‘हिंदुत्व की हिंदस्वराज’ : डॉ. अनंतमूर्तींनी मरण्यापूर्वी आपल्या हातात दिलेले मौलिक विचारधन
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विजय तांबे
  • यू. आर. अनंतमूर्ती आणि ‘Hindutva or Hind Swaraj’ या इंग्रजी व ‘हिंदुत्व की हिंदस्वराज’ या मराठी पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Wed , 22 December 2021
  • ग्रंथनामा शिफारस हिंदुत्व की हिंदस्वराज Hindutva or Hind Swaraj यू. आर. अनंतमूर्ती U. R. Ananthamurthy हिंदू Hindu हिंदूराष्ट्र Hindu Rashtra हिंदुत्व Hindutyva गांधी Gandhi हिंदस्वराज Hind Swaraj

प्रख्यात कन्नड साहित्यिक डॉ. यू. आर. अनंतमूर्ती यांच्या ‘हिंदुत्व ऑर हिंद स्वराज’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद नीला भागवत यांनी केला आहे. मूळ पुस्तक कानडीमध्ये असून त्याच्या इंग्रजी भाषांतरावरून त्यांनी हा मराठी अनुवाद केला आहे. नीला भागवत या ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका आहेत, त्याचबरोबर भाषा आणि समाजशास्त्राच्या उत्तम जाणकार आहेत.

‘हिंदुत्व की हिंदस्वराज’ हे डॉ. अनंतमूर्ती यांचं अखेरचं पुस्तक. म्हणजे अगदी मृत्यूशी स्पर्धा करत पूर्ण केलेलं. मला जायच्या आधी फार महत्त्वाचं सांगायचं आहे, पुढच्या पिढीला आपलं संचित हस्तांतरीत करायचं आहे आणि हातात वेळ फार कमी आहे. मी मरायच्या आधी हे बोलायलाच हवं कारण हे माझं कर्तव्य आहे, अशी डॉ. अनंतमूर्तींची तळमळीची भूमिका आहे.   

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

पुस्तकाचं शीर्षक वाचून असं वाटू शकतं की, हा एक वैचारिक प्रबंध असेल. खंडन-मंडनाच्या पद्धतीनं अनेक पुराव्यांसहीत डॉ. अनंतमूर्तींनी आपली बाजू मांडली असेल. तसं काहीच या पुस्तकात नाही. डॉ. अनंतमूर्ती हे सर्जक व्यक्तिमत्त्व होतं आणि त्यांचा लोकशाही समाजवादी चळवळीशी जिवंत संबंध होता. ते सर्जक लेखक म्हणून दोन्ही विचारपद्धतींकडे बघतात आणि त्याच वेळी या मातीतल्या संस्कृतींचं भानही आपल्याला देतात. लेखकाच्या राजकीय भूमिका स्पष्ट आहेत. लेखक कोणाचाही भक्त नाही. त्याची फक्त एकच अडचण आहे. त्याच्याकडे लिहायला वेळ कमी असल्यानं तो अतिशय नेमकेपणानं मुद्दे मांडतो. वाचकावर जबाबदारी येते, ती त्या मुद्द्यांवर विचार करून पचवण्याची.

मला स्वत:ला हे पुस्तक समजायला सोपं झालं, कारण ‘आयडिया ऑफ इंडिया’चं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या पिढीतले माझे वडील होते. गांधी, साने गुरुजी, समाजवादी चळवळ, विनोबा यांचा पगडा त्यांच्यावर होता. स्वातंत्र्य चळवळ त्यांनी अनुभवली होती. समाजासाठी काम करण्यावर त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या मृत्युपूर्वी बाबरी मशीद उदध्वस्त झाली. हिंदुत्ववाद्यांचा चढता आलेख त्यांनी पाहिला. साने गुरुजींच्या भारतीय संस्कृतीचं अध:पतन होताना वडिलांना होणारे क्लेश आणि वेदना मी जवळून पाहिल्या आहेत. ते लेखक नव्हते, मात्र त्यांच्या वेदना आणि आवेग मला अनंतमूर्तींच्या लिखाणात सापडला. त्यातून मला परत एकदा वडील भेटले.

सहिष्णू, सर्वसमावेशक भारतीय संस्कृती आणि हिंदुराष्ट्रवाद या दोन परस्परविरोधी विचारधारा स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील विविध विचारधारांच्या मंथनातून निर्माण झालेली आणि सहिष्णू व सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीच्या पायावर उभी राहिलेली ‘आयडिया ऑफ इंडिया’ भारतीय जीवनशैलीला साजेशी आहे. हिंदुत्वामध्ये ‘हिंदू’ शब्द असला तरी या संकल्पनेचं मूळ फॅसिस्ट विचारांमध्ये आहे. ‘हिंदूराष्ट्र’ हे मुळातच सर्वसमावेशकता, सहिष्णूता आणि विविधतेतून एकता या संकल्पनांच्या विरोधात आहे. या संकल्पना तर भारतीय संस्कृतीचा पाया आहेत. राष्ट्रवाद ही संकल्पना मूळची कुठली? तिचा पाया काय आहे? भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या गांधी आणि टागोरांनी ही संकल्पना का नाकारली? आणि हिंदुत्ववाद्यांना ही पाश्चात्य संकल्पना का आवडली? भारतीय राष्ट्रवादाच्या संकल्पनेचं वेगळेपण काय आहे?

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

हे सगळं डॉ. अनंतमूर्ती या पुस्तकातल्या ८६ पानांमध्ये मांडतात. हे लिहीत असताना ते विकासाबद्दल आणि  यंत्रांबद्दलसुद्धा  लिहितात. ते लिहितात, “आपल्या अंतर्मनातलं पाप, दुष्टावा, याबद्दल गांधीजींनी जो मार्ग सांगितलाय, तो फार महत्त्वाचा आहे. मन कलुषित आहे, हे जेव्हा मान्य केलं जातं, तेव्हाच दिलसफाई करायचा प्रयत्न करता येतो. आपलं मन निर्मळ आणि योग्यच आहे, पाप असेल तर इतरांच्यात असं समजणं हा नथुराम गोडसेचा मार्ग आहे.’’

हे वाचताना आपल्या गाडीला अचानक ब्रेक लागतो. आपण अंतर्मुख होतो. आपल्या न कळत हे वाक्य आपण पुन्हा वाचतो. ते एका वाक्यात गोडसे-मार्गाचं मूलतत्त्व आपल्याला सांगतात. आणि पुढे लिहितात, “मोदी संस्कृतीची बीजं गोडसेमध्ये सामावली होती की काय!”

सावरकर आणि गोडसेंबद्दल लिहिताना अनंतमूर्ती सध्याच्या राजकारणाचे संदर्भ देतात. मोदींच्या राजकारणाचं सावरकरांच्या तत्त्वांसोबत साम्य दाखवतात. गांधींच्या ‘हिंदस्वराज’मधील मुद्दे स्पष्ट करताना जुन्या करारातील आणि बौद्ध साहित्यातील बोधकथा सांगतात. त्याचबरोबर कन्नड कवींची वचनं वापरतात. ख्रिस्ती आणि हिंदू धर्मातील देव आणि सैतानाच्या कल्पनांबद्दल लिहितात आणि एक वाक्य आपल्याला खटकन अडवतं- ‘‘हिंदू दृष्टीकोन एक प्रकारे सर्वसमावेशी, परस्पर नातेसंबंध परिपूर्णतेनं लक्षात घेणारा आहे. आता हेच पहा ना, २००२मध्ये गुजरातमध्ये झालेल्या हत्याकांडाला, तिस्ता सेटलवाडनी जणू काही आपणच त्याला जबाबदार आहोत, अशा भावनेनं अंगावर घेतलंय आणि त्याविरुद्ध तिची लढाई सुरू आहे.”

हे विधान वाचकाला मुळापासून गदागदा हलवतं. प्रश्न पडतो की, हा हिंदूधर्म असेल तर मी खरा हिंदू आहे का? मग हिंदुत्ववादी खरे हिंदू आहेत का? वाचक एकंदरीतच हिंदूधर्माकडे वेगळ्या पद्धतीनं बघायला उद्युक्त होतो. तिस्ता सेटलवाडबद्दल केलेल्या विधानाचं कारण ते लिहितात, “दु:खदायक गोष्टी घडतात, तेव्हा आपली नैतिकता याला जबाबदार आहे की काय, हा विचार मनात तीव्रपणे येतो.”

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

डॉ. अनंतमूर्ती वाचकाच्या नकळत त्याच्या संवेदनशीलतेला हात घालून त्याला सहिष्णूता आणि सर्वसमावेशकता यांच्या नैतिक आधारांचा आरसा वाचकाला दाखवतात. या नैतिकतेत हिंदुत्ववाद कुठे बसतो, हा प्रश्न वाचक स्वत:ला विचारू लागतो.

मोदींची राजकारण करण्याची शैली डॉ. अनंतमूर्ती मांडतात. मोदींचं गुजरातमधील राजकारण, त्यांच्या पहिल्या संसदीय निवडणुकीची प्रचारशैली आणि जाहिरातबाजी, मुस्लीम समाजाला शरणागती पत्करायला लावणारा नेता, असं वलय मोदींभोवती निर्माण होणं, या सर्वांची नोंद घेताना गांधींच्या नोआखलीच्या दौऱ्याची आठवण त्यांना होते. ते लिहितात, “सार्वत्रिक हिंसेचे प्रसंग उद्भवतात, तेव्हा आपण ती आपली वैयक्तिक जबाबदारी मानत नाही, परंतू येशू ख्रिस्त आणि गांधी यांनी तशी ती मानली होती.”

हे वाक्य आपल्याला परत धक्का देतं. अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडतं. आपण जेवढा व्यापक आणि सखोल विचार करू, तेवढं मानवतेचं, संस्कृती आणि धर्माचं चित्र स्पष्ट होत जातं. त्याच वेळी हिंदुत्वाचा फोलपणा समजून येतो. सामूहिक हत्याकांडात राजकारण्यांचे स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी जनतेला वापरलं जातं, हे स्पष्ट करण्यासाठी ते इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या दिल्लीतील शिखांच्या क्रूर हत्याकांडाचं उदाहरण देतात.

सावरकरांचं हिंदुत्व नक्की काय आहे? यासाठी सावरकरांनी इतिहासाची मांडणी कशी केली? हे डॉ. अनंतमूर्ती मांडतात. त्या वेळी आपण त्यांच्या एका वाक्यापाशी अडकतो- “सावरकरांची विचारप्रणाली आपल्याला शत्रूचा पाडाव करण्याची प्रेरणा देते, परंतू यातून तृप्तीची भावना जाणवत नाही.” पुढे अनंतमूर्ती लिहितात, “परंतू मुक्तीच्या भावनेला कवटाळण्यासाठी आपण उपनिषदं वाचू. गौतमबुद्धाकडे वळू.”

वाचकाला इथं शांत राहून विचार करायला संधी मिळते. हिंदू धर्माचं उद्दिष्ट शत्रूचा पाडाव करणं आहे की, मुक्तीच्या दिशेनं वाटचाल करणं आहे? मग सावरकरांचा हिंदुत्ववाद हा हिंदू धर्माला अनुसरून आहे का? की त्यांचा हिंदू धर्म काही वेगळा आहे? सावरकरांच्या विचारांचा सारांश मांडल्यानंतर ते लिहितात, “सावरकरांची भाषा ओघवती आहे, तर गांधीजींची भाषा सूक्ष्म आणि संयत आहे. सावरकरांचं लिखाण हे अत्युच्य भावनाविवश मनोवस्थेतून केलेलं आहे. या उलट गांधींचं लिखाण आत्मपरीक्षणाच्या तीव्र इच्छेतून झालं आहे.”

एवढंच नोंदवून अनंतमूर्तींचं काम पूर्ण होतं. मात्र वाचक स्वत:ला विचारायला लागतो की, तुला काय आवडतं? भावनेला हात घालणारं ओघवतं लेखन की सूक्ष्म, संयत भाषेतील आत्मपरीक्षण? तुझा विकास, तुझी उन्नत अवस्था कशात आहे?

‘हिंदस्वराज’मधील सर्वोदयाची दृष्टी कधी नव्हे इतकी आज संयुक्तिक आहे. ही दृष्टी समजून घेण्यासाठी गुरुदेव रविन्द्रनाथांची ‘गोरा’ कादंबरी वाचण्याची शिफारस अनंतमूर्ती आवर्जून करतात. ते पुढे लिहितात, ‘‘नरेंद्र मोदी ओबीसी समाजाचे आहेत. त्यांना संघपरिवारानं पंतप्रधान केलं, याचं श्रेय संघाच्या विचारसरणीला नाही; गांधी, आंबेडकर आणि व्ही. पी. सिंग यांनी निर्माण केलेल्या वातावरणाला आहे.’’ या विधानावरून डॉ. अनंतमूर्तींना भारतातील जातींचं भान नेमकं असल्याचं पटतं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

एका प्रकरणात गांधींजींच्या खुनाचे समर्थन करताना गोडसेने न्यायालयात केलेल्या भाषणातील अनेक उतारे डॉ. अनंतमूर्ती देतात. ते वाचत असताना, लेखक असं का करतोय, असं वाटत आणि एका उताऱ्यापाशी आपण थबकतो- “त्यांची विचारसरणी अशी आहे की, भारताच्या ‘वैभवशाली’ भूतकाळाच्या संदर्भातच केवळ जे प्रस्तुत आणि पोषक आहे, तेच विचारात घेणं त्यामुळे शक्य होतं. वेगवेगळ्या धर्मांमधल्या आणि जातींमधल्या कित्येक प्रतिभावंतांनी आधुनिक काळाची जडणघडण करण्यासाठी जी कामगिरी केली, ती या विचारसरणीच्या प्रभावामुळे सहजगत्या विसरली जाते.”

वाचकाला कळतं की, हे प्रभावी भाषण भुरळ पाडतं. आपल्याला वैभवशाली भूतकाळाची गुंगी आलेली असते, तेव्हाच खडबडून जागं करण्याचं काम वरील उतारा करतो. हिंदुत्ववादी विचारसरणीवर केलेलं हे अल्पाक्षरी आणि नेमकं भाष्य आहे.

डॉ. अनंतमूर्ती विषयाला समर्पक असलेल्या गांधी, नेहरू, डॉ. लोहिया यांच्या आठवणी सांगतात. व्ही. पी. सिंग आणि अडवाणींच्या भेटीतील चर्चा सांगत विषय रसाळपणे पुढे नेतात. ते सावरकर, गोडसे, गांधींचे ‘हिंदस्वराज’बद्दल लिहीत असतानाच माणसाचा अतिरेकी हव्यास, विकासाच्या कल्पना, यंत्रांची खरी गरज, पर्यावरणाचा ऱ्हास याबद्दलही लिहितात. पुस्तकाचा शेवट करताना डॉ. अनंतमूर्ती लिहितात की, ‘त्यांना विकासापेक्षा गांधींच्या सर्वोदयाची अधिक गरज वाटते.’

मरण्यापूर्वी एक काम करणं आत्यंतिक गरजेचं आहे, असं मानून मृत्यूशी स्पर्धा करत ‘महात्म्याची अखेर’ हे पुस्तक लिहिणारे जगन फडणीस आणि आता असंच पोटतिडकीनं सांगणारे अनंतमूर्ती… दोघांचा समान विषय गांधीजी होता. डॉ. अनंतमूर्तींनी त्यांचं काम केलं आणि त्यांनी एक्झिट घेतली. त्यांनी आपल्यापुढे अनेक मुद्दे मांडले आहेत. आजच्या काळात अहिंसा, सत्याग्रह, सहिष्णूता, सर्वसमावेशकता हवी. त्याचबरोबर कितीही यांत्रिकीकीरण केलं तरी चालेल असं नसतं. या सगळ्याचं भान आपल्याला डॉ. अनंतमूर्तींच्या पुस्तकातून येतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गांधीविचार वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये होत नाही, तो समग्रतेनेच करावा लागतो. गांधीजींनी १९०९ साली लिहिलेल्या ‘हिंदस्वराज’ या पुस्तकावर गोपाळ कृष्ण गोखले ते जवाहरलाल नेहरू, बहुतेकांनी टीका केली. ते पुस्तक सरळसरळ बाजूला सरकवून ठेवलं गेलं. १९३५च्या आसपास ‘या पुस्तकात आपल्याला काही बदल करावासा वाटतो का?’ हा प्रश्न विचारल्यावर गांधींनी त्याला नकार दिला होता.

आधुनिक भारतातील जवळजवळ सर्वांनीच हे पुस्तक अडगळीत टाकून विकासाचा सुकाणू पूर्णपणे वेगळ्या दिशेला नेला. आजच्या परिस्थितीत मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी वाळीत टाकलेल्या ‘हिंदस्वराज’वरील धूळ झटकून डॉ. अनंतमूर्तींनी ते मरण्यापूर्वी आपल्या हातात दिलं आहे. आज आपण आजच्या काळाचा आणि प्रश्नांचा संदर्भ लक्षात घेऊन गांधीविचारांचं मोकळ्या मनानं वाचन करणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे.

‘हिंदुत्व की हिंदस्वराज’ - डॉ. यू. आर. अनंतमूर्ती

मराठी अनुवाद - नीला भागवत

लोकायत, पुणे

मूल्य - ६० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......