संमेलनाध्यक्षपदी दिब्रिटोंची निवड करणं, ही आजच्या कलुषित सांस्कृतिक वातावरणाच्या व धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर, हे महामंडळानं केलेलं एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे!
पडघम - साहित्य संमेलन विशेष
लक्ष्मीकांत देशमुख
  • फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Wed , 08 January 2020
  • पडघम साहित्य संमेलन विशेष फादर फ्रान्सिस दिब्रिटो Father Francis Dibroto अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan

उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांनी आयोजित केलेला सत्कार समारंभ (२६ सप्टेंबर २०१९) संयोजकांना सातत्यानं येणाऱ्या धमक्यांमुळे पोलीस बंदोबस्तात घ्यावा लागला. त्या घटनेचा मी साक्षीदार होतो. प्रागतिक व पुरोगामी महाराष्ट्र असा लौकिक असणाऱ्या महाराष्ट्राची सांस्कृतिक, सहिष्णुता किती वेगानं घसरत चालली आहे, याचं हे द्योतक आहे. एका अस्सल मराठमोळ्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि मराठीत लक्षणीय साहित्यसंपदा निर्माण केलेल्या एका उदारमतवादी साहित्यिकाच्या सत्कारासाठी पोलीस संरक्षण मागावं लागतं, ही केवळ दुर्दैवी बाब नाही, तर लेखक-कलावंतांच्या स्वातंत्र्याच्या वाढत्या धोक्याची भयसूचक घंटा पुन्हा एकवार तीव्रतेनं खणाणली गेली आहे, असं माजी संमेलनाध्यक्ष म्हणून मला वाटतं.

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा संविधानिक असा मौलिक अधिकार आहे, पण त्याचा अलीकडचा काळात झपाट्यात संकोच होत आहे. त्याबद्दल २०१८मध्ये बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनात मी माझ्या अध्यक्षीय भाषणात सरकारला दोषी धरत ‘राजा तू चुकत आहेस. तू सुधारलं पाहिजेस,’ असं ठाम प्रतिपादन केलं होतं. पण गेल्या वर्षीच्या यवतमाळला झालेल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उदघाटक नयनतारा सहगल यांच्या ‘निमंत्रण वापसी’वरून आपल्या राज्याचं व देशाचं साहित्यिक-बौद्धिक व सांस्कृतिक वातावरण किती गढूळ व दूषित झालं आहे, याचा पुन्हा प्रत्यय आला होता. तेव्हा महाराष्ट्र व बऱ्याच प्रमाणात देशही ढवळून निघाला होता. पण त्यापासून आपण काही बोध घेतल्याचं दिसून येत नाही.

आता तर फादर दिब्रिटोंच्या निवडीला आक्षेप घेताना त्याला सांस्कृतिक राजकारणासोबत धोकादायक असं धार्मिक विरोधाचं असहिष्णू वळण देण्याचा सरळ-सरळ प्रयत्न होताना दिसत आहे. त्याची मला अधिक चिंता व काळजी वाटते. इथं ‘मी’ हा व्यक्ती नाही, तर माजी संमेलनाध्यक्ष म्हणून लेखक-कलावंताच्या एक प्रतिनिधी आहे. म्हणून फादर दिब्रिटोंची निवड केल्याबद्दल महामंडळ, खास करून त्याचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील व प्रा. मिलिंद जोशी यांना मागील काही दिवसांत फोनवरून ज्या धमक्या येत आहेत आणि रविश कुमार ज्यास उपहासानं ‘व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटी’ संबोधतात, त्या सोशल मीडियावर जो अश्लील मजकूर व्हायरल होतोय, त्याचं विवेचन करण्यासाठी आणि घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचे खंडन करण्यासाठी हा लेखनप्रपंच करणं मला भाग पडतंय. हे माझं लेखक-कलावंत म्हणून कर्तव्य आहे. अप्रिय असलं तरी इष्ट तेच स्पष्टपणे लिहिण्याचा हा अल्पसा प्रयास आहे.

फादर दिब्रिटोंच्या अध्यक्षपदाला विरोध करण्यामागे कोण आहे? टीव्हीवर मुलाखती देत व चर्चा करत विश्व हिंदू परिषद व ब्राह्मण महासंघानं उघडपणे त्यांचं ख्रिश्चन असणं अधोरेखित करत विरोध केला आहे. फादर दिब्रिटोंची निवड हा आमच्यासाठी काळा दिवस आहे, असं म्हणत महामंडळानं त्यांची निवड रद्द करावी, तसंच महाराष्ट्र शासनानं, ते संमेलनासाठी अनुदान देत असल्यामुळे हस्तक्षेप करावा अशीही मागणी केली आहे. सनदशीर मार्गानं विरोध करून काही निष्पन्न झालं नाही, तर संमेलन उधळून लावू, अशीही स्पष्ट धमकी या दोन संघटनांच्या प्रतिनिधींनी टीव्ही चॅनेलना मुलाखत देताना दिली आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, सांस्कृतिक राजकारणाला आता उघडपणे धार्मिक वळण विरोधक देत आहेत. कारण नवनियुक्त अध्यक्ष फादर दिब्रिटो धर्मानं ख्रिस्ती आहेत, धर्मगुरू आहेत.

विचारवंतांच्या आत्महत्या, धार्मिक उन्माद व गोहत्येच्या नुसत्या संशयावरून झुंडशाहीनं हिंसक होत मुस्लिमांच्या हत्या करणं, रोहित वेमुला असू देत की डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येमागील सवर्णांचा अनुदार दृष्टिकोन व वर्तनामुळे होणारी असह्य कोंडी आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावानं जोपासला जाणारा बहुसंख्य हिंदूवाद, यामुळे देशातील कला-साहित्य-संस्कृतीचं मोकळं वातावरण झपाट्यानं नष्ट होत आहे. मी काय खावं, काय घालावं हे अप्रत्यक्षपणे डिक्टेट केलं जाऊ लागलं आहे. यापुढे लेखक-कवींनी काय लिहावं तसंच काय लिहू नये, हे जर बाह्यशक्ती नियंत्रित करू लागल्या, तर लोकशाही व स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता वास्तव रूप धारण करू शकते.

म्हणून एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला होणारा धार्मिक विरोध एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही, तर तो प्रामुख्यानं व अंतिमतः सेक्युलॅरिझमचा आहे, असं मला वाटतं. म्हणून त्याची साधक-बाधक चर्चा झाली पाहिजे. विचारकलहाला घाबरायचं नसतं, हा ‘सुधारक’कार आगरकरांचा मोलाचा संदेश शिरोधार्य मानून अमर्त्य सेन ज्या भारतीयांना ‘अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ म्हणतात, त्या आपण भारतीयांनी निकोप चर्चा केली पाहिजे. कोणताही छुपा हेतू वा अजेंडा न ठेवता स्पष्टपणे बोललं-लिहिलं पाहिजे. ही आजच्या काळाची गरज बनली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे नितीन वाडकर, महंत सुधीरदास आणि ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी टीव्हीवर मुलाखत देत उघडपणे फादर दिब्रिटोंना विरोध केला आहे. तसं व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडियावर अभिराम दीक्षित, सुजीत भोगले यांचे लेख व्हायरल झाले आहेत, तसंच प्रा. शेषराव मोरे यांच्या नावानं ‘तत्त्वज्ञ मे. पु. रेगे कृत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे वस्त्रहरण’ या नावाचा लेखही माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर एका प्रसिद्ध मासिकाच्या, लेखकाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून आला आहे, तो एका प्रसिद्ध प्रकाशक व अनुवादक यांनी फॉरवर्ड केला आहे. परंतु हा लेख खरंच प्रा. मोरे यांचा आहे किंवा नाही, हे त्यांनीही विशद केलेलं नाही. पण त्यातील मजकूर वापरून अभिराम दीक्षित व भोगले आदींनी लिहिलं आहे. त्यामुळे नावाचा विचार न करता तो मजकूर सोशल मीडियातून पुढे आला आहे. प्राचार्य ठाले पाटील व प्रा. मिलिंद जोशींना फोनवरून आलेल्या द्वेषमूलक धमक्या या मजकुरांनी प्रभावित होऊन दिल्या असणार. त्यामुळे त्यातून प्रकट झालेल्या विचारांचा-मजकुराचा मी समाचार घेणार आहे.

या सर्वांच्या आक्षेपांचे प्रमुख मुद्दे काय आहेत? नवनिर्वाचित अध्यक्ष हे ख्रिश्चन धर्मगुरू आहेत व धर्मांतरावर विश्वास ठेवतात, ते घडवून आणतात. त्याचं साहित्य हे प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मासंबंधीचं आहे व तेही भाषांतरीत. त्यामुळे लेखक म्हणून त्यांची साहित्यिक योग्यता फारशी नाही. फादर हे उदारमतवादी असल्याचा आव आणत असले तरी ते कडवे धर्मवादी व धर्मप्रचारक आहेत.

खरं तर वेळोवेळी फादर दिब्रिटो यांनी त्यांच्या भाषणांतून, ‘ग्रेट भेट’ व ‘माझा कट्टा’ या टीव्हीवरील कार्यकमांतून आपले विचार मांडले आहेत. तसंच त्यांचे विचार युट्यूबवरही उपलब्ध आहेत. फादर दिब्रिटो ख्रिश्चन धर्मगुरू असल्याचं सर्वश्रुत आहे. पण ते सर्मधर्मसमभावाचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. त्यांनी आपली ख्रिश्चनधर्मीय श्रद्धा कधी लपवून ठेवलेली नाही. महात्मा गांधीही स्वतःला ‘सनातन हिंदू’ म्हणवून घ्यायचे, तरीही दररोजच्या प्रार्थनेत सर्व धर्मग्रंथांचं पठण वा गायन करायचे. फादर दिब्रिटो हेही याच जातकुळीतले आहेत. त्यांचं ख्रिश्चनपण जपत ते सर्वधर्मभावाचा पुरस्कार करतात. त्यांनी वारंवार सांगितलेली व लिहिलेली एक आठवण मी इथं नमूद करतो. ते जेव्हा धर्म अभ्यासासाठी युरोपला गेले, तेव्हा त्यांच्या बॅगेत ‘बायबल’सोबत ‘तुकाराम गाथा’ होती. तिथं त्यांना त्यांच्या देशातील इतर धर्मियांच्या प्रार्थना सांगा असं सांगितलं तेव्हा त्यांनी ‘पसायदान’ या प्रार्थनेचं इंग्रजी भाषांतर करून सांगितलं. तेव्हा ही वैश्विक प्रार्थना आहे, असं ख्रिश्चन धर्म अभ्यासवर्गात सर्वमान्य झालं.

मी आळंदी येथील ज्ञानेश्वर मंदिराचा विश्वस्त आहे. तिथं आम्ही ‘पसायदान विचार साहित्य संमेलन’ घेतलं होतं. त्यातील ‘माझा धर्म आणि पसायदान’ या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून फादर दिब्रिटो यांनी प्रभावी विवेचन केलं होतं. त्यांच्या ‘सुबोध बायबल’मध्ये हजारभर तळटीपा दिल्या आहेत. त्यात संत तुकारामांच्या ‘जे का रंजले गांजले।’ या अभंगाचा साधुत्वाच्या संदर्भात संदर्भ दिला आहे. काल पुण्यात सत्काराच्या वेळी त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी काही वर्षांपूर्वी पुण्यात एक दिवस ते पंढरीच्या वारीत चालले होते, ही आठवण सांगितली. त्यावरून हे सिद्ध होत नाही का की, ते स्वतःच्या धर्माची तत्त्वं वारकरी संतांच्या परंपरेशी जोडून घेत सर्वधर्ममैत्रीभाव साधतात? त्यामुळे धर्मगुरूंचा कडवेपणा व आपलाच धर्म श्रेष्ठ असं ते कधी बोलले नाहीत की लिहिलं नाही.

दुसरा आक्षेप, ते त्यांच्या लेखनातून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतात. तो घेताना त्यांच्या पुढील पुस्तकांचा दाखला दिला गेला. ‘आनंदाचे अंतरंग- मदर तेरेसा’, ‘सुबोध बायबल’, ‘ख्रिस्ताची गोष्ट’, ‘मुलांचे बायबल’ व ‘पोप दुसरे जॉन पॉल’ ही पुस्तकं ख्रिस्ती धर्म व धर्मपंडितांवर लिहिलेली आहेत. त्यामुळे मराठीतलं साहित्य अधिक समृद्ध झालं आहे. साहित्यात जसं समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान आदींवर विपुल लिखाण व्हायला हवं असं आपण म्हणतो, तसंच जगातील सर्व प्रमुख धर्मग्रंथांवर आधारीत लेखनही हवं. त्याशिवाय तो धर्म, ती माणसं, ती भारतीय समाजाचा भाग आहेत, ती कशी समजणार?

हे काम जर फादर दिब्रिटो यांनी रसाळ मराठीत केलं असेल तर तो आक्षेपाचा मुद्दा कसा असू शकतो? अनेक हिंदू विचारवंतांनी व अभ्यासकांनी गीता, वेद व पुराणांवर विपुल असं लेखन केलं आहे. ते काय धर्मप्रसारासाठी होतं म्हणायचं? धर्मग्रंथ ही काही धर्माची वा धार्मियांची संपदा नसते. ती वैश्विक असते. म्हणून आजही जर्मनीमधील अनेक विद्यापीठात संस्कृत भाषेचं अध्ययन होतं. ते संस्कृत साहित्य हा विश्व साहित्याचा भाग आहे म्हणूनच ना? ‘बायबल’ व ‘कुराण’ हे सुबोध मराठीत आले आहेत, त्यानं साहित्यप्रांत समृद्धच झाला आहे.

विश्व हिंदू परिषदेनं व ब्राह्मण महासंघानं फादर यांच्यावर धर्मप्रसार व धर्मांतराचा आक्षेप त्यांच्या निवडीनंतर घेतला आहे, पण त्यांनी त्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. चोवीस तास सुरू राहणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या काळात धर्मांतराची कृत्यं लपून राहू शकत नाहीत. फादर यांनी धर्मांतर घडवून आणलं, असा कोणताही पुरावा नाही. उलट त्यांनी कालच्या पुण्यातील सत्कार समारंभात व्हॅटिकन सिटीमध्ये नव्या शतकाच्या प्रारंभी जबरदस्तीनं वा आमिषानं धर्मांतर घडवून आणणाऱ्यांवर बंदी घातल्याचा दाखला दिला आहे. इतिहासकाळात घडलेल्या अत्याचारांची समस्त ख्रिश्चनांचा धर्मगुरू म्हणून त्यांनी माफी मागितली आहे. फादर दिब्रिटो असं म्हणतात की, जुन्या काळी सर्वच धर्माच्या प्रसारकांनी अत्याचार करून धर्मांतरं घडवून आणली आहेत. इतिहासाच्या भाग झालेला तो धर्मांतराचा काळा कोळसा उगाळत बसायचा? सर्व धर्माचे सांगाडे बाहेर काढायचे की, संस्कृती अधिक वर्धिष्णू करायची? हा त्यांचा प्रश्न व त्यातून सूचित होणारा अर्थ महत्त्वाचा आहे. प्रगतीशील व भविष्यवेधी आहे असं मी मानतो.

धार्मिक कारणावरून फादर दिब्रिटोंना विरोध करणारे त्यांचं वसईतलं कार्य लक्षात घेत नाहीत. आज मुंबई अमराठी म्हणजे इंग्रजी मोठ्या प्रमाणात झाली आहे, पण वसईचं मराठीपण आजही कायम आहे. त्यामध्ये फादर दिब्रिटो व त्यांच्या ‘सुवार्ता’ या मासिकाचा मोठा हात आहे. या परिसरातील मराठीत लिहिणाऱ्या ख्रिश्चन लेखक-कवींची एक दमदार फळी आज साहित्यप्रांती आपली नाममुद्रा कोरत आहे त्यामागे त्यांचा मराठीचा आग्रह व प्रेम हे प्रमुख कारण आहे. वसई हे सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदानं नांदणारे शहर आहे आणि इतिहास काळापासून आजवर तिथं धार्मिक दंगल झाली नाही, हे अभिमानानं फादर दिब्रिटो सांगतात.

ते भारत हा देश बहुधार्मिक व सहअस्तित्वावर विश्वास ठेवणारा व तसं वागणारा उदारमतवादी देश आहे, हे फादर दिब्रिटोंनी पुण्यात डिसेंबर २०१८ मध्ये भरलेल्या १८ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात म्हटलं होतं. भारतीय विशालतेची मुळं ऋग्वेदात सापडतात. आपल्या ऋषींनी म्हटलं आहे- एक रूद, विप्रबहुधा वदान्ति ‘तो’ एक आहे, साक्षात्कारी लोक त्याला अनेक नावांनी ओळखतात. घटनाकारांनी हे बहुविधतेचं सूत्र मान्य करून आपल्या ऋषीमुनींच्या क्रांतदर्शनाला मान्यता दिली आहे. ऋग्वेदात असंही म्हटलं आहे की, ‘आनो भ्रदा ऋतवो यंतु विश्वतः’ (सर्व दिशांतून नवे नवे विचार माझ्या भूमीत येऊ द्या.) या उदारवृत्तीमुळे भारत देश हा सकल धर्मांचं आणि विचारांचं माहेरघर बनला आहे, असा व्यापक उदार सेक्युलर विचार मांडणारा हा सच्चा माणूस आहे. त्यांच्यावरील धर्मप्रसारांचे आरोप हे सर्वथा चुकीचे व बिनबुडाचे आहेत.

भारत देश हा बहुधार्मिक व बहुसांस्कृतिक आहे आणि ते या देशाचं वैशिष्ट्य आहे. आज जगभर सर्व धर्मांचे लोक विविध ठिकाणी स्थालांतरीत होत आहेत, अशा वेळी विविध धर्म मान्य करत शांततामय सहअस्तित्व कसं साध्य करावं, हा प्राश्चात्य देशांपुढला प्रश्न आहे. त्याला भारताकडून त्याची कला शिकता येईल. पण आपण बहुसंख्याकवाद, सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाला अग्रस्थानी आणण्याच्या प्रयत्नात ही कला व हा सर्वधर्म समभाव व सहअस्तित्व नाकारत आहोत. त्यामुळे देशाचं नुकसानच होणार आहे. फार मोठी जनसंख्या असणाऱ्या मुस्लीम व ख्रिश्चनांना राजकारण व समाजकारणात बेदखल करून देशाला आपण अराजकतेच्या दिशेनं तर ढकलत नाही ना, याचा विचार केला पाहिजे, हा विचार फादर दिब्रिटो मांडतात म्हणून त्यांचं महत्त्व आहे.

फादर दिब्रिटो यांची साहित्यसंपदाही अव्वल दर्जाची आहे, पण फादर स्टिफन, बाबा पदमनजी व रेव्हरंड टिळकांपासून असलेली ख्रिस्ती मराठी साहित्य परंपरा ते जोरकसपणे पुढे नेत आहेत आणि त्याद्वारे समाजाला उदार व सर्वधर्म मैत्री समभावासाठी आवाहन करत आहेत. साहित्य जर समाज घडवत असेल तर फादर दिब्रिटो यांचं लेखन त्यासाठी वरील अर्थानं महत्त्वाचं आहे. प्रत्येकानं केवळ आपल्या धर्माची चिकित्सा व टीका करावी, हा अविवेकी संकुचित विचार झाला. जेव्हा महात्मा गांधी ‘सर्व धर्म अपूर्ण आहेत असे म्हणतात’ तेव्हा ती टीका असते. त्याच न्यायानं फादर दिब्रिटोंनी जर हिंदू धर्म व जाती परंपरेवर टीका केली तर बिघडलं कुठे? त्यांचा धर्म महत्त्वाचा नाही, तर ते जी टीका करतात, त्यात सत्यता किती आहे, हे महत्त्वाचं आहे. फादर दिब्रिटो यांच्या टीकेला सर्वधर्म मैत्रीचं अधिष्ठान आहे, हे विसरून चालणार नाही.

आक्षेपकांचे इतरही काही आक्षेप आहेत. उदा. ते संमेलनाला पायघोळ झगा घालून येणार का? संमेलनस्थळी क्रॉस इ. विकणार का? हे आक्षेप अत्यंत थिल्लर आहेत. त्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं!

फादर दिब्रिटो यांची एकमतानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल महामंडळाचं अभिनंदन! त्यांनी या संदर्भात काय विचार केला हे मला माहीत नाही. पण आजच्या कलुषित झालेल्या सांस्कृतिक वातावरणाच्या व धार्मिक असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर माझ्या मते फादर दिब्रिटोंची निवड करणं, हे महामंडळानं केलेलं एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे! गजानन माधव मुक्तीबोध यांनी ‘पार्टनर तुम्हारा पॉलिटिक्स क्या है’ असा भेदक प्रश्न विचारला होता, त्याची आठवण मला महामंडळाच्या या निर्णयामुळे झाली.

साहित्य हे निधर्मी असतं, असलं पाहिजे. मराठी साहित्य संतसाहित्यापासून असंच राहिलं आहे. मराठी साहित्यात आज दलित, स्त्रीवादी, मुस्लीम, आदिवासी आणि ख्रिश्चन साहित्य प्रवाह मुक्तपणे खळाळून वाहत आहेत आणि ते एकूणच मराठी साहित्याला विशाल आणि मानवतावादी बनवत आहेत. हे मुक्तीबोधांना अभिप्रेत असलेलं ‘पॉलिटिक्स’ आहे. आहे ती अन्यायकारी व मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारी व्यवस्था बदलणं, हे व्यापक अर्थानं पक्षापलीकडचं राजकारण असतं. मी त्या अर्थानं राजकीय लेखक आहे. असा विचार मी माझ्या अध्यक्षीय भाषणात मांडला होता. महामंडळाने मराठी साहित्याला मुस्लीम, ख्रिश्चन आदी धर्मियांनी दिलेलं योगदान मान्य करत त्यांना फादर यांच्या निवडीनं साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं हे व्यापक ‘पॉलिटिक्स’ स्वागतार्ह व अभिनंदनीय आहे. आणि आक्षेपकांचं संकुचित म्हणून त्याज्य वाटणारं आहे.

शेवटी आक्षेप घेणाऱ्या विश्व हिंदू परिषद, ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगावसं वाटतं की, त्यांच्या विचारांच्या राज्य सरकारनंच फादर दिब्रिटोंना २०१६ मध्ये ‘ज्ञानेश्वर-तुकाराम’ पुरस्कार देऊन गौरवलं आहे. फादर दिब्रिटो यांच्या व्यक्तिमत्त्वात येशू आणि ज्ञानेश्वर-तुकारामांच्या विचारांचा संगम आहे. त्यांची संमेलनाध्यक्षपदी झालेली निवड एका सेक्युलर साहित्यकाची आहे, तिनं गढुळलेलं सांस्कृतिक व धार्मिक वातावरण निवळण्यास मदत होणार आहे. आक्षेपकांनी मोकळ्या मनानं फादर यांचे विचार समजून घ्यावेत, म्हणजे त्यांची मनं व मतंही साफ, निर्मळ होतील!

.............................................................................................................................................

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मचरित्राच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4945/Nahi-Mi-Ekla

.............................................................................................................................................

लेखक लक्ष्मीकांत देशमुख ९१व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

laxmikant05@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 10 January 2020

लक्ष्मीकांत देशमुख,

तुम्ही म्हणता की :

फादर दिब्रिटोंची निवड करणं, हे महामंडळानं केलेलं एक जबरदस्त ‘पॉलिटिकल स्टेटमेंट’ आहे!

पण दिब्रिटो म्हणतात की 'राजकारणात धर्माचा वापर झाल्यास धर्माचे अवमूल्यन होते'. मग आता साहित्यसंमेलनात पॉलिटिकल स्टेटमेंट केल्याने साहित्याचं अवमूल्यन होत नाही का? काय समजायचं आम्ही वाचकांनी? शब्दांचं मायावी जाल पसरलं तरी ढोंग उघडं पडतं.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा