अजूनकाही
सकाळी उठल्याबरोबर पहिली बातमी वाचायला मिळाली ती बी. टी. देशमुख यांच्या निधनाची; अतिशय क्लेश झाले. ते ‘बीटी’ अशा सुटसुटीत नावानं ओळखले जात. त्या संबोधनात जिव्हाळा आणि आदरही होता. त्यांच्या निधनानं एका सालस आणि सच्छील लोकप्रतिनिधीचं पर्व संपलं असं म्हणावं लागेल.
कोण होते बीटी? एक तळमळीचे शिक्षक होते, वाचक होते, आमदार होते, वक्ते होते, विदर्भाच्या विकासाची तळमळ असणारे नेते होते आणि विदर्भाच्या विकासाचा विकासाचा अनुशेष दूर व्हावा म्हणून संसदीय आणि न्यायालयीन लढाई लढणारे योद्धे होते, पण हे सगळं जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा महत्त्वाचं आहे, बीटी हे व्यक्तिमत्त्व अतिशय सालस आणि सरळ होतं. त्यांच्या या सच्छिलपणाचा प्रभाव किती मोठा होता, याचा एक प्रसंग सांगतो.
बीटी प्रदीर्घ काळ अमरावती पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून येत. या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात एका निवडणुकीत त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. तो उमेदवार धनवान होता आणि केवळ धनवानच होता, हीच त्याची बीटी यांच्या विरोधात निवडून येण्याची पात्रता होती. निवडणुकीचा निकाल लागल्यावर ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक कुमार केतकर यांना मी फोन केला (तेव्हा ‘लोकसत्ता’च्या नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या विदर्भ आवृत्तीचा मी संपादक होतो.) आणि बीटी हरले ही बातमी दिली. बीटी निवडणुकीत पराभूत होऊ शकतात, हीच मोठी बातमी होती.
.................................................................................................................................................................

.................................................................................................................................................................
केतकर म्हणाले- ‘तू आता बीटी यांच्यावरच व्यक्तिवेध लिही. कारण हा पराभव बीटींचं शिक्षण आणि समाजकारणातलं महत्त्व कमी करू शकत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती असणारी साधेपणाची झळाळी कमी करू शकत नाही.’ बीटी यांचं मोठेपण यातच आहे की, निवडणूक हरल्यावरही त्यांच्यावर ‘लोकसत्ता’मध्ये गुणगौरवपर मजकूर आला.
बीटी एका शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले. नंतर शिक्षक झाले आणि जनतेचे प्रश्न सुटावेत या ओढीनं पुढे संसदीय राजकारणात आले. आयुष्यभर ते कुठल्याच पक्षाशी थेट संबंधित नव्हते, पण सर्वच पक्षांत त्यांच्याविषयी मोठा सहज आदरभाव होता. त्यांची नाळ मानवी संवेदनांशी घट्ट जुळलेली होती. अमरावती शहराच्या सामाजिक प्रश्नांच्या भोवती त्यांचा जीव घुटमळत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासाच्या बाबतीत विदर्भ जो मागे पडला, त्याबद्दल त्यांच्या मनात अत्यंतिक सल होती.
पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न बीटी यांनी विधान परिषदेत ज्या हिरीरीने मांडले, तितक्याच आक्रमकपणे त्यांनी विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाचा लढा लढला. बीटी आणि नितीन गडकरी या जोडीने त्यासाठी विधिमंडळ आणि न्यायालय अशा दोन्ही पातळ्यांवर अतिशय अभ्यासूपणे आवाज उठवला. अखेर या प्रश्नावर राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागला आणि विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाच्या प्रश्नात लक्ष घालावं लागलं. त्यांचा हा लढा विदर्भाच्या विकासाच्या अनुशेषाच्या लढाईत सुवर्ण अक्षरानं नोंदवावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे या लढ्याला यश आल्यानंतर श्रेयापासून दूर राहण्याची जी वृत्ती या दोघांनीही दाखवली, त्याचीही विद्यमान राजकारणी आणि पत्रकारांनी न विसरता नोंद घ्यायलाच हवी.
बीटी वृत्तीने अतिशय साधे होते. जवळजवळ सहा फुटाची उंची, शिडशिडीत बांधा, रापलेला वर्ण, पायजमा व कुर्ता किंवा सदरा आणि पायात चपला असा एकूण बीटी यांचा अवतार होता. अभ्यासू वृत्ती आणि अन्यायाविरुद्ध कणखरपणे आवाज उठवण्याची त्यांची वृत्ती होती. ते मुंबई किंवा नागपूरला कामासाठी म्हणा की, विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी रेल्वे किंवा बसनं प्रवास करत. नागपूरला आमदार निवासात राहणारे आणि एस. टी. बसनं प्रवास करणारे गणपतराव देशमुख यांच्यासारखे जे काही मोजके दोन-चार विधिमंडळ सदस्य होते, त्यात बीटी यांचा अग्रक्रमानं समावेश करावा लागेल. आमदार निवास ते विधिमंडळ हा नागपुरातला प्रवास ते एसटीच्या बसनं किंवा चक्क पायी करत. मुंबईतही आमदार निवासातून विधिमंडळात जाताना पाऊस असो की, ऊन बीटी यांनी कधी टॅक्सी केली आहे, असं दिसलं नाही. ताडताड पावलं टाकत बीटी विधिमंडळाकडे जात, सभागृहात प्रवेश करत आणि कामकाजात मोठ्या तडफेनं भाग घेत.
रेल्वे स्टेशनवर किंवा बसस्थानकावर वाहनाची प्रतीक्षा करताना ते बाकावर वाचत बसलेले अनेकदा दिसत. आपण आमदार आहोत म्हणजे कोणी विशेष आहोत, असा कोणताही डामडौल त्यांच्या वागण्यात कधीच दिसला नाही. त्यांच्या पोतडीत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही जनजीवनातील असंख्य हकीकती आणि आठवणी होत्या. त्या आठवणी कुणा धनवान कुटुंबाशी निगडित असलेल्या कधीच नव्हत्या, तर शेतीत राबणाऱ्या बळीराजाच्या आणि सामान्य माणसाच्या होत्या. बळीराजा आणि सामान्य माणूस हाच त्यांच्या आस्थेचा आणि कामाचाही कायम केंद्रबिंदू राहिला. त्यामुळे त्यांना भेटलं की, हिरव्यागार सावलीत वसलेलं एखादं गाव भेटल्यासारखं वाटायचं आणि त्या गावचेच एक रहिवासी बीटी आहेत, असं जाणवायचं.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
बीटी तब्बल अडीच दशकं विधिमंडळाच्या राजकारणात होते, पण पक्षीय राजकारणाचा शिंतोडा त्यांनी त्यांच्या अंगावर चुकूनही उडू दिला दिला नाही आणि कुणाही भ्रष्ट मंत्री नेत्याशी त्यांची कधी जवळीक घडली नाही. साधारण २००० आधीच्या राजकारणात जाणकार, समंजस अभ्यासू आणि पाय जमिनीवर घट्ट रोवलेल्या लोकप्रतिनिधींचं बहुमत होतं. त्यांची संख्या नंतर हळूहळू कमी होत गेली. विधिमंडळ आणि संसदीय राजकारणात धनवानांची चलती सुरू झाली आणि बीटी यांच्यासारखे सच्छिल राजकारणी मागे पडले. निवडणुकीच्या राजकारणात जनतेशी असणाऱ्या बांधीलकीपेक्षा पैसा महत्त्वाचा झाला. कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकलीच पाहिजे, ही ईर्ष्या निर्माण झाली आणि बीटी यांच्यासारखे राजकारणी अपवाद म्हणून उरले.
असे लोकप्रतिनिधी आता केवळ आठवणींच्या प्रदेशातच उरलेले आहे. धनाच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या विद्यमान राजकारणात बीटी यांच्यासारख्या राजकारण्यांना मुळीच आता स्थान उरलेलं नाही. त्यांची जागा विदर्भातला अन्य कोणताही नेता आता कोणत्याही प्रकारे घेऊ शकणार नाही!
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.


Post Comment