‘रुळानुबंध’ : म्हटलं तर हे एका ‘लोकोपायलट’चं आत्मकथन आहे, पण त्याच वेळी आठवणींच्या प्रदेशात केलेली स्वैर मुशाफिरीदेखील आहे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मयुरेश गद्रे
  • ‘रुळानुबंध’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 27 October 2023
  • ग्रंथनामा शिफारस रुळानुबंध गणेश मनोहर कुलकर्णी रेल्वे Railways लोकोपायलट Loco Pilot मेल Mail Train एक्सप्रेस Express Train

अगदी लहानपणापासून ‘मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया’, हे गाणं आपण ऐकलेलं असतं. मामाचं गाव, तिथल्या गमतीजमती, धमाल लक्षात असते. या गाण्यात भेटणारी झुकझुक गाडी आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भागही झालेली असते. पण आपल्यासारख्या हजारो लोकांचा जीव खऱ्या अर्थानं ज्याच्या हातात असतो, तो या झुकझुक अगीनगाडीचा ड्रायव्हर मात्र कायम दुर्लक्षितच राहतो.

रेल्वेचा एखादा अपघात किंवा मुंबईत लोकलच्या मोटरमनचं क्वचित होणारं आंदोलन, अशा घटना वगळता एरवी हा इसम आपल्या खिजगणतीतही नसतो. या माणसालाही कुटुंब असतं, स्वतःच्या आवडीनिवडी, छंद असतात, आपल्यासारख्याच विवंचनादेखील असू शकतात, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. कदाचित रेल्वेच्या अजस्त्र यंत्रणेतला एक सजीव, पण यांत्रिक घटक इतपतच स्थान त्याला दिलं जातं.

आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे नुकतंच प्रकाशित झालेलं ‘रुळानुबंध’ हे पुस्तक. माझा मित्र आणि ‘लोकोपायलट’ (आपल्या भाषेत ‘मेल-एक्सप्रेस गाड्यांचा ड्रायव्हर’) गणेश मनोहर कुलकर्णीचं हे अदभुत पुस्तक. गेली तेहतीस वर्षं तो रेल्वेत नोकरी करतोय. राजधानी, फ्लाईंग राणी, फ्रँटीएर मेल ही लांब पल्ल्याच्या गाड्यांची नावं आपण ऐकलेली असतात, कधीमधी त्यातून प्रवास केलेला असतो, पण गणेशसाठी या गाड्या हेच रोजचं जगणं आहे. एरवी डोंबिवलीत तो चारचाकीच काय, दुचाकी गाडीसुद्धा चालवत नाही. (कारण गाडी चालवायची म्हणजे आम्हाला पुढचा दोन किलोमीटरचा पट्टा क्लिअर असावा लागतो, असं त्याच म्हणणं असतं, अर्थात गमतीनं.) पण एकदा का तो रेल्वे इंजिनात चढला की, मग त्याला अर्जुनाला फक्त ‘पोपटाचा डोळा’ दिसावा, तसा केवळ आणि केवळ नजरेपल्याड, क्षितिजाही पलीकडे पसरलेला रेल्वे ट्रॅक खुणावत राहतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लोकोपायलटचं हे जगणं विलक्षण आणि खूपच वेगळं आहे. बऱ्याचदा आपण रेल्वेत संडास-बेसिन स्वच्छ नाहीत, नळांना पुरेशा दाबानं पाणी नाही, म्हणून कुरकुरत, तक्रारी करत असतो. पण सलग आठ-दहा तास ड्युटी करणाऱ्या ड्रायव्हरसाठी इंजिनमध्ये या मूलभूत सुविधादेखील नसतात, हे आपल्या लक्षात येत नाही. किंबहुना ते आपल्याला माहीतसुद्धा नसतं. मधल्या स्टेशनांवर गाडी थांबते, तेव्हाही नैसर्गिक विधी करण्याएवढाही वेळ त्यांना मिळत नाही. आपण गाडीतून प्रवास करताना दिवसभर काहीबाही चरत राहतो, पण या मंडळींना साधा चहासुद्धा प्यायला मिळत नाही. अनेकदा सोबत आणलेला डबासुद्धा कसाबसा, घिसाडघाईत खावा लागतो.

हे सगळं ‘रुळानुबंध’मध्ये वाचताना, मनाच्या तळाशी एक अपराध-भावना दाटून येते. आपण कुटुंबकबिल्यासहित प्रवास करताना या ड्रायव्हर माणसाचं विश्व मात्र दोन समांतर रूळ आणि सिग्नलचे दिवे, यांच्याशी घट्ट जोडलेलं राहतं, ही जाणीव अस्वस्थ करून सोडते.

इतक्या कठीण आणि आव्हानात्मक स्थितीत वर्षानुवर्षं काम करत असतानाही गणेशने स्वतःमधला वाचक जपलाय, शास्त्रीय संगीताची आवड जोपासली आहे आणि लेखनाची ऊर्मीदेखील उत्फुल्ल ठेवली आहे, याचं मला प्रचंड कौतुक वाटतं. दोन प्रवासांच्या मधल्या वेळेत, जेव्हा विश्रांती घेण्यासाठी तो रनिंगरूममध्ये असतो, तेव्हाही त्याच्या सोबतीला पुस्तकंच असतात.

चौफेर वाचन करत असतानाच हा माणूस अनेक नियतकालिकांत लेखनही करत असतो. चित्र-प्रदर्शनांना भेट देऊन मुलाखती घेत असतो. संगीत-मैफिली आयोजित करतो. आपल्याला वरवर हे सोपं वाटलं, तरी प्रत्यक्षात ते किती कठीण असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

‘डबल इंजन की सरकार’ अशी भाषा आता बंद झाली तर बरे! जीभ आणि रेल्वे, दोन्ही घसरू नये!!

भारतीय रेल्वे कात टाकणार! ५ मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रममुळे ‘फोर-जी’ नेटवर्क प्रत्यक्षात येणार आहे...

मुंबई लोकल रेल्वेमधल्या झुंडी समजून घेताना...

रेल्वेखाली ठार झालेले १६ कामगार हे सरकारच्या तुच्छतेचे बळी आहेत

..................................................................................................................................................................

अनेकदा गणेशच्या डोळ्यादेखत गाडीखाली सापडून केवळ गाई-गुरंच नव्हे, तर प्रत्यक्ष माणसंदेखील मरतात. इंजिनाला मागे जोडलेल्या २०-२२ डब्यांत बसलेल्या माणसांचं जीवन सुरक्षित राहावं, ही त्याची जबाबदारी असते. पण त्यासाठी त्याच इंजिनासमोर आलेल्या जीवाला मात्र तो वाचवू शकत नाही! ही जीवनातली क्षणभंगुरता त्याला पदोपदी अस्वस्थ करते. अशा परिस्थितीत आपल्या आतली संवेदनशील वृत्ती साक्षीभावाने जपून ठेवणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मध्ये मध्ये अनेकदा गणेशला सलाम करावासा वाटतो.

एरवी गप्पा मारतानाही गणेश त्याच्या विविधांगी वाचनाचे वेगवेगळे नमुने पेश करत असतो. त्याचं मराठीइतकंच हिंदी-इंग्रजी पुस्तकांचं वाचनही अफाट आहे. ‘रुळानुबंध’ या पुस्तकातही जागोजागी त्याने जे शेर, वचनं यांचे उल्लेख केले आहेत, त्यातून त्याच्या चौफेर वाचनाची साक्ष वाचकांनाही पटेलच. लेखनाच्या ओघात त्याने सांगितलेल्या वेगवेगळ्या किश्श्यांमधून त्याचा अभ्यासही डोकावतो.

रेल्वेची अजस्त्र यंत्रणा दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस अखंड सुरू असते. त्यात प्रचंड नियोजन, कार्यप्रणाली आणि ती राबवणारी यंत्रणा, या सगळ्यांचा वाटा असतो. गणेशने ते सगळं साध्या सोप्या शब्दांत मांडलंय, हे त्याच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. अवघड शब्द वापरून किचकट लिखाण करणं सोपं असतं, पण वाचकाला समजेल अशा सोप्या भाषेत रेल्वेची अजस्त्र यंत्रणा समजावून सांगणं, हे अवघड काम त्याने चांगल्या प्रकारे पेललं आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/bfwI5

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

गणेशने या पुस्तकात अनेक ठिकाणी निसर्गाची वर्णनं नेमक्या आणि खूप कमी शब्दांत केली आहेत. त्याच वेळी ‘वैतरणेच्या पैलतीरी’ जाणारे उल्लेख येतात, तेव्हा त्याच्या आतली ‘अभ्यस्तता’ आपल्यालाही बुद्धीला स्पर्शून जाते. (या वाक्यातला प्रत्येक शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे.) 

तसं म्हटलं तर हे आत्मकथन आहे, पण त्याच वेळी आठवणींच्या प्रदेशात केलेली ही स्वैर मुशाफिरीदेखील आहे. गणेशाची भाषा विलक्षण ओघवती आहे. या पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकरणांतून वेगवेगळे किस्से त्याने सांगितले आहेत. एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाच्या सफाईने वर्णन केलेले हे ‘मोंताज’ शब्दशः डोळ्यासमोर उभे राहतात. पण त्याच वेळी मनुष्यस्वभावाचं सूक्ष्म निरीक्षण नोंदवण्याचं आणि त्याबद्दल भाष्य करण्याचं त्याच कसब मला जास्त भावलं.

या पुस्तकाच्या सुरुवातीला ज्येष्ठ लेखिका व अनुवादक उमाताई कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की, ‘आपल्याला चिरपरिचित असलेल्या जगाचा अपरिचित अशा नजरेनं घेतलेला एक मागोवा’. हे वर्णन शब्दशः खरं आहे.

‘रुळानुबंध’ – गणेश मनोहर कुलकर्णी | शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक | मूल्य – २६० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक मयुरेश गद्रे किरकोळ विक्री व्यवसायातील उद्योजक आहेत.

mvgadre6@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......