प्रत्यक्षात सचिन पायलट यांचा संघर्ष राहुल गांधींच्याच विरोधात आहे!
पडघम - देशकारण
श्रवण गर्ग
  • राहुल गांधी, सचिन पायलट आणि अशोक गेहलोत
  • Wed , 15 July 2020
  • पडघम देशकारण ज्योतिरादित्य सिंधिया Jyotiraditya Scindia सचिन पायलट Sachin Pilot काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi

राहुल गांधी फक्त पंतप्रधान, भाजप यांना प्रश्न विचारत राहतात. पण आपल्याच पक्षातील लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. राहुल गांधी आता ना काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ना संसदेत काँग्रेसचे नेता. मग ते कसे काय प्रश्न विचारतात आणि पंतप्रधानांकडून उत्तराची अपेक्षा करतात? अनेक वेळा तर ते स्वत:च्या पक्षातही स्वत:च उभ्या केलेल्या प्रश्नांचीही उत्तरं देत नाहीत. उलट त्यांना अधांतरी लटकत ठेवतात. लोकसभा निवडणुकीतल्या अपयशासाठी त्यांनी ज्यांच्या पुत्रप्रेमाला नावं घेऊन दोष दिला होता, त्यात राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचाही समावेश होता. काय झालं त्यानंतर? अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले आणि कमलनाथही. उलट ज्योतिरादित्य सिंधिया आधी गेले आणि आता सचिन पायलट जात आहेत.

ही जरा अतिशयोक्तीच म्हणायला हवी की, सचिन पायलटची समस्या केवळ अशोक गेहलोत आहेत. त्यांची समस्या बहुधा राहुल गांधींबाबत जास्त प्रमाणात आहे. राहुल गांधींची ‘कम्फर्ट लेवल’ त्यांच्या टीममधील त्या तरुण नेत्यांसोबत आहे ज्यांना कुठलीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही किंवा मग त्या ज्येष्ठ नेत्यांसोबत जे इतर कुठेही जाऊ शकत नाहीत. अशा एखाद्या फार्सची आपण कल्पना करू शकतो का, की सचिन पायलट यांच्या गेल्या सहा महिन्यांपासून चाललेल्या तथाकथित ‘षडयंत्रा’मुळे नाराज होऊन गेहलोत घोषणा करतील की, ते आपल्या समर्थकांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत? वास्तव हे आहे की, तूर्त ज्या आमदारांचा गेहलोत यांना पाठिंबा आहे, खरं तर त्यातील बहुतेक काँग्रेससोबत आहेत आणि जे सोडून जात आहेत ते सचिन पायलटचे आमदार आहेत. हीच परिस्थिती मध्य प्रदेशमध्येही होती. जे काँग्रेस सोडून सिंधिया यांच्यासोबत गेले, त्यांना भाजप कार्यकर्त्यांपेक्षा सिंधियांचे समर्थकच मानलं जातं.

प्रश्न असा उपस्थित होतो की, काँग्रेसला जर असंच चालू राहू द्यायचं असेल तर मग राहुल गांधी कुणाच्या आधारावर नरेंद्र मोदी सरकारला आव्हान देऊ इच्छितात? ते तर भाजपवर लोकशाही संपवत असल्याचा आरोप करत असतील तर एका हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत, तीही ते स्वत:च्या हाताने घालवत आहेत, त्याचा दोषही त्यांना स्वत:च्या माथ्यावर घ्यावा लागेल. नवीन लोक यायला तयार नाहीत आणि जे जात आहेत त्यांच्याविषयी खंत केली जाताना दिसत नाही. अस्वस्थ नेत्यांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट यांच्यासह मिलिंद देवरा, जितिन प्रसाद, प्रियंका चतुर्वेदी आणि संजय झा यांचाही समावेश करायला हवा.  

इथं गोवा कसं काँग्रेसच्या हातातून गेलं याची चर्चा करायला नको. पण पाहता पाहता मध्य प्रदेशमधील सत्ता गेली आणि आता राजस्थान संकटात आहे. महाराष्ट्रातलं सरकार सध्या करोनानं वाचवलंय. छत्तीसगढमधील सरकार पाडण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. संकट मध्य प्रदेशमधलं असो की राजस्थानमधलं, ही सगळी बाहेरून पारदर्शी दिसणाऱ्या पण आतून ‘साउंड-प्रूफ’ असलेल्या भिंतीची निर्मिती आहे. ही भिंत गांधी परिवार आणि अस्वस्थ तरुण नेत्यांदरम्यान उभी आहे. ही ‘भूकंपविरोधी’ भिंत काँग्रेसमधलं मोठ्यातलं मोठं संकट आणि मोठ्यातला मोठा आवाजही पार करू शकत नाही.

मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काश्मीरमधल्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘शुभेच्छा’, तर काँग्रेसला ‘सदिच्छा’ देणारं ट्विट केलं होतं. काँग्रेसला एका अमित शहाची गरज आहे असं त्यांनी म्हटलं होतं. प्रश्न असाही आहे की, गांधी परिवारात किंवा काँग्रेसमध्ये एखाद्या अमित शहांना सहन केलं जाण्याची शक्यता तरी आहे का? याच कारणांमु‌ळे राहुल गांधी ‘मोदी’ होऊ शकत नाहीत. ते आपल्या परिवाराच्या भूतकाळाविषयी जाहीरपणे अभिमानानं बोलायला संकोच करतात. याउलट मोदी अतिशय सहजपणे बोलतात आणि त्याला आपल्या विजयाचं हत्यारही बनवतात.

मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अर्णब गोस्वामी यांनी राहुल गांधींची एक मुलाखत घेतली होती. ती बरीच गाजलीही. त्यात त्यांनी म्हटलं आहे की- ‘मी माझा परिवार निवडलेला नाही. मी म्हटलं नव्हतं की, मला या परिवारात जन्माला यायचंय. आता माझ्यासमोर दोनच पर्याय आहेत –सगळं सोडून बाजूला व्हायचं किंवा मग काही बदलण्याचा प्रयत्न करायचा.’ प्रत्यक्षात राहुल गांधी या दोन्ही पर्यायांपैकी कशावरही काम करू शकलेले नाहीत.

अनेक जण असा प्रश्न उपस्थित करत आहेत की, सध्या काँग्रेस पक्ष चारी बाजूंनी मोठ्या संकटात आहे. अशा वेळी सचिन पायलट बंडखोरी करून काँग्रेसला अजूनच कमकुवत बनवत आहेत. त्याचं उत्तर नक्कीच ‘हो’ असं असेल, पण त्याचबरोबर या नव्या धक्क्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला जाग येणार असेल तर ती एक मोठीच उपलब्धी आहे, असंच म्हणायला हवं. कदाचित त्यामुळे भविष्यात होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून हा पक्ष वाचू शकेल. कुणास ठाऊक, कदाचित सचिन पायलट ही बंडखोरी काँग्रेसला वाचवण्यासाठीही करत असतील.

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख ज्येष्ठ पत्रकार श्रवण गर्ग यांनी १५ जुलै २०२० रोजी https://www.satyahindi.com या पोर्टलवर लिहिला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख