समाजाचा खणखणीत आवाज व्हावंसं वाटलं…
पडघम - साहित्य संमेलन विशेष
अनिता यलमटे
  • कथाकार अनिता येलमटे
  • Fri , 03 February 2017
  • अनिता यलमटे Anita Yalmate नवलेखन - मराठी कथा Navlekhan - Marathi Katha राजन गवस Rajan Gawas

साहित्य संमेलन ही मराठी साहित्यविश्वातली एक सर्वाधिक मोठी घडामोड आहे. अनेक लेखक-कवी-कथा\कादंबरीकारांना तिथं व्यासपीठ मिळतं. उद्या त्या व्यासपीठाचे हक्कदार असलेले आणि नुकतेच लिहून लागलेले मराठीमध्ये नवे दमदार कथाकार उदयाला येत आहेत. यातील काहींचं एखाद-दुसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे, तर काहींच्या अवघा पाच-सातच कथा प्रकाशित झाल्या आहेत. पण त्यातून त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढीला लागल्या आहेत. या वर्षीच्या संमेलनात कदाचित या कथाकारांचा नामोल्लेखही होणार नाही, पण यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्या आसाराम लोमटे यांना कथालेखनासाठी मिळाला आहे, त्यांच्या प्रदेशातील म्हणजेच मराठवाड्यातील हे कथाकार आहेत. त्यांची दखल भविष्यात मराठी साहित्यविश्वाला भविष्यात घ्यावी लागेल. त्यातील एका कथाकाराचं हे मनोगत…

-----------------------------------------------------------------------------

नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन गवस यांनी संपादित केलेल्या ‘नवलेखन -मराठी कथा’ या पुस्तकात माझी ‘काकणचोळी’ ही कथा प्रकाशित झाली. त्याची दखल घेत मराठवाडा साहित्य परिषदेने सत्कार व संवाद सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात कथालेखनावर बोलताना विशेष आनंद झाला. आपण का लिहितो? हा प्रश्न माझ्याही मनात अनेकदा येतो. तेव्हा गुदमरलेल्या मनाला मोकळं करत व्यक्त होण्यासाठी लेखणीचा आधार आपण घेतो आहोत, हेही जाणवतं. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या बालपणी अनेक अक्राळविक्राळ अनुभव गाठीशी बांधलेले आहेत. आयुष्याच्या पाऊलवाटेचा महामार्ग होण्यासाठी अनेक उन्हाळे, पावसाळे झेलावे लागतात, तेव्हा कुठे अनुभवांचं मृग नक्षत्र चांगलं बरसतं. मी लिहायला लागले तेव्हा माझी कोणतीही भूमिका तयार झालेली नव्हती किंवा मी कोणत्या चळवळीलाही वाहून घेतलं नव्हतं. मनात शब्दांची गर्दी होत होती. काहीतरी व्यक्त करावंसं वाटत होतं आणि ते कागदावर उतरवावंसं वाटतं. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं काही देणं लागतो. म्हणून त्या समाजाचा खणखणीत आवाज व्हावंसं वाटलं. अशा प्रकारे लेखनाची भूमिका तयार झाली व मी लिहिती झाले.

सुरुवातीला मीही अनेकाप्रमाणे कविता हा प्रकार हाताळत होते. तेव्हा पहिलीच कविता ‘दै. लोकमत’च्या ‘मैत्र’ या पुरवणीत प्रकाशित झाली व आत्मविश्वास वाढला. पण आपल्या भावना, काही प्रश्न व धारदार प्रसंग व्यक्त करण्यासाठी कविता हा लेखनप्रकार थिटा पडतो आहे, हे मला जाणवलं. म्हणून मी कथेकडे वळले. साठोत्तरी कथालेखिकांचं लेखन वाचताना वाटलं, आपणही कथा या लेखनप्रकारात चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो, असं जाणवलं.

अलीकडच्या वीस वर्षांतल्या कथालेखिकांनी तर कमालीचा लेखनपल्ला गाठला आहे. कथेच्या लवचिकतेला ओळखत  लेखिका ठरावीक दंडकांना ओलांडून समाजातील रूढ परंपरेची बेगडी रूपंही नाकारताना दिसतात. अतिशय धीटपणे बदलत्या सामाजिक परिस्थितीतील जाणिवांची निर्मितीक्षम मांडणी कथेत होते आहे. माझ्या अनुभवात ग्रामीण भागातील स्त्रियांच्या अस्तित्वाची झालेली हेळसांड हा प्रमुख धागा आहे.

ग्रामीण स्त्रियांचं अस्तित्व शून्यवत करणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे परित्यक्त्या व मातृत्व. यातील मातृत्व हे प्राकृतिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही अंगांनी स्त्रीत्वाची उंची गाठणारं मूल्य आहे. पण हेच मातृत्व तिला वैधव्यात ओझं बनतं. त्यातही ‘वंशाचा दिवा’ म्हणजेच मुलगा पोटी असेल तर सासरी थारा मिळतो. पण मुलगी पोटी असेल तर तिच्यासकट माहेरी रवानगी होते. डोईवर अक्षता पडल्यावर माहेरही परकंच बनतं. असा अधांतरी जगण्याचा शाप घेणाऱ्या, कुंठत, संपवून घेत किंवा परावलंबी जगणाऱ्या स्त्रिया मी जवळून पाहते आहे.

माझ्या आजूबाजूला घडणारे अनुभव, माणसं, त्यांच्यातली नाती, त्यांची सुख-दु:खं, अगतिकता, बेगड्या रूढी-परंपरा या सर्वांमध्ये होरपळणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या जशाच्या तशा सांगणं मला प्रचंड अस्वस्थतेतून बाहेर येण्यासाठी गरजेचं बनलं. यासाठी मी कथा हा लेखनप्रकार हाताळते. पण कथा म्हणजे गोष्ट नाही, तसाच अनुभवाचा वृतान्तही नाही, तर ती त्या त्या लेखकाची दृष्टी असते.

स्त्रियांच्या लेखनात शोकात्मकताच का येते, असं विचारलं जातं. हे सत्यही आहे. स्त्रिया एका परिघाबाहेर लिहू शकत नाहीत. कारण त्यांचं अनुभविश्व मुळात तोकडं आहे. त्यासाठी जग फिरावं लागतं, बाहेरचे अनुभव घ्यावे लागतात, त्या त्या भूमिकांमध्ये शिरावं लागतं, पण अशी आव्हानं पेलणं मध्यमवर्गीय लेखिकांना शक्य नाही. त्यांच्या परिसरातील कितीतरी प्रश्न अजूनही लेखणीचे विषय बनण्याची वाट पाहत आहेत. अनुभवापलीकडच्या विषयाला हाताळत लिहिणं होत असेल तर ते उसनं अवसान आणल्यासारखं होणार नाही का?

माझ्या कथांचे विषय ही माझ्या भोवतीच्या सत्यकथा-व्यथा यांमधूनच आलेले आहेत. काल्पनिक आहेत ती पात्र, स्थल व काळाची गुंफण. ग्रामीण स्त्रियांच्या वाट्याला अनेक वेळा उपेक्षित, वंचित व दमन करणारं जीवनच आलं आहे. या अन्याय-अत्याचारातून येथील स्त्री जीवनाची एक सोशिक मानसिकता बनली आहे. या मानसिकतेला बदलवत जगण्याचं बळ देण्यासाठीच माझा लेखनप्रपंच आहे.

एका पाश्चिमात्य लेखकानं म्हटल्याप्रमाणे, ‘लेखकाला लेखनाचा शाप मिळालेला असतो आणि शापमुक्त होण्यासाठी त्याला लिहिण्याखेरीज दुसरा उपचारच नसतो.’ म्हणूनच कथा माझी सहचरिणी आहे, तिच्या जन्माचे डोहाळे अस्वस्थ करणारे आहेत. तिच्यासाठीची व्याकूळता प्रसुतीवेदनेपेक्षा कमी नसते. या वेदनेतून जन्माला येणारी कथा ही अलौकिक पातळीवरचं समाधान देणारी असते, हे मात्र निश्चित. या निर्माणाच्या युगात आपलाही छोटासा खारीचा वाटा समाजउभारणीत व्हावा, हीच भूमिका लेखनामागे आहे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......