नाही पापलेट, नाही सुरमई; म्हणून का तुम्ही साहित्य संमेलनाकडे फिरकत नाही?
पडघम - साहित्य संमेलन विशेष
टीम अक्षरनामा
  • चित्र - सतीश सोनवणे
  • Sat , 04 February 2017
  • साहित्य संमेलन Sahitya Sammelan आगरी युथ फोरम Agri Youth Forum सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल Savlaram Maharaj Sport Complex

डोंबिवलीत भरलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा पहिला दिवस फ्लॉप गेला. ना उदघाटनाच्या कार्यक्रमाला गर्दी होती, ना पुस्तक प्रदर्शनाला, ना इतर कार्यक्रमांना, ना खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर... सगळीकडे शुकशुकाट होता. आगरी युथ फोरमने हे संमेलन आयोजित करूनही पापलेट, बांगडे, सुरमई, कोळंबी, रावस, मोरी, चिंबोरी यापैकी काहीच जेवणात नाही. म्हणून कदाचित हा प्रकार घडला असावा. जे साहित्यरसिक आले त्यांनाही बहुधा इथं दरवर्षी प्रमाणे आगरी युथ फोरमने खाद्यमहोत्सव भरवला असावा असेच वाटले असावे. डोंबिवलीमध्ये १३९ वर्षांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांचा उत्साह सळसळायला हवा होता. ठाण्यासापासून बदलापूर-कर्जतपर्यंत मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर आहेत, असं सांगितलं जातं. शिवाय मराठी माणूस साहित्यप्रेमी असल्याचीही जपमाळ ओढली जाते. पण साहित्यप्रेमी मराठी माणसांना साहित्य संमेलनाकडे फिरकावंसं वाटलं नाही. खुद्द डोंबिवलीतील साहित्य रसिकही फारसे फिरकले नाहीत.

असं का झालं असावं? त्याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे आयोजक संस्थेनं डोंबिवली शहरात या संमेलनाची पुरेशी जाहिरात केलेली नाही. महत्त्वाच्या रस्त्यावर मोठ्या कमानी उभारायला हव्या होत्या. मोठ्या चौकांमध्ये मोठे फ्लेक्स लावायला हवे होते. संमेलनस्थळाशेजारच्या परिसरात तर विशेष सजावट करायला हवी होती. पण तसं काहीही केलेलं नाही. त्यामुळे डोंबिवलीमध्ये यंदाचा सर्वांत मोठा साहित्य महोत्सव भरला आहे, याची फारशी कुणाला खबरबात नाही. रिक्षावाल्यांना तर साहित्य संमेलन नावाची गोष्टही फारशी माहीत नाही. पण त्यांना घरडा सर्कल, रोटरी गार्डन किंवा म्हात्रे क्रीडा संकुल मात्र व्यवस्थित माहीत आहे. पण याच परिसरात होत असलेल्या संमेलनाविषयी मात्र फारशी काही माहिती नाही. असो.

संमेलनाचं सुंदर व कल्पक प्रवेशद्वार. त्याच्याकडे पाहताच साहित्याचं संमेलनाचा मूड तयार होतो. पुस्तकांच्या चिदघोषाची खूण पटते.

पण त्या प्रवेशद्वाराचं जरा लांबून छायाचित्र घेतलं तर काय दिसतं? हे पहा.

संमेलनात हौश्या-नवश्या-गवश्यांची गर्दी होतेच होते. खास त्यांच्यासाठी मुख्य मंडपासमोर ही लेखणीची भव्य प्रतिकृती उभारली आहे. त्याला दोन्ही बाजूंनी पायऱ्या आहेत. जेणेकरून ज्यांना वर जाऊन सेल्फी काढायचा आहे किंवा त्याच्या साक्षीने सेल्फी काढायचा आहे, त्यांची सोय व्हावी. पण सेल्फी काढणाऱ्यांची संख्यासुद्धा तुरळक म्हणावी इतकी विरळ होती.

मुख्य मंडपात संमेलनाचा उदघाटन सोहळा सुरू झाल्यानंतरचं हे छायाचित्र. उदघाटनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले. हिंदीतील ज्येष्ठ साहित्यिक विष्णू खरे, माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस आणि विद्यमान संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे आदी मंडळी व्यासपीठावर होती. पण व्यासपीठासमोर मात्र ही अशी गर्दी होती.

मुख्य मंडपाचंच हे उजव्या बाजूनं घेतलेलं छायाचित्रं. लालभडक खुर्च्या साहित्यरसिकांची वाट पाहत ताटकळून गेल्या आहेत.

हे डाव्या बाजूचं छायाचित्र. ये लाल रंग कब मुझे छोडेगा!

हे लेखणीची जी भव्य प्रतिकृती आहे, तिच्यावर चढून घेतलेलं छायाचित्र. हे मुख्य मंडपाच्या बरोबर मध्यभागाचं आहे. तिथंही ही अशी अवस्था आहे.

हे लेखणीची जी भव्य प्रतिकृती आहे, तिच्यावर चढून उजव्या बाजूचं घेतलेलं छायाचित्र.

उदघाटन सोहळा संध्याकाळी सुरू झाला. पण काल दुपारपासून आपापले पुस्तकांचे स्टॉल्स खपून तयार करणाऱ्या, सजवणाऱ्या विक्रेत्यांनी सकाळी सात-आठपासून साहित्यरसिकांची वाट पाहायला सुरुवात केली. पण तिथंही हा असा शुकशुकाट होता. त्यात हे छायाचित्र तर महानुभाव साहित्याची पुस्तकं विकणाऱ्या स्टाॅलचे. त्याकडे फिरकणाऱ्या साहित्यरसिकांची संख्या तर अजूनच कमी.

लोखंडी शेल्फांमध्ये ओळीने बसलेल्या या पुस्तकांवर दिवसभर साहित्यरसिकांची वाट पाहण्याची वेळ आली. लोक येतील आपल्याला पाहतील, हाताळतील, आवडलो तर घरी घेऊन जातील आणि जमलं तर वाचतील, हे या पुस्तकांचं आणि त्यांच्या विक्रेत्यांचं स्वप्न पहिल्या दिवशी तरी काहीसं विरून गेलं.

उदघाटन समारंभाला नाही, पुस्तक प्रदर्शनाला नाही, निदान खाण्यापिण्याच्या स्टॉल्सवर तरी साहित्यरसिकांनी गर्दी करावी की नाही? तर तिथंही ही अशी दारुण अवस्था. लोक निवांत गप्पा मारले उभे आहेत किंवा चहा पित.

 शुक्रवार होता. त्यामुळे गर्दी कमी होती. उद्या आणि परवा सुट्ट्या असल्यामुळे गर्दी वाढेल असं आयोजकांकडून सांगितलं गेलं. शाळा-महाविद्यालयाची मुलं आज संमेलन पाहायला येणार आहेत. त्यामुळे आज तरी गर्दी वाढेल असा वहिम आहे.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

अली खान महमुदाबाद यांच्या पोस्टमुळे धोका नाहीय, तर कुणी टीका केली की, ज्या प्रकारे त्याचा ‘आवाज बंद’ करण्याचा संघटित प्रयत्न होतोय, त्याचा(च) ‘खरा धोका’ आहे

काही वेळा काही गोष्टी आपल्याला वाटतं तशा नसतात, आणि काही वेळा आपल्याला जे सांगितलं गेलं किंवा जे आपण शिकलो, ते चुकीचंच होतं, असं वाटायला लागतं. कारण काही अतिज्ञानी लोक अगदी त्याच्याविरुद्ध काहीतरी सांगतात आणि आपल्याला हे कसं कळलं नाही, किंवा कुणी निदान सांगितलं का नाही, असं वाटायला लागतं. या अतिज्ञानी लोकांना ते कसं कळतं, कुणास ठाऊक! पण होतं काय की, त्यांच्या या (अगाध) ज्ञानप्रकाशामुळे आपल्याला दिपून जायला होतं.......

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका, अशा ‘पाटा-वरवंट्या’खाली युरोप चिरडला जात आहे

युरोपमधील एके काळच्या दोन सामर्थ्यवान देशांतल्या निवडणुका नुकत्याच जवळजवळ एकाच वेळी पार पडल्या. दोन्ही देशांत सत्ताधारी पक्षांचा दारुण पराभव झाला. त्यावरून ‘सत्ताधारी पक्षांविरुद्ध बंड’ (anti-incumbancy) असं उथळ निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी केलं आहे. हे बंड कुठल्या एका पक्षाविरुद्ध नसून परिस्थितीविरुद्ध होतं. आणि या परिस्थितीला सर्व मुख्य पक्ष जबाबदार आहेत, या भावनेतून जनतेनं सर्वच मुख्य पक्षांना झिडकारलं.......