भारताच्या १.३ अब्ज लोकांचं भविष्य अनिष्टानी भरलेलं आहे!
पडघम - देशकारण
ब्रायन डेन्टन आणि सोमिनी सेनगुप्ता
  • ‘न्यू यॉर्क’मधील मूळ लेखातील काही छायाचित्रं, ब्रायन डेन्टन यांनी काढलेली
  • Sat , 30 November 2019
  • पडघम देशकारण मान्सून पाऊस पीक शेतकरी दुष्काळ लहरी हवामान पाणी समस्या मराठवाडा मुंबई

मान्सून हा भारतीय जीवनाचा गाभा अन संस्कृतीचा पाया आहे, हे आपण प्राचीन संस्कृत काव्य आणि हिंदी चित्रपटांत पाहिलं आहे. मान्सून हा लाखो शेतकऱ्यांच्या भविष्याचा रक्षणकर्ता आहे. हाच मान्सून तुमचा आहार नियंत्रित अन नियमित करतो. तो तसाच लहरीदेखील आहे. या लहरीपणाला वातावरण बदलाची साथ या मिळाली असून त्यामुळे गोंधळ उडाला आहे. मान्सूनचे आडाखे बांधणे कठीण होऊन बसलं असून त्याच्या तीव्रतेविषयी काही ठोसपणे सांगणंदेखील अवघड झालं आहे. सगळ्यात खेदाची या बाब म्हणजे सरकारच्या अतिशय संकुचित धोरणांनी या वातावरणीय बदलाच्या काळात लाखो लोकांना, विशेषतः गरिबांना हतबल करून सोडलं आहे.

अनेक वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीनंतर हाती आलेलं मक्याचं पीक जेव्हा कीटकनाशकं आणि अवकाळी पावसानं वाया जाताना फकीर मोहमद नावाचे शेतकरी पाहत आहेत. मुंबईच्या शिवणकाम करणाऱ्या राजश्री चव्हाण यांना खूप पावसामुळे घरात जमा झालेला गाळ कित्येक वेळा काढावा लागला आहे. एकेकाळी बंगलोरमधील पाऊस साठवणाऱ्या तळी प्लॅस्टिक आणि सांडपाण्यामुळे शेवटचा श्वास घेत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी निसर्गाच्या पुनर्भरणाच्या  क्षमतेपेक्षा झपाट्यानं कमी होत आहे.

पाणी हे जीवन आहे. लोक जगण्यासाठी या कोणत्याही पूर परिस्थितीला सामोरं जायला तयार असतात. भारताच्या पूर्वभागात लोक पिण्यायोग्य नसलेल्या पाण्यावर अवलंबून आहेत, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. दिल्लीमध्ये लोक यमुनेच्या अत्यंत प्रदूषित  पाण्यात देवाची पूजा करत आहेत. चेन्नईसारख्या महानगरात अनेक महिने घरातील नळ कोरडे असून महिला पाण्याचा ट्र्क आपल्या भागात आला, याची चाहूल लागताच प्लॅस्टिकचे हंडे घेऊन धावतपळत सुटतात.

पाऊस अनियमित झाला आहे. तो कधी येईल अन केव्हा थांबेल याचा काही नियम नाही. या वर्षी भारताने शतकातील पहिलाच ओला सप्टेंबर महिना अनुभवला असून, तब्ब्ल १६०० लोकांना पुरामुळे जीव गमवावा लागला आहे. साधारणपणे ऑक्टोबरच्या काळात येणारे शेतीआधारित सण-उत्सव यांवर पावसाची छाया होती.

जोरदार कोसळणारा पाऊस ही अतिशय सामान्य बाब झाली आहे. मागच्या शतकाचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की, अतिजोरदार पावसाळी दिवसांचं प्रमाण वाढलं आहे. तसंच या दिवसांच्या मधल्या काळात कोरड्या दिवसांची संख्या वाढली आहे. संयमित पावसामुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. या बदलत जाणाऱ्या परिस्थितीमुळे भारतासारख्या देशात अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे.

ही बदलेली परिस्थिती प्रकर्षानं मध्य भारताच्या पट्ट्यात, पश्चिम महाराष्ट्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेल्या भागात जाणवते. एका वैज्ञानिक संशोधन निबंधानुसार, ७० वर्षांच्या काळात या भागात अतिवृष्टीच्या घटनांमध्ये तिपटीनं वाढ झाली आहे आणि एकूण पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे.

या निबंधाचे लेखक आणि मेरीलँड विद्यापीठाचे वैज्ञानिक रघू मुर्तुगुड्डे म्हणतात, “जागतिक तापमानवाढीने मान्सून ही संकल्पना नष्ट केली आहे. आपण वर्षानुवर्षं लिहिलेल्या कविता, आठवणी फेकून देऊन नवीन गोष्टी लिहायला घेतल्या पाहिजेत.”

भारताचे दुष्काळापासून रक्षण करणारे हिमालयरूपी संरक्षण कवच धोक्याच्या स्थितीत आहे. जर जगभरातील हरितवायू ऊत्सर्जन आजच्या गतीनं चालू राहिल्यास जगभरातील पर्वत त्यांचा एक तृतीयांश बर्फ या शतकाच्या अखेरीपर्यंत गमावू शकतात.

भारतातील पाणीसंकट हे केवळ वातावरणीय बदलामुळे नाही हे वैज्ञानिक निक्षून सांगतात. अनेक दशकांपासून पाण्याची वाढलेली हाव अन गैरव्यवस्थापन हे ठळकपणे दिसतं. पाणी धरून ठेवणारी जंगलं छाटली जात आहेत. बिल्डरांना नाले, खाड्या, तळी यांवर अतिक्रमण करण्यासाठी हिरवा कंदील दिला जात आहे. सरकारी अनुदानं भूगर्भातील पाणी काढण्यास मदतगार ठरत आहेत.

भारताच्या १.३ अब्ज लोकांचं भविष्य हे अनिष्टानी भरलेलं आहे. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार २०५०पर्यंत अनियमित पाऊस, वातावरणीय बदल यामुळं भारताच्या अर्ध्या लोकसंख्येचं जीवनमान  खालावेल.

ग्रामीण भारत : मराठवाड्यातील दुष्काळ

मराठवाडा हा भाग त्याच्या हा त्याच्या जीवघेण्या उन्हाळ्यासाठी ओळखला जातो. या भागातून एखाददुसरी नदी जाते. त्यामुळे पाण्याच्या स्त्रोतांसाठी पावसावर अवलंबून राहावं लागतं. मराठवाडा हा सरकारी धोरणामुळे  कसा पिचला गेला आहे, हे लगेच कळतं.

मागच्या ऑक्टोबर महिन्यात कापणी हंगामाच्या अगोदर एक दोन आठवड्यापूर्वी फकीर मोहंमद हे मला त्यांच्या शेतात घेऊन गेले. त्यांनी मला शेताच्या मध्यभागी असलेल्या लिंबाच्या झाडाखाली उभं राहायला सांगितलं. ते म्हणाले की, लिंबाखाली उभे राहिल्यानं माणूस कधीच आजारी पडू शकत नाही. पण हे ते त्यांच्या शेताबाबत सांगू शकत नव्हते. मागच्या नऊ वर्षांपासून कमी पाऊस पडत आहे. या वर्षी उशिरा पाऊस आला. निम्मं पाणी जमिनीनं पिऊन घेतलं. यंदा अळ्यांनी मक्याचा जीव घेतला, बाजरी पक्ष्यांनी गिळली. कापूस बहरला होता, पण काही उपयोग झाला नाही. शेवटी कमी उत्पादन येणार. ते म्हणाले, “लय काबाड कष्ट केलं, पण आमच्या हातात काय नाय  येणार.”

यापेक्षा वाईट म्हणजे यंदाच्या पावसानं फकीर मोहंमदांच्या गावाचा पाणीप्रश्न सुटला नाही. त्याची विहीर आताच कोरडी पडली आहे. गावाला लागून बांधलेल्या बांधाऱ्यांचे रूपांतर पाणी नसल्यानं  गायरानात झाले असून तिकडं थोडी हिरवळ असल्याने गुरे चरतात.

अरिफच्या घरातील लोक जर एक ग्लासची तहान असेल तर केवळ अर्धा ग्लास पाणी पितात. मोठी माणसं रोजची अंघोळ टाळून मुलांना शाळेत स्वछ अन ताजंतवानं राहायचं असल्यानं त्यांना पाणी उपलब्ध करून देतात. जेव्हा पोरं पाणी वाया घालवतात, तेव्हा त्यांच्या पाठीत धपाटा ठरलेला असतो. त्याच्या गावात रोज चार सरकारी टँकर येतात, पण त्यातून अतिशय कमी पाणी मिळतं. अनेक लोक दुरून पाणी विकत आणतात.

फकीर मोहमद हे पावसानं जेवढं काही दिलं, त्यावर समाधानी होता. पण त्याला पुढची काळजीदेखील सतावत होती. ते म्हणाले, “या वर्षी पिण्यासाठी पाणी नाही. पण पिकांना पाणी  मिळालं आहे. मला  घाबरल्यासारखं होत आहे, कारण येणारा काळ कसा असेल.”

फकीर मोहमद हे साठीला येऊन पोहचले आहेत. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्या रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या सखोल अभ्यासानुसार, १९५०पासून मराठवाड्यातील वार्षिक पाऊसमान १५ टक्क्यांनी कमी  झालं असून ढगफुटीच्या घटनांमध्ये तिपटीनं वाढ झाली आहे.

या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मराठवाड्यात सगळ्यात जास्त पाणी लागणारे उसाचं पीक घेतलं जातंय. फकीर मोहमदांच्या गावापासून थोडं दूर, क्षेत्रात यशाचं पीक घेतलं जात आहे, कारण या भागात या मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. अनेक कारखाने राजकारणी किंवा त्यांचे नातेवाईक यांचे आहेत अन ते उसाला घसघशीत रक्कम द्यायला तयार असतात.

भारतातील करदाते हे या ऊस कारखानदारांना अप्रत्यक्षपणे मदतगार ठरतात. सरकार विजेवर अनुदान देतं, भूगर्भातील पाणी काढण्यासाठी सरकार प्रोत्साहान देतं, खतांवरील अनुदान हे उसासाठी वापरलं जातं. या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी बँका स्वस्तदरानं कर्ज देतात. निवडणुकीच्या काळात कर्जं माफ केली जातात. या वर्षी सरकारनं साखर निर्यातीसाठी ८८ कोटी डॉलरचं अनुदान दिलं आहे.

या सर्व या सवलतींमुळे उसाच्या पिकानं इतर सर्व पिकांना मागं टाकलं आहे. १९४७ पासून ऊसलागवडीला उत्तेजन दिलं गेलं. त्यामुळे भारत जगातील सर्वांत मोठा साखरउत्पादक देश झाला आहे, असा दावा प्रिन्स्टन पर्यावरणीय संस्थेच्या रामानन लक्ष्मीनारायण यांनी केला आहे. मराठवाड्यातील तीन चतुर्थांश भागावर सिंचनाच्या आधारावर उसाचं पीक घेतलं आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट संघटनेननुसार हा भाग सगळ्यात जास्त पाणी संकटातून जात आहे.

ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यातील अशोक पवार या शेतकऱ्यानं मला नुकसानीची छायाचित्रं पाठवली. त्याच सोयाबीन, मुगाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानं एवढा मोठा पाऊस इतक्या उशिरा येईल अन सगळं धुऊन नेईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती.

शहरी  भारत : मुंबई पूर

मुंबईच्या सविता कासुर्डे यांच्या दारावर हिंदू देवता गणपतीची प्रतिमा आहे. देव आपल्याला संकतातून वाचवू शकतो, याही यामागची भावना आहे. पण मिठीनदीबाबत काहीही सांगता येत  नाही. साविताजींच्या उंबऱ्याजवळून मिठी नदी वाहते. १. ३ कोटी लोकसंख्या असलेल्या शहरानं तिचे सर्व मार्ग अडवलेले आहेत.

सविताजींच्या घरपलीकडे थोडी उडी मारली तर तुम्हाला मुंबईचं आतंरराष्ट्रीय विमानतळ दिसू  शकतं. लोक मिठी नदीत प्लॅस्टिक, सांडपाणी सोडून देतात. मिठीच्या पात्रात भराव टाकून गगनचुंबी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. आजूबाजूला असलेल्या झोपड्या या पुराच्या शिकार होतात. या पुरापासून वाचवण्यात मोलाची भूमिका बजावत असणारी खारफुटी सिमेंटचं जंगल बनवण्यासाठी काढून टाकण्यात आली आहे.

वयस्कर सविताजींनी या परिस्थितीत राहायला शिकल्या आहेत. पाण्याची पातळी वाढली की, फ्रिज टेबलवर ठेवायचा, टीव्ही माळ्यावर ठेवायचा, लहान मुलांची दप्तरं प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवायची. पातळी वाढली की, वरच्या माळ्यावर राहायला जायचं.

मुंबईत या वर्षी गेल्या ६५ वर्षांतील सगळ्यात जास्त पाऊस पडला. तो अनेक टप्प्यांत अन जोरदार कोसळला. त्यामुळे बंदिस्त गटारं वाहायला लागली अन जास्त पावसामुळे क्षमतेवर ताण आला. लोकल सेवा विस्कळीत झाली. विमानांची उड्डाणं लांबली. कासुर्डे यांना घराशेजारील शाळेत  आश्रय  घ्यावा लागला.

पूर ओसरल्यावर घरात घाण साचते. मच्छर होतात. हे सगळं साफ करायला लागतं. ही काळजी राजश्री चव्हाण यांना सतावते. मी मान्सूनमध्ये त्यांना भेट दिली होती. त्यांच्या जगण्याचं साधन असलेलं शिवणयंत्र पुराच्या पाण्यातून वाचवताना मी पाहिलं होतं. तसंच त्यांना मुलांचे कपडे अन तांदूळ खराब झाल्यामुळे फेकून द्यावे लागले. जेव्हा राजकारणी मतं मागायला येतात, तेव्हा त्यांना राग येतो. मागच्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यानं त्यांना पाठिंबा द्यावा, त्या बदल्यात नवीन घरं बांधून देतो, असं आवाहन केलं होतं. त्यांनी पाच कुटुंबांना प्रतीकात्मक प्लॅस्टिकच्या चाव्या दिल्या.

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख ‘न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये २५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा-

.............................................................................................................................................

Bryan Denton, a photographer based in India, and Somini Sengupta, the Times’s global climate reporter, visited cities and villages around India to see how climate change and misguided policies are upending the country’s relationship to a precious resource.

.............................................................................................................................................

मूळ लेखाचा मराठी अनुवाद : शेखर पायगुडे, सहायक प्राध्यापक, एमआयटी एडिटी विद्यापीठ, पुणे.

shekhar.paigude91@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा