मोदी, गुजरात आणि हिंदी चित्रपट
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 07 November 2017
  • देशकारण नरेंद्मोर दी Narendra Modi गुजरात Gujratसिक्रेट सुपरस्टार Secret Superstar रईस Raees गोरी तेरे प्यार में Gori Tere Pyaar Mein

‘सिक्रेट सुपरस्टार’ हा अवघा चित्रपट घडतो वडोदरा अर्थात बडोदा या शहरात. कशामुळे? आमीर खान-किरण राव यांना का म्हणून गुजरात राज्य या चित्रपटाची कथाभूमी म्हणून ठरवावीशी वाटली? नक्कीच त्यांना आणि दिग्दर्शक अद्वैत चंदन यांना काही सुचवायचं आहे. एका मुस्लिम कुटुंबात पुरुषाची असलेली दहशत आणि त्याचा परंपरांचा, पुरुष वर्चस्वाचा आग्रह गुजराती शहरात दाखवून मिळवायचं काय होतं खान-राव यांना? की एक पुरुष म्हणजे कुटुंबप्रमुख स्त्रीचं स्वातंत्र्य, कलाविष्कार आणि तिची स्वमत्ता मानतच नाही, हे मांडत असताना नरेंद्र मोदी यांची अंधुक, पुसट आणि त्यांचं एकचालकानुवर्तित्व अशी प्रतिमा मांडायचीय? एरवी त्या चित्रपटात गुजराती भाषा एक-दोन वाक्यांखेरीज ऐकू येत नाही. उजव्या खांद्यावर पदर पांघरलेल्या स्त्रियाही दिसत नाहीत. ना गुजराती व्यापारी दिसले.

नायिकेची शाळा इंग्रजी माध्यमाची. ती लिहितेही इंग्रजीत. तिचा एक मित्र चिंतन पारेख या नावाचा असून तो तिच्यावरच्या प्रेमाखातर खूप मदत करत राहतो. तीही त्याच्या प्रेमात असते. म्हणजे इन्सिया मलिक एका हिंदू मुलावर जीव लावते, हे तर हा चित्रपट दाखवतोच, शिवाय केवळ आवाज ऐकून बुरख्यातील मुलीला एक संगीतकार बोलावतो आणि तिला संधी देतो. तोही हिंदूच. शक्तीकुमाराच्या रूपात आमीर खान स्वत:!

एका हिंस्र, क्रूर, कलाशत्रू व सनातनी विचारांच्या मुसलमान पतीपासून पत्नीला व बापापासून लेकीला मुक्त होण्याची प्रक्रिया दाखवणारा तरी हा चित्रपट आहे का? असा माणूस मग गुजरातीच का? अन्य कोणत्याही राज्यांत तो सापडला असताच की!

.............................................................................................................................................

‘दंशकाल’ या चर्चित कादंबरीसाठी क्लिक करा - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

एक संदर्भ सांगतो. आमीर खानचं पात्र नायिकेला विचारतं, ‘तुझं वय काय?’ ती सांगते, ‘१५’. इथं आपल्याला तर्क लावता येती की, सदर मुलगी २००२ साली जन्मली. म्हणजे गोध्राचा बदला म्हणून गुजरातनं मुस्लिमांची कत्तल केली ते वर्ष. २००२नंतरही मुसलमान पुरुष असेल तर तो फारुखसारखा म्हणजे त्या कुटुंबप्रमुखासारखा वागतो. मात्र त्या वर्षी जन्मलेली मुलगी मात्र त्या जुन्या, अन्यायी, धर्मांध इतिहासापासून सुटी व्हायची धडपड करते आहे, असं बहुधा दिग्दर्शकाला सुचवायचं आहे.

मुस्लिमांच्या दोन पिढ्या कशा वेगळ्या आहेत, हे बडोद्यातून सांगायचं धाडस तर आहेच, पण ते प्रेक्षकांना थेट सांगितलं असतं, तर पटलं असतं. एरवी या चित्रपटात विद्यमान राजकीय संदर्भ चुकूनही दिसणार नाही याची इतकी काळजी घेतली गेलीय की, आउटडोअरचे सारे शॉटस क्षणार्धात नाहीसे होत जातात. ना पोस्टर्स, ना बॅनर्स, ना कटआऊटस, ना बांग, ना घंटानाद, ना मुस्लिम मोहल्ला ना शेजारपाजार. फक्त एकदा पत्नी नमाज पढताना दाखवलेली. घरातही मक्केचं कॅलेंडर नाही की आयत.

सबंध चित्रपट इस्लाम, रूढी, ईश्वर, याविरुद्ध काही भाष्य करत नाही. मग कुटुंब मुस्लिम का दाखवलं? राजपूत, जाट, ब्राह्मण यांचा प्रतिगामी अवतार दाखवून वीट आला म्हणून? बंड केवळ जुलमी पुरुषाविरुद्ध करून चालत नाही. ज्या धर्मव्यवस्थेनं त्याला सत्ता बहाल केली, तीवरही आघात केले पाहिजेत. गंमत म्हणजे नायिकेचा मित्र चिंतन याच्याही आई-वडिलांचा घटस्फोट झालेलाय. पण तो सांगतो की, सारेच पुरुष वाईट नसतात. शक्तीकुमार दोन वेळा घटस्फोटीत आहे. तरीही कलेखातर व प्रेमाखातर तो इन्सियाला त्याला हरवणारी वकीलबाई मिळवून देतो. म्हणजे गुजरातची असो की आणखी कोणी, घटस्फोट तीन पात्रांना एकत्र आणण्याची प्रक्रिया म्हणावी की अनिवार्यता? मुलगी आईला घटस्फोट घ्यायला लावते, हा संदेश देण्यासाठी गुजरात व मुस्लिम यांचा संदर्भ ओढूनताणून आणलेला वाटतो. उत्तरार्धात सारं कथानक फिल्मी होऊन वास्तवापासून पळ काढतं.

याच वर्षी जानेवारीत आलेला शाहरूख खानचा ‘रईस’ गुजराती असूनही काही प्रसंगांमधून राजकीय भाष्य करतो. एका राजकीय मिरवणुकीत मोठ्या चलाखीनं भाजपच्या ध्वजातील दोन्ही रंग झेंड्यांना लावलेले दिसतात. गुजरात दा‌खवतं तेवढं सोज्वळ, अहिंसक, सरळ राज्य नाही हे ‘रईस’ स्पष्टपणे मांडत जातो. हे राज्य गुन्हेगारी जन्माला घालतं, गांधीलाच नव्हे, असे तर शाहरुखला सुचवायचं नव्हतं? संदर्भ अर्थातच गोध्राचा. पण रईस पडला, पाडला किंवा लोळवला. सिनेमा म्हणून तर तो वाईटच होता.

२०१३ साली ‘गोरी तेरे प्यार में’ नावाचा करीना कपूर-इमरान खान यांचा एक चित्रपट येऊन गेला. तो मात्र गुजराती भाषा, माणसं, गाव यांनी समृद्ध होता. मोदी तेव्हा मुख्यमंत्री होते आणि अनुपम खेरचं पात्र सरपंच बनून गावाचा पाण्याचा प्रश्न कसा चिघळेल हे पाहतं, हे या चित्रपटाचं कथानक होतं. गुजराती राजकारणही खुनशी, सुडानं पेटलेलं, स्वार्थी आहे हे दिग्दर्शक मल्होत्रा यानं दाखवलं होतं. एक पुढारी विरुद्ध दोन आदर्शवादी तरुण आणि हतबल गावकरी यांची ही गुजराती कथा अर्थातच पडली, पाडली किंवा लोळवली. करण जोहर निर्माता असूनही!

सारखे उत्तर भारतीय राजकारण आणि हिंसा पाहून आपल्याला गुजराती कथा सपक वाटत असतील तर तो धोकाय. हे तिन्ही चित्रपट म्हणूनच ग्रेट नसावेत काय?

.............................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......