टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राज ठाकरे, संजीव जयस्वाल, कीर्ती आझाद, शरद पवार आणि रोपटी खाणारी म्हैस
  • Sat , 13 May 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya राज ठाकरे Raj thackeray संजीव जयस्वाल Sanjeev Jaiswal कीर्ती आझाद Kirti Azad शरद पवार Sharad Pawar म्हैस Buffalo

१. तूरखरेदीवरून शेतकऱ्यांविषयी असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. शेतकऱ्यांना मानवाकडून अपेक्षा असून भाजपच्या दानवाकडून त्यांना अपेक्षा नाही, अशा शेलक्या शब्दात राज ठाकरेंनी रावसाहेब दानवेंचा समाचार घेतला आहे.

टेररिझम हवा की टुरिझम, आयटी आणि आयटी यांचा समन्वयच देशाला आघाडीवर नेईल, अशा कोणत्याही गंभीर प्रश्नावर फुटकळ कोट्या करण्याचा विद्यमान पंतप्रधानांचा छंद पाहता भारताचे पहिले मराठी पंतप्रधान बनण्याची पात्रता राज ठाकरे यांच्यात आहे, असं म्हणायला हरकत नाही.

..........................................................................................

२. ठाणे महापालिकेचे उपायुक्त, कवी संदीप माळवींना फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गावदेवी परिसरातील फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू केली. कारवाईच्या दरम्यान त्यांनी एकदम दबंग स्टाइलमध्ये रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केली. ठाणे रेल्वे स्टेशनचा परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त करण्याचा निर्धारही महापालिकेने केला आहे. ज्या दुकानात माळवी यांना मारहाण करण्यात आली त्या एकविरा पोळीभाजी केंद्रासह आजूबाजूच्या सात दुकानांना पालिकेने सील ठोकले असून त्यांच्या शेड पाडण्यात आल्या आहेत. स्टेशन परिसरात रस्ते अडवून थांबलेले रिक्षाचालक, रस्त्यावर अतिक्रमण करणारे गाळेधारक आणि काही खासगी वाहनचालकांना आयुक्त आणि त्यांच्या अंगरक्षकांनी मारहाण केली. त्यामुळे स्टेशन परिसरातील वातावरण प्रचंड तापले होते.

वरवर पाहता ही एकदम फिल्मी कौतुकास्पद बातमी वाटते. जरा विचार करा, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने अशाच प्रकारचा आक्षेप घेतला असता आणि त्याला फेरीवाल्यांनी मारहाण केली असती, तर त्याची प्रतिक्रिया म्हणून साक्षात आयुक्त अजय देवगण बनून बाहेर पडले असते का? स्टेशन परिसराला वेढा घातलेल्या फेरीवाल्यांचा हप्ता कोणाकोणाला जातो? स्टेशन परिसर १०० टक्के फेरीवालामुक्त होईल, यावर एका तरी ठाणेकराचा विश्वास बसेल का? आणि तो का बसेल?

..........................................................................................

३. भारतात झाडांची पानं खाल्ली तर म्हशीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. उत्तर प्रदेशमध्ये चक्क एका म्हशीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या म्हशीने चारा समजून रोपटी खाल्ली, हा तिचा गुन्हा असून पोलीस फक्त गुन्हा दाखल करण्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी त्या म्हशीला चक्क अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील खिरी जिल्ह्यात बलदेव कॉलेज परिसरात वनविभागाने लावलेली रोपटी एका म्हशीने फस्त करून टाकली.

ज्या देशात गाय ही माता असते आणि उंदीर दारू पिऊन लास होतात, तिथे म्हशीवर गुन्हा दाखल होण्यात काय अडचण आहे. आता हे पोलिस बैल (खरेखुरे, शिंगंवाले, उगाच गैरसमज नकोत) होते का, असा प्रश्न कोणाला पडला असेल, तर त्यातही गैर काहीच नाही.

..........................................................................................

४. भ्रष्टाचाराबाबत भाजपची भूमिका ही नेहमीच दुटप्पी राहिली असल्याची टीका पक्षाचे माजी खासदार कीर्ती आझाद यांनी केली आहे. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा विषय येतो, तेव्हा पक्ष सोयीस्कर मौन पाळतो, असं ते म्हणाले. मी जेव्हा दिल्ली क्रिकेट असोसिएशनचा (डीडीसीए) ४०० कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आणला, तेव्हा त्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा सहभाग होता. मात्र, पक्षाने जेटलींचा बचावच केला नाही, तर मला पक्षातून निलंबित केले. आता तोच भाजप पक्ष भ्रष्टाचारांच्या आरोपांवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यांना केजरीवालांचा राजीनामा मागण्याचा हक्क नाही, असं आझाद म्हणाले.

आझाद भाऊ, सध्याचा काळ वेगळा आहे. ज्या लोकांना २००० रुपयांच्या नोटेत अत्याधुनिक चिप बसवलेली असते आणि तिच्या साह्याने काळा पैसा नष्ट केला जाणार आहे, हे तंतोतंत पटलं होतं, त्यांना ईव्हीएममध्ये फेरफार केले जाऊ शकतात, यावर विश्वास बसणं कठीण जातं. अरविंद केजरीवालांनी लाल दिव्याचा त्याग केला की, मोठी नौटंकी ठरते आणि तीच आयडिया ढापून केंद्राने प्रसृत केली की, पंतप्रधान व्हीआयपी कल्चरचे कर्दनकाळ ठरतात... गावोगावचे वाल्या जिथे वाल्मिकी बनतात, अशा थोर पक्षाचा साक्षात अध्यक्षापासून जपलेला वारसा नाकारण्याची बुद्धी तुम्हाला कशी झाली आझाद भाऊ?

..........................................................................................

५. गेली १५ वर्षे आपण सत्तेत होतो. मात्र सरकार जाऊन अडीच वर्षे झाली तरी आपण सत्तेत असल्यासारखेच वागत आहोत. या मानसिकतेतून आपल्याला आता बाहेर यावं लागेल. लोकांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या.

पवारांनी बहुधा त्यांच्याही नकळत १५ वर्षांची सत्ता कशी निघून गेली आणि वारंवार नादानी दाखवणाऱ्या, शेतकऱ्याला डिवचणाऱ्या, त्याचा अपमान करणाऱ्या भाजपसारख्या शहरी तोंडवळ्याच्या आणि व्यापारी वृत्तीच्या पक्षाला मतदार तरीही का निवडून देतायत, याचंही विश्लेषण करून टाकलं. जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढायचं ते फक्त विरोधी पक्षात असताना? सत्तेत असताना ‘सत्तेत असल्याची’ गुर्मी दाखवायची, यानेच सत्ता जाते, हे तेही शिकले नाहीत आणि विद्यमान भाजपवालेही शिकायला तयार नाहीत. जनता गुर्मीलाच मत देते, असा त्यांचा होरा जनतेनेच खरा ठरवला असावा.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......