टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नितीश कुमार, गौरीशंकर बिसेन, देवेंद्र फडणवीस, सुनील गावसकर, अनिल कुंबळे, नायजेरियन मुलगा आणि सुप्रिया सुळे
  • Thu , 22 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नितीश कुमार Nitish Kumar गौरीशंकर बिसेन Gaurishankar Bisen देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis सुनील गावसकर Sunil Gavaskar अनिल कुंबळे Anil Kumble नायजेरियन मुलगा सुप्रिया सुळे Supriya Sule

१. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा विरोधी पक्षांच्या एकजुटीला मोठा धक्का समजला जातो आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा सामना करावा, अशी भूमिका नितीश यांनी आधी घेतली होती. कोविंद बिहारचे राज्यपाल असताना त्यांनी कधीही सरकारसाठी अडचणी निर्माण केल्या नाहीत. शिवाय, कुलगुरूंच्या निवडीलादेखील कधीच आक्षेप घेतला नाही, यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचं नितीश म्हणाले.

अरे वा, किती सुंदर आहेत ही कारणं राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी! राष्ट्रीय राजकारणाची समज असलेला द्रष्टा नेता म्हणतात नितीशना ते काही उगीच नाही. कोविंद यांची उमेदवारनिवड जाहीर झाल्यावर अनेकांनी, कधी नावही ऐकलं नव्हतं यांचं, म्हणजे माणूस चांगला असणार, असं म्हणतात त्यापैकीच झालं की हेही. अर्थात, दोन डगरींवर पाय ठेवण्याची कसरत करणारा माणूस बराच काळ हुशार, चतुर, चाणाक्ष वगैरे भासला, तरी डगरींचा समतोल बदलल्यावर तोंडघशी पडतो, हे नितीश यांना माहिती असेलच.

.............................................................................................................................................

२. मध्य प्रदेशाचे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात चक्क झोप काढणं पसंत केलं. छिंदवाडामधल्या योग कार्यक्रमात या कृषिमंत्र्यांनी झोपेचा ‘योग’ साधला. योगदिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिशय उत्साहात दिसले. दोन हजार विद्यार्थ्यांसोबत त्यांनी काही योगासनेही केली. मात्र अवघ्या १० मिनिटांत कृषिमंत्र्यांचा उत्साह मावळला आणि त्यांनी चक्क झोपणं पसंत केलं. आजूबाजूची मंडळी योगासनं करत असताना कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन सोफ्यावर झोपले होते.

हा बिसेन यांच्या बदनामीचा कट आहे, दुसरं काही नाही. योगासनांमुळे माणूस कसा झटकन् रिलॅक्स होतो, याचं प्रात्यक्षिकच बिसेन यांनी दाखवलं, हे योगद्वेष्ट्या भाजपविरोधकांच्या म्हणजेच देशद्रोह्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही. विचार करा, एकतर कृषिमंत्री, तेही मध्य प्रदेशासारख्या शेतकरी असंतोषाच्या होरपळीत सापडलेल्या राज्याचे, त्यांना किती टेन्शन असणार. पण, अवघ्या दहा मिनिटांच्या योगानं त्यांचं सगळं टेन्शन दूर झालं आणि निद्रासन साध्य झालं, याला कधी महत्त्व देणार आहे की नाही हा बिकाऊ मीडिया?

.............................................................................................................................................

३. नायजेरियात फेसबुकवर लाइक्स मिळवण्यासाठी एका तरुणाने एका लहान मुलाला उंच इमारतीवरून खाली फेकून देण्याची धमकी दिली. मुलाच्या बखोटीला धरून त्याने मुलाला खिडकीतून बाहेर धरलं आणि तो फोटो फेसबुक अकाऊंटवरून शेअर करून ‘या फोटोला १ हजार लाईक्स द्या, नाही तर मुलाला १५ व्या मजल्यावरून खाली फेकून देईन’ अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हा त्याचा एकट्याचा दोष नाही. लाइक म्हणजे पसंतीची दाद, शाबासकीची थाप, कौतुकाची पावती. ती मिळवण्यासाठी काहीतरी ठोस करावं लागतं, हा समजच मोडून काढला आहे आज समाजमाध्यमांनी. त्यासाठी अतिशय ओंगळ अवतारात एखादा सेल्फी काढणंही पुरेसं ठरतं आताच्या काळात. अशा स्वस्त लाइक्सची झिंग चढली की हे धंदे सुचतात. पोलिसांनी याला ३५व्या मजल्यावर उलटं पकडून तो फोटो व्हायरल करावा. लहान मुलाच्या फोटोच्या पाचपट जास्त लाइक मिळेपर्यंत त्याला खिडकीआत न घेण्याची शिक्षा फर्मावावी.

.............................................................................................................................................

४. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याशी झालेल्या वादानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरने कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कुंबळे शिस्तबद्ध आहे, हेच खेळाडूंना खटकत होतं. शिस्तपालन न करणारे खेळाडूच त्याच्यावर नाराज होते आणि त्यांना त्यांच्या पसंतीचा प्रशिक्षक हवा होता, असं सुनील म्हणाला. आज सराव नाही केला तरी चालेल; बरं वाटत नाही, तर सुट्टी घ्या आणि शॉपिंग करा, असं म्हणणारा प्रशिक्षक तुम्हाला हवा का, असा सवाल गावसकर यांनी खेळाडूंना केला. यापुढे खेळाडूंसमोर नतमस्तक तरी व्हावं लागेल किंवा अनिल कुंबळेसारखं पद तरी सोडावं लागेल, असा संदेश संभाव्य प्रशिक्षकाला यातून मिळाला आहे. ही खूपच दुःखद बाब आहे, असंही गावसकर म्हणाला.

जाऊ द्या हो गावसकर, क्रिकेटचा विद्यमान देव ज्या समितीत आहे, तीही कुंबळे यांना थांबवून अतीव उर्मट विराट कोहलीचे कान उपटू शकली नाही, यातच सगळं आलं... गंदा है पर धंदा है ये. उगाच तुमच्या काळातल्या क्रिकेटचे फंडे इथं आणू नका. तुमच्या काळापासूनच या सगळ्याची बीजं रोवली गेली आणि तुम्ही कानाडोळा करत राहिलात, हेही सगळ्यांना माहिती आहेच की. असा हंगामी उद्रेक काय कामाचा.

.............................................................................................................................................

५. राज्यात सरकारविरोधी कुणी सूर काढला की, लगेच मुख्यमंत्री त्यांना तुमची कुंडली आमच्याकडे आहे, असा धमकीवजा इशारा देतात. मुख्यमंत्र्यांना एवढीच कुंडल्या बघण्याची आवड असेल तर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ज्योतिषी बनावं, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

ताई तुमचं बरोबर आहे. पण, सध्या आपलं ग्रहमान नरम आहे. कुंडली बिघडली की, भुजांमध्ये कितीही बळ असलं तरी फटका बसायचा टळत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. कुंडली निघू नये म्हणून ‘नारायण, नारायण’चा जपही करावा लागतो काहींना. तेव्हा जरा सबूर. घड्याळ नाजुक असतं... जराशा धक्क्यानेही बंद पडू शकतं, हे विसरून कसं चालेल?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......