संमेलन संपले, अखिल भारतीयच, पण मुस्लीम मराठी!
पडघम - साहित्यिक
कलीम अजीम
  • ११वे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन
  • Mon , 06 November 2017
  • पडघम साहित्यिक ११वे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन पनवेल Panvel 11 Ve Akhil Bhartiya Muslim Marathi Sahitya Sammelan

पनवेलला ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान ११वं मुस्लीम मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याची सांगता रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाली. मुस्लीम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. राज्यातील व पनवेलमधील अनेक साहित्यप्रेमींनी उत्स्फूर्त हजेरी लावली. परंपरेप्रमाणे काही मागण्या व ठराव या संमेलनात मांडण्यात आले. उदा. सरकारनं संमेलनाला निधी व मुस्लीम मराठी सांस्कृतिक मंडळासाठी जागा द्यावी, राज्यातील विद्यापीठात मुस्लीम मराठी साहित्याचं अध्यासन केंद्र सुरू करावीत. या दोन मागण्या प्रमुख होत्या. या व्यतिरिक्त अनेक ठराव मांडण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांनी मराठी मुस्लीम साहित्याचा आढावा घेतला. यासह समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधलं. दहशतवाद, सामाजिक सुरक्षा व आयसिस यावर सबनीस यांनी चिंता व्यक्त केली. तर संमेलनाध्यक्ष बीबी फातेमा बालेखाँ मुजावर यांनी मुख्य प्रवाहात होत असलेली मुस्लीम मराठी साहित्यिकांची फरफट आधोरेखित केली. मराठी मुस्लीम साहित्य परिषद मान्य करण्यास अनेक वर्षाचा कालावधी लावला याबद्दल यांनी खंत व्यक्त केली. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदा उद्घाटनाचं भाषण प्रकाशित करून वितरीत करण्यात आलं. उद्घाटन कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष रामशेठ ठाकूर, पनवेलच्या महापौर कविता चौतमल, आमदार इम्तियाज जलील यांच्यासह संमेलनाचे सर्व माजी अध्यक्ष उपस्थित होते.

तीन दिवस चाललेल्या या संमेलनात अनेक विषयावर चर्चा झाली. 'महाराष्ट्रील समतेच्या चळवळी आणि मुस्लीम' या परिसंवादात राज्यातील सामाजिक चळवळीतील मुस्लीम समुदायाचं योगदान यावर समतोल चर्चा झाली. यात हभप शामसुंदर सोन्नर, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनवर व नागपूरचे प्रा. जावेद पाशा कुरेशी यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील सांस्कृतिक व प्रबोधनाच्या चळवळीत मुस्लीम समुदायाच्या योगदानावर चर्चा झाली. इतिहासाचं विकृतीकरण, संत-साहित्यात मुस्लीम संतांचं स्थान याची उजळणी परिसंवादात करण्यात आली. भारतात मुस्लीम मूलनिवासी असून त्यांनी इथल्या स्थानिक परंपरा व संस्कृतीचा स्वीकार केला. लाखो मुस्लिमांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. १८५७ सालच्या उठावात एकट्या दिल्लीत २५ हजारांपेक्षा जास्त मुस्लिमांना फासावर चढवण्यात आलं होतं. आज सत्ताधारी पक्ष मुस्लिमांना परके ठरवतोय, यापेक्षा वेदनादायी गोष्टी दुसरी कुठली नाहीये, अशी खंत जावेद पाशा कुरेशी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या समूहाकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र मागणं, लोकशाही राष्ट्राचं दु:ख आहे, असा सूर एकूण परिसंवादात उमटला.

मुस्लीम समाजाबाबत समज व गैरसमज हा दुसरा महत्त्वाचा परिसंवाद या संमेलनात झाला. यात माजी आयजी एसएफ मुश्रीफ, 'दी वीक'चे प्रिन्सिपल कॉरसपाँडंट निरंजन टकले, इतिहास संशोधक सरफराज शेख, डॉ. सय्यद रफीख, धनराज वंजारी, मेहबूब काझी व मोहसीन खान यांनी मुस्लिमांच्या दानवीकरणाच्या सादरीकणावर भाष्य केलं. 'मोहम्मद अली जिना यांनी द्वी-राष्ट्राचा सिद्धान्त सावरकरांकडून घेतला होता. त्यामुळे फाळणीचे ते पहिले गुन्हेगार आहेत' अशी भूमिका निरंजन टकले यांनी मांडली. गौमांस बंदीवरील त्यांच्या एका स्पेशल स्टोरीचा उल्लेख ते म्हणाले की, 'बीफ बॅनच्या आड बजरंग दल खंडणीचा व्यवसाय करत आहे, यांचे व्हिडिओ पुरावे माझ्याकडे आहेत. एका कार्यकर्त्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, 'माझ्याकडे असलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये एक गोरक्षक म्हणतोय की 'डर फैलाने में इतना समय लगा, अब बिझनेस का टाईम हैं'. मुस्लीम विरोधात सुरू असलेल्या षडयंत्राबाबत टकलेंनी अनेक खुलासे केले.

इतिहासाचे अभ्यासक सरफराज शेख यांनी टिपू सुलतानच्या सुरू असलेल्या कथित राक्षसीकरणावर भाष्य केलं. तब्बल सात वर्षं त्यांनी टिपूवर केलेल्या संशोधनाचा उहापोह आपल्या व्याख्यानात केला. टिपू सुलतानच्या नैतिकतेचे पुरावे देत ते कसे ब्राह्मण्यावाद्यांच्या डोळ्यांना खुपत आहेत, याबद्दल त्यांनी विचार मांडले. तर माजी पोलीस अधिकारी वंजारी यांनी भारतात आयबी म्हणजे गुप्तचर यंत्रणा सत्ता चालवत असल्याचा धक्कादायक खुलासा केला. तर सय्यद रफीक यांनी दहशहवादाच्या आरोपाच्या षडयंत्रावर भाष्य केलं. भारतीय मुस्लीम हा शांतीप्रिय असून तो दहशतवादी कारवाया करु शकत नाही हे निर्दोष सुटत असलेल्या तरुणांवरून सिद्ध होतं, असं मत मांडलं. सर्व बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास नव्यानं करावा व खऱ्या आरोपींना शोधावं अशी मागणी डॉ. रफीख सय्यद यांनी केली. तर अध्यक्षीय समारोप करताना एसएम मुश्रीफ म्हणाले की, दलित व बहुजन शिक्षित होण्यानं ब्राह्मण्यावाद्यांचं धाबं दणाणलं होतं. त्यामुळे त्यांना मुस्लिमांच्या पाठीमागे लावलं, असा आरोप केला. 'जेव्हापासून स्फोटाच्या तपासात ब्राह्मण्यवादी संघटनांचा हस्तक्षेप आढळला, तेव्हापासून स्फोटाच्या घटना कमी झाल्या' असा आरोपही मुश्रीफ यांनी केला.

शनिवारी मुस्लीम महिलांनी आपल्या भावविश्व व साहित्यातील अवकाशावर भाष्य केलं. मस्जिदमध्ये नमाजला न जाता येणं ही आम्हाला सूट असल्याचं मत नागपूरच्या जुल्फी शेख यांनी मांडलं. घरातली मुलंबाळं, स्वंयपाक-पाणी सोडून दर तासा-दोन तासाला मस्जिदमध्ये नमाजला जाणं महिलांना प्रॅक्टिकली शक्य नाही, पण पुरुषांना व्यवसायाच्या ठिकाणी ते शक्य असतं असंही मत जुल्फी शेख यांनी मांडलं. तलाक, मस्जिद व दर्गा प्रवेश यापेक्षाही गंभीर विषय मुस्लीम महिलांचे आहेत, याकडे सामाजिक संघटना कधी लक्ष देणार असा प्रश्नही त्यांनी विचारला. विद्युत भागवत यांनी महिला सुरक्षेवर सरकारला घेरलं. तर ऐनुल अतार यांनी मुस्लीम महिलांच्या बदलल्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. हसिना मुल्ला यांनी ग्रामीण भागातील महिलांची फरफट मांडली. मुस्लीम महिलांचं संघर्ष करणारे चित्रण साहित्यात येत नसल्याची खंत त्यांनी मांडली. एकूण परिसंवादात हिंदू-मुस्लीम प्रश्नात स्त्रियांची होणारी होरपळ साहित्य क्षेत्रानं दुर्लक्षित केल्याची खंत मांडण्यात आली.

शनिवारच्या दुसऱ्या परिसंवादात मुस्लीमोत्तर लेखकांच्या नजरेतून मुस्लीम साहित्य या विषयावर चर्चा झाली. यात हिंदू आणि मुस्लिमांमधली गंगा-जमनी संस्कृती साहित्यात प्रकर्षानं मांडावी असा ठराव मान्यवरांनी मांडला. पांडुरंग कंद व फारुख तांबोळी यांनी मुस्लीम विषयातील साहित्यिक संशोधनात येत असलेल्या अडचणींवर भाष्य केलं. संशोधनासाठी मराठी मुस्लीम साहित्याचं संग्रहण करावी अशी मागणी या दोघांनी केली. अनिलकुमार साळवे यांनी सिनेमातील प्रातिनिधिक मुस्लीम चित्रणावर भाष्य केलं. मुस्लीम साहित्य संशोधक मेळावा व २५ वर्षांतील मराठी मुस्लीम साहित्याचा लेखाजोखा हे दोन प्रमुख परिसंवाद शनिवारचं मुख्य आकर्षण ठरली. डॉ. बशारत अहमद यांनी २५ वर्षांतील मुस्लीम मराठी साहित्याच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. १९९० पासून मराठी मुस्लीम संघटनेच्या स्थापनेपासून आज मुस्लीम मराठी साहित्याची काय स्थिती आहे, यावर संमेलनाच्या सर्व अध्यक्षांनी विवेचन केलं. फ.म. शाहजिंदे यांनी मराठी मुस्लीम साहित्यिकांच्या लेखन प्रसारासाठी त्रैमासिक पत्रिकेची गरज व्यक्त केली, तर जावेद पाशा कुरेशी यांनी मुस्लीम प्रश्नांवर दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर द्यावा असा प्रस्ताव मांडला. डॉ. इकबाल मिन्ने यांनी मुस्लीम मराठी साहित्य चळवळ पुढे नेण्यासाठी सहकार्य करण्याचं आव्हान केलं.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4257

.............................................................................................................................................

शनिवार एकांकिका व नवेदित कवी संमेलनामुळेही चांगलाच गाजला. मुख्य परिसंवादानंतर दोन कवी संमेलनं झाली. पहिल्या कवी संमेलनात महिला कवींनी दर्जेदार कविता सादर केल्या. महिला प्रश्न, कुटुंब, नातेसंबंध, सामाजिक मान्यता, आदर अशा विविध आशयांना घेऊन कविता सादर झाल्या. यात फरजाना डांगे, जुल्फी शेख, मोहसिना शेख, शमा बरडे, समीना शेख सायराबानू चौगुले इत्यादी कवयित्रींनी आपल्या रचना सादर केल्या. यानंतर डॉ. एकबाल मिन्ने लिखित व आरेफ अन्सारी दिग्दर्शित ‘एक रात्र वादळी’ या एकांकिकेचं अभिजित भातलवंडे व विदुला बाविस्कर यांनी सादरीकण केलं.

मिलाजुला मुशायऱ्यात मोठ्या संख्येनं कवींचा सहभाग होता. प्रेम, त्याग यापासून सामाजिक वेदना व सुरक्षेसंदर्भात अनेक कवींनी आपल्या रचना सादर केल्या. कलीम खान, एके शेख, मुबारक शेख, मसूद पटेल, खलील मोमीन, बशारत अहमद, बदीउज्मा बिराजदार, सय्यद आसीफ, आबीद शेख, राज पठाण, कैलास गायकवाड, आबीद मुन्शी, छाया गोवारी यांच्यासह सुमारे ३० कवींनी संमेलनात रचना सादर केल्या.

रविवारी पहिल्या सत्रात नवोदित कवींचा मुशायरा झाला. यात शफी बोल्डेकर, सुनिती साठे, मोहसीन सय्यद, समाधान दहिवाल, परवेज शेख, जावेद अली यांच्यासह सुमारे २० पेक्षा जास्त कवींनी सहभाग घेतला. यानंतर सोशल मीडिया व आजचा तरुण यात नौशाद उस्मान, डॉ. शाहीद शेख, खालीद मुल्ला, शशी सोनवणे व साजिदचे पठाण यांनी सोशल मीडियातील लेखनशैली, ट्रोलिंग व बिझनेस मॉडेलवर चर्चामंथन केलं. बेगुनाह कैदी पुस्तकाचे लेखक अब्दुल वाहिद शेख यांनी मुंबईतील २००६ पश्चिम रेल्वे ब्लास्टमधील निर्दोष आरोपींच्या शिक्षेत सूट मिळावी, यासाठी सोशल मीडिया कॅम्पेन चालवण्याचं आवाहन केलं.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.aksharnama.com/client/diwali_2016

.............................................................................................................................................

मुस्लीम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत मंडळाची आगामी भूमिका ठरवण्यात आली. यात त्रैमासिक पत्रिका व वेबसाईट सुरू करणं, मंडळाच्या विभागीय शाखा सुरू करणं, निधी व जागेसाठी प्रयत्न करणं आदी विषयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. संमेलनाच्या समारोपाआधी कोंकणी मुस्लिमांच्या साहित्य व सांस्कृतिक योगदानावर मंथन झालं.

प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित समारापोचा सोहळा पार पडला. समारोपात एकूण १६ ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषेचं विद्यापीठ अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरला व्हावं, मुस्लीम मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळासाठी विभागीय साहित्य मंडळाप्रमाणे अनुदान मिळावं, जेलमधील दलित-आदिवासी व मुस्लीम विचाराधिन कैदींची सुटका करावी इत्यादी विषय मांडण्यात आले. या संमेलनाला राज्यभरातून अनेक मराठी मुस्लीम व मुस्लीमोत्तर लेखकांनी हजेरी लावली होती.

.............................................................................................................................................

लेखक कलीम अजीम ‘सत्याग्रही विचारधारा’ या  मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 07 November 2017

निरंजन टकले म्हणतात की सावरकरांनी पहिल्यांदा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. च्यायला, सईद अहमद खानांनी १९०६ साली मुस्लीम लीग द्विराष्ट्रवादाच्या आधारेच पैदा केली ना? उगीच आपलं काहीतरी ठोकून द्यायचं हां. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘काॅन्टिट्यूशनल कंडक्ट ग्रूप’चे केंद्रीय निवडणूक आयुक्तांना जाहीर पत्र : जोवर सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती एसबीआय देत नाही, तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक प्रकाशित करू नये

आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की, सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४पर्यंत आहे. निवडणूक वेळेत होण्यासाठी आयोगाने २७ मार्च किंवा त्यापूर्वीच वेळापत्रक जाहीर करावे. एसबीआयने निवडणुकीच्या घोषणेच्या आधीच ‘इलेक्टोरल बाँड्स’चा डेटा द्यावा. संविधानाच्या कलम ३२४नुसार आपल्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय निवडणूक आयोगाला आपली प्रतिष्ठा आणि त्याची स्वायत्तता परत मिळवण्याची ही संधी आहे.......