टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • योगी आदित्यनाथ, रामदास आठवले, प्रियंका रावत, सुनील मित्तल आणि लव-जिहाद
  • Mon , 01 May 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या योगी आदित्यनाथ Yogi Adityanath रामदास आठवले Ramdas Athawale प्रियंका रावत Priyanka Rawat सुनील मित्तल Sunil Mittal लव-जिहाद Love Jihad

१. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ गोरखपूरमध्ये आरएसएस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय बैठकीत म्हणाले, फक्त ‘गोमाता की जय’ म्हणून गोमातेचं संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने स्वत:हून गोमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यावरच गोमातेला वाचवण्यात यश येईल. त्याच वेळी, अनेक स्वयंघोषित गोरक्षकांच्या झुंडीच्या झुंडी देशामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यारस्त्यांवर दादागिरी करत आहेत. या स्वयंघोषित गोरक्षकांनी गोरक्षणाच्या नावाखाली धुडगूस घालू नये, असा इशारा त्यांनी वेगळ्या ठिकाणी दिला.

थोडं थांबून, विचार करून, दीर्घ श्वास वगैरे घेऊन नंतरच काय ते पक्कं बोललं तर बरं होईल आदित्यनाथजी! की तुम्ही आतापासूनच ‘छोटे मोदी’ बनायला सुरुवात केली आहे? गावोगावचे गो-गुंड हे त्यांच्या मते ‘गोमातेच्या रक्षणासाठी व्यक्तिगत पातळीवर अतिशय प्रामाणिक प्रयत्न’च करत असतात. त्यासाठी दोन-पाच परधर्मीय कापावे लागले, तर तेही धर्मकृत्यच वाटतं त्यांना. त्यांना जरब कशी बसवणार तुम्ही?

............................................................................................

२. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा मागील महिन्याभरापासून राजकीय वर्तुळात रंगली असताना राणे यांनी भाजपमध्ये जावं, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकताच दिला. ‘नारायण राणे भाजप गेल्यास त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे, हा माझा त्यांना मित्रत्त्वाचा सल्ला आहे,’ असं रामदास आठवलेंनी म्हटलं. ‘राणे यांनी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केल्यास त्यांना पाहिजे ते मिळेल,’ असं सूचक विधानदेखील आठवले यांनी केलं.

ते जायला तयार नव्हते तरी मी त्यांना पाठवले

त्यांचे हित मी माझ्या आर्जवात साठवले

त्यांच्या विरोधातले प्रचार मी जागीच गोठवले

कारण मी त्यांचा खरा हितचिंतक रामदास आठवले

............................................................................................

३. अमेरिकेच्या अन्याय्य ‘एच-१बी’ व्हिसा धोरणाविरोधात भारताने कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. यासाठी भारतानेही फेसबुक, गुगल आणि व्हॉट्सअॅपसारख्या कंपन्यांवर का बंदी घालू नये, असा प्रश्न भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी उपस्थित केला आहे. अमेरिकेच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करणं आवश्यक आहे. भारतात विदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात. त्यामुळे भारताच्या आयटी व्यावसायिकांसाठी व्हिसाधोरण कडक करणं योग्य नाही. ज्या ठिकाणी कामगार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती प्राप्त करून देतात, तिथं भारतीय कंपन्यांना एक निश्चित पगार देण्यासाठी सक्ती केली जाते. हे अतिशय चुकीचं धोरण आहे, असं त्यांनी म्हटलं.

मित्तल म्हणतायत त्यात तथ्य आहेच. मात्र, ट्रम्प यांना धडा शिकवण्यासाठी ट्रम्प बनण्याची गरज नाही. आपण कितीही देशप्रेमानं फुगलो, तरी बेडकीचा बैल होऊ शकत नाही. अमेरिकेतल्या उद्योगांचे भारतातले हितसंबंध सांभाळण्यासाठी त्या कंपन्या सक्षम आहेत. त्या ही ट्रम्पबाजी धुडकावून लावल्याशिवाय राहणार नाहीत. ते त्यांच्या संस्कृतीला मानवणारच नाही. लगेच आपल्या पर्यायी कंपन्यांची घोडी दामटवण्याची गरज नाही. त्यांचा या कंपन्यांएवढा वकूबही नाही आणि पोहोचही नाही.

............................................................................................

४. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील खासदार प्रियंका रावत यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची चामडी सोलून काढण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी भर पत्रकार परिषदेतही याच धमकीचा पुनरुच्चार केला. पोलीस अधिकाऱ्यांनी आतापर्यंत बरीच ‘मलई’ (पैसे) खाल्ली आहे. आता भाजपचं सरकार आहे. आता या लोकांनी कामं केली नाहीत तर ‘मलई’सह त्यांची चामडीही सोलून काढेन, असं रावत म्हणाल्या. जे काम करतील तेच या जिल्ह्यात राहतील. आम्ही सगळ्यांचा रेकॉर्ड तपासणार आहोत. यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. रावत यांनी पोलीस अधिकारी सिंह यांना रामनगर परिसरातील हत्या प्रकरणाच्या संदर्भात फोन केला होता. मी पोलीस अधिकारी आहे. माझं काम मला माहीत आहे, असं उत्तर त्यांनी दिल्याचा आणि ते उद्धटपणाचे असल्याचा रावत यांचा दावा आहे.

रावतबाईंचा उद्धटपणाचा अनुभव पाहता त्यांना पोलिस अधिकाऱ्याचं उत्तर उर्मट वाटणं स्वाभाविक आहे. भारतीय जनता पक्षाचे सगळेच लोकप्रतिनिधी शुचिर्भूत असल्याने जमिनीच्या दोन बोटं वरूनच चालतात आणि नैतिकतेचं आभाळ त्यांना दोन बोटंच उरलेलं असतं. फावल्या वेळात या ताईंना ‘सिंघम’ सिनेमा दाखवला पाहिजे आणि त्यातून अर्थबोध न झाल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गजाआड करून शिकवणी घेतली पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, सर्वज्ञ आणि राज्याचे मालक नव्हेत, हे यांना कळेल तो सुदिन.

............................................................................................

५. ‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी एका शाळेमध्ये मुले आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गांत बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेरठमधील रिषभ अॅकॅडमी या शाळेमध्ये असा अजब नियम घालण्यात आला आहे. या शाळेच्या सचिवांच्या म्हणण्यानुसार ‘मुस्लिम मुलं हिंदू नावं घेतात आणि हिंदू मुलींना ‘नादी लावतात’ आणि हा ‘लव्ह जिहाद’ टाळण्यासाठी शाळेनंच मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या वर्गात बसवलं आहे. या शाळेनं मुलांना दाढी ठेवायलाही बंदी घातली आहे. शाळेतल्या सगळ्या मुलांना ‘योगी कट’ करून घ्यायला सांगितलं गेलं आहे. योगी कट म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हेअरस्टाईल. ही शाळा जैन व्यवस्थापनाची असल्यामुळे आम्ही हा नियम लागू केल्याचं शाळेनं म्हटलं आहे. मुलांच्या डब्यांची तपासणी केली जाईल, असंही शाळेनं म्हटलं आहे.

आता इतकं सगळं करताच आहात तर लगेहाथ भगवी छाटी आणि कफनी हा गणवेषही जाहीर करून टाका आणि सगळ्या मुलांना अभ्यासाऐवजी धर्मदीक्षाच द्यायला सुरुवात करा. म्हणजे शहाणी माणसं मुलांना या शाळेत धाडणार नाहीत. न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी और ना ही होगा ‘लव्ह जिहाद’. शाळेची जागा बरी असेल तर तिथं गोशाळाही काढायला हरकत नाही... फक्त नाव बदलून आलेल्या बैलांपासून हिंदू गायींचं संरक्षण करायला लागेल थोडंसं.

............................................................................................

editor@aksharnama.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......