आज आपलं एक समाज म्हणून, एक देश म्हणून भरकटत जाणं पाहता संपूर्ण गांधीजींपर्यंत पोहोचणं तातडीचं बनलं आहे.
पडघम - देशकारण
संदीप शिवाजीराव जगदाळे
  • महात्मा गांधी
  • Fri , 02 October 2020
  • पडघम देशकारण महात्मा गांधी Mahatma Gandhi गांधी जयंती Gandhi Jayanti २ ऑक्टोबर 2 October

हिंदीतील प्रसिद्ध लेखक असगर वजाहत यांची ‘शहा आलम कैंप की रुहें’ नावाची एक कथा आहे. या कथेत रात्रीच्या वेळी शहा आलम कैंपमध्ये अनेक आत्मे त्यांच्या लहान लहान मुलाबाळांना भेटायला येत असतात. कथेतील काळ हा हिंदू-मुस्लीम दंगलीचा आहे. 

एका रात्री सगळ्या आत्म्यांसोबत एक नवीनच म्हाताऱ्याचा आत्मा कॅम्पमध्ये येतो. सगळे या म्हाताऱ्याला विचारतात, ‘तुझं कोणी नातेवाईक इथे आहे का?’ तर म्हातारा म्हणतो, ‘होय आणि नाही पण’. हे ऐकून सगळ्यांना वाटतं की, म्हातारा पागल असावा. सर्वजण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. म्हाताऱ्याचा आत्मा कॅम्पमध्ये कोणाला तरी शोधत फिरत राहतो. परत कोणीतरी म्हाताऱ्याला विचारतो, ‘तुम्ही कोणाला शोधत आहात?’ तर म्हातारा म्हणतो, ‘अशा लोकांना जे माझा खून करू शकतील.’ यावर विचारणारा माणूस गोंधळात पडतो. म्हातारा पुन्हा म्हणतो, ‘पन्नास वर्षांपूर्वी मला गोळ्या मारून, मारून टाकलं होतं. आता मला वाटतंय की, दंगल करणाऱ्यांनी मला जिवंत जाळून टाकावं. पण त्याच्या गोळीनेही मी मेलो नव्हतो आणि जिवंत जाळून टाकल्याने ही मरणार नाही.’

लेखक इथे म्हाताऱ्याचं नाव-गाव काहीच सांगत नाही, पण या प्रसंगाच्या शेवटापर्यंत येताना आपल्याला आपोआपच लक्षात येतं की, हा म्हातारा आत्मा महात्मा गांधींचा आहे. गांधी मरत नाही, गांधी मरणारही नाही. उलट गांधी अधिकाधिक समकालीन होऊन परततोय, पुन्हा पुन्हा परततोय.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

आपण पुन्हा पुन्हा गांधींपर्यंत पोहोचतोय. पण कसं पोहोचतोय आपण महात्मा गांधींपर्यंत? महात्मा गांधींचं असणं जितकं विराट आहे ते विराटपण आपण स्वीकारतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय का? की यातही आपण काही ‘शॉर्टकट’ शोधलेत. सोयीपुरत्याच गांधीपर्यंत पोहोचणं आणि सोयीपुरत्याच गांधीपर्यंत नवीन पिढीला पोहोचवनं आपण पसंत करतोय का? नवीन पिढी गांधीपर्यंत कशी पोहचत आहे?

काही वर्षांपूर्वी एक हिंदी सिनेमा आला होता. या सिनेमातही महात्मा गांधींचा आत्मा येतो आणि नायकाला सदाचाराची शिकवण देतो. या सिनेमानंतर युवकांमध्ये ‘गांधीगिरी’ हा शब्द रूढ झाला आणि युवकांनी प्रतिवादाचं माध्यम म्हणून या गांधीगिरीचा अनेक ठिकाणी वापर केला. मग दमनकारी पद्धतीने वागणाऱ्या प्रशासकांना गुलाबाचं फूल दे, मेणबत्ती मोर्चा काढ इत्यादी इत्यादी.

हे असं करणं सविनय प्रतिवादाच्या पद्धतीला आणि समोरच्याच्या नैतिकतेला आव्हान करून बदल घडवून आणण्याच्या गांधीविचाराला धरून आहेच, परंतु याच्याही आणखी पुढे गांधीजींचे अस्तित्व खूप शिल्लक राहतं. महात्मा गांधी आयुष्यभर जे राबवत होते, बोलत होते, लिहीत होते त्या सगळ्यांपर्यंत नवीन पिढी का पोहोचू शकत नाही? सिनेमॅटिक ‘गांधीगिरी’च्याही पुढे गांधीजी आहेत, पण तिथपर्यंत नवीन पिढी पोहोचेल, याचे मार्ग आपण तयार केले नाही. हे मार्ग तयार करणं सर्वाधिक गरजेचं आहे.

.................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

भारतातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्यलढ्यात सर्वप्रथम महात्मा गांधींनी उभं केलं. तोच शेतकरी आज सगळ्यात जास्त संकटात सापडलेला आहे. आपल्या विकास प्रक्रियेचा शहरी तोंडावळा पाहता या प्रक्रियेत आज परिघावर ढकलल्या गेलेला शेतकरी काही दिवसांनी परिघाच्या बाहेर फेकला जातोय की, काय अशी भीती वाटते. अशा अरिष्टाच्या काळात शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना गांधी समजून सांगणं सर्वाधिक गरजेचं आहे. ‘ग्राम स्वराज’च्या माध्यमातून गावाचीसफाई, ग्रामअर्थव्यवस्था, गावाच आरोग्य, गावाचा आहार, व्यसनमुक्ती याविषयी बोलणारे आणि गावालाच विकासाचे केंद्र मानणारे महात्मा गांधी आज सर्वाधिक महत्त्वाचे आहेत.

४ एप्रिल १९३६ च्या ‘हरिजन’मध्ये गांधीजींनी लिहिलेय, ‘‘मला विश्वास आहे आणि मी हे पुन्हा पुन्हा सांगतोय की भारत मूठभर शहरांमध्ये नाही तर सात लक्ष गावात वसलेला आहे. पण आपल्या शहरवासीयांची समजूत आहे की, भारत शहरातच आहे आणि गावांची निर्मिती शहरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाली आहे. आपण कधी याचा विचार करण्याचे कष्टही घेतले नाहीत की, त्या गरीबांना पोट भरणे इतकं अन्न आणि शरीर झाकण्याइतका कपडा मिळतो की नाही आणि ऊन अन् पावसापासून वाचण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छप्पर आहे की नाही.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गाव खेड्याची मुळापासून काळजी वाहणारे गांधी विचार वेगवेगळ्या मार्गांनी नवीन पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, तरच गांधीजींना अपेक्षित असणारा अहिंसक समाज, स्वावलंबी भारत निर्माण होऊ शकेल. महात्मा गांधींपर्यंत नवीन पिढीने पोहोचण्याचे मार्ग तयार करताना आपल्याला या पिढीच्या मानसिकतेला, तिला आकर्षक वाटत असलेल्या माध्यमांना समजून घ्यावं लागेल. त्यामाध्यमातून त्यांना संपूर्ण गांधींपर्यंत न्यावं लागेल. वरवरची ‘गांधीगिरी’ दाखवणाऱ्या चित्रपटांसोबतच गांधीजींचे जीवन गंभीरपणे उलगडून दाखवणारे ‘गांधी’, ‘मेकिंग ऑफ महात्मा’ यासारखे चित्रपट त्यांना दाखवावे लागतील. सक्षम अभ्यासक्रमाच्या माध्यमातून गांधीजींचे लेखन त्यांच्या हातात ठेवावं लागेल. 

आज आपलं एक समाज म्हणून, एक देश म्हणून भरकटत जाणं पाहता संपूर्ण गांधीजींपर्यंत पोहोचणं तातडीचं बनलं आहे.

..................................................................................................................................................................

लेखक संदीप शिवाजीराव जगदाळे तरुण कवी आहेत. 

sandipjagdale2786@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा