टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राबडीदेवी, तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव, मनोहर पर्रीकर, नरेंद्र मोदी, संजय राऊत आणि मोहन भागवत
  • Mon , 12 June 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राबडीदेवी Rabri Devi तेजप्रताप Tej Pratap तेजस्वी प्रताप Tejaswi Yadav नरेंद्र मोदी Narendra Modi उद्धव ठाकरे Uddhav Thackeray संजय राऊत Sanjay Raut मोहन भागवत Mohan Bhagwat

१. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी या आपल्या मंत्री असलेल्या मुलांसाठी ‘देशी’ सून शोधत आहेत. आपल्याला चित्रपट पाहायला जाणारी आणि मॉलमध्ये जाणारी सून नको. मुलांसाठी संस्कारी सून हवी असल्याची इच्छा त्यांनी रविवारी लालूप्रसाद यादव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलून दाखवली. राबडीदेवी आणि लालूप्रसाद यादव दाम्पत्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव हे बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री तर तेजप्रताप यादव हे आरोग्यमंत्री आहेत. राबडीदेवी म्हणाल्या, माझी मुलं ही खूप धार्मिक आहेत. त्यामुळे आम्हाला मुलांसाठी चांगल्या संस्काराची सून हवी आहे. घराला पुढे नेणारी, मोठ्यांचा आदर करणारी हवी. आम्ही जसे आहोत, अगदी त्याप्रमाणे आम्हाला सून हवी असे त्या म्हणाल्या.

अरे देवा, जेवणात चारा मिळणार की काय सुनांनाही? राबडीदेवींना काही कौटुंबिक मालिका पाहायला लावा. त्यातल्या तथाकथित संस्कारी सुना सासवांविरोधात काय प्रकारची कारस्थानं रचतात आणि कशी तिला जेरीला आणतात, ते पाहिल्यानंतर त्यांच्या संस्कारांच्या कल्पना बदलतील. यादवांकडची गडगंज संपत्ती पाहता त्यांच्या सुनांना घरच्या थिएटरातच नवीनतम सिनेमे पाहायला मिळतील आणि परदेशांतून खरेदी केल्यावर देशातल्या मॉलमध्ये जायची वेळच येणार नाही.

……………………………………………………………………………………………

२. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील तीन वर्षांत वापरलेली जॅकेट विकली तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, अशी बोचरी टीका करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली, तर कर्जमाफीसाठी ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा म्हणजे लबाडाघरचं जेवण असल्याचा टोला सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी लगावला. कालपर्यंत काँग्रेसला शिव्या घालत होतो, परंतु तीन वर्षांपूर्वी सत्तेवर बसलेले भयंकर चोर निघाले. त्यांच्याकडून हिशेब मागत असल्यानेच त्यांच्या जिव्हारी लागतंय, असं राऊत म्हणाले.

चोरांबरोबर वाटणीत सहभागी होणाऱ्यांनी चोरांकडे हिशोब मागावेत आणि नि:स्पृहतेचा आव आणावा, हे धड विनोदीही नाही. मोदींची जाकिटं विकली तर राज्याचं कर्ज फिटेल म्हणताय, तर शिवसेनेच्या सर्वस्तरीय नेत्यांचे कपडे झटकले तर एखाद्या जिल्ह्याचं कर्ज फिटायला काहीच हरकत नव्हती... की नोटाबंदीने पंचाईत केली?

……………………………………………………………………………………………

३. रोहिणी रडारचा फायदा सर्जिकल स्ट्राइकला झाला, सर्जिकल स्ट्राइकचा प्लॅन यशस्वी जवानांनीच केला. त्यामुळे भारतीयांसोबतच जवानांचे मनोबल वाढविणारा सर्जिकल स्ट्राइक ठरला, असे उद्गार माजी संरक्षणमंत्री, गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी काढले.

तिकडे होते, तेव्हा इकडची आठवण येत होती. मन रमत नव्हतं. इकडे आले, तर आता तिकडच्या आठवणी छळतायत. मासेमारी बंद असलेल्या काळात असं होत असावं गोयंकारांचं. बाकी शिपायाला कार्यालय सहायक म्हटल्यामुळे आणि सफाई कर्मचाऱ्याला सफाई अधिकारी म्हटल्यामुळे त्यांचं जेवढं मनोबल वाढतं, तेवढंच आधीच्या काळात ढोल न वाजवता घातल्या जाणाऱ्या रेड्सना सर्जिकल स्ट्राइक म्हटल्याने जवानांचंही वाढत असेल, यात शंका नाही.

……………………………………………………………………………………………

४. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाच भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान करण्याच्या मागणीचा शिवसेनेने पुनरुच्चार केला आहे. मोहन भागवत यांना राष्ट्रपती करून हिंदूराष्ट्र संकल्पनेवर शिक्कामोर्तब करायला हवे, अशी भूमिका सेनेने मुखपत्रातील अग्रलेखातून मांडली आहे. राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम हे रेंगाळलेले देशहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंदुत्वाचा रबर स्टॅम्प राष्ट्रपती भवनात विराजमान झाला पाहिजे. हिंदू राष्ट्रावर मोहोर उठवणारा राष्ट्रपतीच देशाला हवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेची देशहिताच्या प्रश्नांची संकल्पना मनोरंजक आहे. या असल्या प्रश्नांवर वेळ घालवून अधूनमधून, फावल्या वेळेत शेतकऱ्यांचे प्रश्न, चलनबंदीतून आलेली मंदी वगैरे किरकोळ प्रश्नांकडे लक्ष देत असल्याने सेनेचं हसू होत असतं. भाजपपुरस्कृत कोणताही राष्ट्रपती हा त्यांच्या विचारांचा ‘रबरस्टँप’च असणार आहे, तिथं भागवतच कशाला हवेत?

……………………………………………………………………………………………

५. गोमांसविक्री आणि भक्षणावरून देशात वाद निर्माण झाला असतानाच गोवंश हत्याबंदीचा प्रस्ताव काँग्रेस पक्षानेच १९२० मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात सादर केला होता, अशी माहिती देऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप प्रसंगी डॉ. भागवत म्हणाले, १९२० मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या व्यवस्थेचं काम डॉ. केशव हेडगेवार यांच्याकडे होतं. त्या अधिवेशनाला महात्मा गांधी अध्यक्ष म्हणून नागपुरात आले होते. महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दोन ठराव सादर झाले होते. त्यात स्वतंत्र भारतात गोवंश हत्याबंदीचा प्रस्तावही होता. तसंच स्वतंत्र भारताचा ठराव होता. त्यात भारत हा भांडवलशाहीचा विरोध करेल, असं नमूद केलं होतं.

आधार, जीएसटीपासून सर्जिकल स्ट्राइकपर्यंत सगळीकडे नामांतर करून काँग्रेसचेच उपक्रम पुढे नेणाऱ्या या सरकारने गोवंश हत्याबंदीही काँग्रेसकडूनच उधार घेतली आहे तर... पण, मग ते त्याच अधिवेशनात भांडवलशाहीच्या विरोधाचं काहीतरी म्हणालात, त्याचं काय झालं भागवतजी? काँग्रेसप्रमाणेच आपला पक्षही थेट भांडवल‘शहां’चा हस्तक असल्यासारखंच काम करताना दिसतो आहे.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......