स्त्रियांच्या वेदनांना मुखर करण्याचा प्रयत्न
पडघम - साहित्य संमेलन विशेष
मेनका धुमाळे
  • कथाकार मेनका धुमाळे
  • Fri , 03 February 2017
  • मेनका धुमाळे Menka Dhumale नवलेखन - मराठी कथा Navlekhan - Marathi Katha राजन गवस Rajan Gawas

साहित्य संमेलन ही मराठी साहित्यविश्वातली एक सर्वाधिक मोठी घडामोड आहे. अनेक लेखक-कवी-कथा\कादंबरीकारांना तिथं व्यासपीठ मिळतं. उद्या त्या व्यासपीठाचे हक्कदार असलेले आणि नुकतेच लिहून लागलेले मराठीमध्ये नवे दमदार कथाकार उदयाला येत आहेत. यातील काहींचं एखाद-दुसरं पुस्तक प्रकाशित झालं आहे, तर काहींच्या अवघा पाच-सातच कथा प्रकाशित झाल्या आहेत. पण त्यातून त्यांच्याविषयीच्या अपेक्षा वाढीला लागल्या आहेत. या वर्षीच्या संमेलनात कदाचित या कथाकारांचा नामोल्लेखही होणार नाही, पण यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार ज्या आसाराम लोमटे यांना कथालेखनासाठी मिळाला आहे, त्यांच्या प्रदेशातील म्हणजेच मराठवाड्यातील हे कथाकार आहेत. त्यांची दखल भविष्यात मराठी साहित्यविश्वाला भविष्यात घ्यावी लागेल. त्यातील एका कथाकाराचं हे मनोगत…

-----------------------------------------------------------------------------

एका मध्यमवर्गीय कुटुंबात झालेला जन्म खूप काही शिकवून जातो. घरातून नकळत होत जाणारे वाचनाचे, लेखनाचे संस्कार स्वस्थ बसू देत नव्हते. लिखाणाला योग्य दिशा मिळत नव्हती. त्यामुळे जे मनात येईल ते फक्त कागदावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. बहुतेकदा कवितेच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करण्यात एक वेगळा आनंद मिळत होता. जगण्याच्या कक्षा विस्तारत गेल्या आणि अनुभव वाढत गेले. वाढत्या अनुभवांनी जाणीवांना जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि याच जाणीवा शब्दरूप घेऊ लागल्या.

पारंपरिक मध्यमवर्गीय संस्कारांनी मी एक स्त्री आहे, याची वारंवार आठवण करून दिली आणि स्त्री म्हणून जगताना निर्माण होणारे असंख्य प्रश्न मनाला अस्वस्थ करू लागले. जगणं काय असतं, हे भवताल बघताना कळत होतं. विशेषत: बाईच्या वाट्याला समाजाने दिलेला भोगवटा तिला जिवंतपणी मरण दाखवतो. या सर्व परिस्थितीत माझं संवेदनशील मन हळहळत होतं. या सर्व परिस्थितीवर आपण काहीच करू शकत नाही, ही अस्वस्थता काळीज पोखरून टाकत होती. कवितारूपी शब्दांनी मग ही अस्वस्थता थोडी कमी केली. अनुभवांना व्यक्त करण्यासाठी कविता अपुरी वाटू लागली आणि मग कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. सौ. नभा बडे यांच्या माध्यमातून कथाकार डॉ. भास्कर बडे यांच्या सहकार्याने कथालेखनाचा माझा प्रवास सुरू झाला.

नॅशनल बुक ट्रस्ट प्रकाशित आणि राजन गवस संपादित ‘नवलेखन - मराठी कथा’ या कथासंग्रहात ‘कोरडा पाऊस’ ही कथा प्रकाशित झाली आणि कथालेखिका म्हणून माझं नाव समोर आलं. ही निवड माझ्या लेखनासाठी अतिशय प्रेरणादायी ठरली. त्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला.

बालपणापासूनच परंपरांच्या बाबतीत वेगवेगळे प्रश्न निर्माण व्हायचे, पण या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. त्यामुळे अस्वस्थता वाढत होती. ती कमी करण्यासाठी वाचन करणं आवश्यक होतं. यातूनच वाचनाची गोडी वाढत गेली.

कदाचित मी स्वत: एक स्त्री असेल म्हणून स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिलं गेलेलं साहित्य जास्त प्रमाणात वाचनात आलं. त्यातून काही भूमिका बनत गेल्या. भारतीय पुरुषसत्ताक मानसिकतेनं स्त्रियांना किती छळलं आहे, हे मी स्वत:ही अनुभवत होते.

ग्रामीण भागात राहत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यातच लक्षात आलं की, जे साहित्य आपण वाचतो त्यात आपल्यासारख्या स्त्रियांचे प्रश्न तर आलेच नाहीत. स्त्री मग ती जगातील कोणतीही असो तिच्या वेदना समान असतात, ही गोष्ट जरी मान्य केली तरीही आजच्या आधुनिक युगात शहरी स्त्रिया आणि ग्रामीण स्त्रिया यांच्या अडचणींमध्ये खूप तफावत आहे. त्यांच्या प्रश्नांचं स्वरूपही भिन्न आहे. सुशिक्षित नोकरी करणारी स्त्री एकवेळ आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकते, पण ग्रामीण स्त्री आजही परंपरेच्या जोखडाखालून बाहेर यायला तयारच नाही. त्यामुळे तिच्या वाट्याला अजूनही भोगणंच आहे. तिचं हे भोगणं समोर यावं यासाठी लेखनाचा छोटासा प्रयत्न.

रामायण, महाभारत यांसारख्या आपल्या धार्मिक महाकाव्यांनी एक वेगळीच परंपरा निर्माण केली आहे. विशेषत: रामायणातील घटना प्रसंगांनी तर खूपच विचार करायला भाग पाडलं –

मी करत राहिेले स्वत:ला सिद्ध

सांगत राहिलीस मी पवित्र आहे म्हणून

सर्व अन्याय निमूटपणे सहन केलास.

पण एक केले नाहीस.

फक्त एवढाच प्रश्न विचारला असतास रामाला,

माझ्या नसण्याने तू विरह, व्याकूळ झालास

आणि बिलगलास, वृक्ष वेलांना

याची साक्ष तुला देता येईल का?

तुझ्याशिवाय राहिले मी रावणाच्या लंकेत

आणि क्षणार्धात माझे पावित्र्य तू संपवलेस

माझ्याशिवाय तुही एकटाच होतास,

मग तुझ्या पावित्र्याचा पुरावा कोणता?

फक्त एवढाच प्रश्न विचारला असतास

तर आज नक्कीच घडले असते

एक वेगळे रामायण

अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले.

आजूबाजूचा अस्वस्थ करणारा भोवताल अनेक प्रश्न माझ्यासमोर निर्माण करत होता आणि त्यांच्या उत्तरासाठी माझी कथांच्या माध्यमातून धडपड चालू झाली.

आजच्या संगणकाच्या युगातही स्त्रिया कितीही शिकल्या, अनेक उच्चपदावर गेल्या, तरीही त्यांच्याकडे स्त्री म्हणूनच बघितलं जातं. तिची ओळख फक्त स्त्रीच असते. तिला उपभोगाचीच वस्तू मानलं जातं. अधिकारी वर्ग आणि हाताखाली काम करणारा पुरुष वर्ग यांच्याकडूनही पावलोपावली तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते. तिचं चारित्र्य हा तर अत्यंत महत्त्वाचा घटक. त्यात एकट्या राहणाऱ्या, विधवा किंवा घटस्फोटित महिला ही तर जणू काही पुरुषांची सार्वजनिक मालमत्ताच आहे, अशाच प्रकारे तिच्याशी वागलं जातं.

नोकरी आणि घर ही तारेवरची कसरत करताना केवळ ती स्त्री म्हणून दिलं जाणारं दुय्यमत्व त्रास देणारं होतं. स्त्रीवादी लेखनाच्या मर्यादा सांगताना अशी टीका केली जाते की, स्त्रिया त्यांच्या ‘चूल-मूल’च्या बाहेर येऊन लेखन करत नाहीत. पण हे शंभर टक्के खरं वाटत नाही. कारण चौकटीच्या आतलं तिचं जगणं, तिचे अनुभव इतके व्यापक आणि भयानक आहेत की, तेही समग्रपणे काही अपवाद वगळता साहित्यात आले नाहीत. हे सगळे अनुभव, प्रश्न लेखनातून यावेत यासाठी माझे प्रयत्न आहेत.

डोईचा पदर आला खांद्यावरी

भरल्या बाजारी जाईन मी

ही क्रांतीची परंपरा पुढे नेऊन साहित्यातून मांडण्याचा माझा प्रयत्न असेल.

आज मी ज्या परिस्थितीत वाढले, जे संस्कार माझ्यावर झाले, त्यामुळे मी आणि माझ्या पिढीतील अनेक स्त्रिया या जुन्या आणि नव्याच्या सीमारेषेवर उभ्या आहेत. धड जुनं सोडता येत नाही आणि नवं स्वीकारता येत नाही, अशा संक्रमणाच्या काळात लेखनातून काहीतरी नवी मांडणी करणारा, धर्म संस्कृती, रूढी-परंपरा, जाती या सर्वांचा वेगळ्या अंगानं विचार करून तो साहित्यातून मांडण्याचा माझा प्रयत्न आपणास आवडेल ही अपेक्षा.

menkadhumale@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......