‘द वुमन इन द विंडो’ : ‘फिल्म न्वार’चा जन्मदाता
सदर - न-क्लासिक
चिंतामणी भिडे
  • ‘द वुमन इन द विंडो’ची पोस्टर्स
  • Sat , 23 December 2017
  • इंग्रजी सिनेमा English Movie न-क्लासिक चिंतामणी भिडे Chintamani Bhide द वुमन इन द विंडो The Woman in the Window फ्रिट्झ लँग Fritz Lang

दिग्दर्शक फ्रिट्झ लँगचा ‘एम’ हा सार्वकालिक महान जर्मन चित्रपट १९३१ साली जर्मनीत प्रदर्शित झाला, त्यावेळी तशा प्रकारच्या सिनेमासाठी ‘फिल्म न्वार’ ही स्वतंत्र ओळख किंवा ज्यॉनरचा जन्म अद्याप झाला नव्हता. संदिग्धता, स्खलनशील व्यक्तिरेखा, त्यांचं नैतिक अध:पतन आणि भल्याबुऱ्याच्या सीमारेषेवर घुटमळणारे आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांना काही अंशी संभ्रमात टाकणारे, त्यांच्या मनात प्रश्नांचं मोहळ निर्माण करणारे असे हे चित्रपट. ‘एम’ हा त्यांचा उद्गाता. पण ‘फिल्म न्वार’ ज्यॉनरला ‘एम’ने जन्म दिला असला तरी या शब्द प्रयोगाचा जन्मदाता ‘एम’ नव्हता. ‘एम’नंतर सुमारे १३ वर्षांनी अमेरिकेत प्रदर्शित झालेला लँगचाच एक चित्रपट ‘फिल्म न्वार’ या शब्दप्रयोगाला जन्म देण्यास बऱ्याच अंशी कारणीभूत ठरला.

‘द वुमन इन द विंडो’ हे त्याचं नाव!

वर उल्लेख केलेल्या विशिष्ट पद्धतीच्या चित्रपटांच्या जातकुळीला ‘फिल्म न्वार’ हे नाव देण्याचं काम केलं एका फ्रेंच नियतकालिकाने. ‘द माल्टीज फाल्कन’, ‘डबल इंडेम्निटी’, ‘लॉरा’, ‘मर्डर, माय स्वीट’ आणि ‘द वुमन इन द विंडो’ हे ४०च्या दशकाच्या पूर्वार्धात बनलेले सिनेमे १९४६ साली फ्रान्समध्ये प्रदर्शित झाले होते. या सिनेमांचं एकत्रित वर्णन निनो फ्रँक या फ्रेंच समीक्षकाने ‘फिल्म न्वार’ असं केलं. वर वर बघता हे सर्वच क्राइम थ्रिलर, सस्पेन्स या प्रकारातले. पण निव्वळ क्राइम थ्रिलरमध्ये असतं त्याप्रमाणे केवळ प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवत, त्यांना खुर्चीच्या टोकावर आणून बसवणारे चीप थ्रिल्स देणं, इतकाच मर्यादित हेतू या चित्रपटांचा नव्हता. त्यांचा अवकाश त्यापेक्षा खूप व्यापक होता. माणसाची स्खलनशीलता दाखवून निर्णायक क्षणी होणारं त्याचं अध:पतन, नियतीचा खेळ, मानवी स्वभावातली गुंतागुंत आणि मनाच्या तळातील अंधारा कोपरा शोधून काढण्याची धडपड या चित्रपटांमध्ये होती. त्यामुळेच ‘डबल इंडेम्निटी’सारखे सिनेमे केवळ थरारपट न राहता ऑल टाइम क्लासिक्सच्या यादीत गणले जातात.

‘द वुमन इन द विंडो’च्या वाट्याला मात्र हे भाग्य आलं नाही. खरं म्हणजे लँगच्या यशस्वी सिनेमांपैकी तो एक. पण लँगने अमेरिकेत सिनेमे बनवायच्या आधी जर्मनीत बनवलेले सिनेमे आशय आणि हाताळणीच्या पातळीवर अधिक उजवे होते, असा मतप्रवाह त्या काळच्या समीक्षकांमध्ये होता. त्यामुळेच ‘बियाँड द रिझनेबल डाउट’, ‘द वुमन इन द विंडो’, ‘स्कार्लेट स्ट्रीट’, ‘द बिग हीट’ यांसारख्या सिनेमांमधून काही अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करूनही समीक्षकांनी या सिनेमांना लँगच्या अन्य सिनेमांच्या तुलनेत काहीसं दुय्यम स्थान दिलं.

पण ‘फिल्म न्वार’च्या प्रवाहात मात्र ‘द वुमन इन द विंडो’ला मानाचं स्थान आहे.

प्रोफेसर रिचर्ड वॅनली हे मध्यमवयीन, लब्धप्रतिष्ठित गृहस्थ. सुटीसाठी बाहेरगावी निघालेली बायको आणि दोन मुलांना गुड बाय करून नेहमीप्रमाणे क्लबमध्ये येतात. क्लबच्या ग्लास विंडोमध्ये लावलेलं एका स्त्रीचं पोर्ट्रेट त्यांचं लक्ष वेधून घेतं. तेवढ्यात त्याचे दोन स्नेही डिस्ट्रिक्ट अॅटर्नी फ्रँक लॅलॉर आणि डॉक्टर मायकल बार्कस्टेन तिथं येतात. क्लबमध्ये निवांत वेळ घालवल्यानंतर परत जात असताना प्रोफेसर वॅनलींचे पाय पुन्हा त्या पोर्ट्रेटसमोर थबकतात. त्याच वेळी ते पोर्ट्रेट जिच्यावरून बनवलंय ती अॅलिस रीड ही तरुणी तिथं येते. वॅनलींचा विश्वास बसत नाही. दोघांमध्ये संभाषण वाढत जातं. ती त्यांना तिची आणखी काही चित्रं बघण्यासाठी घरी बोलावते. ते तिच्यासोबत तिच्या घरी जातात. थोड्याच वेळात तिथं अॅलिसचा धनिक प्रेमी क्लॉड मॅझार्ड येतो. त्याचा गैरसमज होऊन तो वॅनलीच्या अंगावर झेपावतो. दोघांच्या झटापटीत वॅनलीच्या हातून मॅझार्डचा खून होतो. मुळातल्या पापभिरू वृत्तीमुळे आधी तो पोलिसांना बोलावण्याचा विचार करतो; पण ज्या क्षणी त्याच्या लक्षात येतं की, मॅझार्ड आणि रीड यांचा काही संबंध आहे, हे कोणालाच माहिती असण्याची शक्यता नाही, त्या क्षणी तो आणि रीड हा खून दडपण्याचा निर्णय घेतात आणि वॅनली तो मृतदेह घेऊन लांब जंगलात नेऊन टाकतो.

आता कुठलाही धोका नाही, असं वाटत असतानाच काही अनपेक्षित अडचणी उभ्या राहातात आणि वॅनलीला काही अवघड निर्णय घ्यावे लागतात. बायको आणि दोन मुलांसमवेत साधं सरळ आयुष्य जगणारा एक मध्यमवयीन, सुखवस्तू, पापभिरू प्रोफेसर गुन्हेगारी आणि कटकारस्थानांच्या खोल दलदलीत रुतत जात असतानाच पुन्हा एकदा आयुष्य एक अनपेक्षित वळण घेतं.

जिच्याविषयी आसुसून आकर्षण वाटावी, अशी काहीशा गूढ व्यक्तिमत्त्वाची स्त्री एका पुरुषाचा आपलं इप्सित साध्य करण्यासाठी वापर करून घेते, ही कुठल्याही फिल्म न्वारची वन लाइन. त्यात कधी कधी, ती गूढ व्यक्तिमत्त्वाची स्त्री खरोखरच अडचणीत असते आणि हिरो तिच्या आकर्षणापायी काहीही देणंघेणं नसताना तिला मदत करायला जाऊन स्वत:च अडचणीत येतो, एवढाच काय तो बदल होतो. या वन लायनर पलिकडे न्वार सहसा जात नाही. बहुतांशी फिल्म न्वार पहिल्या प्रकारात मोडतात; ‘वुमन इन द विंडो’ दुसऱ्या प्रकारात मोडतो.

जर्मन एक्स्प्रेशनिझम आणि लोकप्रिय व्यावसायिक पैलू यांची बेमालूम सांगड घालण्याचं लँगचं कसब याही चित्रपटात दिसून येतं. एरवी माशीही न मारणारी व्यक्ती परिस्थितीच्या रेट्याखाली खुनासारखा टोकाचा गुन्हा करू शकते, इतकंच नव्हे आपला गुन्हा दडपण्यासाठी कटकारस्थानं रचू शकते, ही ‘वुमन इन द विंडो’ची मध्यवर्ती कल्पना घाबरवून सोडणारी आहे. पापभिरू माणूसही वेळप्रसंगी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, याचं दर्शन अस्वस्थ करणारं आहे.

यात लँगने आणखी एक गंमत केली आहे. खरं म्हणजे त्याविषयी विस्तारानं सांगता येणार नाही, कारण त्यामुळे रहस्यभेद होऊन पहिल्यांदा चित्रपट पाहण्यातली गंमत निघून जाईल. पण फिल्म न्वार म्हणजे त्यातल्या मुख्य पात्रांसाठी एक प्रकारचं दु:स्वप्नच असतं. काहीही ध्यानीमनी नसताना अचानक धोका, कपट, कटकारस्थानं आणि गुन्हेगारीच्या दलदलीत प्रमुख व्यक्तिरेखा फसत जाते आणि कधी एकदा हे दु:स्वप्न संपून जाईल, असं तिला होतं. नेमका याचाच वापर करत लँगने कथानकाला शेवटी अफलातून कलाटणी दिली आहे.

या शेवटाबद्दल दोन मतप्रवाहदेखील आहेत. अनेकांना हा शेवट रुचलेला नाही. काहींना ती लँगची मजबुरी वाटलेली आहे. पण मजबुरीतून लँगने असा शेवट केला, हे एकवेळ खरं मानलं तरी ते करताना त्याने न्वारची कास सोडलेली नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लँगचे सिनेमे डार्क असतात आणि बऱ्याचदा निष्कर्ष काढण्याचं काम तो प्रेक्षकांवरच सोपवतो. ‘एम’मधला पीटर लॉरेचा हॅन्स बेकर्ट हा अतिशय विकृत असा लहान मुलांचा खुनी आहे, हे माहीत असूनही लँग शेवटी त्याला असा काही तत्त्वज्ञानात्मक आधार देतो की, त्याच्या कृत्याचा निवाडा करणारे तरी कुठे भले आहेत, या प्रश्नात प्रेक्षकाला आपलंच प्रतिरूप दिसून प्रेक्षक सैरभैर होतो. झाडाला बांधलेली पापी स्त्री तिला दगड मारणाऱ्यांसाठी सरसावलेल्या लोकांना सांगते की, मला दगड जरूर मारा, पण त्याची सुरुवात अशा पुण्यवान माणसानं करावी, ज्यानं आजवर कुठलाच गुन्हा केलेला नाही, या गोष्टीची आठवण त्या वेळी येते. ‘बियाँड अ रिझनेबल डाऊट’मध्ये देखील एका बेसावध क्षणी आपल्या कृत्याची कबुली देणारा टॉम गॅरेट खरोखरंच त्याने जे केलं, त्याविषयी दोषी आहे का, याचा संदेह प्रेक्षकाच्या मनात उरतोच.

‘द वुमन इन द विंडो’च्या बाबतीतही नेमकं हेच होतं. चित्रपटाच्या सुरुवातीला क्लबमध्ये वॅनलीचं आपल्या मित्रांबरोबर प्रलोभनाला बळी पडण्यामागील धोक्यांबाबतीत होणारं संभाषण आणि पुढे आपल्या सुप्त वासनांना मूर्त रूप देण्याच्या प्रबळ इच्छेतून घडणारा घटनाक्रम यामुळे वॅनली हा सुरुवातीला अकस्मात आणि नंतर समजून उमजून गुन्हा करताना उघड उघड दिसूनही प्रेक्षकांच्या मनात मात्र त्याची खरोखरच चूक काय, याविषयीचा संदेह कायम राहतो.

वॅनलीची भूमिका करणारा एडवर्ड रॉबिनसन हा फिल्म न्वारमधला नेहमीचा चेहरा. ‘डबल इंडेम्निटी’, ‘की लार्गो’, ‘स्कार्लेट स्ट्रीट’, ‘हाऊस ऑफ स्ट्रेंजर्स’, ‘नाइट हॅज अ थाउजंड आईज’, ‘द स्ट्रेंजर’ अशा असंख्य गाजलेल्या न्वारमध्ये त्यानं ठसा उमटवला होता. दिसायला तो थेट आपल्या मध्यमवयीन अशोक कुमारसारखा. उंची साधारण, पण व्यक्तिमत्त्व अतिशय रुबाबदार आणि प्रसन्न. ‘हावडा ब्रिज’, ‘गुमराह’, ‘ज्यूल थीफ’मधला अशोक कुमार आठवा. वॅनलीच्या भूमिकेतला रॉबिनसन थेट त्याच जातकुळीतला आहे आणि त्यामुळेच त्याचं प्रेक्षकाशी नातं जुळतं. प्रेक्षक त्याच्या अडचणींशी समरस होतो.

‘पेस्ट’ या ऑनलाइन नियतकालिकानं ऑगस्ट २०१५ मध्ये ‘फिल्म न्वार’ या शब्दप्रयोगाला ७० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त १०० सर्वोत्कृष्ट न्वार चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली, त्यात ‘डबल इंडेम्निटी’, ‘आउट ऑफ द पास्ट’, ‘चायना टाऊन’, ‘सनसेट बुलेवार्ड’सारखे ऑल टाइम क्लासिक्स न्वार असताना ‘द वुमन इन द विंडो’ पहिल्या क्रमांकावर होता. कदाचित त्याविषयी मतभेद होऊ शकतील. पण ‘फिल्म न्वार’ ही सिनेमाची स्वतंत्र शैली म्हणून ओळख निर्माण करण्याचं या सिनेमाचं श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

.............................................................................................................................................

लेखक चिंतामणी भिडे मुक्त पत्रकार आहेत.

chintamani.bhide@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......