टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, नुरुर रेहमान बरकती, नितीन पटेल, उद्धव ठाकरे आणि योगी आदित्यनाथ
  • Wed , 10 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi नुरुर रेहमान बरकती Noor Rehman Barkati नितीन पटेल Nitin Patel उद्धव ठाकरे Uddhav Thackeray योगी आदित्यनाथ Yogi Adityanath

१. तिहेरी तलाकवरून राजकारण करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम नेत्यांना केले आहे. मुस्लिम धर्मातील आघाडीच्या संघटनांनी तिहेरी तलाकसारख्या प्रथेविरोधात पुढे यावे आणि या कायद्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही मोदींनी म्हटले आहे. लोकशाहीमध्ये सुसंवाद आणि मैत्री ही बलस्थानं असतात. केंद्र सरकारला नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये भेदभाव करता येत नाही. विविधतेतही एकता हेच भारताचे वैशिष्ट्य असल्याचे मोदींनी सांगितले.

आता अशीच एक बैठक परिवारातल्या संघटनांचीही घ्यायला हरकत नाही. त्यांनाही गोहत्या, राममंदिर, कत्तलखाने, लव्ह-जिहाद वगैरे गोष्टींवर आक्रमक राजकारण करण्याची सवय लागली आहे. देशातली विविधतेची संस्कृती समजून घेण्याची त्यांनाही तेवढीच गरज आहे. त्यामुळे, पंतप्रधानांनी स्वधर्मीय स्वपक्षीयांनाही या मार्गदर्शनाचा लाभ द्यावा.

...............................................................................................................

२. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणाऱ्या मुस्लिमांची समाजातून हकालपट्टी करून त्यांना चोप देऊ, अशी धमकी टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम मौलाना नुरुर रेहमान बरकती यांनी दिली आहे. कोलकातामधील पत्रकार परिषदेत बरकती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. संघ आणि भाजपमध्ये जाणाऱ्या मुस्लिमांना आम्ही शिक्षा देऊ. चांगला चोप दिल्यावर त्यांना इस्लाम धर्मातून काढून टाकू अशी धमकीच त्यांनी दिली.

तर बरकतीबाबांच्या या हरकतीने देशभरातील मुस्लिम लगेच भाजपपासून फारकतीला सज्ज होतील, अशी त्यांची समजूत आहे काय? आपण कोणत्या काळात राहतो, हे यांच्या लक्षातच येत नसेल का? भाजप मुस्लिमविरोधी आहे, अशी त्यांची खात्री असेल, तर त्यांनी आपल्या धर्मबांधवांचं प्रबोधन करावं. हकालपट्टी आणि चोप देण्याची भाषा कशाला? मग तुमच्यात आणि लव्ह-जिहाद म्हणून कोकलणाऱ्यांमध्ये फरक काय?

...............................................................................................................

३. पावसाळ्याला सुरुवात झाली की मुंबईत तुंबणाऱ्या पाण्यामुळे नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर येतो. नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

करेक्ट. त्यामुळे यापुढे दरवर्षी नालेसफाईचं काम सुरू झालं की, गेल्या वर्षीच्या नालेसफाईतून काय साधलं हे विचारायचं नाही. ही एक कायम चालणारी प्रक्रिया आहे, अशी मुंबईची तुंबई झाली की, प्रत्येक वेळी स्वत:ची समजूत काढायची. उद्धवसाहेब, आता लगेहाथ रस्त्यांना खड्डे पडणं आणि ते सतत बुजवले जाणं, हीसुद्धा कशी कायमस्वरूपी प्रक्रिया आहे, तेही सांगून टाका. म्हणजे त्यावरून बोंबा मारणाऱ्यांची तोंडं बंद होतील. जगभरात फक्त आपल्याकडेच या प्रक्रिया मानवजातीच्या अंतापर्यंत चालणार आहेत, याची जाणीव दळभद्री टीकाकारांना होणं आवश्यक आहे.

...............................................................................................................

४. दारूबंदी असलेल्या गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मुलाने मद्यपान करून अहमदाबाद विमानतळावर गोंधळ घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. पटेल यांचा मुलगा जयमान त्याच्या कुटुंबासह सुट्टीसाठी ग्रीसला निघाला होता. सोमवारी पहाटे पत्नी आणि मुलीसह तो अहमदाबाद विमानतळावर आला, त्यावेळी तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला धड उभेही राहता येत नव्हते. त्याने व्हीलचेअरवर बसून इमिग्रेशन आणि अन्य तपासण्या पूर्ण केल्या. जयमानने अतिमद्यपान केले असल्याने त्याला कतार एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चढण्यापासून रोखले. त्यामुळे संतापलेल्या जयमानने एअरवेजच्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद घातला. दरम्यान नितीन पटेल यांनी गांधीनगरमध्ये बोलताना मुलाने मद्यपान केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हा आपल्याला बदनाम करण्याचा कट आहे. मुलाची तब्येत बरी नव्हती अशी सारवासारव त्यांनी केली.

शंभर टक्के षड्यंत्र हो! काही शंकाच नाही. हे आरोप खरे असायला नितीन पटेल किंवा त्यांचा मुलगा हे काय आम आदमी पार्टीचे सदस्य आहेत का? जयमानने बहुदा एखाद्या भावनगरी सोडावाल्याच्या दुकानातून बीअर, व्होडका किंवा व्हिस्की फ्लेवरचा भरपूर सोडा प्यायला असणार आणि गॅसेसमुळे तो अस्वस्थ झाला असणार. आता कडक दारूबंदी असलेल्या या शुचिर्भूत राज्यात या अपेयपानी फ्लेवरचे सोडे इतके लोकप्रिय कसे, हे मात्र विचारू नका.

...............................................................................................................

५. बाबर, अकबरसारखे मुघल सत्ताधीश घुसखोर होते, हे एकदा मान्य केल्यावर देशातील सर्व समस्या सुटण्यास सुरुवात होईल, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ‘बाबर, अकबर हे मुघल सम्राट फक्त घुसखोर होते आणि त्यांचा भारताशी कोणताही संबंध नव्हता,’ असे आदित्यनाथ यांनी म्हटले. जो समाज आपल्या इतिहासाचे संवर्धन करू शकत नाही, तो आपल्या भूगोलाचे संरक्षण करू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरू गोविंद सिंग हे खरे हिरो आहेत. या थोर व्यक्तींचा गौरव व्हायला हवा. ‘लोकांनी खऱ्या इतिहासाचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेतल्यास आयएसआय, आयसिससारख्या संघटनांची भीती वाटणार नाही,’ असे आदित्यनाथ पुढे म्हणाले.

चला, यापुढे भीती कोणत्या संघटनांची बाळगायची आहे, हे आदित्यनाथ यांनी स्पष्ट करून टाकलं. शिवाय, कोणत्या दुकानातल्या पुड्यांमधला इतिहास ‘खरा’ मानायचा, हेही त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. आता प्रत्येक राज्याने आपापल्या महापुरुषांची मुळं शोधून कोण कोणत्या परराज्यातून आलेल्या वंशाचा आहे, याचा शोध घ्यावा. म्हणजे राज्यपातळीवर, गल्ली पातळीवर, घर पातळीवरचे ‘खरे हीरो’ शोधता येतील.

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......