भागातील लोकांना आपले जगणे परत रुळावर आणण्यासाठी काही वर्षे घालावी लागतील.

हे फक्त महाराष्ट्रात घडत नाहीये. उत्तराखंडमध्ये अशा घटना गेल्या महिन्यात दोन वेळा घडल्या आहेत. चीनमध्ये हनान प्रांतात एका दिवसात प्रचंड पाऊस पडला. तो एवढा होता की, चीनमध्ये दरवर्षी जेवढा सरासरी पाऊस पडतो, तेवढा या एका दिवसात एका प्रांतात पडला. सर्व जीवन अस्ताव्यस्त झाले. युरोपमध्ये जर्मनी व इतर देशांत आलेल्या महापुरात शेकडो लोक मेले. बर्फाच्छादित कॅनडामध्ये ५० सेल्सिअसपर्यंत तापमान गेले, जे आपल्याकडे चंद्रपूरमध्ये जाते. तिथल्या जनतेला एवढ्या तापमानाची सवय नसल्याने शेकडो लोकांनी आपला जीव गमावला. या उष्णतेच्या लाटेमुळे अमेरिकेतील लाखो हेक्टर जंगल जळून खाक झाले.

या सर्व घटना गेल्या काही दिवसांतील आहेत. त्यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. या सर्व घटनांमागे ‘जागतिक तापमावाढ’ व ‘हवामान बदल’ आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या कारणावर गंभीर चर्चा होणे आवश्यक आहे. कारण गेल्या तीन-चार वर्षांपासून हे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पूर आला की, लोकांच्या दुर्धर अवस्थेची, त्यांच्या सहनशीलतेची कसोटी लागते. आठवडाभर नेत्यांना शिव्या देणे, राजकारणाविषयी मानहानीकारक बोलणे, असे प्रकार घडतात. असंतोषाच्या भीतीने काहीतरी मलमपट्टी केली जाते अन् मग हळूहळू सगळे मागे पडते. परिस्थिती जरा स्थिरस्थावर झाली की, पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’. तसे होऊ द्यायचे नसेल तर आपल्याला पुरामागील कारणांचा गंभीर विचार करावा लागेल अन् त्याच्यावर उपाय करावे लागतील.

सध्या अलमट्टी धरणाचे व इतर कारणे सांगितली जात आहेत. पण त्यापेक्षा महत्त्वाचे कारण आहे - जागतिक तापमानवाढ. हवामान बदलामुळे कमी काळात प्रचंड पाऊस पडण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढलेले आहे. आपल्या देशात सरासरी दरवर्षी ११०० मिलिमीटर पाऊस पडतो. २००५ साली मुंबईत एका दिवसात ९५० मिलिमीटर पाऊस झाला होता. म्हणजे भारतात एका वर्षात जेवढा पाऊस पडतो, त्याच्या ८० टक्के पाऊस एका दिवसात एका शहरात पडला होता. आता गेल्या चार दिवसांत सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या भागांत वर्षभर जेवढा पाऊस पडतो, त्याच्या २५ टक्के पाऊस एकाच दिवसात पडला आहे. महाबळेश्वरला एका दिवसात ४८० मिलिमीटर, तर जव्हारला ४५० मिलिमीटर पाऊस झाला. एका दिवसात ४०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस या भागात पाच ठिकाणी झाला.

देशातील सर्वाधिक पाऊस मेघालयमधील चेरापुंजी या ठिकाणी होतो. गेल्या तीन वर्षांत महाबळेश्वरने चेरापुंजीला मागे टाकले आहे. आता रत्नागिरी चेरापुंजीला मागे टाकते आहे. गेल्या दीड महिन्यात रत्नागिरीमध्ये २६५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. कमी वेळात प्रचंड पाऊस पडल्याने पूर येण्याची शक्यता प्रचंड वाढते. तेच गेल्या काही वर्षांत आपण पाहत आहोत. बाकी कारणे याआधीही होती, पण म्हणून काही एवढी पुरांची संख्या नव्हती.

आपण जे विकासाचे मॉडेल स्वीकारले आहे, त्याचे दोन मोठे परिणाम झाले आहेत. एका बाजूला मोठे- मोठे उद्योग आपण उभारले आहेत. त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनाओक्साईड इत्यादी तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरणारे वायू आपण वातावरणात सोडत आहोत, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा विनाश चाललेला आहे. खाणकाम, खनिजे इत्यादीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे, घातक रसायने नदीत सोडल्याने नद्या प्रदूषित होत आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

गेल्या १०० वर्षांत भारतातील तापमान १.२ सेल्सिअसने वाढलेले आहे. तापमान वाढल्याने बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. समुद्राचे बाष्पीभवन वाढले आहे. त्यामुळे ढगफुटीचे, कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२१ या चालू वर्षात आत्तापर्यंत २१ वेळा ढगफुटीच्या घटना फक्त दोन राज्यांत घडल्या आहेत. गेल्या ४० वर्षांत ४०० टक्क्यांनी पुराचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये १४ जिल्ह्यांत कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण ६०० ते ९०० टक्क्यांनी वाढले आहे.

कमी वेळात प्रचंड पाऊस पडल्यास पूर येण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्याला थोपवणे खूप कठीण आहे. दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे आपण पर्यावरणाचा, नद्यांचा विनाश करून शहरीकरण केले आहे, विकास केला आहे, त्यामुळे आगीत तेल ओतले गेले आहे. आग लागली आहे, ती तापमानवाढीमुळे अन् ती विझवण्याचे काहीही नियोजन आपल्याकडे नाही. उलट त्या आगीचा अजून भडका कसा उडेल, याची आपण तयारी केली आहे.

या काळात फक्त पुराचे प्रमाण वाढलेले नाही तर चक्रीवादळ, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा इत्यादी घटनाही वाढलेल्या आहेत. भारतातील एकूण क्षेत्रापैकी ३० टक्के क्षेत्राचे वाळवंटीकरण झाले आहे. एका वर्षात भारतात ६६ लाख वेळा वीज पडली आहे. त्यात शेकडो लोकांचा प्राण गेला आहे. केरळमध्ये एका वर्षी महापूर आला होता, तर त्याच वर्षी तिथे पाण्याचे संकटही निर्माण झाले होते. IMDचा एक अभ्यास सांगतो की, महारष्ट्रामध्ये एका बाजूला कोकण आणि सांगली, सातारा, कोल्हापूर पट्ट्यामध्ये पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, तर दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्र, धुळे, जळगाव व मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. या घटनांमुळे दरवर्षी हजारो लोक मरत आहेत. त्यातून दरवर्षी प्रचंड नुकसान होत आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

आपण यातून काहीचे शिकलो नाही, पर्यावरणाचा विनाश असाच चालू राहिला, तर येत्या ३० वर्षांत भारतातील ७८ शहरे पाण्यात बुडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सुदैवाने अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्याला विकासाचे मॉडेल बदलावे लागेल. मोठ्या व पर्यावरणाचे विनाश करणाऱ्या उद्योगांपेक्षा लहान शहरांत, गावांत लहान-लहान पर्यावरण पूरक उद्योग उभे करावे लागतील. पर्यावरणाला सोबत घेऊन विकास करावा लागेल. आणि हे करणे सहज शक्य आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक जीवनपद्धतीचा अवलंब करावा लागेल.

संदर्भ -

१) Indian metrological department (IMD)

२) Down to earth articles and reports

..................................................................................................................................................................

लेखक कुंडलिक विमल वाघंबर लोकायत संघटना (पुणे)चे कार्यकर्ता आहेत.

kundalik.dhok@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा