...आणि मी मूर्ख बनायला नकार दिला आहे
पडघम - देशकारण
हिमांशू कुमार
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Mon , 20 November 2017
  • पडघम देशकारण मुजफ्फरनगर भारत माता की जय ‌Bharat Mata Ki jay हिमांशू कुमार Himanshu Kumar हिंदू धर्म Hindu Dharma

मला माहीत आहे, तुम्हाला खूप वाईट वाटतं आहे
जेव्हा तुम्हाला कोणी म्हणतं की, या देशात राहणारा
कुणी ‘भारत माता की जय’ नाही म्हणू इच्छित
समजू शकतो की, तुमचं रक्त उसळून उठतं
मीही तारुण्यात ‘भारत माता की जय’चे नारे देत राहिलो
आजही देऊ शकतो, त्यात काही वाईट नाही
पण आता देत नाही
मी आता जाणीवपूर्वक ‘भारत माता की जय’ म्हणण्याला विरोध करतो

मी असं का करतो?
असं समजू नका की, मी कम्युनिस्ट आहे
वा मी विदेशी पैसे खातो
वा मी नक्षलवादी आहे
वा मी मुसलमानांचे तळवे चाटतो

माझा जन्म एका सवर्ण
हिंदू परिवारात झाला
मलाही सांगितलं गेलं की, हिंदू धर्म जगातला सर्वांत महान धर्म आहे
मलाही सांगितलं गेलं की, आमची जात सर्वांत उच्च आहे
मलाही सांगितलं गेलं की, देशातील एक राजकीय पक्ष
पूर्णपणे बरोबर आहे
मीही सैनिकांच्या बहादुरीचे सिनेमा पाहायचो
आणि टाळ्या वाजवायचो
मीही पाकिस्तानचा द्वेष करायचो
पण नंतर मला आदिवासी भागात जाऊन
राहण्याची संधी मिळाली
मी तिथं जाऊन अनुभवलं
माझ्या धारणा
बऱ्याच अर्धवट आणि चुकीच्या होत्या
 
मी माझ्या धर्माला सर्वांत चांगला मानतो
पण याच तऱ्हेनं सर्वच लोक आपापल्या धर्माला चांगलं मानतात
मग हे योग्य असू शकत नाही की, माझा धर्म सर्वांत चांगला आहे
 
मी दलितांच्या जळलेल्या वस्त्यांचा दौरा केला
माझ्या लक्षात आलं
की, माझ्या धर्मात बऱ्याच चुकीच्या गोष्टीही आहेत
हळूहळू माझ्या ध्यानात येतं गेलं की, सगळ्याच धर्मात चुकीच्या गोष्टी आहेत
पण कुठल्याच धर्माचा पुरस्कर्ता त्या चुकीच्या गोष्टी स्वीकारायला आणि सुधारायला तयार नाही
या प्रकारे मला धर्माची कट्टरता समजली
त्यानंतर मी माझी कट्टरता सोडण्याचा निश्चय केला
मी हा निश्चय केला की, मी आता कुठल्याच धर्माला आपला मानणार नाही
कारण सगळेच धर्म एकसारख्याच मूर्खपणानं आणि कट्टरतेनं भरलेले आहेत
 
आदिवासींमध्ये राहत असताना मी
पोलिसांचे अत्याचार पाहिले
मी त्या आदिवासी मुलींना मदत केली
ज्यांच्यासोबत पोलिस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी सामूहिक बलात्कार केले होते
मी त्या आयांना आपल्या घरात आसरा दिला, ज्यांच्या मुलांना आणि नवऱ्यांना
सुरक्षा दलांनी ठार मारलं होतं
कारण त्यांच्या जमिनी उद्योगपतींना देता याव्यात
मी आदिवासींच्या त्या गावांमध्ये रात्री घालवल्या
ज्या गावांना सुरक्षा दलांनी आगी लावल्या होत्या
त्या जळालेल्या घरांमध्ये बसून मी स्वत:ला प्रश्न विचारले की,
शेवटी या निर्दोष आदिवासींची घरं का जाळली गेली
घर जळाल्यानं कुणाचा फायदा होईल
घर जाळणारा कोण आहे
 
तिथं माझ्या लक्षात आलं
की, आम्ही जे शहरांत मजेत बसून
वीज जाळतो
कारमध्ये बसून शॉपिंग मॉलमध्ये जातो
आम्ही जो बाहेर शंभर रुपयांचा पिझ्झा खातो
हा ऐशोराम तेव्हाच शक्य आहे
जेव्हा या आदिवासींच्या जमिनींवर उद्योगतींचा कब्जा असेल
उद्योग असतील तर आम्हा शहरी सुशिक्षित लोकांना नोकरी मिळेल
 
आमच्या विकासासाठी आदिवासींच्या जमिनींवर कब्जा
तर पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवानच करतील
आदिवासी आपली जमीन सोडू इच्छित नाही
त्यामुळे आमचे जवान आदिवासींची घरं जाळतात
 
आम्ही शहरी लोक यामुळे जवानांचं गुणगान गातो
यामुळे आदिवासी मरतात
वा त्यांच्यावर बलात्कार होतात
वा त्यांची घरं जाळली जातात तेव्हा
आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही
पण जवानांसोबत काहीही झालं तर
आम्ही शिव्याशाप द्यायला लागतो
 
आदिवासींच्या जळालेल्या गावात बसून
मला भारतीय मध्यमवर्गाचं राजकारण सगळं राजकारण समजून
आलं
मला राजकारण
भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था यांच्या अभ्यासासाठी कुठल्या विद्यापीठात जावं लागलं नाही
ते मी माझ्या अनुभवातून शिकलो
 
मला काश्मिरी मित्रांनाही भेटण्याची संधी मिळाली
मी त्यांच्या परिवारासोबत भारतीय जवान आणि अर्ध सैनिका दलांच्या जुलमांविषयी जाणून घेतलं
कारण तोपर्यंत मला समजलं होतं
की, सरकारी सैन्य कशा प्रकारचा अत्याचार करतं
त्यामुळे काश्मिरी जनतेवरील भारतीय सैन्याचा जुलूम मी निर्मळ मनानं समजू शकलो
काश्मीरमध्ये जवानांनी ज्या तरुणांना त्यांच्या घरातून उचलून ठार मारलं होतं
मी त्या मुलांच्या आयांना भेटलो
ज्या पुरुषांना सैन्यानं त्यांच्या घरातून उचललं
आणि कित्येक वर्षांपासून त्यांचा काही ठावठिकाणा नाही
त्यांच्या बायकांना भेटलो
त्या बायकांना काश्मीरमध्ये ‘हाफ विडो’ म्हटलं जातं
म्हणजे अर्ध्या विधवा
मी त्या महिलांविषयी जाणून घेतलं, ज्यांच्यावर आपल्या सैन्यांनी बलात्कार केले

मी मुजफ्फरनगरमधील दंगलीनंतर तिथं राहून काम केलं
तिथे एका खोट्या प्रचारानंतर दंगली घडवल्या गेल्या
मी त्या खोट्या प्रचारामागचं सत्य शोधलं
दंगली अमित शाहनी केल्या होत्या
या दंगलीत एक लाख गरीब मुसलमान बेघर झाले होते
हिवाळ्यात त्यांना उघड्यावरील राहुट्यांमध्ये राहावं लागलं
तिथं थंडीमुळे साठपेक्षा जास्त मुलांचे मृत्यू झाले
 
या प्रकारे मी पाहिलं की लव-जिहादच्या नावावर
भाजपनं हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना भडकावली
आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी जागा जिंकल्या

माझी अस्वस्थता वाढत गेली
मला वाटायला लागलं की, आम्ही शहरी लोक इतके स्वार्थी कसे काय होऊ शकतो
की आमच्या फायद्यासाठी करोडो आदिवासींवर अत्याचार केले जातात?
आम्ही इतके स्वार्थी कसे काय होऊ शकतो की, दलितांच्या वस्त्या जाळल्या जातात
आणि आम्ही क्रिकेट पाहत राहतो
काश्मीरमध्ये आमचं सैन्य अत्याचार करतं आणि आम्ही त्याचं समर्थन करतो
तेव्हा भाजपचं सरकार आलं
मी पाहिलं की, आता दलितांवर अत्याचार करणारे
अजूनच ताकदवान झाले आहेत
काश्मीरविषयी बोलल्यामुळे
दलित विद्यार्थ्यांना हॉस्टेलमधून काढलं जात आहे
त्यानंतर त्यातील एक दलित विद्यार्थी रोहित वेमुलानं आत्महत्या केली
मला वाटलं की, ही आत्महत्या नाही, एक प्रकारची हत्याच आहे
त्याच वेळी सोनी सोरी नावाच्या आदिवासी महिलेवर सरकारचे अत्याचार वाढत चालले होते
मी अस्वस्थ होतो की, शेवटी या मुद्द्यांकडे कुणीच का लक्ष देत नाही
तेव्हाच सरकारमधल्या लोकांना ‘भारत माता की जय’चं पिल्लू सोडण्यात आलं
मला वाटलं, ‘भारत माता की जय’ म्हणणं हा मुद्दाच नाही
ही तर खऱ्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठीची
सरकारी चलाखी आहे
 
मी ठरवलं
की, मी ‘भारत माता की जय’ नाही म्हणणार
ज्या प्रकारे मी कुठल्याही देवाची पूजा करत नाही
पण माणसांच्या भल्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो
या प्रकारे मी भाजपच्या म्हणण्यानुसार ‘भारत माता की जय’ अजिबात म्हणणार नाही
हां, मी देशाल्या नागरिकांची सेवा पहिल्यासारखीच करत राहीन
सध्या ‘भारत माता की जय’चा लोकांना मूर्ख बनवण्यासाठी वापर केला जातो आहे
आणि मी मूर्ख बनायला नकार दिला आहे.

हिंदीतून मराठी अनुवाद – टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

‘हाऊ द बीजेपी विन्स’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4285

.............................................................................................................................................

लेखक हिमांशू कुमार मुजफ्फरनगरमध्ये राहतात. ते सामाजिक कार्यकर्ते असून आदिवासींमध्ये काम करतात.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सध्याच्या काळामध्ये तरुण पत्रकार लढायला तयार आहेत, ही माझ्या दृष्टीने अत्यंत आशादायक गोष्ट आहे. मला फक्त ह्यात नागरिकांचं ‘कॉन्ट्रीब्युशन’ फारसं दिसत नाही : निखिल वागळे

‘पर्यायी मीडिया’चं काम ‘मेनस्ट्रीम’च्या तुलनेमध्ये कमी पोहोचणारं असलं तरी खूप महत्त्वाचं आहे. आणीबाणीमध्ये ‘साधना’सारख्या छोट्या साप्ताहिकाने जे काम केलं, तेच इतिहासात नोंदलं गेलं. तेच नेमकं ह्यांच्या बाबतीत होणार आहे. जेव्हा सत्ताधाऱ्यांना ‘तू नागडा आहेस’ असं सांगायला समाजातलं कोणीही तयार नव्हतं, तेव्हा या किंवा कमी रिसोर्सेस असलेल्या लोकांनी हे काम केलं. माझ्या मते हे खूप ऐतिहासिक काम आहे.......

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......