पं. शरच्चंद्र आरोलकर : हे तो प्रचीतीचे बोलणे
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • पं. शरच्चंद्र आरोलकर
  • Sat , 20 May 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music केशव परांजपे Keshav Paranjpe पं. शरच्चंद्र आरोलकर Pandit Sharatchandra Arolkar

संगीतविषयक पुस्तकांत खूप विविधता आहे. मोठ्या कलाकारांची चरित्रं किंवा आत्मचरित्रं ही संगीतात अनभिज्ञ असणाऱ्या उत्सूक वाचकाला आवडेल अशी पुस्तकश्रेणी आहे. अर्थात याबाबतीतही एक प्रश्न आहेच. शास्त्रीय संगीत परंपरेतले अगदीच थोडे कलाकार सर्वसामान्यांना ठाऊक आहेत. जिथं कलाकारांची नावंसुद्धा नीट माहिती नाहीत, तिथं त्यांच्या चारित्र्याबद्दल उत्सूकता कुठून असणार? त्यांच्या चरित्रात येणारे संदर्भ कसे लागणार? तरीही ही चरित्रं वाचनीय आहेत. ती वाचून कलाकाराचा परिचय होईल, तसा संगीत परंपरेचाही परिचय होईल. आज एका किंचित चरित्र प्रकारातील लक्षणीय पुस्तकाचा परिचय करून देतो. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका नीला भागवत यांनी लिहिलेलं व संपादित केलेलं पुस्तक- ‘शरच्चंद्र आरोलकर : लेणे प्रतिभेचे’. आरोलकरबुवा हे अतिशय गुणी गायक. त्यांचं गाणं खास ठेवणीतलं. तसे ते अलीकडच्या काळातले. खूप लोकप्रिय वगैरे झाले नाहीत, पण गाण्याच्या संपर्कात असणाऱ्या दर्दी रसिकांच्या आणि कलाकारांच्या मनात आरोलकरबुवांच्या नावाचा एक सुगंधी कप्पा नक्की असतो.

एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील शास्त्रीय संगीत कलाकारांची चरित्रं हा सांस्कृतिक क्षेत्राविषयी आस्था असणाऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रेरणास्रोत आहे. पुष्कळदा हा स्रोत भावविवशता, दुराग्रह, अतिशयोक्ती आणि अगदी बुवाबाजी अशा अनिष्टांनी गढूळलेला असतो. नीला भागवत यांचं आरोलकरबुवांवरील लेखन-संपादन अशा सर्व दूषणांपासून मुक्त आणि म्हणूनच हृद्य व उदबोधक आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत या सांस्कृतिक संचिताचं कोंदण हे सरंजामशाही परंपरेचं आहे. म्हणूनच या परंपरेच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेणाऱ्या, स्पष्टपणे बोलायचं तर साम्यवादी विचारसरणीच्या लोकांच्या शास्त्रीय संगीतविषयक दृष्टिकोनाविषयी साहजिकच कुतूहल वाटतं. ही मंडळी संगीतावर आणि संगीतकारांवर मनापासून प्रेम करताना दिसतात आणि सांस्कृतिक विद्रोहासाठी त्यांनी दंडही थोपटलेले असतात. अशा कलाकार, समीक्षक आणि रसिकांचा दृष्टिकोन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत समजून घ्यायलाच नव्हे तर ते काळाबरोबर पुढे नेण्यासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. त्यांच्या दृष्टिकोनातून उतरलेलं प्रस्थापित कलाकारांचं मूल्यमापन संगीत समीक्षेची वेगळी मिती पुढे आणू शकतं.

अस्सलपणाचा संदर्भ होऊन जगणं हीदेखील एक फार मोठी कामगिरी आहे, असं म्हणून नीलाबाईंना पं. आरोलकर यांच्या चरित्राचा व्याप करावासा वाटला. स्वातंत्र्योत्तर काळात बदलत जाणाऱ्या वास्तवाच्या संदर्भात कलाकारांची आत्मनिष्ठ आणि लोकाभिमुख अशी वर्गवारी करून नीलाबाई आरोलकरबुवांना समजून घेतात आणि समजावून देतात.

‘आलेख जीवनाचा’ या प्रकरणात नीलाबाईंनी आरोलकर बुवांच्या चरित्राचे ठळक आणि महत्त्वाचे तेवढेच तपशील, तेही त्रोटकपणे नमूद केले आहेत. चरित्र म्हणून हे तपशील फारच त्रोटक असले तरी नीलाबाईंना जे विधान करायचं आहे, त्याची पुष्टी ते करतात. आरोलकरबुवांचं संगतवार, सविस्तर चरित्र हा वेगळा लेखनविषय होऊ शकेल असं मात्र जरूर वाटत राहतं. या चरित्रात घटितं नाहीत. म्हणून ते चितारणं अवघडही झालं आहे.

‘नोंदवही’ या शीर्षकाने एकोणीस पानांचा मजकूर ‘मला उमगलेले बुवांचे संगीतविचार’ अशा प्रकारचा आहे. बुवांकडे शिकताना फार काही विचारण्याची-प्रश्नोत्तरं करण्याची सोय होती, असं चित्र दिसत नाही. तेव्हा बुवांनी जे म्हटलं, सांगितलं, बुवांची जी ठाम मतं जाणवली त्याचं मनन करणं, त्यांचा अन्वय लावणं, हा उद्योग नीलाबाईंना ‘आपुलाचि वाद आपणासि’ या बाण्याने करावा लागला असणार. या संवादाचीच टिपणं-टाचणं या प्रकरणात येतात, पण ती टाचण स्वरूपात नसून निबंध स्वरूपात आहेत. बुवांनी ख्यालाला जे ‘फ्ल्युइड स्कल्पचर’ म्हटलं ते नेमकं काय, याचा उलगडा करण्याचा संगतवार प्रयत्न या केला आहे. काही बंदिशी आणि सुरावटीचे दाखले देणं या संदर्भात अपरिहार्यच होतं. सामान्य वाचकालाच काय, पण थोडंबहुत संगीत शिकलेल्या विद्यार्थ्यालाही हा भाग अवघड जाईल. पण जरी हे स्वरलेखन पूर्णत: वगळून बाजूला काढलं तरी बुवांचं म्हणणं काय होतं हे लक्षात यावं एवढी सुस्पष्टता या लेखनात आहे. ख्याल गायकीची अतिशय मौलिक तत्त्वं या प्रकरणात सूचित झाली आहेत. प्रयोगशील कलाकारांना करून दाखवण्यात रस असतो, बोलण्यात नसतो. ते बोलतात, ते उदगार असतात. गृहीत-साध्य-सिद्धान्त अशी प्राध्यापकी मांडणी करणं हा त्यांचा पिंड नसतो. त्यांच्या उदगारांचा अन्वय लावण्याचं काम टीकाकारांचं असतं. नीलाबाईंनी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे.

‘गुरूंचे गुरू- एक अशांत कलाकार’ हे प्रकरण फारच सुंदर उतरलं आहे. बुवांच्या व्यक्तिमत्त्वातले अंतर्विरोध, त्यांच्या वेदनेचे स्रोत नीलाबाईंनी फार नेमकपणाने अधोरेखित केले आहेत. बुवांची बाजू घेण्याचा प्रकार त्यात बिलकूल नाही. अकृत्रिम आत्मीयतेच्या पार्श्वभूमीवर केलेली तटस्थ कार्यकारणमीमांसा असं या लेखनाचं स्वरूप आहे आणि ते हृद्य आहे. संगीताच्या क्षेत्रात मनस्वी गुरूंचा सहवास करणं, त्यांचं शिष्यत्व निभावणं हे किती दिव्य असतं याची कल्पना या क्षेत्राबाहेरील लोकांनासुद्धा असेल!

बुवा आणि नीलाबाई या गुरुशिष्यांतला विसंवाद या नात्याच्या सशक्त होण्यातले अडसर नीलाबाईंनी स्पष्टपणे मांडले आहेत. तरीही त्यात कुठे तक्रारीचा सूर येऊ दिलेला नाही. खरं तर त्यांच्या मनातच कुठे तो तरळलेला नाही. आपल्या मर्यादा, आपल्या नात्याच्या मर्यादा म्हटल्या की, त्याला दोन्ही बाजू आल्याच यांची समंजस जाणीव आणि अंतर्यामीचा काहीसा विषाद या लेखनात कुठेतरी जाणवत राहतो. या विषादाचं कारण जिव्हाळा, आपुलकी- ती या लेखनाला विलोभनीय करून जाते.

ख्याल गायकी आणि टप्पा गायन या विषयांवरची बुवांची आकाशवाणीवरची दोन भाषणं ‘संगीतकला विहार’ या मासिकात प्रसिद्ध झाली होती. कोलकात्याच्या संगीत रीसर्च अ‍ॅकॅडमीसाठी पं. के. जी. गिंडे आणि मोहन नाडकर्णी यांनी बुवांची मुलाखत घेतली होती. बुवांचे विचार त्यांच्याच शब्दांत यातून समोर येतात. बुवांच्या नेमस्त पण नेमक्या बोलण्याचा प्रत्यय या भाषण-संभाषणातून येतो. त्याचं आकलन वाचकाला होतं, ते मात्र या पुस्तकातील आधी वाचलेल्या पासष्ट-सत्तर पानांमुळेच. बुवांच्या विचारांचा परिचय वाचकाला अगोदरच मिळालेला असल्यामुळे हे संभाषण अधिक नेमकेपणाने कळू शकतं.

यानंतर अरुण खोपकर, दिलीप चित्रे, सुरेश तळवळकर, मोहन नाडकर्णी, रामकृष्ण दास, अरविंद मुळगावकर, पं. शरद, सुमित्रा-समीर साठे आणि अमरेंद्र धनेश्वर यांचे लेख आहेत. हे सर्व लेख बुवांचं गाणं आणि त्यांना बुवा कसे दिसले-भावले हे सांगतातच, शिवाय या प्रत्येक लेखकाची ओझरती ओळखही या लेखांतून होते. रामकृष्ण दासांच्या अगदी छोट्या लेखाच्या उत्तरार्धात बुवांच्या चरित्राचा काही तपशील पुढे येतो, तो वेधक आहे. ‘ग्वाल्हेर गायकी अंतर्मुख होऊन गाणारे म्हणजे आरोलकरच’ असा निर्वाळा पं. तळवळकरांनी दिला आहे. बुवांच्या रागाचं स्वरूप आपल्याला शंभर-दीडशे वर्षं मागे घेऊन जात असे, ही तळवळकरांची टिप्पणी बुवांना जे अभिप्रेत होतं, ते रसिकांपर्यंत पोहोचत होतं, या गोष्टीची पावतीच आहे. ज्यांच्यामुळे बुवांची प्रतिभा रसिकांपर्यंत पोहोचली असं बिरुद नीलाबाईंनी सुप्रसिद्ध संगीत समीक्षक मोहन नाडकर्णी (जोशी कुटुंबीय) यांना दिलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या शब्दमर्यादेत नेमका बसणारा नाडकर्णी यांचा लेख अतिशय संपृक्त आहे. मुळगावकरांनी बुवांच्या साक्षेपी, अभ्यासू वृत्तीचा दाखला दिला आहे. त्यांचे गाते शिष्य शरद साठे आणि बुवांचे प्रशिष्य अमरेंद्र धनेश्वर यांचे अधिक विस्तृत लेख या पुस्तकासाठी मोलाचे ठरले असते.

आपल्या गुरूचे देव्हारे न माजवता वस्तुनिष्ठपणे, विश्लेषणात्मक आणि काळाचं भान ठेवून लिहिलेलं हे पुस्तक त्यातील अभिनिवेशरहित आत्मीयतेमुळे वाचनीय आणि मननीय झालं आहे.

‘शरच्चंद्र आरोलकर : लेणे प्रतिभेचे’ – लेखन-संपादन – नीला भागवत, लोकवाङमय गृह, पाने – १४३, मूल्य – २०० रुपये.

लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......