या पुस्तकातून व्यापक जाणीव-जागरूकतेचा जो जागर केला आहे, तो प्रगल्भ लोकशाहीसाठी आवश्यक असणाऱ्या सुजाण नागरिकांना विवेकी, विचारी व विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी साहाय्यकारी होणारा आहे
ग्रंथनामा - आगामी
लक्ष्मीकांत देशमुख
  • ‘शब्दांचीच शस्त्रे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 19 May 2023
  • ग्रंथनामा आगामी शब्दांचीच शस्त्रे Shabdanchich Astre आरोग्य सेना Aarogya Sena डॉ. अभिजित वैद्य Abhijit Vaidya पुरोगामी जनगर्जना Purogami Jangarjana

‘आरोग्य सेने’चे प्रवर्तक डॉ. अभिजित वैद्य यांनी ‘पुरोगामी जनगर्जना’ या मासिकात २०१४ ते २०२२ या कालखंडात लिहिलेल्या निवडक संपादकियांचा ‘शब्दांचीच शस्त्रे’ हा संग्रह उद्या पुण्यात माजी संपादक व खासदार कुमार केतकर आणि भाषावैज्ञानिक डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या या संग्रहाला कथा-कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

संपादकाच्या नावे व संपादकीय लेखनासाठी ओळखले जाणारे आजच्या काळातले एक मासिक आहे ‘पुरोगामी जनगर्जना’ आणि तिचे संपादक आहेत डॉ. अभिजित वैद्य. स्वत:ची अभ्यासांती बनलेली सुस्पष्ट व ठाम वैचारिक भूमिका आणि वृत्तपत्राच्या तुलनेत मासिक असल्यामुळे दीर्घ निबंधवजा विषयाचा सर्वांगीण वेध घेणाऱ्या अभ्यासू संपादकीय लेखनामुळे ‘पुरोगामी जनगर्जने’ला वैचारिक स्वरूप आणि स्वत:ची वेगळी ओळख वैद्य यांच्यामुळे लाभली आहे. मी गेली अनेक वर्षे या मासिकाचा डोळस वाचक आहे. करोना कालखंडातील त्यांची आरोग्य विषयाची अनेक संपादकीय ही तत्कालिकतेच्या पलीकडे जात एकूण आरोग्य व्यवस्थेचा परामर्ष घेणारी होती. ती वाचकांची समज वाढवणारी व नवा विचार देणारी होती.

एक तर विषयाचा सखोल अभ्यास, त्यातली सामाजिक, आर्थिक, राजकीय गुंतागुंत नेमकेपणानं मांडत स्वत:च्या प्रज्ञेनं त्यावर भाष्य करणं, यामुळे तत्कालिक व घाईगर्दीमध्ये लिहिल्या जाणाऱ्या, ज्याला ‘लिटरेचर इन हरी’ म्हणलं जातं, अशा संपादकीय वा अग्रलेखांना वैद्य तात्विक मूल्यप्रदान करत, तिला वैचारिक निबंधाचे रूप प्राप्त करून देतात. त्यामुळे त्यांचे संपादकीय लेख हे पुस्तकरूपाने येणे हे मराठी वैचारिक साहित्याच्या समृद्धीसाठी माझ्या मते महत्त्वाचे होते. म्हणून साधना प्रकाशनासारख्या प्रतिष्ठित प्रकाशनसंस्थेमार्फत वैद्यांचा ‘शब्दांचीच शस्त्रे’ हा त्यांच्या या मासिकातील मागच्या आठ वर्षांच्या (२०१४ ते २०२२) काळातील निवडक संपादकीयांचा संग्रह मराठी वाचकांपुढे येत आहे, त्याचे मी सहर्ष स्वागत करतो.

वैद्य श्रद्धेय भाई वैद्यांचे केवळ जैविकच नाहीत, तर वैचारिक वारसदार आहेत. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक, आर्थिक न्याय आणि स्वातंत्र्य - समता - बंधुता या संविधानिक तत्त्वज्ञानाने त्यांचा वैचारिक व भावनिक पिंड पोसला गेला आहे व खऱ्या अर्थाने समृद्ध झाला आहे. त्यामुळे विषय कोणताही असू दे, वैद्य यांच्या पुरोगामी आणि मूल्याधिष्ठित भूमिकेचा प्रत्यय त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक लेखात येतो. त्यामुळेच वाचकांना वर्ण्य विषयाच्या सर्व बाजूचे ज्ञान होते, तसेच त्यांची वैचारिक जनहिताची ठाम भूमिकाही समजून येते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पत्रकारितेची दुहेरी मूल्यं असतात. एक निष्पक्ष बातम्या देणं आणि दोन संपादकीय भाष्यातून विचार देणं. संपादकीयाचा विषय प्रासंगिक आणि ताज्या घटना असल्या तरी त्यामागचे सर्व सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक - सामाजिक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैचारिक पैलू उलगडून दाखवत वाचकांचं प्रबोधन आणि शिक्षण होणं, हा या लेखनाचा हेतू असतो. ते लोकशाही राज्यव्यवस्थेत फार महत्त्वाचं असतं. जितके जागरूक, सुजाण, सजग विचारी लोक असतील तेवढी लोकशाही बळकट व समृद्ध होत जाते.

कोणते अर्थविचार, कोणती विचारधारा आणि कोणत्या दिशा एखाद्या देशाच्या निवडून आलेल्या पक्ष व राज्यकर्त्यांची असते त्यावरच त्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं.  लोकशाहीमध्ये डाव्या, मध्यम व उजव्या विचारधारेचा आणि देश - समाज घडवण्याच्या ध्येयधोरणात वैचारिक संघर्ष अपरिहार्य असतो, पण लोकशाही ही ‘ग्रेट इक्वलायझर’ असते, सुवर्णमध्य साधणारी असते, याचे भान ठेवून राज्यकर्त्यांनी क्रांती नाही तर उत्क्रांतीच्या नेमस्त व मध्यम मार्गाने देश व समाजाला न्यायचं असतं. लोकांना कायम संघर्ष व अस्थिरता आणि वेगवान बदल नको असतो. त्यामुळे राजकारणापलीकडे जात देशाच्या नेतृत्वानं ‘स्टेट्समनशीप’ दाखवत देशाला योग्य दिशेनं न्यायचं असतं. अन्यथा सत्ताकारण हेच राजकारण व त्यासाठी कोणत्याही तडजोडी करणं आणि सत्ता मिळवणं, टिकवणं व पुन्हा पुन्हा निवडून येणं हेच जर राजकीय पक्षाचं ध्येय झालं, तर तो देश विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांच्या आवर्तात सापडतो.

अशा वेळी सामान्य माणसांना जसे विचारवंत, साहित्यिक, कलावंतांनी मार्ग दाखवायचा असतो, तसाच तो पत्रकारांनी पण दाखवायचा असतो. म्हणूनच माध्यमाला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जातं. कारण त्याची भूमिकाच मुळी ‘वॉच डॉग’ची असते, जागल्याची असते. त्याला देश - समाज - लोकांबाबत, काय इष्ट, काय अनिष्ट चाललं आहे, हे सांगायचं असतं. तसंच त्यामागची कारणं स्पष्ट करत पुढील वाटचालीची व एकूणच भवितव्याची दिशा विवेकशीलतेनं, पण तर्कशुद्ध पद्धतीने सांगायची असते.

आधुनिक, स्वतंत्र व लोकशाहीवादी देश आणि समाजाचा पाया हा विवेक, विज्ञाननिष्ठा, स्वातंत्र्य, समता आणि मानवतावाद या पंचतत्त्वांवर उभा असतो. तो जेवढा मजबूत तेवढा तो देश मोठा, असं साधं सरळ समीकरण आहे. त्यासाठी लोकशिक्षण हा धर्म मानणाऱ्या पत्रकारांनी लेखन करीत लोकांना विचार (आणि मग कृती) करायला प्रवृत्त करायचं असतं. येथे पत्रकार कोणत्या विचारधारेचा आहे, तो लोकशाही व संविधानिक मूल्यांना किती मानतो आणि त्याच्या मनात - विचारांत व्यापक जनकल्याणाचा विचार किती प्रखर आहे, त्यावर त्याच्या लेखनाची महत्ता ठरत असते. या कसोटीवर वैद्य पुरेपूर उतरतात व ‘डिस्टिंग्शन’ने पास होतात, असं म्हणलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. त्याचा रोकडा पुरावा म्हणजे हा वैचारिक ग्रंथ होय!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘शब्दांचीच शस्त्रे’ या पुस्तकात साधारणपणे २०१४ ते २०२२ या कालखंडातील संपादकीयांचा समावेश आहे आणि हा कालखंड नरेंद्र मोदी पर्वाचा आहे. भारतात प्रथमच पूर्ण बहुमतानं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली उजव्या हिंदुत्ववादी विचाराचा भारतीय जनता पक्ष २०१४मध्ये केंद्रात सत्तेवर आला व पुन्हा पुढील निवडणुकीत अधिक जास्त बहुमत मिळवत २०१९मध्ये आपली केंद्रीय सत्ता राखली. गेली साडेआठ वर्षे हा पक्ष सत्तेवर आहे व देशाचा कारभार आजवर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींनी ज्या डावीकडे झुकलेल्या मध्यममार्गी विचारांनी चालवलं, त्यापासून बहुतांशानं फारकत घेत उघड धर्मवादी म्हणजेच हिंदुत्ववादी राजकारण, ज्याचा पाया या पक्षाची मातृसंस्था असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना आहे, तिचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि हे हिंदू राष्ट्र आहे व ते झाले पाहिजे, या निर्धारानं भाजपची वाटचाल सुरू आहे.

या आठ वर्षांच्या मोदीपर्वानं देशाला काय दिलं आहे, याचं उत्तर हे पुस्तक देतं. ते म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण करीत हिंदू राष्ट्र स्थापनेकडे होणारी वाटचाल आणि त्यामुळे देशातली वाढती अस्वस्थता आणि विषमता, अधिक वेगानं भांडवलशाहीला दिलेली जोरकस चालना आणि त्यामुळे गरिबांचं साधं जगणंही कठीण होणं, माणूस व देश घडविणाऱ्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराकडे केवळ दुर्लक्षच नाही, तर त्यांचं खासगीकरण करण्याचे प्रयत्न करणं आणि स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि मुक्तविचारांचा संकोच करीत एकाधिकारशाही बळकट करणं होय! या चार स्तंभावर मोदीप्रणीत भाजप सरकार उभं आहे. आणि चिंतेची बाब म्हणजे ते अधिक भक्कम होत चाललं आहे.

वैद्यांनी ‘शब्दांचीच शस्त्रे’ पुस्तकात एकूण बारा भागात लेखांची विभागणी केली आहे, ती वरील चार प्रवाहाचे विविध पैलू म्हणले पाहिजेत. धर्म, विवेक, अहिंसा, विषमता, स्वातंत्र्य, आरोग्य, विज्ञान, पर्यावरण, हिंदुत्व, राजकीय, आंतरराष्ट्रीय आणि विविध असे भाग करून निवडक लेख त्या भागात समाविष्ट केले आहेत. या साऱ्यांचा सविस्तर परामर्श प्रस्तावनेत घेणे शक्य नाही, पण काही ठळक मुद्दे, विचार आणि भाष्य याकडे वाचकांचं लक्ष वेधणं व त्यांची मौलिकता, तसेच त्यातल्या काही मर्यादा पण दाखवून देणे माझे कर्तव्य मानून संक्षेपाने मी मांडणी करणार आहे.

प्रथम मी मोदी पर्वाची सर्वांत चिंतेची बाब मानतो त्या ‘धर्म’ आणि ‘हिंदुत्व’ या ‘शब्दांचीच शस्त्रे’ पुस्तकाच्या विभागातील लेखाचा परामर्ष घेणार आहे. पुस्तकातले पहिले दोन लेख ‘दगडांची देवळे आणि विज्ञानाचे देव’ आणि ‘धर्म, विज्ञान आणि बुद्ध’मध्ये वैद्य हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्माचा उदय, विकास, त्यांचे मूलभूत तत्त्वज्ञान व कालौघात शिरलेल्या अनेक अनिष्ट प्रथांची चिकित्सा प्रथम करतात. मग प्रबोधनाचे (रेनेसन्स) नवयुग अवतरले आणि कोपरनिकस, गॅलिलिओ आणि न्यूटनच्या वैज्ञानिक शोधांनी युरोपात वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित झाला, तेव्हा कुठे ख्रिश्चन समाज धर्म परंपरेच्या जोखडातून मुक्त झाला, हे सांगतात. पण ‘मनुस्मृती’ला प्रमाण मानत जातीत विभागलेल्या हिंदू धर्म आणि ‘दीने कामिल’ म्हणजे कुराणातील प्रत्येक शब्द ईश्वरीय आहे असे समजून अंतिम सत्य मानणारा मुस्लिम समाज मात्र आजही खऱ्या अर्थानं आधुनिक व विज्ञाननिष्ठ झाला नाही, त्यामुळे हे दोन धर्मसमूह व त्यांचे देश मागास व अविकसित राहिले, हे वैद्य या तिन्ही धर्माचा इतिहास पुरेशा तपशीलानं कथन करत स्पष्टपणे सांगतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘हिंदुत्व’ भागातील लेख पाहिले तर भाजप व संघ परिवार, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, विवेकानंद, महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर ज्यांचे विचार संघ विचाराविरोधी आहेत, त्यांना ‘अप्रोप्रिएट’ करत आपल्या हिंदुत्ववादी विचारांचा जनसामान्यात बुद्धीभेद व विचारभ्रम करीत कसा हिंदुत्वाचा प्रसार कसा करतो, यावर प्रकाश टाकत त्यांच्या महापुरुष चोरण्याच्या प्रवृत्तीवर जे कठोर प्रहार वैद्य करतात, ते वाचकांना पटण्यासारखे आहेत. पण संघ परिवारास व हिंदुत्ववाद्यांस पंडित नेहरू हा महापुरुष चोरून ‘अ‍ॅप्रोप्रिएट’ करावासा का वाटत नाही, उलट त्यांना सातत्याने का झोडपतात, हे सांगताना पंडित नेहरू म्हणजे समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही व पुरोगामित्व या चार विचारांचे प्रतीक होते व सिद्ध केलेले भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान व नैतिकता पाळणारे होते. या साऱ्या विरुद्ध हिंदुत्ववाद्यांना आधी छुपे पण मोदीपर्वात उघड धर्मयुद्ध पुकारलं आहे, म्हणून त्यांना नेहरू खुपतात, हे फारच समर्पकपणे दाखवून दिले आहे.

नेहरूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टीकोन मानवतावादी, लोकशाहीवादी, विवेकी आणि विज्ञानवादी होता. तसेच वैद्यांच्या मते विविधतेतील एकता सांधणाऱ्या महान भारतीय संस्कृतीला (गंगा-जमनी तहजिबला) टिकवायचं असेल तर धर्मनिरपेक्षता अवश्यक आहे, असे मानणारे पंडित नेहरू होते. संघपरिवाराचे हिंदुत्व या नेहरू विचारांचे ‘अ‍ॅन्टी थिसीस’ आहे, म्हणून मोदीसह सारे भाजपेयी नेहरूंचा एवढा पराकोटीचा तिरस्कार करतात. ‘राष्ट्रप्रेमाची झूल पांघरलेली हिंस्त्र झुंडशाही’ हा लेख तर अंगार बरसणारा आहे व व्यंग, भावोत्कटता, क्षोभ आणि आसुडासारखे फटके लगावणाऱ्या जळजळीत भाषेचे दर्शन घडवणारा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यातील वकिलांसाठी ‘न्यायव्यवस्थेला तुडविणारे निर्लज्ज गुंड’, भाजप खासदार साक्षी महाराजांसाठी ‘बेताल भगवा खासदार’, राजस्थानचा आमदार आहुजांसाठी ‘चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांनाही दिसण्यात लाजवणारा’ अशी वेचक आणि भेदक विशेषणे वापरतात.

जेएनयुमधील कन्हैयाकुमार व इतर तरुण विद्यार्थ्यांना ‘टुकडे टुकडे गँग’चा सदस्य ठरवत देशद्रोही ठरवत राष्ट्रप्रेमाची झूल पांघरणाèया हिंस्त्र झुंडशाहीचं जे दर्शन घडलं होतं, त्याचा समाचार घेणारा हा लेख केवळ चिंतनीय नाही तर भाजप-संघपरिवाराच्या फॅसिस्ट प्रवृत्तीचा पर्दाफाश करणारा आहे. वैद्य या लेखात शेवटी ‘धर्मप्रेम आणि राष्ट्रप्रेम ही आवाहनं बहुसंख्य जनतेला बेभान बनवतात. अगदी समाजकंटकही अशा वेळी धर्म व राष्ट्रप्रेमाची झूल पांघरतात. बेभान समजा विवेकबुद्धी हरवून बसतो’, असं लिहून वाचकांना विचार करायला भाग पाडतात.

भीमा - कोरेगाव प्रकरणी डझनभर विचारवंतांना ‘युपा’ सारख्या दहशतवाद विरोधासाठी निर्माण झालेल्या कायद्याखाली अटक करून संघरूपी मनुवादी विचारांचं खरं स्वरूप कसं उघडं झालं आहे, हे स्पष्ट करणारा लेख घ्या, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचं संघाच्या विजयादशमीच्या वार्षिक सभेत हजेरी लावली तेव्हा हेडगेवार हे सच्चे राष्ट्रपुरुष होते, हे सौजन्यापोटी भेटवहीत लिहिलेल्या विधानाचा वापर करून संघाचा स्वत:ला उजळवण्याचा प्रयत्न विषद करणारा लेख घ्या किंवा संघ कालानुरूप बदलत आहे, अशी जाहिरात मोहन भागवतांच्या २०१८मधील नवी दिल्लीत विज्ञानभवनात केलेल्या तीन भाषणांच्या आधारे संघामार्फत केली जाते, ती किती भ्रामक व बुद्धीभेद करणारी आहे, हे पटवून देताना ‘संघ सूर छेडता, गीत उमटले जुने’ असे काव्यात्मक शीर्षक वैद्य लेखाला देतात आणि निक्षून सांगतात की, संघपरिवाराचा चेहरा बदलू शकतो, पण मेंदू (पक्षी - विचार) बदलू शकत नाही. म्हणून संघ ‘ग्लासनोस्त’ (खुलेपणा) कधीमधी अंगिकारतो, पण ‘पेरिस्ट्रोयका’ (पुनर्रचना)चा प्रश्नच उद्भवत नाही, हा त्यांचा विचार करण्याजोगा आहे. वैद्यांची धारदार तैलबुद्धी वैचारिक एक्स-रे काढीत संघपरिवाराच्या विचाररूपी देहाच्या आतले काळे, प्रतिगामी व इतर धर्मांना कमी लेखणारे हिंदुत्वाचे लपलेले रूप दाखवते. ते प्रत्येकाला पटेलच असे नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

प्रस्तुत पुस्तकातील ‘विषमता’, ‘आरोग्य’ आणि ‘पर्यावरण’ या तीन विभागातील लेखांचे विषय व त्यावरील भाष्य पाहिले की, लेखकाच्या विचारसृष्टीने अवघी मानवता कवेत घेत व त्यांना भेडसावणाऱ्या कळीच्या प्रश्नांचा खास करून सन्मानाने आरोग्यसंपन्न आणि पर्यावरणाशी स्नेह राखीत आनंदाने कसे जगता येईल या प्रश्नांचा अत्यंत पोटतिडकीने विचार करीत आणि समस्येच्या मुळाशी जात, त्याची ऐतिहासिक वाटचाल सविस्तरपणे नोंदवली आहे व आपल्यापरीने त्याची उत्तरही शोधली आहेत. त्यामुळे या तिन्ही भागातील लेख वाचताना वैद्यांचा या प्रश्नांच्या अभ्यास किती सखोल आहे व त्याला करुणा व बंधुतेची समर्पक जोड देऊन जगानं कोणत्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे, याची जी तत्त्वज्ञान आणि विचारधारेच्या परिप्रेक्ष्यात वैचारिक मांडणी त्यांनी केली आहे, त्यानं वाचक अक्षरश: स्तिमीत होतो. वाचकांच्या बुद्धी व विचारावरची ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’तून मिळणाऱ्या चुकीच्या व मुद्दाम पसरवलेल्या माहितीच्या आधारे निर्माण झालेल्या अवैज्ञानिक व अविवेकी अज्ञान व पूर्वग्रहाची काजळी दूर होण्यास मदत होते.

‘विषमता’ विभागातील लेख आणि ‘आंतरराष्ट्रीय’ विभागातील काही लेखांचा एकत्रित विचार करता, सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर आणि चीन व रशियानं भांडवलशाहीची कास धरल्यानंतर सबंध जगात भांडवलशाही आणि बाजाराच्या अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणात प्रभाव वाढला आणि अमेरिकन भांडवलशाही मॉडेल म्हणजे आर्थिक विकासाची गुरुकिल्ली मानून जगातील बहुसंख्य राष्ट्रांनी धोरणे आखली व कृती कार्यक्रम राबवले. पण आज करोना या महामारीच्या २०२० व २०२१ या दोन वर्षांनं व अर्थव्यवस्थेच्या झालेल्या जागतिक पडझडीनं त्यातल्या फोलपणा जाणवून लागला आहे. त्याचं कारण म्हणजे जागतिक विषमतेनं धारण केलेलं अक्राळविक्राळ रूप होय.

‘विषमता’ विभागातील पाचही लेखातून जे चिंतन लेखकानं प्रस्तुत केलं आहे, ते आर्थिक विकासाच्या भांडवलशाही विचारधारेची जशी काळी बाजू दाखवते तशीच साम्यवादी - समाजवादी डावी विचारधारा मूलत: विषमता निर्मूलक असताना मागे का पडली आणि अप्रस्तुत - इर्रिलिव्हंट वाटावी एवढी निस्तेज का झाली, याचं विवेचन पण मूळातूनच वाचण्यासारखं आहे. आजचं जागतिक अर्थकारण हे फॉर दी 1% बाय द 1% अँड ऑफ दी 1%’ आहे, असं वैद्य जोसेफ स्टग्लित्झ या नोबेल विजेत्या अर्थशास्त्राच्या हवाल्यानं सांगत मागील तीस वर्षांत जगातल्या ५० टक्के लोकांच्या उत्पन्नात शून्य टक्के वाढ झाली आहे, तर जगातील १ टक्का लोकांकडे जगातील ९९ टक्के लोकांच्या संपत्तीपेक्षा अधिक संपत्ती आहे, हे विदारक सत्य सातत्याने ‘ऑक्सफॅम’चे वार्षिक अहवाल अधोरेखित करत आहेत, हे वाचकांच्या नजरेस वैद्य आणून देतात.

या विभागातील लेखांची शीषर्क पाहा. ‘ओंगळवाण्या संपत्तीत लोळणारे दरिद्रीजग!’ ‘विषमतेचा शाप घेऊन येणारे जगाचे भविष्य’ आणि ‘भुकेने होरपळणारे आणि श्रीमंतीत लोळणारे जग’. ती वाचकांना खडबडून जागे करणारी आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आर्थिक विषमतेचा विचार करताना पुस्तकाच्या ‘आंतरराष्ट्रीय’ भागातील लेखाच्या वरील लेखासोबत विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. अमेरिकेचा लोकशाही समाजवादी नेता बर्नी सँडर्स या २०१६च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या विचाराचा मागोवा घेत अनिर्बंध भांडवलशाही ही शेवटी आर्थिक विषमतेला कशी जन्म देते, हे अधोरेखित करतात. त्यासाठी सँडर्सनी अमेरिकन लोकांना विचारलेल्या प्रश्नांचा हवाला देतात, ती फारच भेदक आहे. ‘तुम्ही कोणाच्या बाजूचे आहेत? दोन वेळचं अन्न मिळण्यासाठी आणि आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी तडफडणाऱ्या सामान्य माणसांच्या का ज्यांची संपत्तीची हाव कधीच संपत नाही अशा श्रीमंताच्या?’ त्यांचा विचार काय आहे? तो फार साधा, सरळ पण लोकहिताचा आहे, तो म्हणजे ‘जनतेला सन्मानानं जगता यावं यासाठी अन्न, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा भागतील याची शाश्वती शासनाने द्यायला हवी.’

भारतासाठी हा विचार किती अधिक प्रमाणात महत्त्वाचा आहे, हे सांगायची गरज नाही. वैद्यांचा या संदर्भातला ‘जग उजवीकडे घरंगळत चालले आहे का?’ हा लेख विषमतेची मूलभूत चिकित्सा करणारा आहे. त्यांच्या या लेखातले प्रतिपादन चिंतनीय आहे.

‘पर्यावरण’ विभागातील दोन्ही लेखात जागतिक तापमान वाढीचं संकट किती भयानक व विनाशकारी आहे आणि म्हणून जगाचं पर्यावरण कसं राखलं पाहिजे, याचा वैद्य पूर्ण शास्त्रीय माहिती देत उहापोह करतात. जागतिक परिप्रेक्ष्यात विचार करताना २०१५ पॅरिसची पर्यावरण परिषद, जी पर्यावरण बदलाबाबतची ‘लिगली बायंडिंग इंटरनॅशनला ट्रिटी’ म्हणजेच कायदेशीर बंधनकारक असणाऱ्या आंतरराष्ट्रीय करार आहे, त्या निमित्ताने या प्रश्नाचं गांभीर्य योग्य ती आकडेवारी देत विषद करतात. पुढील काहीं दशकांत कोट्यवधी लोक पर्यावरण विस्थापित होतील आणि ते सर्व गरीब तळागाळातलेच लोक असतील, हे निक्षून सांगतात.

वैद्य हे स्वत: नामांकित हृदयरोग तज्ज्ञ आहेत व गेली अनेक वर्षे ‘आरोग्य सेने’मार्फत एक सामाजिक बांधीलकी मानून पूर, भूकंप झालेल्या भागात तातडीनं वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यामुळे ‘आरोग्य’ विभागातले त्यांचे लेख हे भारताच्या आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था व त्याला कारण असलेल्या चुकीच्या आरोग्य धोरणाचा परखड चिकित्सा करणारे झाले आहेत.

यातील नमुनादाखल ‘भारताच्या सार्वजनिक आरोग्याच्या विषमतेचे वास्तव’ या लेखात त्यांनी करोनाच्या उद्रेकामुळे देशावर ओढवलेल्या साथीच्या रोगांच्या संकटाचं कारण म्हणजे आपल्या देशाची दुर्लक्षित व रोगग्रस्त सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असून ती विषमतेने कमालीची ग्रासली आहे, हे सांगताना भारत आरोग्यावर जीडीपीचा जेमतेम १.२५ टक्के खर्च करतो, तर त्या तुलनेत ‘ब्रिक्स’ देशांतला भारतासारखाच विकसनशील असलेला ब्राझील देश ९.२ टक्के खर्च करतो, हे दाखवून देतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

आज भारतीयांना आरोग्यासाठी स्वत:च्या खिशातून एकूण सार्वजनिक खर्चाच्या ६४.२ टक्के खर्च करावा लागतो आणि भारताच्या गरिबीचं हे एक मोठं कारण आहे. त्यामुळे सार्वजनिक व्यवस्थेचे खासगीकरण देशाला परवडणारे नाही, हे या निमित्ताने वैद्य तर्कशुद्धपणे सांगतात. या विभागातले सर्वच लेख त्यांचा आरोग्य विषयाच्या व्यासंगाचे व तर्कशुद्ध प्रतिपादनाचे उत्कृष्ट नमुने आहेत.

वैद्यांच्या काश्मीर व चीन प्रश्न आणि शेतकरी आंदोलनामुळे मागे घेतलेल्या तीन कृषी कायद्याबाबतच्या लेखात जे विवेचन केले आहे, त्यातील वास्तवाशी कोणीही सहमत होऊ शकेल. पण त्यासंदर्भात मोदी सरकारवरची त्यांची टीका ही वस्तुनिष्ठ कमी आणि व्यक्तिनिष्ठ अधिक व विशिष्ट चष्म्याच्या नजरेतून केलेली वाटते. मोदी सरकारच्या धर्माधिष्ठित राजकारणाचा आणि ‘क्रोनी कॅपिटलिज’ धोरणाचा मीही वैद्यांइतकाच प्रखर टीकाकार आहे. पण माझा संरक्षक विषयाचा जो काही थोडाबहुत अभ्यास आहे, तो हे सांगतो की, गलवान घटनेनंतर भारताने तत्परतेने लडाख व एकूणच भारत-चीन सीमेवर सैन्य पाठवून चीनच्या आक्रमकतेला चांगली वेसण घातली आहे व सीमावर्ती भागातील रस्ते, पूल आदी पायाभूत सुविधा जलदगतीनं बऱ्याच प्रमाणात वाढवल्या आहेत.

काश्मीरमधलं कलम ३७० हटवणं हा पण भाजपचा पहिल्यापासूनचा अजेंडा होता व त्यामागे त्यांचं मुस्लीम द्वेषाचं राजकारण होतं, हे जरी मान्य केलं, तरी त्यामुळे भारतापासून अलग होण्याचा पर्याय कधीही उपलब्ध आहे, या काश्मिरी लोकांच्या बनलेल्या मानसिकतेला छेद देण्याचं काम कलम ३७० कलम रद्द करण्यानं झालं आहे, असं काश्मीरचा माझा अभ्यास मला सांगतो. त्यामुळे त्याबाबतची मुस्लिमांवरील अन्याय व एकमेव मुस्लीम बहुत राज्य कमकुवत करत डेमोग्राफिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न, ही टीका मला रास्त वाटत नाही.

तसेच ज्या पद्धतीनं कोविड काळात बुलडोझिंग करत तीन कृषी कायदे मोदींनी संमत करून घेतले, त्यावर माझाही आक्षेप होताच. पण या तीन कृषी कायद्याची आवश्यकता कुठींत झालेल्या शेतीसाठी व शेतकऱ्यांना शेतमालाला वाजवी दाम मिळण्यासाठी होती, यावर बराच काळ चर्चा झाली होती. त्याचा उहापोह केवळ अदानी-अंबानींच्या फायद्यासाठी हे कृषी कायदे आणले एवढ्या पुरता मर्यादित करणे मला उचित वाटत नाही.

शेतकऱ्यांना त्यांच्या पीकांना योग्य दाम मिळाला पाहिजे व शेतकऱ्यांना अधिक मदत सबसिडीमार्फत कशी देता येईल व शेतीचा जीडीपीमधला टक्का कसा वाढेल, यावर पण वैद्यांनी भाष्य आणि दिशादिग्दर्शन केलं असतं, तर योग्य झालं असतं!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

येथे माझे प्रामाणिक मतभेद मी नोंदवले व ते उद्या वैद्यांनी विचार करून मान्य केले तरी आम्ही दोघे काही ‘मोदीभक्त’ होणार नाही. मोदींच्या असहिष्णू, दलित - आदिवासी व अल्पसंख्याक विरोधी धोरणांचा आणि उद्योग नाही तर निवडक उद्योगपती‘स्नेही’ भ्रष्ट धोरणांना असलेला आमचा विरोध कमी होणार नाही.

वैद्यांच्या लेखाचे मथळेही केवळ चमकदार प्रतिमांचे नाहीत, तर ते तेवढे अर्थपूर्ण आहेत. वानगीदाखल त्यांच्या काही लेखांची शीर्षके पाहा. ‘‘आप’चा बाप आणि आमचे ‘आप’’, ‘मोदी सुपरशॉपमधली नवीन वस्तू योग’, ‘विकासाच्या मृगजळाखालील हिंदुत्वाची हिंस्त्र झुंडशाही’, ‘तिमिरात दीपोत्सव विवेकाचा’, ‘भगव्या रंगाखाली चाललेले मृत्यूचे तांडव’.

वैद्यांची भाषाशैली प्रवाही व प्रतिमायुक्त शब्दांनी संपन्न आहे. लेखातल्या विषयाची माहिती व तपशील त्यांच्या व्यासंगीपणाचे द्योतक आहे आणि मुख्य म्हणजे लेखाचा आशय, चिंतन, तत्त्वज्ञान, संदर्भ आणि वर्ण्य प्रश्नावरची लोकशाही, समाजवाद आणि संविधानिक तत्त्वज्ञानाच्या आधारे उपाययोजना सुचवणे हे त्यांच्या लेखांचे खास वैशिष्ट्य आहे. खास म्हणजे या सर्व लेखांमधून त्यांची सामान्य जनांच्या हिताची कळकळ चिंतेबाबतची करुणा आणि दमनकारी, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध - मग ती राजसत्ता असू दे की धर्मसत्ता, त्याबाबतचा सात्त्विक संताप प्रत्ययास येतो.

आजचं अस्वस्थ विषम आणि सामान्यांचं जगणं कठीण करणारं अन्यायी कुरूप जग बदलावं आणि खऱ्या अर्थाने सर्वांना स्वातंत्र्य उपभोगता यावं, समतेचं राज्य यावं, खऱ्या अर्थानं बंधुता प्रस्थापित व्हावी आणि न्याय, कायदा, संविधानिक नैतिकता हा देश - समाजकारणाचा स्थायिभाव व्हावा, ही त्यांची कळकळ आहे. त्यासाठी वैद्यांनी व्यापक जाणीव-जागरूकतेचा या पुस्तकातून जो जागर केला आहे, तो प्रगल्भ लोकशाहीसाठी आवश्यक असणाऱ्या सुजाण नागरिकांना विवेकी, विचारी व विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी साहाय्यकारी होणारा आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......