टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • एन. श्रीप्रकाश, विजय रुपानी, रमण सिंह, प्रशांत भूषण आणि ओमर अब्दुल्ला
  • Mon , 03 April 2017
  • विनोदनामा टपल्या विजय रुपानी Vijay Rupani रमण सिंह Raman Singh प्रशांत भूषण Prashant Bhushan ओमर अब्दुल्ला Omar Abdullah एन. श्रीप्रकाश N Sreeprakash

१. गुजरातमधील भाजप सरकारने गोहत्या करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा करणारा कायदा मंजूर केला असताना आणि उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखान्यांविरोधातील कारवाई सुरू असताना केरळमधील पोटनिवणुकीत भाजप उमेदवार एन. श्रीप्रकाश यांनी निवडून आल्यास मतदारसंघात गोमांसाचा पुरवठा व्यवस्थित राहील, याची काळजी घेऊ, असे आश्वासन मतदारांना दिले आहे.

अहो निवडणूक जिंकायचीये त्यांना. दारुड्यांच्या प्रांतात नळातून दारू पुरवू आणि चरसींना लांब जायला नको म्हणून गल्लोगल्ली स्वस्त दरांत अंमली पदार्थवाटप करू असंही आश्वासन देतील ते. होलसेल गाजराची शेती आहे ही. एकदा सत्ता ताब्यात आली की बरोब्बर आपल्या औकातीवर कसे जातात, याची उदाहरणं गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये दिसताहेत. ईशान्येत आणि केरळात गाय निवडणुकीपुरतीच यम्मी आहे, ती कायमस्वरूपी मम्मीच आहे... यांची.

.................................................................................................................................

२. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आदित्यनाथ हे कोणत्याही मशिदीच्या आत मंदिर बांधू शकतात. देशात अराजक निर्माण करण्याची त्यांची क्षमता आहे, अशी घणाघाती टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. आदित्यनाथ कधीच देशाला एकत्र आणू शकत नाही. याऊलट ते देशात दुही निर्माण करतील, असा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी अशा भाजपशी हातमिळवणी का केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

ओमरसाहेबांची उमर झाली का? याच भाजपच्या एनडीएच्या मंत्रिमंडळात आपले पिताश्री आणि आपण मंत्री होतो, याचा विसर कसा पडला त्यांना? आदित्यनाथ उत्तर प्रदेशात जे करतायत, तेच तुम्ही काश्मीरमध्ये करताहात की अनेक वर्षं. तुमची आणि त्यांची उद्दिष्टं काही फारशी वेगळी नाहीत. उलट त्या प्रक्रियेला वेग दिल्याबद्दल तुम्ही त्यांचे आभार मानायला हवेत.

.................................................................................................................................

३. उत्तर प्रदेशातील अँटी रोमिओ पथकावरुन सुरू झालेल्या वादात कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी रविवारी ट्विट करून उडी घेतली आणि या पथकाचे नाव ‘अँटि कृष्णा पथक’ का नाही, अशी विचारणा केली. रोमिओने तर एकाच स्त्रीवर प्रेम केलं, कृष्ण मात्र स्त्रियांची छेड काढण्यासाठी प्रसिद्ध होता, असं त्यांनी म्हटलं आहे.

आता कोणी संस्कृतीरक्षक चेवात येऊन प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला चढवतील आणि तमाशातली गणगवळण चवीने पाहणारे, राधाकृष्णाचं मंदिर बांधणारे संस्कारी लोक्स ‘बरा झाला चेचला त्याला’ म्हणून टाळ्या पिटतील. बाकी कृष्ण कळायला तुम्हाला अमुक इतके जन्म घ्यावे लागतील वगैरे संबित आदी संभावित ‘पात्रां’ची टकळी सुरू झालीच आहे. जणू, हे जन्माला आले तेच रामायण-महाभारत वाचत!!

.................................................................................................................................

४. गोहत्या करणाऱ्यास गुजरातने जन्मठेपेची तरतूद केली असताना गोहत्या करणाऱ्यास आम्ही फासावर लटकवू, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी म्हटले आहे. मी कुणाच्या खाण्याच्या सवयीच्या विरोधात नाही, परंतु आपणास गुजरातला शाकाहारी बनवायचे आहे, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटले होते.

देशातला एक भाग गोप्रदेश म्हणून आरक्षित ठेवून तिथे यांच्या आवडीच्या सगळ्या देशी गायी नेऊन सोडाव्यात आणि यांना तिथले मुख्यमंत्री करावं. हे शेण गोळा करत आणि गोमूत्र गोळा करत फिरतील आणि बाकीच्या देशाला जरा रोजच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे वळता येईल. रूपानी महोदयांचा आपल्या राज्यातल्या मुस्लिम समुदायाशी परिचय नसणार, हे स्वाभाविक आहे; राज्यातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या कोळी बांधवांची आणि त्यांच्या खानपानाचीही त्यांना ओळख नाही, ही कुपमंडुकतेची कमाल आहे. कोळ्यांच्या हातातल्या कोयतीशी गाठ पडली की समजेल लवकरच.

.................................................................................................................................

५. केवळ प्रेम केल्यामुळे गेल्या १५ वर्षांत देशात ३८ हजार ५८५ प्रेमी युगुलांच्या हत्या करण्यात आल्या असून दहशतवादी हल्ल्यात होणाऱ्या मृत्यूंपेक्षा प्रेमात बळी जाणाऱ्यांचा हा आकडा सहापट अधिक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तर प्रेमभंग झाल्याने आणि त्याच्याशी संबंधित विविध कारणांनी ७९ हजार १८९ तरुण-तरुणींनी आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे.

आता तरी अँटिरोमिओ स्क्वॉड, व्हॅलेंटाइन डेला विरोध, प्रेमी युगुलांना मारहाण वगैरेंच्या माध्यमातून भगवे तालिबान किती मोठं देशकार्य करताहेत, हे आपल्या लक्षात यायला हरकत नाही. समाजात जोवर प्रेमभावना राहील, तोवर इतक्या प्रमाणावर माणसं मरत राहतील, हे लक्षात घेऊन समाजातला परस्परसद्भाव संपूर्णपणे नष्ट करण्याला गत्यंतर नाही. हे कटु औषध देण्यासाठीच काही महात्म्यांचा पृथ्वीतलावर अवतार झाला आहे!

.................................................................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......