‘देशभक्ती’ कशाला म्हणतात, हे स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते!       
पडघम - देशकारण
अनिल जैन
  • स्वामी विवेकानंद
  • Mon , 18 January 2021
  • पडघम देशकारण स्वामी विवेकानंद Swami Vivekanand स्वामी विवेकानंद जयंती Swami Vivekananda Jayanti देशभक्ती Patriotism भाजप BJP संघ RSS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची सर्वांत मोठी अडचण ही आहे की, ज्याला त्यांच्या संघटनेबाहेर मान्यता किंवा आदर आहे असा त्यांच्याकडे स्वतःचा ‘महापुरुष’ नाही. त्यांचे स्वत:चे ‘महापुरुष’ मर्यादेपेक्षा जास्त वापरले जाऊ शकत नाहीत, कारण असे केल्याने राष्ट्रीय चळवळीदरम्यान केलेली ‘कर्मे’ उघडी पडतात. म्हणूनच गेली काही दशके भारतातील महापुरुष आणि राष्ट्रनायकांचे ‘अपहरण’ करून त्यांच्या विचारधारेचे वाहक म्हणवून घेण्यासाठी हास्यास्पद मोहिमा राबवल्या जात आहेत.

या संदर्भात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी अनेक नावांचा ते वेळोवेळी आपल्या सोयीनुसार वापर करत असतात. स्वामी विवेकानंद (जन्म : १२ जानेवारी १८६३ - मृत्यू ४ जुलै १९०२) यांचे नावही अशा महानायकांपैकी एक आहे. १९६०-७०च्या दशकात संघाचे तत्कालीन सरसंघचालक एम.एस. गोलवलकर यांनी विवेकानंदांना त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे ‘प्रतीक’ बनवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू केला, जो आजही कायम आहे.

गंमतीची गोष्ट म्हणजे जात आणि जातद्वेषी राजकारणाच्या संस्कारात वाढलेले आणि पंतप्रधान बनलेले नरेंद्र मोदी यांनाही आता विवेकानंदांचे ‘अवतार’ म्हटले जात आहे. विकाऊ आणि चमचेगिरी करणाऱ्या वर्तमानपत्रांत ‘नरेंद्र ते नरेंद्र’ या शीर्षकाखाली भाजपनेत्यांचे लेख छापले जात आहेत.

११ सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो (अमेरिका) येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपल्या ऐतिहासिक वक्तव्याद्वारे भारताचा जागतिक विचार पुढे ठेवत हिंदू धर्माचा उदारमतवादी चेहरा जगासमोर नेला. त्यांच्या भाषणाचे साऱ्या जगाने कौतुक केले. त्या परिषदेत विवेकानंद म्हणाले, “सांप्रदायिकता, कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाने गेल्या अनेक वर्षांपासून या सुंदर भूमीला आपल्या पाशात अडकवून ठेवलं आहे. यामुळेच धर्माच्या नावावर हिंसाचार झाले आहेत. अनेकदा ही पृथ्वी धर्माच्या नावाने झालेल्या हिंसाचारामुळे रक्तरंजित झाली आहे. यामुळे किती संस्कृती आणि किती देश नष्ट झाले, याची गणतीच नाही. असे जर नसते तर मानव समाज आजच्यापेक्षा कितीतरी प्रगत झाला असता.”

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

स्वामी विवेकानंद हे पूर्णपणे आध्यात्मिक व्यक्ती आणि भारतीयतेचे क्रांतिकारी अग्रदूत  होते. त्यांचे हिंदुत्व हे दांभिक आणि कर्मकांडाविरुद्ध असून दलित आणि कामगारांना  सर्वांगीण सामाजिक न्याय देणारे होते. त्यांना भारतीय अध्यात्म आणि भौतिक विकासाची इच्छा होती. त्यांच्या विचार-आचारात जातीय आणि वांशिक द्वेषाला अजिबात स्थान नव्हते. समकालीन राजकारणापासून ते दूर राहिले असले तरी, त्यांचा धर्म सामाजिक सामर्थ्याच्या प्रश्नांशी सतत संघर्ष करत राहिला. म्हणूनच राजकारणाबद्दल वैमनस्य बाळगणारे विवेकानंद हे अनेक राजकीय कार्यकर्त्यांसाठी ‘प्रेरणास्थान’ राहिले. याच कारणामुळे धर्माच्या आडून शोषणात्मक सामाजिक शक्ती अबाधित ठेवण्याचा कुटील हेतू असलेल्यांनी या योद्धा-संन्याशाला त्यांच्या विचारधारेचे पूर्वज म्हणून आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही ते करत आहेत, जेणेकरून त्यांची प्रखर सामाजिक जाणीव छद्म सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या बाजूने वापरता येईल.

विवेकानंदांना या धोक्याची जाणीव असल्याने त्यांनी ‘जाती, संस्कृती आणि समाजवाद’ या त्यांच्या प्रसिद्ध व्याख्यानात असे म्हटले आहे – “काही लोक हे देशभक्तीबद्दल खूप बोलतात, परंतु हृदयाचा भावाबाबत कोणी काहीच बोलत नाही. हे पाहिल्यानंतर आपल्या मनात कोणते भाव येतात. देवता आणि ऋषीचे वारस म्हणून आपण पशूसारखे किती दिवस जगत आहोत. देशावर पसरलेल्या अज्ञानाच्या अंधकाराने तुमचे मन अस्वस्थ होत नाही काय? ही अस्वस्थताच आपल्या देशभक्तीचा पहिला पुरावा आहे.”

विवेकानंद राजकारणी नसून संन्याशी होते. समाजाच्या वेदना जाणणारा संन्याशी असल्याने त्यांना हिंदू समाजातील आचार आणि विचार चांगलेच ठाऊक होते. ते एक योद्धा संन्याशी होते, म्हणून त्यांनी हिंदू समाजात असलेल्या  प्रचलित वाईट चालीरिती व रूढी-परंपरा यांच्यावर निर्दयपणे हल्ला केला. हिंदू समाजात आज जो धर्मांधपणाचा धोका वाढत आहे, त्याबाबत विवेकानंदांनी दिलेल्या इशारा आपण समजू शकतो.

‘जात, संस्कृती आणि समाजवाद’मध्ये त्यांनी आपल्या काळातील हिंदू कट्टरपंथवादी आणि ढोंगी धर्मीय लोकांना आव्हान देताना म्हटले आहे – “जेव्हा शूद्रांनी त्यांच्या हक्काची मागणी करण्यासाठी तोंड उघडले, तेव्हा त्यांची जीभ कापली. त्यांना जनावराप्रमाणे वागणूक देण्यात आली. परंतु आता आपण त्यांना त्यांचे हक्क परत करा, अन्यथा जेव्हा ते जागे होतील आणि आपल्याद्वारे (उच्चवर्गाने) केलेले शोषण समजून घेतील, तेव्हा ते तुम्हाला सोडणार नाहीत. हे (शूद्र) लोक - ज्यांनी आपल्याला संस्कृती  शिकवली आहे - तुम्हाला खाली खेचतील. शक्तिशाली रोमन संस्कृती कशी धुळीस  गेली याची कल्पना करा.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आपल्या या व्याख्यानात भारतीयांना चेतावणी देताना विवेकानंद म्हणाले, “शेकडो वर्षे आपल्या डोक्यावर अंधश्रद्धेचे ओझे लादून, फक्त युगानुयुगे कोणत्या अन्नाला स्पर्श करावा व कोणत्या नाही आणि कोणत्या सामाजिक गोष्टीवर चर्चा करायची, यावर आपले सामर्थ्य घालून सर्व माणुसकीला अत्याचाराखाली ठेचून तुम्ही काय साध्य केले आहे आणि आज तुम्ही काय करत आहात?

या पहिल्यांदा माणूस बनूया आणि जे आपल्या प्रगतीविरुद्ध नेहमीच उभे राहिलेल्या पुरोहितांना बाहेर काढूया. ते कधीच स्वत:ला सुधारू शकले नाहीत आणि त्यांचे हृदय कधीच विशाल बनू शकले नाही. शतकानुशतके अंधविश्वास व जुलूमशाहीचे ते निर्माते आहेत. म्हणून प्रथम पुरोहितशाही नष्ट करा, आपले संकुचित विचार-संस्कार सोडा, मनुष्य व्हा आणि यातून बाहेर पहा. इतर राष्ट्रे पुढे कशी जात आहेत ते पहा.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या संघटना जातीय द्वेषाच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून धर्मपरिवर्तनाबद्दल खूपच आकांडतांडव करतात. याबाबत विवेकानंदांनी हे कबूल केले आहे की, भारतात मुस्लीम राज्यकर्त्यांच्या आगमनानंतर देशातील लोकसंख्येचा एक मोठा भाग असलेल्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता, पण त्याच वेळी ते म्हणतात की, हे सर्व काही तलवारीच्या बळावर झाले नाही.

त्यांनी म्हटले आहे, “भारतातील मुस्लीम विजयाने उत्पीडित, शोषित आणि गरीब लोकांना स्वातंत्र्य उपभोगायला  मिळाले आणि म्हणूनच देशातील लोकसंख्येचा पाचवा हिस्सा असलेले लोक मुस्लीम झाले. तलवारीने आणि जबरदस्तीने हिंदूंनी इस्लाम धर्म स्वीकारला हा विचार करणे मूर्खपणाशिवाय दुसरे काही नाही. खरे हे आहे की, ज्यांनी इस्लामचा स्वीकार केला त्यांना जमीनदार आणि पुरोहितांच्या तावडीतून मुक्त व्हायचे होते. हिंदूंपेक्षा बंगालमधील मुसलमानांची संख्या अधिक आहे, कारण बंगालमध्ये बहुसंख्येने जमीनदार होते.” (संदर्भ -  ‘स्वामी विवेकानंदाचे निवडक लेख’, खंड ३, १२ वी आवृत्ती, १९७९, पृ. २९४)

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हिंदूंच्या राष्ट्रवादाचे ध्वजधारक मुस्लिमांबद्दल असलेल्या त्यांच्या तिरस्कारयुक्त विचारसरणीला कायदेशीर ठरवण्यासाठी बऱ्याच काळापासून स्वामी विवेकानंद यांचे नाव वापरत आले आहेत. पण विवेकानंदांना अशा लोकांची संकुचित मानसिकता आणि मुस्लिमांबद्दलच्या त्यांचे असलेले वैमनस्य चांगले परिचित असल्यामुळे त्यांनी म्हटले होते, “या अनागोंदी आणि विसंवादाच्या बाबतीतही माझ्या मनात उमटणारे संपूर्ण भारताचे जे चित्र उभे राहते आहे, ते आत्मविश्वासी आणि अद्वितीय आहे. त्यात वैदिक मन (ज्ञान) आणि इस्लामिक शरीर असेल.” इस्लामिक शरीरानुसार त्याचा अर्थ वर्ग आणि जातीविहीन समाज असा होता.

आज परिस्थिती अशी आहे की, जर स्वामी विवेकानंद आज जिवंत असते तर त्यांचा उपदेश ऐकून हिंदू कट्टरतावादाच्या प्रचारकांनी त्यांना ‘छद्म धर्मनिरपेक्षवादी’, ‘शहरी नक्षलवादी’ किंवा ‘हिंदूविरोधी’ ठरवले असते आणि त्यांना ‘पाकिस्तानात जाण्या’चाही सल्ला दिला असता. कारण ज्याप्रमाणे त्यांना गांधी, आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांना समजून घेणे शक्य नाही, त्याचप्रमाणे विवेकानंदांनाही समजून घेणे शक्य नाही, तर अशक्य आहे.

..................................................................................................................................................................

लेखक अनिल जैन वरिष्ठ पत्रकार आहेत.

अनुवादक प्रा. प्रियदर्शन भवरे हे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे समाजशास्त्राचे अध्यापन करतात.

priyadarshan1971@gmail.com

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख ‘न्यूज क्लिक’ या हिंदी पोर्टलवर १२ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा - 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा