‘लोकशिक्षक’ मा. गो. वैद्य
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर
  • मा. गो. वैद्य आणि त्यांच्यावरील ‘‘वैद्य’कीय’ या गौरवग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Wed , 11 March 2020
  • पडघम माध्यमनामा मा. गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर तरुण भारत भाजप सरसंघचालक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते, संघाच्या हिंदुत्वाचे प्रखर भाष्यकार अशी ओळख असलेल्या मा. गो. वैद्य यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक साक्षेपी, निष्पक्ष, व्यावसायिक आणि कुशल संपादक, भाषा तज्ज्ञ, संस्कृतचे शिक्षक व अभ्यासक हेही असलेले पैलू अनेकांसाठी अज्ञात आहेत. त्यावर  प्रकाश टाकणारा हा लेख. आज, ११ मार्च २०२०ला मा. गो. वैद्य वयाच्या ९८व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. नुकताच ज्येष्ठ पत्रकार श्यामकांत पात्रीकर यांनी संपादित केलेला ‘‘वैद्य’कीय’ हा गौरवग्रंथ प्रकाशित झाला आहे. त्यातील हा लेख.

.............................................................................................................................................

मा. गो. वैद्य यांच्याशी झालेली पहिली भेट अजूनही आठवते. ते वर्ष होतं १९८१. महिना डिसेंबर आणि स्थळ विधिमंडळाची इमारत. कविवर्य ना. धों. महानोर यांनी त्यांचे विधानपरिषदेतील सहकारी असलेले मा. गो. वैद्य यांच्याशी ओळख करून दिली आणि सांगितलं, ‘हा आमच्या मराठवाड्यातला बरं का!’. मा. गो. वैद्य यांचं नाव आणि दरारा मी ऐकून होतो; वर्षभरापासून नागपुरात असल्यानं त्यांना दुरून पाहिलेलंही होतं, पण समोरासमोर प्रथमच भेटत होतो. ‘तरुण भारत’ या दैनिकाचे संपादक, संस्कृतचे गाढे अभ्यासक, मराठीचे तज्ज्ञ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ अधिकारी अशी त्यांची ओळख होती. परखड प्रतिपादन करणारं त्यांचं लेखन लोकप्रिय होतं. प्रथमदर्शनी लक्षात आली, ती त्यांची भेदक नजर. त्यामुळे हस्तांदोलन करण्याची गुस्ताखी न करता मी आपला हात जोडून त्यांना नमस्कार केला. ‘मी ओळखतो यांना, त्यांच्या काही बातम्या वाचल्या आहेत’ असं मा. गो. वैद्य त्यावर म्हणाले. कोण, कुठले, काय वाचता वगैरे जुजबी चौकश्या झाल्या आणि आमची भेट संपली.

त्यांची ती भेदक नजर माझा नंतरही पाठलाग करतच राहिली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं दिवसभरातून एकदा तरी ना. धों. महानोरांची भेट घ्यायचा शिरस्ता असल्यानं ‘मा.गों’नाही नमस्कार घडत होता. त्याच अधिवेशनाच्या काळात ‘मा.गों.’नी मराठी भाषेसंबंधी एक बातमीही मला दिली. मी काम करत असलेल्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकात ती बातमी दुसर्‍या दिवशी प्रकाशित झाल्यावर तिचा उल्लेख करून ना. धों. महानोर आणि मा. गो. वैद्य या दोघांनीही विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित केला. पत्रकारितेत येऊन तेव्हा जेमतेम चार वर्षं झालेली होती आणि विधिमंडळ वृत्तसंकलनाचं ते माझं पहिलंच वर्ष होतं. दोन दिग्गजांनी आपल्या बातमीच्या आधारे विधानपरिषदेत बोलावं हे मला फारच भारी वाटलं! नंतर अधूनमधून भेटी होत गेल्या, भीड चेपली आणि मा. गो. वैद्य यांना मीही ‘बाबुराव’ म्हणू लागलो.

खरं तर, मी काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ज्या पक्षात अनेक जिवलग मित्र आहेत, त्या भाजपचा किमान समर्थकही नाही. शिवाय त्यांची विद्वत्ता आणि माझी समज यात मोठ्ठं अंतर होतं. त्यामुळे बाबुराव वैद्य यांच्याशी कितपत सूर जुळतील याबद्दल मी साशंकच होतो. ही साशंकता दूर करण्याचं सर्व श्रेय बाबुरावांचं.

मध्यम उंची, शिडशिडीत बांधा, गव्हाळ वर्ण, धुवट धोतर आणि त्यावर सदरा घातलेल्या बाबुरावांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भेदक नजर. अशी की, जणू त्यांचे डोळे समोरच्याला पूर्ण स्कॅन करत आहेत. शिवाय चेहऱ्यावर विद्वता आणि अधिकारांचं तेज. त्यामुळे हा माणूस समोरच्याचं ऐकून घेईल की, नाही अशी शंका प्रथमदर्शनी यायची, पण प्रत्यक्षात मात्र त्यांचं बोलणं आणि समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं या बाबतीत बाबुराव उदार असल्याचा अनुभव नंतर येत गेला.  महत्त्वाचं म्हणजे या माणसातले अनेक गुण समजत गेले, त्यांच्याकडून मराठी भाषा शिकायला मिळाली.

‘तरुण भारत’ या दैनिकासाठी मी काही काळ पत्रकारिता केलेली आहे आणि मला तिथे बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. निवडणुकीच्या काळात शिवराळ भाषेत करण्यात येत मोहिमेबद्दल मतभेद होऊन मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या मुख्य वार्ताहरपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला, तेव्हा आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नव्हती. पत्नी मंगला नोकरी करत होती आणि माधव गडकरी यांच्यामुळे ‘मुंबई सकाळ’ या दैनिकाचा नागपूरचा वार्ताहर म्हणून काम करत होतो. मी बर्‍यापैकी अडचणीत होतो, पण  मुकुंदराव किर्लोस्कर यांच्यामुळे पुण्याच्या ‘सकाळ’चाही वार्ताहर म्हणून काम करू लागलो. दरम्यान माधव गडकरी ‘लोकसत्ता’चे संपादक झाले आणि तेही काम पत्नी मंगलाच्या नावाखाली करू लागलो. या तिन्ही दैनिकांचं मिळून मासिक मानधन १५०० रुपये होतं. तेव्हा उपसंपादकाला सुमारे १३०० रुपये पगार मिळत असे. म्हणजे माझी प्राप्ती बर्‍यापैकी चांगली होऊ लागलेली होती.

शिवाय मी सतत कोणत्या ना कोणत्या साप्ताहिक-मासिकासाठी लिहीत असे. तेव्हा दूरदर्शनचं प्रक्षेपण नुकतच नियमित सुरू झालेलं होतं आणि त्याचं अप्रूप होतं. माझा यारदोस्त प्रकाश देशपांडे तेव्हा ‘तरुण भारत’ या दैनिकाच्या ‘मध्यमा’ या पुरवणीचा संपादक होता. त्याच्यामुळे दूरदर्शनवरील कार्यक्रमांवर आधारित ‘साप्ताहिकी’ हा स्तंभ लिहायला सुरुवात केली. या मानधनातून पेट्रोल आणि बिडी-काडीचा खर्च सुटे. एकंदरीत आमचं चांगलं चाललेलं असताना जगण्याला अचानक एक वळण मिळालं.

‘तरुण भारत’ या दैनिकाचे मुख्य संपादक तेव्हा ‘मामासाहेब’ या नावाने ओळखले जाणारे दि. भा. घुमरे होते आणि ल. त्र्यं. जोशी तेव्हा नंबर दोन होते. लक्ष्मणराव हे त्यांचं सर्वपरिचित संबोधन. एक दिवस सकाळी लक्ष्मणरावांचा फोन आला. सटरफटर बोलणं झाल्यावर त्यांनी सांगितलं, ‘दुपारी जरा बाबुरावांना भेटून घ्या’. ‘प्रयोजन काय’ असं मी विचारल्यावर लक्ष्मणराव म्हणाले, ‘भेटून तर घ्या. काही चांगली बातमी असेल’.

एव्हाना बाबुरावांशी गप्पा मारण्याइतकी घसट निर्माण झालेली होती. एका नागपूर ते मुंबई रेल्वे प्रवासात आम्ही सोबत होतो आणि दोघांचीही तिकिटे कन्फर्म नव्हती. त्या डब्याचा टीसी बाबुरावांच्या ओळखीचा होता आणि लवकरच तिकीट कन्फर्म करतो असं तो त्यांना म्हणाला. त्यावर ‘यांचंही बघा’ असं बाबूरावांनी त्याला सांगितलं. बर्थ मिळेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. म्हणजे बाबुराव बोलत होते आणि मी श्रवण करत होतो.

...तर लक्ष्मणरावांनी सांगितल्याप्रमाणं मी कार्यालयात गेलो. लक्ष्मणरावांना भेटलो. मला बाबुरावांच्या केबिनमधे सोडून लक्ष्मणराव लगेच बाहेर गेले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर बाबुरावांनी अत्यंत आस्थेवाईकपणे चौकश्या केल्या. शेवटी ते म्हणाले, ‘आमच्याकडे ‘तरुण भारत’मध्ये वार्ताहराची एक जागा रिकामी झाली आहे. तुम्ही येणार का?’ मला हा धक्काच होता. ते स्पष्ट सांगून मी म्हणालो, ‘‘ ‘सकाळ’ आणि ‘लोकसत्ता’ या दोन दैनिकांसाठी मी अर्धवेळ काम करतो आहे. पुढच्या करिअरसाठी आणि माझी मुळं महाराष्ट्रात टिकून राहण्यासाठी ते आवश्यक आहे. शिवाय मी काही संघ समर्थक नाही. म्हणून मला जरा वेळ द्या विचार करायला.’’

‘‘तुम्ही विचार करा, काही हरकत नाही. ‘लोकसत्ता’ आणि ‘सकाळ’चं काम करायला हरकत नाही. संघाबद्दल नंतर बोलू, आधी काम तर करून बघा”, असं हसत हसत बाबुराव म्हणाले आणि आमची भेट संपली. जाण्याआधी दिगंबरराव आणि लक्ष्मणरावांना भेटून घ्या हे त्यांनी आवर्जून सांगितलं. बाबुराव हसतातसुद्धा हे सुखावणारं होतं आणि लक्ष्मणराव लगेच बाहेर का गेले, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं.

तेव्हा ‘तरुण भारत’मध्ये असणारा माझा दोस्तयार प्रकाश देशपांडे सेक्युलर विचाराचा होता. त्याच्याशी बोललो. प्रकाशनं सांगितलं, ‘‘तरुण भारत केवळ संघवाल्यांचा आहे हा तुझा गैरसमज आहे. मीच नाही तर कम्युनिस्ट अण्णासाहेब (प्र. शं.) देशमुख, आंबेडकरी ज्ञानेश्वर वाघमारे हेही आहेत संपादकीय विभागात.” 

मग मी यथावकाश ‘तरुण भारत’ या दैनिकात रुजू झालो आणि एक वेगळे बाबुराव मला अनुभवायला मिळाले. शिवाय माझ्यावर अचूक मराठी भाषेचा विस्तारित संस्कारही याच नोकरीच्या काळात झाला, हे नमूद करायला मला आनंद वाटतो. शरदराव मोडक, प्रकाश देशपांडे, अण्णासाहेब देशमुख, वामन तेलंग, लक्ष्मणराव या मंडळींनी माझीच नाही  तर सर्वांचीच भाषा तेव्हा घोटून घेतली. या संदर्भात बाबुराव तर गुरूच होते.

ते तेव्हा संघाच्या प्रकाशनांची शिखर संस्था असलेल्या तरुण भारत असोसिएट्सचे अध्यक्ष होते. ‘तरुण भारत’च्या संपादकीय विभागालगतच त्यांची केबिन होती. दैनंदिन कामात त्यांचा हस्तक्षेप नव्हता, मात्र त्यांची दैनंदिन कामावर गडद छाया आणि दराराही  होता. तेव्हा बाबुराव किमान पंधरा-वीस दिवस तरी दौर्‍यावर असत. आल्यावर आठवडा-पंधरा दिवसांतून एकदा तरी ते दुपारी चहाच्या वेळेस संपादकीय विभागात चक्कर मारत आणि गप्पा मारत. या गप्पा अंकाबाबत असत. भाषक चुकांवर बाबुराव त्या चुकीचा उल्लेख करून कोरडे ओढत. चुका दाखवताना अचूक शब्द, भाषा, रचना कशी हवी, त्याची व्युत्पत्ती याबद्दल सांगत. भाषाविषयक समज आणि जाणिवा विकसित करणारा तो अनुभव मी कधीही विसरू शकणार नाहीच.

त्या ‘वर्गा’त शिकल्यानुसार अजूनही मी ‘तज्ज्ञ’ असाच शब्दप्रयोग करतो, ‘तज्ञ’ नाही; ‘पोलीस’ या शब्दातलं ‘ली’ हे अक्षर ‘दीर्घ’च लिहितो  आणि प्रत्यय लागल्यावरच ‘लि’ असा र्‍हस्व करतो; ‘अस्मादिक’ लिहितो, जर मराठीत अक्षरावरची वेलांटी दीर्घ असेल तर इंग्रजीत ‘इ’ वापरतो... असं सांगावं तितकं थोडंच आहे.

एकदा या वर्गात बाबुरावांनी अचानक विचारलं, ‘गेल्या आठवड्यात झालेल्या ए. बी. बर्धन आणि श्री. वा. धाबे यांच्या पत्रकार परिषदा इतक्या त्रोटक का आल्या?’ संबंधित वार्ताहरानं बचाव करताना सांगितलं की, बर्धन भाजपच्या फारच विरोधात आणि अर्धवट माहितीवर आधारित बोलले म्हणून... त्याला ताडन तोडत बाबुराव म्हणाले, ‘तशीच बातमी द्यायची होती आणि नंतर लेख लिहून बर्धन यांना उघडं पाडायचं होतं. बातमीशी कधीच छेडछाड करू नका यापुढे’. बाबुरावांचं हे सांगणं ‘तरुण भारत’ या दैनिकाच्या (तेव्हाच्या) यश आणि विश्वासार्हतेचं गुपित तर होतंच, शिवाय पत्रकारितेचा तो एक धडाही होता.

बाबुरावांच्या पत्रकार/संपादक म्हणून निकोप असणार्‍या काही आठवणी यानिमित्तानं नोंदवून ठेवायला हव्यात. ‘तरुण भारत’मध्ये असताना माझ्या वाट्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या असाईनमेंट जास्त येत. मला तो छळ वाटत असे. एकदा त्या संदर्भात मी तक्रार केली, तर लक्ष्मणराव म्हणाले, ‘त्या बाबुरावांच्या सूचना आहेत’.

मग एकदा धाडस करून ही तक्रार त्यांच्याकडे मी केली. त्यावर ते शांतपणे म्हणाले, ‘तुम्ही त्या बातम्या भक्तिभावानं नाही तर रिपोर्टर म्हणून अतिशय व्यवस्थित लिहिता म्हणून मी तसं सुचवलेलं आहे. शिवाय उद्या संघावर तुम्ही लिहाल, तेव्हा तुम्हाला बरंच काही नीट समजलेलं असेल’. ते एक प्रशस्तीपत्र होतं, ते देण्याची ती खास बाबुरावांची शैली होती आणि शिकवणही.

बाबुरावांचा हा दृष्टिकोन बरंच काही शिकवणारा ठरला.

रा. स्व. संघाचा तृतीय शिक्षा वर्ग आणि त्याचा जाहीर समारोप, ही नागपुरात एक मोठी इव्हेंट असते. ‘तरुण भारत’चेही अनेक सहकारी संघाच्या वेषात त्या कार्यक्रमाला श्रद्धेनं हजेरी लावत असतात. समारोपाच्या वृत्तसंकलनाचं कामही माझ्याचकडे येत असे. हे घडलं तेव्हा बाळासाहेब देवरस सरसंघचालक होते. त्या वर्षीच्या समारोपाच्या कार्यक्रमाला गेलो. बाळासाहेब देवरस यांची कार आल्यापासूनच कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले उठून उभे राहिले; अपवाद केवळ मी आणि ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकाच्या अनिल शर्मा यांचा होता. कार्यक्रम संपल्यावर कार्यालयात येऊन मी बातमी दिली आणि घरी गेलो.

दुसर्‍या दिवशी कार्यालयातून दोन-तीन फोन आले की, माझ्या संदर्भात काही तरी सुरू आहे. लक्ष्मणराव जोशी यांचा फोन आल्यावर बराच उलगडा झाला. कार्यालयात गेल्यावर माझी पेशी सरळ संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब टालाटूले यांच्या दरबारात झाली. मला उभं करूनच त्यांनी फायरिंग सुरू केली. लक्ष्मणराव गप्प होते; तो त्यांचा नाईलाज असावा. शेवटी मला मेमो द्यावा असा निर्णय झाला. उपमर्द करणारी वागणूक मिळण्याचा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच (आणि शेवटचाही!) प्रसंग होता.  उद्विग्न होऊन मी बाहेर पडलो. आपल्या नोकरीचा हा शेवटचा महिना या निर्णयाप्रत मी एव्हाना आलेलो होतो.

संपादकीय विभागाकडे जाणारा जिना चढत असताना बाबुराव जिना उतरताना दिसले. माझ्या चेहर्‍यावरचा तणाव त्यांना जाणवला असावा. त्यांनी काय झालं वगैरे चौकशी केली, मी त्यांना जिन्यातच उभ्या-उभ्या तावातावानं सांगू लागलो, तर ते म्हणाले, ‘चला, वर बसून बोलू’. त्यांच्या केबीनमध्ये जाईपर्यंत मीही जरा सावरलो होतो. त्यांनी चहा मागवला. मग मी काय घडलं ते, माझी भूमिका आणि राजीनाम्याचा विचार वगैरे मोकळेपणानं सांगितलं. प्रकरण जरा गंभीर झालं असल्याचं मान्य करून बाबुराव किंचित रागानंच म्हणाले, ‘आदर म्हणून उभे राहिले असतात, तर काय बिघडलं असतं? वाद ओढवून घेण्याचा तुमचा स्वभाव काही जात नाही!’ थोडा वेळ शांततेत गेल्यावर बाबुराव म्हणाले, ‘‘जा कामाला लागा. मी बघतो काय करायचं ते आणि हो राजीनाम्याचा विचार काढून टाका मनातून.”

पुढं या प्रकरणात काहीच घडलं नाही. स्वयंसेवक नसलेल्या पत्रकाराच्या बाजूनं बाबुराव वैद्य ठामपणे उभे राहिल्यानंच हे घडलं, हे मला चांगलं ठाऊक आहे. आणखी एक प्रसंग - एका संततिनियमन गोळीची (टुडे) पत्रकार परिषद होती. कंपनी मुंबईची होती आणि त्या कंपनीचा जनसंपर्क अधिकारी माझा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र होता. मी काही बिझिनेस बीट कव्हर करत नव्हतो. अशा पत्रकार परिषदांना मी चुकूनही जात नसे, पण मित्र म्हणाला, ‘तुला पत्रकार परिषद कव्हर कर, असं म्हणतच नाहीये मी. परिषद संपल्यावर ये. आपण गप्पा मारू आणि जेवू या!’. कल्पना चांगली होती. मी गेलो तेव्हा जेवणं आटोपत आलेली होती. दोघे-तिघे मंतरलेल्या पाण्यासोबत चाळा करत बसलेले होते. मी आणि माझा मित्र जरा दूर एका टेबलवर बसलो. खूप वर्षांनी भेटलो असल्यानं रात्री उशीरापर्यंत दोस्तीचे ‘गले शिकवे’ झाले.

तिसर्‍या दिवशी भलतंच लफडं वाट्याला आलं. एव्हाना लक्ष्मणराव जोशी संपादक झालेले होते. त्यांचं ‘लगेच या’ असं बोलावणं आलं. गेलो तर जाहिरात विभागाचे अधिकारी बसलेले होते. ‘ती’ बातमी आमच्याकडे प्रकाशित झालेली नव्हती आणि त्याबद्दल मला दोषी धरण्यात आलेलं होतं. मी काय घडलं ते लक्ष्मणरावांना समजावून सांगितलं. त्यांना ते पटलंही.

पण प्रकरण आणखी  चिघळलं. बाबुरावांच्या दरबारात पोहोचण्याची वर्दी आली. मी पोहोचलो तर बाकीचे त्यांचं म्हणणं सांगून गेलेले असावेत. मी जे काय सांगायचं ते सांगितलं. बाबुराव वैद्य यांच्या चेहऱ्यावर मिश्कील हसू होतं.

मला ते म्हणाले, ‘जायच्या आधीच लक्ष्मणरावांना सांगायला पाहिजे होतं, म्हणजे हा गोंधळ झाला नसता. असो! ती प्रेसनोट आहे का तुमच्याकडे?’. मी नाही म्हणालो, कारण मी पत्रकार परिषदेला गेलेलोच नव्हतो अशीही पुस्ती जोडली. बाबुरावांनी त्यांच्यासमोरची प्रेस नोट माझ्याकडे दिली आणि ते म्हणाले, ‘अडचण इथे आहे’. मी पाहिलं तर प्रेसनोट इंग्रजीत होती’. ‘तरुण भारत’मधल्या प्रत्येकाला ते किती चांगलं ओळखून होते, हे माझ्या लक्षात आलं. मी उठलो तर बाबुराव म्हणाले, ‘त्यांची अडचण ओळखून एक बातमी करून द्या’. संपादकीय विभागात आलो तर लक्ष्मणराव समोरच गालातल्या गालात हसत उभे होते.

एक शेवटची आठवण सांगतो. माझी बदली ‘लोकसत्ता’च्या नागपूर कार्यालयातून मुंबईला झाली. शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत पत्नी मंगला आणि कन्या सायली नागपूरलाच राहणार होते. मुंबईला रुजू होण्याआधी नागपुरात बाबुराव वगळता बहुतेक सर्वांच्या भेटी झाल्या. ते तेव्हा संघाच्या सर्वोच्च वरिष्ठ वर्तुळात होते. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीतही होते आणि त्यांचा जास्त मुक्काम दिल्ली व उत्तर प्रदेशात असे. ते तेव्हा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या गडबडीत असावेत. त्या निवडणुका संपल्यावर बाबुराव नागपुरला आले, तेव्हा नेमका मीही नागपूरला आलेलो होतो. रीतसर वेळ घेऊन ज्येष्ठ संपादक मनोहर अंधारे आणि मी बाबुरावांना भेटायला गेलो. माझी मुंबईला बदली झाल्याचा त्यांना आनंद झाला. बर्‍याच गप्पा झाल्या. त्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणि लागलेले निकाल हाही विषय होता.

बोलता बोलता बाबुराव सहज बोलून गेले की, भाजपच्या पाठिंब्यावर मायावती मुख्यमंत्री होऊ शकतात. मुंबईच्या प्रवासात तोच विषय माझ्या डोक्यात घोळत राहिला. ‘लूज टॉक’ करण्यात बाबुराव नसतात हे मला चांगलं ठाऊक होतं. बहुजन समाजवादी पक्षाच्या मायावती मुख्यमंत्री होण्याचा  संदर्भ त्यांनी मला हिंट म्हणून दिला होता अशी माझी खात्री होती. मग भाजपच्या पाठिंब्यावर मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री होणार असल्याची बातमी केली. ती बातमी मराठी, हिंदी, इंग्रजीत माझ्या नावानिशी प्रकाशित झाली. माझं राजकीय ज्ञान हे अज्ञान असल्याचा निष्कर्ष अनेकांनी काढला, तरी कोणताही प्रतिवाद न करता मी ठाम होतो. नंतर काही दिवसांनी खरंच मायावती भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाल्या.

सांगायचं तात्पर्य हे की, बाबुराव बोलत असताना नीट ऐकलं तर काही तरी हाती येत असल्याचा माझा तरी अनुभव  आहे .

अलीकडच्या काही वर्षात मी काही बाबुरावांच्या संपर्कात नाही. मात्र माझ्या लिहिण्याच्या मेजावर त्यांचं ‘शब्ददिठी शब्दमिठी’ हे पुस्तक मार्गदर्शनासाठी सदैव सज्ज आहे. आमचं शेवटचं बोलणं दोन वर्षापूर्वी झालं. पत्रमहर्षी अनंतराव भालेराव यांच्यासंबधी ‘कैवल्यज्ञानी’ या ग्रंथाचं संपादन मी करतो आहे. त्यासाठी लेख मागण्यासाठी मी बाबुरावांना फोन केला होता. त्यांना कल्पना आवडली, पण ते म्हणाले, ‘अहो , इच्छा असूनही अनंतरावांसंबधी लिहिता येणं शक्य नाही, कारण आता मी ९५ वर्षांचा आहे’. मग मीही फार काही आग्रह केला नाही. पण वयाच्या ९५व्या वर्षी सुद्धा त्यांची लिहिण्याची असोशी खूपच भावली.

बाबुराव कट्टर हिंदुत्ववादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यांच्या रक्तातच भिनलेला, पण विरोधकांशी ते सुसंस्कृत उदारपणे वागतात, पत्रकारितेची मूल्ये जपतानाही ते त्यांची विचारसरणी आड आणत नाहीत आणि ज्ञानताठा न बाळगता ते सदैव शिक्षकाच्या भूमिकेत वावरतात हे मला खूपच महत्त्वाचं वाटतं. या अर्थानं ते लोकशिक्षक आहेत. त्यांचा प्रदीर्घ सहवास लाभला नाही ही रुखरुख माझ्या मनात कायम आहे; तसं घडलं असतं तर माझं आकलन आणि मराठी भाषा नक्कीच आणखी समृद्ध झाली असती.  

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

ramesh shinde

Wed , 11 March 2020

प्रवीण बर्दापूरकर सरांचे 'दोस्त-यार' पुष्कळ आहेत, हे समजले. लेखात मा.गो. वैद्यांपेक्षा स्वतःच्या ओळखी आणि स्वतःची स्वभाववैशिष्ट्ये यांविषयी बर्दापूरकर यांनी जास्त शब्द खर्च केले आहेत, असे वाटते आहे. दुर्दैवाने त्यातून उभी राहाणारी बर्दापूरकर यांची प्रतिमाही काही जाणीव समृद्ध करणारी नाही. सतत पुढे-पुढे करणारे पोकळ व्यक्तिमत्व, असे त्यांचे रूप वाटते, त्यामुळेच दुसऱ्यांच्या गौरवग्रंथात ते स्वतःचाच जास्त गौरव करताना दिसतात. सरांचा स्वतःचा गौरवग्रंथ कधी येणार आहे, ते कळवावे. त्यात सरांचेच लेख असतील ना, संपादक साहेब?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......