शब्द आहेत त्याच्याजवळ वाचा नाही आणि वाचा आहे, त्याच्याकडे इच्छा नाही!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
डॉ. संध्या शेलार
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Tue , 20 December 2016
  • ग्रामस्वराज्य Gram Swarajya दारूबंदी Liquor Ban ग्रामीण तरुण Rural Youth उसतोड मजूर Then Rural Youth

ग्रामीण स्वराज्याचे स्वप्न गांधीजींनी पाहिले. त्या दृष्टीने युवकांनी ग्रामीण भारताकडे वळावे, असे राजकीय लोकांकडून वारंवार आवाहन होत असते. मात्र त्या अनुषंगाने कुणी काही भरीव कार्य केलेले पाहण्यात आलेले नाही. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी तर कमीच असतात, परंतु रोजच्या सुविधांचा आभाव हेही शिक्षित तरुणांनी गावाकडे पाठ फिरवण्याचे महत्त्वाचे कारण आहे. आज कृषितज्ज्ञ झालेला मुलगा / मुलगी शेतात राबण्याचे आणि शेती करण्याचे टाळतात आणि शासकीय सेवेच्या नादी लागून आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया घालवतात. जी मुले थोडीफार वर सरकतात, ती नवीन लोकांना स्वप्न दाखवण्याचे काम करतात. एकंदरीत, शहरात राहून शेती पाहणे यांना मान्य असते, परंतु ती शेती शेतात राबून करणे अजिबात मान्य नसते.

दुसरे असे की, जशी पिढी पुढे सरकते आहे, तशी शेतीची विभागणी होऊन शेतकरी अल्पभूधारक झाला आहे. एका तुकड्याचे चार भाग करून जगणे त्याला अवघड होऊन बसले आहे. मग पर्याय - पुन्हा शहराकडे धाव! जागतिकीकरणाने तर स्वयंपूर्ण खेड्याचे बापूंचे स्वप्न धुळीत नुसते मिळवले नाही, तर खोल गाडले आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. आजच्या खेड्यांची सर्वांत मोठी समस्या जशी रोजगाराची आहे, तशीच आणखी एक समस्या या गावांना पोखरून टाकीत आहे. आज जरी वरवर गावाचे चित्र गोजिरे दिसत असले, तरी देशाचा पाया असलेला सर्वसामान्य वर्ग नाशाच्या दिशेला सरकत आहे. हे जरी लक्षात येण्याजोगे नसले, तरी असेच चालू राहिले, तर जे हात देशासाठी राबत आहेत, त्यांच्या घरात फक्त स्त्रिया आणि मुलेच शिल्लक राहिली तर आश्चर्य वाटायला नको! हा गंभीर प्रश्न आहे, अवैध दारूनिर्मिती आणि विक्री यांचा! घरातील वीस ते तीस वयोगटातील पुरुष जर या नशेच्या आहारी गेला असेल, तर त्याचे वयोमान साधारणपणे चाळीसच्या पुढे जाणे अवघड जाते. विसाव्या वर्षी लग्न झालेल्या या मंडळींना मुलंही लवकर होतात. ती अल्पवयात कामाच्या शोधात हिंडताना दिसली तर नवल वाटायला नकोच!

‘दारू पिणे’ या गोष्टीच्या समर्थनार्थ आलेली उत्तरे तर हास्यास्पद आहेत. मजूर दारू पितो, त्याचा श्रमपरिहार व्हावा म्हणून आणि हुजूर पितो, ते मानसिक शांती लाभावी म्हणून. मी जेव्हा जेव्हा एखाद्या ऊसतोडणी मजुरासमोर किंवा शेतात राबणाऱ्या मजुरासमोर दारूचे, व्यसनाचे शरीरविघातक परिणाम विषद करते, तेव्हा त्यांच्या अनेक प्रतिक्रिया येतात. त्यात मोठा वर्ग शरमिंदा होतो, या सवयीबद्दल खेद व्यक्त करतो; परंतु तेवढ्यापुरताच! नंतरच्या वेळी दारूचा वास येणारच. बागायतदार आपल्या मजुराच्या दारू पिण्याबद्दल, तो बायका-मुलांना करत असलेल्या मारहाणीबद्दल, त्याच्या मुलांच्या-बायकोच्या जाचाबद्दल आणि उपासमारीबद्दल भरभरून बोलणार! त्या मालकाच्या सहृदयतेबद्दल मला कितीदा तरी गहिवरून आलं आहे; पण ‘त्या मजुराला दारू पुरवू नका’ असं ज्या वेळी मी सांगते, तेव्हा मात्र तोच सहृदय माणूस मागे सरकतो. याची खोलात जाऊन चिकित्सा केल्यावर माझ्या लक्षात आलं की, एकतर दारूचा फक्त एक पेला दिवसभराच्या कामाचं मोल असतं आणि गावठी दारूचे दहा रुपयाचे चार फुगे जरी त्या मजुराला दिले, तरी बागायतदाराचे शंभर रुपये वाचतात आणि त्या नशेच्या अमलाखाली मजूर दुप्पट काम करतो.

ऊसतोडणी मजुरांचा तर एक प्रश्न फार भयाण आहे. तो म्हणजे त्यांना पहाटेपासून रात्र होईतो राबणे फक्त दारूच्या किंवा तत्सम अमलाखाली शक्य असल्याचे सांगितले जाते. इथे त्याच माणसासोबत राबणारी त्याची बायको, बहीण, मुलगी मात्र दारू पिताना दिसत नाही. स्त्री हे काम करते, मग पुरुषाला या नशेची गरज का भासावी? की ही फक्त तोंड लपवण्याची कारणे झाली? सकाळी पाचपासून राबणारी स्त्री कधीही एखाद्या नशेचा आधार घेत नाही. मिसरी आणि तंबाखू सेवनाचे प्रमाण जरी महिलांमध्ये आढळत असले, तरी हेही प्रमाण बरेच कमी आहे. चहा या एकाच उत्साहवर्धक पेयाचा अवलंब तिच्या रोजच्या सवयीत आढळतो. ग्रामीण महिलांमध्ये दारूचे व्यसन अगदी नगण्य आहे.

अवैध दारूनिर्मिती आणि विक्री हा शासनाच्याही डोकेदुखीचा भाग आहेच, परंतु बऱ्याच ठिकाणी याच रखवालदारांचा हात या मजुरांच्या डोक्यावर असतो. ‘तूही खा आणि मीही खातो’ अशी वृत्ती या समाजविघातक शक्तींना पाठबळ देताना दिसते. त्या अर्थी दिसते सर्वांनाच, परंतु या प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेले नाही. काही थोडेफार उभे राहिले, तरी त्यांना शांत करणे या शक्तींना सहज शक्य होते. मी संघटनेचे काम करत असताना एक बाई कळवळून म्हणाली. ‘‘दुसरं काही नको ताई, फक्त दारू बंद करा. कष्टाने कमावतो, ते लेकरांच्या मुखात पडू द्या.’’ या एका वाक्यात त्या संपूर्ण स्त्रीवर्गाची व्यथा समोर उभी राहते. मी त्या दृष्टीने चौकशी चालू केली, तर एक भयानक वास्तव समोर आले. ते म्हणजे, गावात आधीच दारूबंदी होती आणि तरी गावाच्या चारही कोपऱ्यांवर दारूनिर्मिती आणि दारूविक्री राजरोसपणे चालू होती. ग्रामसेवक अगदी शांतपणे सांगत होते, ‘‘ताई, दारूबंदीचा ठराव सर्वानुमते संमत झाला आहे.’’ नंतर एका पेपरच्या छोट्या चौकटीतसुद्धा बातमी वाचली, ‘शिरूर तालुका दारूमुक्त होणार! सह्यांची मोहीम जोरात!’ परंतु तरी रस्त्याच्या बाजूला हेलपटणाऱ्यांची संख्या आहे तशीच. का? बियर बारच्या समोर वाहन उभे करायला जागा मिळत नाही. गावकुसवात दारू करणाऱ्यांना आणि विकणाऱ्यांना कुणी थांबवत का नाही?

दारूबंदीची चळवळ भली मोठी आहे, परंतु राजकीय, सामाजिक निष्क्रियतेने त्या चळवळीला पोकळ करून टाकले आहे! कुणाला मताचे राजकारण बोलू देत नाही, तर कुणाला स्नेहाचे संबंध बोलू देत नाहीत. बोलायचे, आवाज उठवायचा तर कुणाला जिवाच्या सुरक्षिततेची हमी वाटत नाही, तर ‘या नशेचा प्रादुर्भाव आपल्या घरापर्यंत नाही ना, मग कशाला त्यात पडा’, ही मानसिकता कुणाला याबद्दल बोलण्यापासून परावृत्त करते.

या सगळ्यात ग्रामीण तरुण कुजत चाललाय. त्याला यातून बाहेर काढायला कुणाला वेळ तर नाहीच, परंतु तशी कुणाची इच्छाही नाही. हितसंबंध सर्वांना मुके करून ठेवत आहेत. शब्द आहेत त्याच्याजवळ वाचा नाही आणि वाचा आहे, त्याच्याकडे इच्छा नाही!

 

लेखिका मुक्ताई ग्रामीण महिला संघ (नागरगाव, शिरूर, जि. पुणे)च्या अध्यक्ष आहेत.

Shelargeetanjali16@gmail.com                    

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Wed , 21 December 2016

Must Read. Present ground level truth.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......