जी कल्पना पुरेपूर कसोटीवर उतरते ते सत्य. ‘संपूर्ण सत्य’ ही चुकीची संकल्पना आहे. कारण त्याची पडताळणी होत नाही
ग्रंथनामा - झलक
विजय तांबे
  • ‘महात्मा गांधींचे लोकविलक्षण अनुयायी : गोपराजू रामचंद्र राव’ या पुस्तिकेचे मुखपृष्ठ
  • Fri , 16 June 2023
  • ग्रंथनामा झलक गोपराजू रामचंद्र राव Goparaju Ramachandra Rao गोरा GoRa महात्मा गांधी Mahatma Gandhi आस्तिकवाद Theism नास्तिकवाद Atheism

गोपराजू रामचंद्र राव तथा गोरा हे महात्मा गांधी यांचे तामिळनाडूतील अनुयायी. गोरा यांनी अस्पृश्यता निवारणासारखे सामाजिक उपक्रम राबवत असताना, या गुरुशिष्याच्या जोडीने आपले सामाजिक कार्य अत्यंत तादात्म भावनेने केले. या दोघांच्या स्नेहसंबंधांविषयी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे यांनी गांधी अभ्यास केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे नुकतेच व्याख्यान दिले. ते ‘महात्मा गांधींचे लोकविलक्षण अनुयायी : गोपराजू रामचंद्र राव’ या पुस्तिकेच्या रूपाने विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. या पुस्तिकेतला हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

तत्त्वज्ञान म्हणजे वास्तव समजून घेणे, अशी व्याख्या करतात. वास्तव समजून घेताना परिस्थितीचा, श्रद्धेचा, धर्माचा पगडा असतो. त्याच्या तत्त्वज्ञानातून मूठभर श्रीमंत कोट्यवधींना दरिद्री ठेवू शकतात, तर हिंदूंमध्ये अनेकांना अस्पृश्य ठेवता येते.

जी कल्पना पुरेपूर कसोटीवर उतरते ते सत्य. ‘संपूर्ण सत्य’ (absolute truth) ही चुकीची संकल्पना आहे. कारण त्याची पडताळणी होत नाही.

नास्तिकवादी विचार व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा ठामपणे आग्रह धरतो. श्रद्धा आणि सत्य यात फरक करून वस्तुस्थिती समजून घेतो. नास्तिकवादी व्यक्ती कल्पनाशक्तीचा मुक्तपणे वापर करून अपरोक्ष ज्ञान मिळवतो. ते मत बनवतात, सिद्धान्त रचतात आणि वैविध्याचा आनंद घेतात. मात्र कधीच डरपोकपणे मनाचे दरवाजे बंद करत नाहीत. नास्तिकवादी व्यक्ती मोकळ्या मनाने वस्तुस्थितीच्या आधारे पडताळणीची पद्धती वापरून श्रद्धेकडून सत्याकडे प्रवास करतात.

जे पडताळणीस सक्षम आहे आणि व्यक्तीसाठी आवश्यक आहे, त्याची तपासणी करून माहिती करून घ्यावी. जे पडताळणीस सक्षम नाही किंवा सध्याच्या गरजांसाठी अनावश्यक असेल, त्याचा मत म्हणून मान राखावा. ज्याचा मत म्हणून मान ठेवतो, त्याचा सत्य म्हणून स्वीकार केलेला नाही. नास्तिकवाद ज्ञानग्रहणासाठी शास्त्रीय पद्धतीचा अंगीकार करतो.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

नास्तिकवादी विचार कार्यकारणभावाकडे वेगळ्या पद्धतीने बघतो. कृती आणि परिणामाच्या नात्याकडे निश्चितता म्हणून बघत नाही, तर संभाव्यता म्हणून बघतो. घटनांच्या समीपतेतून संभाव्यता वाढते. वाढत्या अंतरातून संभाव्यता कमी होते. कोणत्याही उपक्रमासाठी किंवा कार्यासाठी निश्चित उपलब्धीचा दावा नास्तिकवाद करत नाही. तेथे संभाव्यतेच्या शक्यतेला जागा ठेवून अपेक्षाभंग टाळला जातो.

नास्तिकवादी विचार या विश्वाकडे ‘पक्षांच्या थव्याचा समूह’ या संकल्पनेतून बघतात. जेव्हा अनेक पक्षी एकत्र बसलेले असतात, तेव्हा तो थवा असतो. मात्र प्रत्येक पक्षी आपल्या मार्गाने उडून जातो, तेव्हा थवा लुप्त होतो. तरीही प्रत्येक पक्षी स्वतः अस्तित्वात असतोच. म्हणजे थव्याच्या अस्तित्वात नव्हे, तर प्रत्येक पक्षाच्या अस्तित्वात वास्तव दडलेले आहे.

गोरा मार्क्सवादी विचारांना परखड नकार देतात. ते म्हणतात की, गांधींचा सत्याग्रह आणि अस्तित्ववादी तत्त्वज्ञान हे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मान्यता देण्याचे मोठ्या प्रमाणातील प्रयत्न होते. गोरांच्या मते, मर्यादा असूनही भौतिकवाद, गांधीवाद आणि अस्तित्ववादाने मानवी संस्कृती नास्तिकवादाच्या दिशेने नेली. गांधींच्या सत्याग्रहाने अन्यायाविरुद्धचे खरे हत्यार दिले. ते हत्यार समाजातील तळागाळाचे विशेष मित्र बनले. अस्तित्ववादाने व्यक्तीचे महत्त्व आधोरेखित केले. या तिन्ही वादांना सार्वत्रिक समता आणण्यात अपयश आले. कारण त्यांनी नास्तिकवाद त्याच्या परिणामांसकट उघडपणे स्वीकारला नाही.

नास्तिकवादाचे नीतीशास्त्र

गांधीजींनी गोरांकडे त्यांच्या नैतिकतेच्या संकल्पनेची विचारणा केली. गोरा म्हणाले, ‘मी जे करतो ते मी बोलतो आणि जे बोलतो ते करतो; ही माझ्या नैतिकेची व्याख्या आहे. गुप्ततेला माझ्याकडे थारा नाही. उघड असणारे सर्व नैतिक वर्तन असते.’

गांधीजी म्हणाले, ‘बरोबर. मी असं म्हणतो, गुप्तता हे पाप आहे. तू नास्तिक आहेस. पाप कल्पनेबद्दल तू भांडशील.’

गोरांच्या मते, ‘एखाद्याने आपल्या इच्छापूर्तीसाठी इतरांकडून व्यापक आणि पूर्ण सहकार्य मिळण्यासाठी त्याने लोकांशी केलेल्या व्यवहाराची पद्धत म्हणजे नैतिकता. नैतिक वर्तनाची दोन मूलतत्वे गोरा मांडतात- प्रामाणिकपणा आणि सहनशक्ती. विचार, शब्द आणि कृतीतील सातत्य म्हणजे व्यक्तिगत प्रामाणिकपणा. त्यामध्ये गुप्ततेला स्थान नाही. त्यांच्या मते, ‘व्यक्तीला नैतिक आणि सामाजिक ठेवणाऱ्या तीन गोष्टी आहेत. स्वयंशिस्त, धार्मिक श्रद्धा आणि राजकीय ताकद’.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

गोरा यातील स्वयंशिस्तीची निवड करतात. नैसर्गिक वर्तनाची खात्रीलायक उत्तम पद्धत म्हणजे प्रत्येक व्यक्तीने नैसर्गिक बंधन पाळणे होय. गांधीजींचा स्वयंशिस्तीचा मार्ग कसा योग्य आहे, याचे विवेचन ते करतात. कायदा की नैतिकता, असा प्रश्न निर्माण झाल्यास काम नैतिकतेने करावे आणि त्यानुसार कायद्यात बदल करावे, असे ते म्हणत.

नास्तिकवादी राजकारण

शासनाद्वारा लोकांचे प्रश्न सोडवण्याची पद्धत म्हणजे ‘राजकारण’ अशी राजकारणाची व्याख्या ते करतात. यासाठी स्वयंशिस्त आणि धार्मिक श्रद्धा या पुरेशा नसतात. राजकीय पद्धतींचे व्यवस्थापन करण्याचे काम सरकार करते. लोकांच्या सहकार्यातून आणि लोकांनी दिलेल्या करातून हे अधिकार त्यांना प्राप्त होतात. लोकांनी सहकार्य न करणे आणि कर देणे बंद केल्यास सरकार कोसळेल. या अर्थाने जनता शासनाची मालक असते. मात्र लोकांना जेव्हा कळते की, ते मालक आहेत, तेव्हाच मालकी हक्क शक्य असतो.

आस्तिक विचारातून विकास झालेल्या गुलामगिरीच्या मनोवृत्तीत हे शक्य नाही. नास्तिकवादी दृष्टीकोन असे मानतो की, लोकशाही खऱ्या अर्थाने चालवण्यासाठी इच्छाशक्ती आणि जाणीव जागृत करणे अपरिहार्य आहे.

जनतेच्या नियंत्रणाशिवाय निवडून दिलेले प्रतिनिधी, मंत्री, राष्ट्रपती हे लोकांच्या बाबतीतील कर्तव्याबद्दल राजेशाही वागण्यापेक्षा कमी असणार नाहीत. समाज आस्तिक आहे, तोपर्यंत लोकशाहीतील सार्वमत, पुढाकार, परत बोलवण्याचा अधिकार सामान्य माणसाच्या जीवनात फार सुधारणा करू शकणार नाही. लोकांच्या गुलामवृत्तीचा फायदा राजकीय पक्ष घेणार.

सत्ता हस्तगत केल्याशिवाय लोकांची पुरेपूर सेवा करता येणार नाही. पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा सुरू होते. त्यातून लोकांची सेवा दूर राहते. आणि सत्तेची स्पर्धा आणि ती हस्तगत करण्याचे विविध मार्ग मुख्य विषय बनतात. सत्तेसाठीचे राजकारण होते. लोकशाहीतील पक्ष व्यवस्थेत सत्तेचे राजकारण हे न टाळण्यासारखे आहे. लोकशाहीत मनाचा मोकळेपणा अत्यावश्यक आहे, मात्र मतदान पक्षाप्रमाणे होते. सगळे पक्ष ‘विरोधासाठी विरोध’ या पातळीवर असतात आणि पक्षीय रचना मनाच्या मोकळेपणाची शक्यता अमान्य करते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

पक्षविरहित विकेंद्रीत व्यवस्थेत लोकशाहीचा योग्य प्रकारे कारभार होऊ शकेल. विकेंद्रीत व्यवस्थेत एक पायाभूत युनिट असावे. ते युनिट किलोमीटरचे नको, लोकसंख्येचे असावे. या युनिटमधून एक समिती निवडली जाईल. युनिटमधील लोकांच्या बदलत्या गरजा आणि अपेक्षांची दखल घेण्याचे काम ही समिती करेल. पायाभूत समित्यांचा संघ असेल. त्यामध्ये संपर्क, गरजांचा विनिमय, संशोधन यासारख्या व्यापक गरजांची पूर्तता होईल. प्रत्येक स्तरावर संघाचा विस्तार होत संपूर्ण मानव जात कवेत येईल. तळातील समित्या वरच्या स्तरावरील समित्या निवडतील. उच्च समित्या सर्वसाधारण गरजांकडे लक्ष देतील, तर पायाभूत समित्या तात्काळ गरजांकडे लक्ष देतील. मुलेबाळे आणि वैवाहिक प्रेम हे प्रत्येक व्यक्तीचे राहील. मात्र जात, टोळी, कुटुंब या जुनापुराण्या संस्थांना विकेंद्रीत समिती हा पर्याय असेल.

पक्षविरहित लोकशाही, विकेंद्रीकरण, सार्वमत, परत बोलावण्याचा अधिकार आणि पुढाकार यातून सरकार नागरिकांच्या जवळ जाईल. मात्र मनुष्य देवाला शरण गेल्यासारखा इतरांना शरण जाण्याच्या मनोवृत्तीचा असल्याने हे औपचारिक राहील. लोकशाहीत नागरिकांचे खरे सार्वभौमत्व नास्तिकवादातूनच येईल.

नास्तिकवादी अर्थविचार

गोरा मांडतात की, आर्थिक संबंधात आस्तिकवादी आणि नास्तिकवादी दृष्टीकोन असतात. आस्तिकवादी समाजात विषमता सहन करणे आणि भूकेकंगालांनी दानधर्मावर जगणे हा आसरा आहे. हावरटांच्या दयेवर गरिबांनी जगावे, असे आस्तिकवादी समाजाचे चित्र आहे. नास्तिकवादी अर्थव्यवस्थेत सर्व माणसे समान असून सर्वांना चांगल्या प्रकारे जगण्याची समान संधी असेल. जीवनाला लागणाऱ्या भौतिक गरजांच्या पूर्ततेत समतेचा करणे, हे नास्तिकवादी अर्थशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

आर्थिक समता प्रस्थापित करू इच्छिणारे मार्क्सवाद आणि गांधीवाद हे दोन मार्ग आहेत. उत्पादन साधनांवर शासनाची मालकी आणून त्याद्वारे समता प्रस्थापित करण्याचे विचार मार्क्सवाद मानतो, तर गांधीवाद विश्वस्त वृत्तीतून समता प्रस्थापित करू इच्छितो. दोन्ही विचार पद्धतींचे परिणाम बघता, या दोन्ही पद्धती विशिष्ट मर्यादेच्या पुढे उद्दिष्टपर्यंत प्रगती करू शकल्या नाहीत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

आस्तिकवादी वृत्तीमुळे विश्वस्त वृत्तीतून समता येण्याबदली धर्मादाय वृत्ती निर्माण झाली. विनोबांची भूदान चळवळ आदर्शवादी होती, मात्र अंमलबजावणी प्रतिगामी होती. आर्थिक समतेचे उद्दिष्ट कामगार संघटना गाठू शकल्या नाहीत, कारण त्यांचे परिस्थितीचे विश्लेषण चुकीचे होते. गरिबांना विषमतेची घृणा येत नाही आणि ते बंड करत नाहीत. ते श्रीमंतांइतकेच भांडवली वृत्तीचे असतात. थोडक्यात, श्रीमंतांची संपत्ती सुरक्षित करण्याचं काम गरिबांच्या मनातली भांडवलशाही करते. गरीब श्रीमंतांचा मत्सर करतात आणि त्यांना खाजगी मालमत्ता नष्ट करण्याबदली श्रीमंत व्हायचे असते.

नास्तिकवादी अर्थशास्त्रातून समतेचे ध्येय प्राप्त करतानाच मानवी व्यक्तिमत्त्वांच्या पैलूंना स्पर्श होईल, कारण मानवीय व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिष्ठेचा आदर राखणे, हे भौतिक गरज भागवण्याइतकेच महत्त्वाचे आहे. सर्व जनतेला सन्मानपूर्वक सुविधा पुरवणे गरजेचे आहे, असे नास्तिकवाद मानतो.

नास्तिकवादी तंत्रज्ञान विकेंद्रीकरण मानते. महाकाय मोजकी यंत्रे वापरण्यापेक्षा अनेक छोटी छोटी यंत्रे वापरण्याचा आग्रह धरते. छोट्या यंत्रातून व्यक्तीला स्वयंपूर्ण होण्यास मदत होते. यातून व्यक्तीचे स्वातंत्र्य जपले जाऊन शोषण आणि बेरोजगारी टाळता येते. नास्तिकतावादाच्या जागरणातून मालक आणि मजूर, ब्राह्मण आणि शूद्र असा फरक नसेल.

नास्तिकवादी लिंगभाव

स्त्रियांबद्दलचे विचार मांडताना गोरा लिहितात की, ‘पुरुषांसाठी सुख मिळवून देणारी वस्तू म्हणजे स्त्री, हा दृष्टीकोन नास्तिकवादाला अमान्य आहे. पुरुषा एवढाच स्त्रीलासुद्धा लैंगिक इच्छा आणि सौंदर्यपूर्तीचा अधिकार आहे. लैंगिक संबंधाबाबत गुप्तता ही समाजविरोधी आहे. भूक भागवण्यासाठी अन्न निर्माण करण्याइतकाच सेक्स महत्त्वाचा आहे. मात्र मुले जन्माला येऊ द्यायची की नाही, हा निर्णय सर्वस्वी स्त्रीचा असेल. जेव्हा लैंगिक संबंध मोकळे असतील, तेव्हाच लोकांना यातील गैरमार्गाबद्दल अप्रीती होईल आणि लोक आपल्या आदर्श कार्याकडे लक्ष देतील.’

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................

‘थोडक्यात ईश्वर मानल्याने मनुष्य विविध प्रकारच्या जोखडात अडकलेला आहे. त्यानेच स्वतःवर खूप बंधने घालून घेतली आहेत. या संस्कार आणि बंधनांमुळे मनुष्य खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकत नाही. नास्तिकता म्हणजे फक्त देव अमान्य करणे नव्हे. नास्तिकता म्हणजे ईश्वराला अमान्य करणाऱ्या परिणामांची स्थिती मांडणे होय. मुक्त मनशक्ती आणि आत्मविश्वास हे मानवाला स्वतंत्र करणारे परिणाम आहेत म्हणूनच नास्तिकता ही सकारात्मक आहे,’ असे गोरा म्हणतात.

आपल्यापैकी काही जण देव मानतात, काही मानत नाहीत, तर काही अजून काही मानतात. या सगळ्या आपण वैयक्तिक बाबी मानतो. त्यामुळे त्याचे मोठ्या विचारसरणीत रूपांतर करायला जात नाही.

विचारसरणी किंवा दर्शने ही जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करून संपूर्ण मानव जातीने कोणत्या दिशेने जावे, मानवी जीवनाचे श्रेयस काय याचे दिग्दर्शन करून विचार व्यूहाची मांडणी करतात. प्राचीन काळात भारतात आस्तिक आणि नास्तिक दर्शने निर्माण झाली. आधुनिक काळात भांडवलशाही, मार्क्सवाद, हिंदुत्ववाद, समाजवाद ही दर्शने आहेत. गोरांचा आग्रह नास्तिकतेचे परिपूर्ण दर्शन बनवण्याचा होता. नास्तिकतेचे विचार मांडताना त्यांनी आपला स्वतःचा राजकीय, आर्थिक आणि नैतिक दृष्टीकोन मांडला. आताच्या अस्तित्वात असलेल्या सर्व दर्शनातील त्रुटी या आस्तिकवादातील दोषांमधून निर्माण झाल्या आहेत आणि या सर्वांवर एक उपाय म्हणजे गोरा म्हणतात, ‘तो नास्तिकवाद स्वीकारणे होय’, अशी एकंदर त्यांची मांडणी आहे.

त्यांनी मांडलेल्या आर्थिक, राजकीय किंवा नैतिक विचारांचा नास्तिकतेशी नेमका संबंध काय? किंवा एखादा माणूस गोरा म्हणतात तसा नास्तिकवादी होऊन मुक्त मन:शक्ती आणि आत्मविश्वासाचा पुरेपूर आनंद घेत असेल, तर त्याचे आर्थिक, राजकीय, महिलांविषयीचे विचार गोरा म्हणतात तसेच असतील का? किंवा हेच आर्थिक, राजकीय, महिलांविषयीचे विचार एखादा आस्तिक मांडू शकतो का? हे प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात. यांची उत्तरे मला गोरांच्या लिखाणात सापडली नाहीत. या बद्दल सविस्तर लिहिता येईल, मात्र विषय आहे, गोरांचे जीवन आणि विचार याची ओळख करून घेणे आणि गांधीजींशी संबंध अधिकाधिक घनिष्ट होण्याची कारण काय, हा आहे.

कृती कार्यक्रम

मात्र गोरा हे समाजातील विषमता, सर्व प्रकारचे शोषण, मानवी गुलामगिरीची वृत्ती याबद्दल अत्यंत अस्वस्थ होते आणि त्यांनी हे प्रश्न सोडवायला आपल्या विचारानुसार कृती कार्यक्रम आखला. पक्षविरहित निवडणुका व्हाव्यात म्हणून जनमत निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप काम केले.

मंत्र्यांनी साध्या जीवन पद्धतीचा पुरस्कार करावा, त्यांनी रेल्वेच्या पहिल्या वर्गाने प्रवास करू नये, यासाठी रेल्वे स्थानकात मंत्र्यांना पहिल्या डब्यात चढू दिले नाही. शेवटी पोलिसांनी त्यांना दूर केले. राष्ट्रपती आणि राज्यपाल आलिशान निवासस्थानात राहतात म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

जवाहरलाल नेहरूंनी आपली राहणी साधी ठेवावी आणि त्यांनी पक्षविरहित लोकशाहीचा पुरस्कार करावा, म्हणून सेवाग्राम ते दिल्ली अशी पदयात्रा केली. नेहरू राहत असलेल्या ‘तीन मूर्ती भवन’ समोर त्यांनी सत्याग्रह केला. तेव्हा नेहरूंनी त्यांच्या अटकेचे आदेश दिले नाहीत. गोरांना भेटायला बोलावले, चर्चा केली आणि आपले मतभेद स्पष्ट केले.

व्यक्तिगत स्वातंत्र्य अबाधित ठेवून आर्थिक समतेबाबत गांधीजींचे तेरा रचनात्मक कार्यक्रम त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांनी आर्थिक समता मंडळ स्थापन करून त्याद्वारे प्रचार केला.

देशात अन्नटंचाई आहे, लोकांना खायला मिळत नाही, तेव्हा शोभेची झाडे लावून बगीचे सजवणे चुकीचे आहे. या मागणीसाठी त्यांनी १९६८मध्ये शोभेची झाडे काढून तेथे भाजीपाला लावण्याचे जाहीर आंदोलन केले. त्यांच्या विजयवाडा येथील नास्तिक केंद्रांनी विज्ञान प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणावर केले. विनोबांच्या भूदान पदयात्रेतसुद्धा त्यांचा सहभाग होता.

या अफाट माणसाने मनाला जे वाटेल ते बेधडकपणे राबवण्याचे काम हाती घेतले. परिणामांची चिंता केली नाही. आपले सगळे व्यवहार पारदर्शक ठेवले. त्यांची पारदर्शकता वाचून आपल्याला घाबरायला होते. त्यांचा संपूर्ण संसार लोकवर्गणीतून चालत असे. त्यात त्यांची मुलगी गरोदर राहिली. तिचे लग्न झाले नव्हते किंवा ठरलेलेही नव्हते. तो तिच्या प्रेमाचा आविष्कार होता. वर्गणी देणाऱ्या सर्वांना त्यांनी परिस्थिती सांगितली आणि आपण मुलीच्या वर्तनाचे समर्थन करतो हेही सांगितले. त्यातून काही जुने मित्र तुटले. त्यांनी वर्गणी देणे बंद केले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी लिहिले आहे की, या घटनेतून पाठिंबा देणारे आणि मदत करणारे नवीन मित्र मिळाले.

गोरा आणि गांधी

गोरांनी नास्तिक विचारांना व्यापक करण्याचा गंभीरपणे प्रयत्न केला. ते मानत की हिंदू, मुस्लीम, शीख, जैन, ख्रिश्चन ही माणसांना लागलेली वेगवेगळी लेबले आहेत. ही लेबले भेदभाव करतात. मी कोण आहे, हे सांगताना, मी कोण नाही, हे जास्त सांगत असतो. ही सर्व लेबले ईश्वराची जोडलेली आहे आणि माणसे ईश्वराची गुलाम आहेत.

दुसरीकडे गांधीजींना अभिप्रेत असलेला ईश्वर जराही पारंपरिक नाही. तो सत्य आहे. मनुष्य परिपूर्ण नाही. त्याला वासना, विकार, भावना आहेत. आपल्यातील अपूर्णतेमुळे आपल्याला सत्याचे आकलन होत नाही. परंपरेने सांगितलेला धर्म गांधीजी स्वीकारत नाहीत. 'स्पिरिट ऑफ रिलिजन' 'आणि' टेक्स्ट ऑफ रिलिजन' असे दोन भाग गांधीजी करतात. ‘स्पिरिट ऑफ रिलिजन’ हे ईश्वरनिर्मित सत्य आहे. मग मानवाला सत्याला साजेसे जगायचे असेल, तर ‘टेक्स्ट ऑफ रिलिजन’मध्ये बदल करावा लागेल, असे गांधीजी मांडतात. गोरा गांधींसोबत चर्चेमध्ये मुद्दे मांडतात, तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेली ईश्वर संकल्पना आणि गांधीजींचा ईश्वर हे वेगवेगळे आहेत. एका अर्थाने दोघेही वेगवेगळ्या पातळ्यांवर आहेत. तरीही ही चर्चा का चालू राहिली? गांधींनी गोरांना आपले निकटचे स्नेही का मानले? या प्रश्नांची उत्तरे किशोरलाल मश्रूवाला यांनी दिलेली आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

‘An Atheist with Gandhi’ या गोरा यांच्या पुस्तकाला किशोरलाल मश्रूवालांची प्रदीर्घ प्रस्तावना आहे. त्यामध्ये धार्मिकता, आस्तिक, नास्तिक आणि मानवी मर्यादा यांची सविस्तर चर्चा केली आहे. प्रस्तावनेत किशोरलाल मश्रूवाला म्हणतात की, गोरांचा असा विश्वास असेल की, त्यांची नास्तिकता वादावरील श्रद्धा आणि आवाहन यामुळेच ते जनतेमध्ये काम करू शकतात. तो त्यांचा भ्रम आहे. लोक गोरांच्या हृदयाकडे बघतात.

किशोरलाल मश्रूवाला लिहितात की, सामाजिक आणि नैतिकतेच्या सर्वोच्च मूल्यांवर आधारित योग्य, चांगले आणि न्याय्य यावर गोरांचा असलेला विश्वास, त्यासाठी जीवन झोकून द्यायची त्यांची तयारी, तसेच जीवनावरील गाढ श्रद्धा श्रेष्ठ आहे. एकदा योग्य मार्ग निवडल्यावर त्याच्या आचरणामध्ये व्यक्तिगत गैरसोय, अहंकार, पूर्वग्रह, सामाजिक चालीरिती किंवा सगेसोयरे हे अडथळे त्यांच्यासाठी राहत नाहीत. गोरा हे करू शकत होते, कारण त्यांची चिकाटी आणि अस्सलपणा त्यांच्या धार्मिकतेमधूनच प्रकट होत होता.

या धार्मिकतेला मश्रूवाला ‘अत्यावश्यक धार्मिकता’ म्हणतात. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक, मात्र तुमच्यात ही अत्यावश्यक धार्मिकता प्रकट होत नसेल, तर तुम्ही आपले काम उभे करू शकत नाही. गोरांचा त्याग, कामावरील निष्ठा, पराकोटीचे झोकून देणे आणि पारदर्शकता हे आहेच. त्याचबरोबर त्यांच्या लिखाणात कुठेही अहंभाव आढळत नाही. गोरांमधील त्या अत्यावश्यक धार्मिकतेला गांधीजी प्रतिसाद देतात आणि गोरा गांधीजींचे आप्त बनतात.

म्हणून तर गांधीजी म्हणतात, ‘तू खरा की मी? हे परिणाम सिद्ध करतील. तुझे काम सुरू ठेव. जरी तुझी पद्धत माझ्याविरुद्ध असेल, तरीही मी तुला मदत करेन.’

‘महात्मा गांधींचे लोकविलक्षण अनुयायी : गोपराजू रामचंद्र राव’ – विजय तांबे

गांधी अभ्यास केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर | पाने – ३२ | मूल्य – २७ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......