टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी-अमित शहा, उद्धव ठाकरे, भारतीय हॉकी टीम, सुब्रमण्यम स्वामी, झैनाब अब्बास, विराट कोहली, मिरवाईज उमर फारुख आणि गौतम गंभीर
  • Mon , 19 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या उद्धव ठाकरे Uddhav Thackeray नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah भारतीय हॉकी टीम Indian Hockey Team सुब्रमण्यम स्वामी Subramanian Swamy झैनाब अब्बास Zainab Abbas विराट कोहली Virat Kohli मिरवाईज उमर फारुख Mirwaiz Umar Farooq गौतम गंभीर Gautam Gambhir

१. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन कान टोचल्यानंतर शिवसेना नरमेल, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच सेनेनं भाजपवर जाहीर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक झालीच तर ती जिंकण्याची भाषा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली होती. शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत, आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. मात्र, आम्हाला मध्यावधीचे काय होणार यापेक्षा काश्मीरचे काय होणार? याची जास्त चिंता असल्याचे सांगून सेनेनं भाजपला खोचक टोला लगावला आहे.

शिवसेनेचं नामांतर ‘टाइमपास सेना’ असं करायला काय हरकत आहे? सत्तेत राहून सत्तेतल्या जोडीदाराला विरोध हा जो काही पायावर कुऱ्हाड मारण्याचा अद्भुत उद्योग सुरू आहे, त्यातून या पक्षाबद्दल काही मोजक्या मराठी माणसांच्या मनात उरलेलं उरलंसुरलं प्रेमही संपून जाईल. इकडे यांना महाराष्ट्रात शेजारच्या राज्यातले लोक आलेले, राहिलेले चालत नाहीत आणि इथं बसून थेट काश्मीरची चिंता. तिकडे शाखा काढा, सत्तेत जा आणि चिंता वाहा. प्रादेशिक संकुचितवाद्यांना राष्ट्रीय बाणा शोभत नाही.

……………………………………………………………………………………………

२. वर्ल्ड हॉकी लीग सेमिफायनल स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सुपडा साफ करून टाकला. पाकिस्तानच्या संघाला तब्बल ७-१ अशा मोठ्या फरकाने पराभूत करून टीम इंडियाने या स्पर्धेतली आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे.

ज्या कोणा क्रीडापत्रकाराच्या लेखणीतून ही बातमी उतरली आहे, त्याच्यावर बिचाऱ्यावर क्रिकेटमधल्या भारताच्या विजयानंतर करायची ‘सुपडा साफ’ वगैरे पाकिस्तानविषयक ‘अलंकारां’ची पखरण हॉकी सामन्यावर करायला लागली आहे. चँपियन्स ट्रॉफीची मॅच भारत जिंकला असता, तर हॉकीतला हा मोठा, दणदणीत विजयही कोपऱ्यात फेकला गेला असता. काही लोकांनी बॅटी तासून हॉकीस्टिक बनवण्याची चित्रं एकमेकांना पाठवली खरी; पण, त्या स्टिक्सनेही हे लोक दोनच दिवसांत पुन्हा क्रिकेटच खेळू लागतील. आपल्याला समाज म्हणून दुसऱ्या कशात रसही नाही आणि गतीही नाही.

……………………………………………………………………………………………

३. पाकिस्तानी टीव्हीसाठी काम करणाऱ्या झैनाब अब्बास या पत्रकार महिलेबरोबर ज्या टीमचा प्लेअर किंवा कर्णधार सेल्फी काढतो ती टीम हरते अशी एक अंधश्रद्धा सोशल मीडियावर ट्रेंड होते आहे. झैनाबने ज्या खेळाडूंसोबत फोटो काढले आहेत, ते खेळाडू शून्यावर तरी बाद झाले आहेत किंवा त्यांना मोठी खेळी करता आली नाही. रविवारच्या सामन्याआधी युवराज सिंग आणि विराट कोहलीसोबत झैनाबने सेल्फी काढला. आता हे दोन सेल्फीच टीम इंडियाच्या पराभवाचं कारण आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.

अरे देवा, म्हणजे आपल्या देशात बीसीसीआयचा क्रिकेट संघ जिंकावा म्हणून जे यज्ञयाग-होम हवन केलं गेलं, त्यातल्या सगळ्या पुण्यसंचयाला एका पाकिस्तानी तरुणीचा अपशकुन भारी पडला... म्हणजे तिचा धर्म आपल्या धर्मापेक्षा पॉवरफुल आहे की काय? ओह माय गॉड!!!

……………………………………………………………………………………………

४. गायींचा देखभाल निधी उभारण्यासाठी पेट्रोलवर एक रुपयाचा अधिभार लावण्याची कल्पना भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी ‘गौरवशाली भारतीय गाय’ या परिषदेत मांडली. १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात सैन्याच्या खर्चासाठी स्त्रियांनी हातातल्या सोन्याच्या बांगडय़ा काढून दिल्या होत्या. गायींच्या संरक्षणासाठी तर सर्वच जण मदत करतील, असंही त्यांनी सांगितलं. दूध व पुनरुत्पादनाची क्षमता संपलेल्या गायी सांभाळणं शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसतं. मात्र या गायींचं मूत्र तसंच शेणापासून उत्पादनांची निर्मिती करून तसेच इतर गायींचं दुग्धोत्पादन वाढवून शेतकऱ्याला भाकड गायीही सांभाळणं कठीण जाणार नाही, असं परिषदेतील विविध सत्रात सहभागी झालेल्या वक्त्यांनी सांगितलं.

बैलबुद्धीचा (म्हणजे सरकारी भाषेत गो-पुत्र हो!) आणखी एक आविष्कार. त्यासाठी सुब्रम्हण्यन स्वामींना चीनच्या युद्धाचा दाखला देण्यातही कसलीही भाडभीड वाटत नाही, यात आश्चर्य नाही. असली संमेलनं भरवणाऱ्या गो-पुत्रांनी दोनपाच आया ऐपतीनुसार सांभाळायला घ्याव्यात. घरी नेऊन त्यांचं शेणमूत काढावं. यातले जे शहरी गणंग मोठ्या सोसायट्यांमध्ये राहतात, त्यांनी आवारातच गोशाळा काढण्याची कल्पना मांडून पाहावी. यांच्यातले काही बिल्डरही आहेत. त्यांनी आपल्या आरामदायी, शाही निवासी प्रकल्पांमध्ये एकेका गोठ्याची व्यवस्था करावी फ्लॅटगणिक.

……………………………………………………………………………………………

५. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर दणदणीत विजय मिळवला. हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारुखने या विजयाबद्दल पाकिस्तानचे अभिनंदन केलं आहे. मिरवाईजच्या ट्विटला भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मिरवाईज सीमारेषा का ओलांडत नाही? तुला तिथं चांगले (चायनीज) फटाके मिळतील? ईद तिथं साजरी केली जाते. मी तुम्हाला सामानाची बांधाबांध करण्यात मदत करेन,’ असं प्रत्युत्तर गौतम गंभीरने केलं.

गौतमने इतक्या गंभीरपणे क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं तर? गड्या, मिरवाईज आणि त्याच्या राज्यातल्या अनेकांना सीमा ओलांडून पलीकडे जाण्याऐवजी आमचीच बहुसंख्या आहे, असं दाखवून सीमाच अलीकडे आणायची इच्छा आहे. त्यांना तो सल्ला दिलास तर ते म्हणतील, मित्रा, आमचंही तेच म्हणणं आहे. आपण चिडून अशी प्रतिक्रिया द्यावी, म्हणूनच कोणी टोचणारं वक्तव्य करतं, तेव्हा आपण त्या ट्रॅपमध्ये अडकायचं नसतं.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......