‘प.वा.’: समतावादी विचारांची बैठक असलेला वैचारिक देवाणघेवाणीचा मुक्त विचारमंच!
पडघम - माध्यमनामा
अभय कांता
  • ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाची काही मुखपृष्ठं
  • Sat , 19 May 2018
  • पडघम माध्यमनामा परिवर्तनाचा वाटसरू Parivartanacha Watsaru अभय कांता Abhay Kanta

‘‌‌‌‌‌‌वी नीड यू’ या संस्थेतर्फे ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकास आज संध्याकाळी ठाण्यात ‘प्रबोधन पुरस्कारा’नं गौरवण्यात येत आहे. त्यानिमित्तानं या पाक्षिकाचे संस्थापक-संपादक अभय कांता यांचं हे मनोगत.

.............................................................................................................................................

‘समतावादी विचारांची बैठक असलेला वैचारिक देवाणघेवाणीचा मुक्त विचारमंच!’ अशी भूमिका असलेल्या ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाचं हे २१वं वर्ष. महाराष्ट्रात अशी भूमिका घेऊन एखादं वैचारिक नियतकालिक एवढा दीर्घ काळ आणि तेही एकाही अंकाचा खंड पडू न देता सुरू राहणं, ही अलीकडच्या काळात अवघड बाबच म्हटली पाहिजे. ‘प.वा.’शिवाय हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच वैचारिक अथवा निमवैचारिक नियतकालिकं आज सुरू आहेत. काही नामवंत नियतकालिकं बंद पडल्याचीही ताजी उदाहरणं आहेत. त्रैमासिक ‘समाज प्रबोधन पत्रिका’, द्वैमासिक ‘नवभारत’, मासिक ‘आंदोलन’ आणि साप्ताहिक ‘साधना’ ही चालू अंकांची उदाहरणं, तर बंद पडलेली नियतकालिकं म्हणजे पुण्यातून निघणारं मासिक ‘अंतर्नाद’ आणि नागपूरहून निघणारं मासिक ‘आजचा सुधारक’.

‘आजचा सुधारक’च्या बंद होण्याच्या निमित्तानं थोडीफार चर्चा वर्तमानपत्रांमधून झाली. त्यात लेखक व ‘सुधारक’चे माजी संपादक नंदा खरे यांचा ‘हम सजाते रहेंगे नये काफिले’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्यात ते म्हणतात, ‘‘ ‘आजचा सुधारक’सारखी वैचारिक मराठी नियतकालिके- ‘समाज प्रबोधन पत्रिका’, ‘नवभारत’, ‘परिवर्तनाचा वाटसरू’- वेगवेगळ्या कारणांमुळे, वेगवेगळ्या दिशांनी क्षीण व ‘अनियत’ होऊ लागली होती. हे का घडले, याचे विश्लेषण आजच होणार नाही. ती क्रिया अगदी नुकतीच वेगवान होत आहे. माझ्या मते, ‘नवउदारमत’ (भाषांतर : सरकारसमर्थित मुक्त बाजारपेठी विचार!) ही एकमेव अर्थनीती ठरत गेली आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर ‘प्रगत’ देश मदांध होत गेले आहेत. त्यांना आव्हान मात्र पर्यायी अर्थविचारांतून न येता धार्मिक मूलतत्त्ववादाकडून दिले जात आहे! यामुळे जगभरात धर्माचे आकर्षण वाढत आहे आणि त्याचा पाया वस्तुनिष्ठता नसून श्रद्धा हा आहे. धार्मिक मूलतत्त्ववाद नवउदारमताइतकाच असहिष्णु असतो! वाढत्या असहिष्णुतेने बंधुभाव क्षीण होत आहे. ‘समता’ हे मूल्य तर ना धर्म मानतात, ना बाजारपेठ मानते. स्वातंत्र्य केवळ मूठभरांसाठीच उरले आहे. एकूण- विचारी, विवेकी वृत्ती घटते आहे.’’ (११ जून २०१७, दै. लोकसत्ता)

मुद्दा गंभीर आहे. पण त्याकडे वळण्यापूर्वी आधी एक गमतीची बाब पाहू. खरे यांनी ज्या तीन नियतकालिकांचा उल्लेख सुधारकच्या जोडीनं केला ती तिन्ही नियतकालिकं अजूनही सुरू आहेत! ‘प.वा.’चा उल्लेख त्यात येण्याचं कारण असं असावं, की खरे यांनी लेख लिहिण्याच्या तीनच महिन्यांपूर्वी ‘प.वा.’चं मुखपृष्ठ रंगीतचं पुन्हा कृष्णधवल झालं आणि आतील पानांचा कागद शुभ्र रंगापासून पुन्हा एकदा थोडासा पिवळ्या छटेकडे झुकला! असो. यावरून ‘प.वा.’ क्षीण झाल्याचा निष्कर्ष काढणं हे काहीसं अविवेकी वाटतं, पण ते जाऊ दे.

गंभीर मुद्दा असा की, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभगिनीभाव ही लोकशाहीची तत्त्वत्रयी आणि आरोग्यदायी समाजासाठी आवश्यक मूल्यं- न्याय व विवेक पूर्णपणे संपुष्टात आलेल्या आजच्या भारतात, खरं तर महाराष्ट्रात, ‘प.वा.’सारखी नियतकालिकं टवटवीत स्वरूपात चालू शकतात काय? हे अवघड आहे. आणि हे अवघडलेपण ‘प.वा.’च्या सुरुवातीला दिलेल्या एका ओळीच्या भूमिकेचा परिपाक आहे.

आज ना कुणाला ‘समता’ हवी आहे, ना ‘वैचारिक देवाणघेवाण’ ना ‘मुक्त’ विचारमंच. आज वैचारिकतेच्या नावाखाली खोटेपणाचा, रेटारेटीचा नि ट्रोलिंग-किलिंगचा काळ आहे. एके काळी महाराष्ट्रात ‘वैचारिक गारठा’ निर्माण झाल्याचं बोललं गेलं. आता तर वैचारिकता जाणीवपूर्वक संपुष्टात आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले आहेत. श्याम मनोहर यांनी एके काळी ‘अंधारात मठ्ठ काळा बैल’ असं लिहिलं होतं. आता ‘भर उजेडात गोरे नि घारे बैल’ राजसत्तेपासून लोकसत्तेपर्यंत विराजमान आहेत आणि यांचा पोळा वर्षात एक दिवस नसून रोज सुरू असतो. या पोळा नि तदनुषंगिक पोळीमध्ये ‘प.वा.’सारखी माध्यमं पोळून निघणार, हे अपरिहार्य आहे. खरं तर त्याची भीती नाही. कार्ल मार्क्स, ज्योतीराव फुले, ताराबाई शिंदे, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधुनिक मुक्तिदायी तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेऊन समतावादी परिवर्तनाची वाट तुडवू पाहणाऱ्यांना अशी भीती वाटूही शकत नाही. थोडंसं मागे जाऊ.

३० जानेवारी हा दिवस भारतात ‘शहीद दिवस’ किंवा ‘हुतात्मा दिवस’ म्हणून औपचारिकपणे घोषित केला गेलेला आहे. १९४८मध्ये या दिवशी नथुराम गोडसेनं महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. हुतात्मा दिवस घोषित असण्याचा अर्थ असा, की या दिवशी देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तीनही सैन्यदलांचे प्रमुख राजघाटावर येऊन गांधींच्या समाधीवर पुष्पं वाहतात. त्यानंतर सैनिक बिगुल वाजवून मानवंदना देतात. बरोबर सकाळी ११ वाजता देशातल्या हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतीसाठी दोन मिनिटं शांतता पाळली जाते.

१९९८मध्ये या दिवसाला आणखी एक पदर होता. तो शुक्रवार होता आणि त्यातही विशेष बाब म्हणजे त्या दिवशी रमजान ईद होती.

ए 4 आकाराचं पाठपोठ एक पानी स्वयंघोषित अनियतकालिक म्हणून ‘प.वा.’ची सुरुवात ३० जानेवारी १९९८ रोजी साताऱ्यातील करंजे गावातील सय्यद कॉलनीमधील भाड्याच्या राहत्या घरात झाली. पहिल्या दिवशी अंकाचं वितरण कसं झालं? ईदचा उल्लेख आला आहेच. त्या दिवशी सर्व मित्रांना (पन्नासेक) घरी बिर्याणी व शीर खुरमा खायला बोलावलं होतं. त्यासोबतच ‘प.वा.’चा अंक प्रत्येकाला दिला गेला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पार्थ पोळके, लक्ष्मण माने, वर्षा दिघे शेडगे, प्रमोद कोपर्डे, किशोर बेडकिहाळ आणि कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर अशा सर्वांनी त्यादिवशी हजेरी लावली होती. ‘प.वा.’च्या पहिल्या दिवशीचा हा ‘मेळ’ आजतागायत सुरू आहे. अनेकांच्या सहकार्यानं, कृतीशील सहभागानं ही वीस वर्षं पार पडलेली आहेत.

‘प.वा.’ सुरू झाला, तेव्हा उजवा विचार अत्यंत जोमात होता. १९९१मध्ये सुरू झालेलं खाजगीकरणाचं वारं आणि १९९२मधे बाबरी मशिदीच्या पतनानंतर सुरू झालेलं जमातवादाचं वारं १९९८मध्ये अधिक स्थैर्यानं, आत्मविश्वासानं वाहू लागलेलं होतं. १९९६मधील १३ दिवसांच्या सरकारनंतर वाजपेयींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ती १९ मार्च १९९८ रोजी. हे सरकार १३ महिने चाललं. मग दुसरी पोखरण चाचणी, कारगील युद्ध, विजय दिवस. वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले १३ ऑक्टोबर १९९९ रोजी. त्यामुळे विपरीत आणि बिकट परिस्थिती ही ‘प.वा.’ला सुरुवातीपासून लगटून आलेली आहे.

खरं तर या परिस्थितीनेच ‘प.वा.’ला सर्व अडचणींच्या विरोधात तगून राहण्याचं बळ दिलं आहे. ‘प.वा.’ची वाट तोवर सरणार नाही, जोवर समतेच्या राष्ट्रीय महामार्गावर आपला प्रवास सुरू होणार नाही.

.............................................................................................................................................

लेखक अभय कांता ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकाचे संपादक आहेत.

abhaykanta3@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 21 May 2018

अरे वा, ईदच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या अंधश्रद्धाविरोधी मासिकाचा विजय असो. आता प्रश्न असा आहे की मासिकाचा वाढदिवस ग्रेगरीय पंचांगाप्रमाणे साजरा करणार की हिजरी पंचांगानुसार? -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......