धनगर सिद्दरामय्या हिंदूविरोधी कसे?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, येडीयुरप्पा आणि अमित शहा
  • Wed , 31 January 2018
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar सिद्धरामय्या Siddaramaiah बी. एस. येडीयुरप्पा B S Yeddyurappa अमित शहा Amit Shah

या लेखाचं शीर्षक काहींना खोडसाळ वाटू शकेल? मलाही ते फारसं आवडलेलं नाही. पण राजकारणातले राजकीय नेत्यांचे डावपेच आपल्या आवडीनिवडी पलीकडचे असतात. या वर्षात कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं तिथं राज्य सरकार आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून सत्ता खेचून घ्यायची, असा भारतीय जनता पक्षाचा (भाजप) प्रयत्न आहे.

कनार्टक हे दक्षिणेतलं महत्त्वाचं राज्य आहे. ६.११ कोटी लोकसंख्या असलेलं हे राज्य देशात आठव्या क्रमांकावर आहे. ३० जिल्हे आणि ४.९० कोटी मतदार. विधानसभेचे २२४ आमदार आहेत. उत्तर, दक्षिण आणि समुद्र किनारपट्टीचा प्रदेश अशा तीन भागात ते वसलेलं आहे. दक्षिणेकडच्या या एकमेव राज्यात २००८ ते २०१३ या काळात भाजपची सत्ता होती. बी. एस. येडीयुरप्पा तेव्हा मुख्यमंत्री होते. ते खाण घोटाळा प्रकरणात तुरुंगात गेले आणि इथं भाजपची राजवट बदनाम होऊन काँग्रेस पक्ष २०१३ मध्ये सत्तेवर आला. मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जाणं हा तेव्हा भाजपला मोठा धक्का होता. पाच वर्षांत भाजपच्या राज्यात तीन मुख्यमंत्री द्यावे लागले. पक्षांतर्गत भानगडी-कुलंगडी-भांडणं विकोपाला गेली आणि भाजपची हार झाली. तेव्हा ज्या येडीयुरप्पांनी कर्नाटकात भाजपला डुबवलं, त्यांनाच आता परत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करून भाजप पुन्हा सत्ता मिळवण्याचं स्वप्न बघत आहे. त्यासाठी डावपेच आखत आहे.

निवडणूक जिंकण्याच्या डावपेचाच भाग म्हणून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना ‘मुल्ला सिद्धरामय्या’ म्हणत ते घोर हिंदू विरोधी आहेत असं जाहीर केलं आहे. या राज्यात मुस्लिमांची संख्या १२ टक्के आहे. २२४ पैकी ३५ आमदारांच्या प्रत्येक मतदारसंघात मुस्लिम मतं २० टक्क्यांच्या आसपास आहेत. हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा भाजप विरुद्ध हिंदूविरोधी अशी विभागणी केली तर हिंदू मतं संघटित होतात. त्यातून ‘हिंदू वोट बँक’ तयार होते. निवडणुका जिंकता येतात, हे भाजपचं सूत्र आहे. उत्तर प्रदेश, गुजरात विधानसभांच्या निवडणुकांत हे सूत्र वापरून भाजपनं सत्ता मिळवली. तोच प्रयोग कर्नाटकात भाजपला करायचा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच कसे हिंदूंचे शत्रू आहेत, हे सांगण्याचा अमित शहांचा प्रयत्न आहे. शहा यांच्या सूरात सूर मिळवून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सिद्धरामय्यांनी कर्नाटकात बीफवर बंदी आणून दाखवावी, असं म्हटलंय.

भाजप नेते कन्नड मतदारांत धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नांत असले तरी ते होण्यात काही अडचणी आहेत. या राज्यातली जातीय समीकरणं भाजपला त्रासदायक आहेत. भाजपची या राज्यातली प्रतिमा लिंगायत आणि ब्राह्मण समाजाचा पक्ष अशी आहे. कर्नाटकात लिंगायत (१७ टक्के), वक्कलिग (१५ टक्के), कुरुबा धनगर (८ टक्के), दलित (२३ टक्के), मुस्लिम (१२ टक्के) आणि उरलेल्यांत ब्राह्मण, मागासवर्गीय (ओबीसी) छोट्या जाती येतात.

लिंगायत, वक्कलिग, धनगर या तीन हिंदू जातींचं कर्नाटकच्या राजकारणावर वर्चस्व आहे. या तिन्ही जाती आपल्याला नेत्याला मत देतात. पक्ष बघत नाहीत. म्हणून सध्या या तीन नेत्यांभोवती कर्नाटकचं राजकारण फिरतंय. येडीयुरप्पा हे लिंगायत आहेत. ते भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. सिद्धरामय्या धनगर आहेत. ते काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. एच. डी. देवेगौडा हे वक्कलिग समाजाचे नेते. त्यांचा जनता दल (धर्मनिरपेक्ष) हा पक्ष आहे. त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी हे या पक्षाचे प्रमुख नेते आहेत.

जॉब, रोड आणि वॉटर हे या निवडणुकीत महत्त्वाचे मुद्दे आहेत. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या, लिंगायत ही हिंदू धर्मातील एक जात नसून तो स्वतंत्र धर्म आहे. म्हणून लिंगायत धर्माला केंद्रानं मान्यता द्यावी आणि अल्पसंख्याक दर्जा बहाल करावा, या मुद्यावर लिंगायत समाज विभागला गेला आहे.

लिंगायत धर्म ही भाजपसाठी भलतीच डोकेदुखी आहे. लिंगायतांमधील विरशैव हा समूह आम्ही हिंदू आहोत असं मानतो. त्यामुळे विरशैव व लिंगायत यांच्यात भांडण आहे. गौरी लंकेश आणि डॉ. एस. एम. कलबुर्गी हे स्वतंत्र लिंगायत धर्माच्या बाजूनं होते म्हणून त्यांची हत्या झाल्याचं सांगितलं जातं. या गोष्टींचा या निवडणुकीत प्रचारात वापर होणार आहे. सिद्धरामय्या हे लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या जनचळवळीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. हा मुद्दा ऐरणीवर आला तर आपली लिंगायत वोट बँक फुटेल अशी भाजपला भीती आहे.

हिंदूंमध्ये फूट पाडतात म्हणून सिद्धरामय्या हिंदूविरोधी असं भाजप म्हणतो. सिद्धरामय्या हे कर्नाटक गेल्या पाच वर्षात काँग्रेस काळात जॉब आणि रोड निर्मितीत कसा पुढे आहे आणि त्यामुळे राज्याचा कसा विकास होतोय हे सांगत आहेत. बेंगलुरू ही आयटी सिटी बनवून जॉब दिले, हे पटवण्यात सिद्धरामय्या काहीसे यशस्वी ठरताना दिसताहेत. कर्नाटकातले रोड चांगले असल्याचं बोललं जातंय. या मुद्यांवर भाजपपेक्षा काँग्रेसचं पारडं जड दिसतंय. म्हणून विकासाच्या मुद्याऐवजी भावनिक मुद्यांवर निवडणूक न्यायचा भाजपचा प्रयत्न दिसतोय.

कर्नाटकात महादायी नदीच्या पाण्याचा प्रश्न गेली ३० वर्षं भिजत पडलाय. कर्नाटक गोवा राज्यातल्या पाणी वाटपाचा हा वाद आहे. गोव्यातल्या महादायी नदीतुन ७.५६ टीएमसी फूट पाणी कर्नाटकच्या कलसा-भांदुरी नाला प्रकल्पात सोडायचं. त्यामुळे हुबळी, धारवाड या शहराची तहान भागते. पण हे पाणी देण्यास गोवा भाजप सरकार टाळाटाळ करतंय, कर्नाटकावर अन्याय करतंय, असा सिद्धरामय्यांचा आरोप आहे. या प्रश्नापायी कालच्या २५ जानेवारीला कर्नाटक बंद होतं. गोव्यातलं पर्रीकर-भाजप सरकार अडवणूक करतंय, केंद्रातलं मोदी सरकार दुर्लक्ष करतंय, कन्नड जनता येत्या निवडणुकांत या रागातून भाजपला धडा शिकवेल असं सिद्धरामय्या बोलतात.

सिद्धरामय्या हे जुने जनता दलातले नेते. धनगर समाज त्यांच्या मागे आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. प्रशासन चालवण्यात ते उजवे ठरलेत. काँग्रेस पक्ष त्यांच्यामागे एकमुखी आहे. ओबीसी, दलित, मुस्लिम यांचा मुख्यमंत्री अशी प्रतिमा त्यांनी बनवलीय. अशा सक्षम नेत्याच्या तावडीतून भाजपला कर्नाटक खेचायचा आहे.

म्हणूनच कर्नाटक जिंकण्यात सिद्धरामय्या हा मोठा अडथळा आहे, हे शहांसारख्या चतुर राजकारण्यानं जोखलं आहे. मुळावर घाव घालायचा म्हणून शहांनी कर्नाटकात मागच्या आठवड्यात सिद्धरामय्या हिंदूविरोधी आहेत अशी गर्जना केलीय. पण जातीनं धनगर असलेले सिद्धरामय्या जीवनशैलीनं हिंदू आहेत. अमित शहांच्या डोक्यातला हिंदू धर्म वेगळा असेलही. पण त्याआधारे ते सिद्धरामय्यांचं हिंदूपण काढून कसं घेऊ शकतील? जात विरुद्ध धर्म अशी लढाई उभी राहिली की, धर्मांध नेहमी हरतात. गुजरातमध्ये हार्दिक पटेल आणि पाटीदार समाजाला हिंदूविरोधी ठरवता आलं नाही हे दिसलं आहे. कर्नाटकातही गुजरातसारखी जात विरुद्ध धर्म अशी दुफळी करण्याचा प्रयत्न होतोय, त्यात कोण बाजी मारणार हे पुढच्या काळात उलगडत जाणार आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Sourabh suryawanshi

Wed , 07 February 2018

पण आपले पूर्वज यज्ञात गायी चा बळी का देत होते आणि ते नेमकं बंद का व कधी झालं जर अधिक तपशील असेल तर माहिती द्यावी @ Mr.pote S


Mr.pote S

Wed , 31 January 2018

अहो काका, सिद्धारमैया काय बोलले होते माहीत आहे का ? ते बोलले होते की त्यांना बिफ खाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बातम्यात पण छापून आले होते हे. आता सर्वसामान्य हिंदू जो गायीला देव मानतो तो बिफ खायची भाषा करेल का हो ? तसेच सिद्धारमैया हे प्रशासनात उजवे आहेत, भ्रष्टाचाराला थारा देत नाहीत वगैरे जावईशोध तुम्ही कोठून लावलेत ? त्यांच्या राज्यात dy.sp गणपती यांनी सिद्धारमैयाचे मंत्री जाॅर्ज हे त्यांचा छळ करतात म्हणून आत्महत्या केली, दुसरी IPS अधिकारी अनुपमा शेनाॅय यांनीही मंत्री छळ करतात म्हणून नोकरीची राजिनामा दिला आहे, IAS अधिकारी रवी यांनीही आत्महत्या केली. हि सर्व सुप्रशासनाची लक्षणे आहेत का ? तसेच शशिकला या कर्नाटकातील जेलमध्ये आहेत त्यांनीही जेलमध्ये लाच घेऊन VIP ट्रिटमेंट मिळते, हे भ्रष्टाचारमुक्त राज्याचे लक्षण आहे का ? तर सांगायचा मुद्दा काय कांदळकरकाका की लेख लिहीताना बेसिक माहिती तरी गोळा करून लेख लिहा, उगाच एेकिव माहितीवरून लेख लिहू नका. कारण अश्या कच्च्या लेखांमुळे काॅंग्रेसच्या पैशावर तुम्ही लेख लिहीता असा समज लोकांमध्ये निर्माण होऊ शकतो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......