टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, नुरुर रेहमान बरकती, नितीन पटेल, उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ
  • Wed , 10 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi नुरुर रेहमान बरकती Noor Rehman Barkati नितीन पटेल Nitin Patel उद्धव ठाकरे Uddhav Thackeray योगी आदित्यनाथ Yogi Adityanath

१. तिहेरी तलाकवरून राजकारण करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम नेत्यांना केले आहे. मुस्लिम धर्मातील आघाडीच्या संघटनांनी तिहेरी तलाकसारख्या प्रथेविरोधात पुढे यावे आणि या कायद्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही मोदींनी म्हटले आहे. लोकशाहीमध्ये सुसंवाद आणि मैत्री ही बलस्थानं असतात. केंद्र सरकारला नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये भेदभाव करता येत नाही. विविधतेतही एकता हेच भारताचे वैशिष्ट्य असल्याचे मोदींनी सांगितले.

आता अशीच एक बैठक परिवारातल्या संघटनांचीही घ्यायला हरकत नाही. त्यांनाही गोहत्या, राममंदिर, कत्तलखाने, लव्ह-जिहाद वगैरे गोष्टींवर आक्रमक राजकारण करण्याची सवय लागली आहे. देशातली विविधतेची संस्कृती समजून घेण्याची त्यांनाही तेवढीच गरज आहे. त्यामुळे, पंतप्रधानांनी स्वधर्मीय स्वपक्षीयांनाही या मार्गदर्शनाचा लाभ द्यावा.

...............................................................................................................

२. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणाऱ्या मुस्लिमांची समाजातून हकालपट्टी करून त्यांना चोप देऊ, अशी धमकी टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम मौलाना नुरुर रेहमान बरकती यांनी दिली आहे. कोलकातामधील पत्रकार परिषदेत बरकती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. संघ आणि भाजपमध्ये जाणाऱ्या मुस्लिमांना आम्ही शिक्षा देऊ. चांगला चोप दिल्यावर त्यांना इस्लाम धर्मातून काढून टाकू अशी धमकीच त्यांनी दिली.

तर बरकतीबाबांच्या या हरकतीने देशभरातील मुस्लिम लगेच भाजपपासून फारकतीला सज्ज होतील, अशी त्यांची समजूत आहे काय? आपण कोणत्या काळात राहतो, हे यांच्या लक्षातच येत नसेल का? भाजप मुस्लिमविरोधी आहे, अशी त्यांची खात्री असेल, तर त्यांनी आपल्या धर्मबांधवांचं प्रबोधन करावं. हकालपट्टी आणि चोप देण्याची भाषा कशाला? मग तुमच्यात आणि लव्ह-जिहाद म्हणून कोकलणाऱ्यांमध्ये फरक काय?

...............................................................................................................

३. पावसाळ्याला सुरुवात झाली की मुंबईत तुंबणाऱ्या पाण्यामुळे नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर येतो. नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

करेक्ट. त्यामुळे यापुढे दरवर्षी नालेसफाईचं काम सुरू झालं की, गेल्या वर्षीच्या नालेसफाईतून काय साधलं हे विचारायचं नाही. ही एक कायम चालणारी प्रक्रिया आहे, अशी मुंबईची तुंबई झाली की, प्रत्येक वेळी स्वत:ची समजूत काढायची. उद्धवसाहेब, आता लगेहाथ रस्त्यांना खड्डे पडणं आणि ते सतत बुजवले जाणं, हीसुद्धा कशी कायमस्वरूपी प्रक्रिया आहे, तेही सांगून टाका. म्हणजे त्यावरून बोंबा मारणाऱ्यांची तोंडं बंद होतील. जगभरात फक्त आपल्याकडेच या प्रक्रिया मानवजातीच्या अंतापर्यंत चालणार आहेत, याची जाणीव दळभद्री टीकाकारांना होणं आवश्यक आहे.

...............................................................................................................

४. दारूबंदी असलेल्या गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मुलाने मद्यपान करून अहमदाबाद विमानतळावर गोंधळ घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. पटेल यांचा मुलगा जयमान त्याच्या कुटुंबासह सुट्टीसाठी ग्रीसला निघाला होता. सोमवारी पहाटे पत्नी आणि मुलीसह तो अहमदाबाद विमानतळावर आला, त्यावेळी तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला धड उभेही राहता येत नव्हते. त्याने व्हीलचेअरवर बसून इमिग्रेशन आणि अन्य तपासण्या पूर्ण केल्या. जयमानने अतिमद्यपान केले असल्याने त्याला कतार एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चढण्यापासून रोखले. त्यामुळे संतापलेल्या जयमानने एअरवेजच्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद घातला. दरम्यान नितीन पटेल यांनी गांधीनगरमध्ये बोलताना मुलाने मद्यपान केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हा आपल्याला बदनाम करण्याचा कट आहे. मुलाची तब्येत बरी नव्हती अशी सारवासारव त्यांनी केली.

शंभर टक्के षड्यंत्र हो! काही शंकाच नाही. हे आरोप खरे असायला नितीन पटेल किंवा त्यांचा मुलगा हे काय आम आदमी पार्टीचे सदस्य आहेत का? जयमानने बहुदा एखाद्या भावनगरी सोडावाल्याच्या दुकानातून बीअर, व्होडका किंवा व्हिस्की फ्लेवरचा भरपूर सोडा प्यायला असणार आणि गॅसेसमुळे तो अस्वस्थ झाला असणार. आता कडक दारूबंदी असलेल्या या शुचिर्भूत राज्यात या अपेयपानी फ्लेवरचे सोडे इतके लोकप्रिय कसे, हे मात्र विचारू नका.

...............................................................................................................

५. बाबर, अकबरसारखे मुघल सत्ताधीश घुसखोर होते, हे एकदा मान्य केल्यावर देशातील सर्व समस्या सुटण्यास सुरुवात होईल, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ‘बाबर, अकबर हे मुघल सम्राट फक्त घुसखोर होते आणि त्यांचा भारताशी कोणताही संबंध नव्हता,’ असे आदित्यनाथ यांनी म्हटले. जो समाज आपल्या इतिहासाचे संवर्धन करू शकत नाही, तो आपल्या भूगोलाचे संरक्षण करू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरू गोविंद सिंग हे खरे हिरो आहेत. या थोर व्यक्तींचा गौरव व्हायला हवा. ‘लोकांनी खऱ्या इतिहासाचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेतल्यास आयएसआय, आयसिससारख्या संघटनांची भीती वाटणार नाही,’ असे आदित्यनाथ पुढे म्हणाले.

चला, यापुढे भीती कोणत्या संघटनांची बाळगायची आहे, हे आदित्यनाथ यांनी स्पष्ट करून टाकलं. शिवाय, कोणत्या दुकानातल्या पुड्यांमधला इतिहास ‘खरा’ मानायचा, हेही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. आता प्रत्येक राज्याने आपापल्या महापुरुषांची मुळं शोधून कोण कोणत्या परराज्यातून आलेल्या वंशाचा आहे, याचा शोध घ्यावा. म्हणजे राज्यपातळीवर, गल्ली पातळीवर, घर पातळीवरचे ‘खरे हीरो’ शोधता येतील.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......