समाजाचा खणखणीत आवाज व्हावंसं वाटलं…
पडघम - साहित्य संमेलन विशेष
अनिता यलमटे
  • कथाकार अनिता येलमटे
  • Fri , 03 February 2017
  • अनिता यलमटे Anita Yalmate नवलेखन - मराठी कथा Navlekhan - Marathi Katha राजन गवस Rajan Gawas

साहित्य संमेलन ही मराठी साहित्यविश्वातली एक सर्वाधिक मोठी घडामोड आहे. अनेक लेखक-कवी-कथा\कादंबरीकारांना तिथं व्यासपीठ मिळतं. उद्या त्या व्यासपीठाचे हक्कदार असलेले आणि नुकतेच लिहून लागलेले मराठीमध्ये नवे दमदार कथाकार उदयाला येत आहेत. यातील काहींचं एखाद-दुसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे, तर काहींच्या अवघा पाच-सातच कथा प्रकाशित झाल्या आहेत. पण त्यातून त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढीला लागल्या आहेत. या वर्षीच्या संमेलनात कदाचित या कथाकारांचा नामोल्लेखही होणार नाही, पण यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्या आसाराम लोमटे यांना कथालेखनासाठी मिळाला आहे, त्यांच्या प्रदेशातील म्हणजेच मराठवाड्यातील हे कथाकार आहेत. त्यांची दखल भविष्यात मराठी साहित्यविश्वाला भविष्यात घ्यावी लागेल. त्यातील एका कथाकाराचं हे मनोगत…

-----------------------------------------------------------------------------

नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन गवस यांनी संपादित केलेल्या ‘नवलेखन -मराठी कथा’ या पुस्तकात माझी ‘काकणचोळी’ ही कथा प्रकाशित झाली. त्याची दखल घेत मराठवाडा साहित्य परिषदेने सत्कार व संवाद सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात कथालेखनावर बोलताना विशेष आनंद झाला. आपण का लिहितो? हा प्रश्न माझ्याही मनात अनेकदा येतो. तेव्हा गुदमरलेल्या मनाला मोकळं करत व्यक्त होण्यासाठी लेखणीचा आधार आपण घेतो आहोत, हेही जाणवतं. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या बालपणी अनेक अक्राळविक्राळ अनुभव गाठीशी बांधलेले आहेत. आयुष्याच्या पाऊलवाटेचा महामार्ग होण्यासाठी अनेक उन्हाळे, पावसाळे झेलावे लागतात, तेव्हा कुठे अनुभवांचं मृग नक्षत्र चांगलं बरसतं. मी लिहायला लागले तेव्हा माझी कोणतीही भूमिका तयार झालेली नव्हती किंवा मी कोणत्या चळवळीलाही वाहून घेतलं नव्हतं. मनात शब्दांची गर्दी होत होती. काहीतरी व्यक्त करावंसं वाटत होतं आणि ते कागदावर उतरवावंसं वाटतं. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं काही देणं लागतो. म्हणून त्या समाजाचा खणखणीत आवाज व्हावंसं वाटलं. अशा प्रकारे लेखनाची भूमिका तयार झाली व मी लिहिती झाले.

सुरुवातीला मीही अनेकाप्रमाणे कविता हा प्रकार हाताळत होते. तेव्हा पहिलीच कविता ‘दै. लोकमत’च्या ‘मैत्र’ या पुरवणीत प्रकाशित झाली व आत्मविश्वास वाढला. पण आपल्या भावना, काही प्रश्न व धारदार प्रसंग व्यक्त करण्यासाठी कविता हा लेखनप्रकार थिटा पडतो आहे, हे मला जाणवलं. म्हणून मी कथेकडे वळले. साठोत्तरी कथालेखिकांचं लेखन वाचताना वाटलं, आपणही कथा या लेखनप्रकारात चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो, असं जाणवलं.

अलीकडच्या वीस वर्षांतल्या कथालेखिकांनी तर कमालीचा लेखनपल्ला गाठला आहे. कथेच्या लवचिकतेला ओळखत  लेखिका ठरावीक दंडकांना ओलांडून समाजातील रूढ परंपरेची बेगडी रूपंही नाकारताना दिसतात. अतिशय धीटपणे बदलत्या सामाजिक परिस्थितीतील जाणिवांची निर्मितीक्षम मांडणी कथेत होते आहे. माझ्या अनुभवात ग्रामीण भागातील स्त्रियांच्या अस्तित्वाची झालेली हेळसांड हा प्रमुख धागा आहे.

ग्रामीण स्त्रियांचं अस्तित्व शून्यवत करणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे परित्यक्त्या व मातृत्व. यातील मातृत्व हे प्राकृतिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही अंगांनी स्त्रीत्वाची उंची गाठणारं मूल्य आहे. पण हेच मातृत्व तिला वैधव्यात ओझं बनतं. त्यातही ‘वंशाचा दिवा’ म्हणजेच मुलगा पोटी असेल तर सासरी थारा मिळतो. पण मुलगी पोटी असेल तर तिच्यासकट माहेरी रवानगी होते. डोईवर अक्षता पडल्यावर माहेरही परकंच बनतं. असा अधांतरी जगण्याचा शाप घेणाऱ्या, कुंठत, संपवून घेत किंवा परावलंबी जगणाऱ्या स्त्रिया मी जवळून पाहते आहे.

माझ्या आजूबाजूला घडणारे अनुभव, माणसं, त्यांच्यातली नाती, त्यांची सुख-दु:खं, अगतिकता, बेगड्या रूढी-परंपरा या सर्वांमध्ये होरपळणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या जशाच्या तशा सांगणं मला प्रचंड अस्वस्थतेतून बाहेर येण्यासाठी गरजेचं बनलं. यासाठी मी कथा हा लेखनप्रकार हाताळते. पण कथा म्हणजे गोष्ट नाही, तसाच अनुभवाचा वृतान्तही नाही, तर ती त्या त्या लेखकाची दृष्टी असते.

स्त्रियांच्या लेखनात शोकात्मकताच का येते, असं विचारलं जातं. हे सत्यही आहे. स्त्रिया एका परिघाबाहेर लिहू शकत नाहीत. कारण त्यांचं अनुभविश्व मुळात तोकडं आहे. त्यासाठी जग फिरावं लागतं, बाहेरचे अनुभव घ्यावे लागतात, त्या त्या भूमिकांमध्ये शिरावं लागतं, पण अशी आव्हानं पेलणं मध्यमवर्गीय लेखिकांना शक्य नाही. त्यांच्या परिसरातील कितीतरी प्रश्न अजूनही लेखणीचे विषय बनण्याची वाट पाहत आहेत. अनुभवापलीकडच्या विषयाला हाताळत लिहिणं होत असेल तर ते उसनं अवसान आणल्यासारखं होणार नाही का?

माझ्या कथांचे विषय ही माझ्या भोवतीच्या सत्यकथा-व्यथा यांमधूनच आलेले आहेत. काल्पनिक आहेत ती पात्र, स्थल व काळाची गुंफण. ग्रामीण स्त्रियांच्या वाट्याला अनेक वेळा उपेक्षित, वंचित व दमन करणारं जीवनच आलं आहे. या अन्याय-अत्याचारातून येथील स्त्री जीवनाची एक सोशिक मानसिकता बनली आहे. या मानसिकतेला बदलवत जगण्याचं बळ देण्यासाठीच माझा लेखनप्रपंच आहे.

एका पाश्चिमात्य लेखकानं म्हटल्याप्रमाणे, ‘लेखकाला लेखनाचा शाप मिळालेला असतो आणि शापमुक्त होण्यासाठी त्याला लिहिण्याखेरीज दुसरा उपचारच नसतो.’ म्हणूनच कथा माझी सहचरिणी आहे, तिच्या जन्माचे डोहाळे अस्वस्थ करणारे आहेत. तिच्यासाठीची व्याकूळता प्रसुतीवेदनेपेक्षा कमी नसते. या वेदनेतून जन्माला येणारी कथा ही अलौकिक पातळीवरचं समाधान देणारी असते, हे मात्र निश्चित. या निर्माणाच्या युगात आपलाही छोटासा खारीचा वाटा समाजउभारणीत व्हावा, हीच भूमिका लेखनामागे आहे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......