स्वातंत्र्य आणि समता या दोन आदितत्त्वांच्या सहसंबंधांचा गतिमान आलेख शब्दबद्ध करणारा हा बृहद्ग्रंथ म्हणजे एक असाधारण, मौलिक असे अक्षरलेणे होय
ग्रंथनामा - झलक
अभय टिळक
  • ‘महाराष्ट्राची लोकयात्रा : सामाजिक संघर्ष आणि चळवळी यांचा इतिहास’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 20 January 2023
  • ग्रंथनामा झलक महाराष्ट्राची लोकयात्रा Maharashtrachi Lokyatra सदानंद मोरे Sadanand More सामाजिक चळवळी Social movement समता Equality संत Sant संतपरंपरा Sant Paranpara

महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील ‘Unsung Heroes’ना मानाचा मुजरा करणारे आणि त्यांचे योगदान नेमकेपणाने अधोरेखित करणारे आंतरविद्याशाखीय अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे ‘महाराष्ट्राची लोकयात्रा : सामाजिक संघर्ष आणि चळवळी यांचा इतिहास’ हे पुस्तक नुकतेच सकाळ प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या ग्रंथावर संत ज्ञानेश्वर अध्यासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष आणि अर्थशास्त्र अभ्यासक व विश्लेषक प्रा. अभय टिळक यांनी लिहिलेला हा अभिप्राय....

..................................................................................................................................................................

लोकव्यवहारामध्ये समतेच्या अनुभवास येणाऱ्या सार्वत्रिक आणि सार्वकालिक घाऊक अभावाचे बीजारोपण एका विषम द्वंद्वात आदिम काळापासून झालेले आहे. त्या द्वंद्वाचे रूप विशुद्ध आर्थिक आहे. मानवमात्रांच्या अमर्याद गरजा आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी सर्वतोपरी अपुरी असणारी भौतिक साधनसामग्री हा त्या द्वंद्वाचा गाभा आहे. आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्याचे ज्याचे सामर्थ्य अधिक, तितका स्वतःच्या सुखसमृद्धीचा पैस विस्तारण्याच्या त्याच्या स्वातंत्र्याच्या सीमा अधिक विस्तारक्षम, हे मग ओघाने आलेच.

या क्षमतेचे अथवा सामर्थ्याचे वाटपही निसर्गातच मुदलात समान नसते. आपल्या स्वातंत्र्याच्या कक्षा वर्धिष्णू करण्याची क्षमता अधिक असणाऱ्या व्यक्ती अथवा लोकसमूह आपले साम्राज्य विस्तारण्याचा खटाटोप बळजोरपणे सुरू ठेवतात. या चढाओढीत प्रथम बळी जातो, तो समतेच्या तत्त्वाचा! या विषमतेचे चटके बसणारे समाजघटक, साहजिकच संबंधित विषम व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवतात. परिणामी, मार्क्सच्या मांडणीतील विरोध-विकासाच्या चक्रनेमिक्रमानुसार समग्र लोकव्यवहार उत्क्रांतीच्या मार्गावर गतिमान राहतो.

स्वातंत्र्य आणि समता या दोन आदितत्त्वांच्या सहसंबंधांचा, थेट प्रागैतिहासिक काळापासून भारतीय समाजव्यवहारात साकारत आलेला गतिमान आलेख शब्दबद्ध करणारा ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ हा प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचा बृहद्ग्रंथ म्हणजे एक असाधारण, मौलिक असे अक्षरलेणे होय.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

परंपरेचे कमालीचे सूक्ष्म आणि प्रगल्भ वाचन, औरसचौरस असे साक्षेपी संशोधन, उपलब्ध आधारभूत साधनसाहित्याची चिकित्सक छाननी करण्याची परिपक्व अशी संशोधकीय दृष्टी, ‘समाज’ नावाच्या लोकसंस्थेची निर्मिती, जडणघडण आणि वाटचाल यांतील गाभासूत्र जाणून घेण्याची निरलस जिज्ञासा, परिवर्तन आणि सातत्य यांचा इतिहासाच्या विशाल पटलावर चालू असलेला लपंडाव आस्थेवाईकपणे न्याहाळून, काळाच्या विविध टप्प्यांवर त्यांतून उमलणारे आकृतिबंध आणि त्यांतील साधर्म्य-वैधर्म्य अचूक हेरण्याची मायाळू प्रज्ञा, लोकमानसाला आकार देणाऱ्या नानाविध भल्याबुऱ्या वृत्ती-प्रवृत्तींची त्या-त्या काळातील व्यक्तींच्या तसेच प्रेरणांच्या माध्यमातून अभिव्यक्त होत राहण्याची चिवट प्रकृती, आणि अशा अभिव्यक्तीद्वारे प्रत्येक काळातील लोकजीवनाला लाभत गेलेली गतिमानता संवेदनशीलतेने टिपण्याची बौद्धिक तरलता... अशा अनेकविध क्षमतांच्या प्रा. मोरे यांच्या ठायी साकारलेल्या संगमाचा परिपाक म्हणजे प्रस्तुत ग्रंथ.

वास्तविक पाहता, व्यष्टी तसेच समष्टीच्या ठायी प्रौढ अशी इतिहासदृष्टी विकसित करणे, हे इतिहासाच्या अभ्यासाचे पायाभूत मार्गदर्शक तत्त्व आहे. प्रचलित वर्तमानाचे अंतरंग वस्तुनिष्ठपणे उलगडण्यासाठी अशा इतिहासदृष्टीची निकड असते.

अस्मितांचे कंगोरे कमालीचे टोकदार बनलेल्या आजच्या वर्तमानात, निर्मम स्पर्धेचा माहौल चौफेर नांदताना दिसतो आहे. अशा स्पर्धाळू वातावरणात समतेच्या मूल्याला अवकाश लाभणे दुरपास्त होते. स्पर्धेसाठी का होईना, स्पर्धक ‘जोपासावे’ लागतात, इतपत बंधुतेचाही विसर पडण्याच्या कठीण पर्वामधून वैश्विक समुदायाचे संक्रमण आजघडीला चालू आहे. परिणामी, समतेचे मूल्य प्रचंड वावटळीत सापडल्याचे दुर्धर वर्तमान आपण सगळेच अनुभवत आहोत. मात्र, समतेच्या मूल्याचा सातत्यशील मूल्य ऱ्हास ही केवळ जागतिकीकरणाच्या विद्यमान पर्वातील स्पर्धेच्या झंझावाताची परिणती नव्हे. समतेचे मूल्य प्रस्थापित करण्यासाठी आजवर प्रत्येकच पर्वादरम्यान लढा उभारावा लागलेला आहे. हे भान समाजमनाच्या ठायी चिरस्थायी बनवण्याचे प्रबळ साधन म्हणून या ग्रंथाचे मूल्य अढळ ठरते.

सर्वांगीण विकासाचे एक अंग गणल्या जाणाऱ्या आर्थिक विकासाचा आणि लोकशाही राज्यव्यवस्थेचा असणारा घनिष्ठ आंतरिक संबंध सिद्ध झालेला आहे. तसेच, दुसरीकडे मुक्त बाजारपेठीय व्यवहारांचा पुरस्कार करणारे भांडवलशाहीप्रधान अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास व लोकशाही यांचा सहसंबंधही व्यवहारतः सर्वमान्य ठरला आहे. बाजारपेठीय अर्थकारणाची तळी उचलून धरणारे भांडवलशाहीप्रधान अर्थकारण हे व्यक्तिगत आवडीनिवडी आणि व्यावहारिक ऊर्मी-प्रेरणा यांच्या प्रकटीकरणास उन्मुक्त वाव पुरवते; तर लोकशाही राज्यव्यवहारात सर्वसामान्य नागरिकांच्या आशा-आकांक्षा बहरतात. भांडवलशाहीप्रधान आर्थिक विकास आणि लोकशाही राज्यव्यवहार यांच्या आंतरिक नात्याचा जैविक दुवा हा असा आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मात्र, मुक्त बाजारपेठ म्हणजे अनियंत्रित बाजारपेठ नव्हे. सर्व प्रकारच्या निसर्गदत्त क्षमतांचे आणि भौतिक साधनसामग्रीचे वितरण मुळातच असमान असणाऱ्या समाजव्यवस्थेमध्ये, खुल्या बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे लाभ उठवण्याची क्षमता नसणाऱ्या लोकसमूहांच्या हिताचे संरक्षण-संवर्धन करण्यासाठी राज्यसंस्थेला आवश्यक तिथे हस्तक्षेप करावाच लागतो. आर्थिक विकासाच्या लाभांचे समन्यायी वाटप होण्याची ती जणू पूर्वअटच ठरते. अपुऱ्या बळापायी स्पर्धेमध्ये पिछाडीवर पडणाऱ्या समाजघटकांच्या समांतर विकासाकरिता सक्रिय होण्यासाठीच लोकव्यवहारात बंधुतेच्या तत्त्वाचा परिपोष डोळसपणे घडवून आणावा लागतो.

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन आधुनिक मूल्यांचा लोकशाही राज्यव्यवस्थेच्या गाभ्याशी थेट अनुबंध आहे. या अनुबंधाचा अंकुर बाराव्या शतकापासून ऊर्जस्वल बनलेल्या संतांच्या चळवळीमधून धुमारलेला आहे. हे एरवी सहजासहजी आकलनाच्या कक्षेत न येणारे वास्तव ठळकपणे पृष्ठभागावर आणणे, हे प्रा. मोरे यांच्या या ग्रंथाचे अपूर्वपण होय.

आध्यात्मिक लोकशाहीचा पाया संतांनी रचला, या प्रतिपादनाचा सत्त्वांश आपल्याला सर्वार्थाने आकळलेला असतोच असे नाही. प्रत्येक व्यक्तीचे सार्वभौमत्व मान्य करणे आणि जपणे, हा तर लोकशाहीचा गाभा. विद्यमान युगात व्यक्तीच्या सार्वभौमत्वाला संरक्षक कवच लाभते ते राज्यघटनेचे. आधुनिक लोकशाही व्यवस्थेचा पायरव आसमंतात उमटण्याच्या शक्यताही नसलेल्या काळात संतांच्या चळवळीने प्रत्येक जिवाचे निसर्गदत्त असे स्वायत्त सार्वभौमत्व जोडले ते दृश्य विश्वाचे अधिष्ठान असणाऱ्या विश्वचैतन्याच्या स्वायत्ततेशी. या अजोड कार्यकर्तृत्वाचे तत्त्वदर्शन साकारले ज्ञानदेवांनी; तर त्या प्रक्रियेचे व्यावहारिक दर्शन प्रकटले तुकोबांच्या जीवनसंघर्षाद्वारे!

कुटुंबसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, न्यायसंस्था अशा बहुविध संस्थांवर प्रबळ नियंत्रण राखणाऱ्या धर्मसंस्थेने जीवनाच्या विविध अंगांत रुजलेल्या अधिकारभेदांवर मान्यतेची मोहोर उमटवली होती. समतेचा प्रवाह अवरुद्ध करण्याच्या धर्मसंस्थेच्या या सर्वंकष अधिसत्तेला मध्ययुगात संतांनी आव्हान दिले. त्या संतऊर्मीचेच पाथेय जपत-जोपासत स्वातंत्र्यप्राप्तीच्या संगराला समतेसाठीच्या संघर्षाची जोड एकोणिसाव्या शतकापासून सुधारकाग्रणींनी पुरवली. प्रा. मोरे यांनी या ग्रंथामध्ये चितारलेला हा शब्दालेख सघन अशा आंतरिक समृद्धीची अनुभूती प्रदान करणारा असाच आहे. ‘सत्यशोधक समाजा’ची महात्मा फुलेकृत स्थापना हा समतासंघर्षाच्या त्या पर्वाचा ठरतो पाया; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अजोड परिश्रमांद्वारे साकारलेली ‘भारतीय राज्यघटना’ ही ठरते, त्याच पर्वाची सर्वोच्च परिणती!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गतकालाच्या सम्यक् आकलनाद्वारे कालोचित बोध ग्रहण करण्याबाबत भागवतधर्मी संत आणि सुधारक यांच्या दरम्यानची समरूपता नेमकी हेरण्यात प्रा. मोरे यांच्या प्रस्तुत ग्रंथातील अवघ्या विश्लेषणाची मार्मिकता एकवटलेली आहे. बुरसट, संकुचित आणि विकृत धर्माचरणाद्वारे तत्कालीन मराठी समाजव्यवहारात उदंड माजलेल्या विस्कळीतपणापायी यादवसत्ता अस्तंगत झाली. महाराष्ट्राची भूमी परसत्तेच्या अमलाखाली आली. हे उमगलेल्या संतविचाराने मूल्यपरंपरेतील सत्वांश जागवत समतेची पेरणी आरंभली. एकंदरच समाजव्यवहारावर प्रभाव असणाऱ्या धर्मपरंपरेची सश्रद्ध चिकित्सा हाती घेत संतांनी तिच्यातील गाभ्याचे विस्तारक आणि सर्वसमावेशक उपयोजन प्रवर्तित केले. ज्ञानोबा-तुकोबांच्या पुढ्यात त्या संदर्भात आदर्श होता महर्षी व्यासांचा! भागवतधर्मी संतांनी मशागत केलेल्या समता सिंचित भूमीमधूनच शिवकालात स्वातंत्र्याचे अंकुरण साकारले.

समतेचे अस्तर लाभलेले स्वातंत्र्यच निकोप आणि शाश्वत शाबीत होत असते, हा धडा संतविचारांच्या डोळस आकलनाद्वारे मनीमानसी मुरवलेली लोकहितवादी-फुले-रानडे-शिंदे-शाहू-आंबेडकर ही सारी सुधारकपरंपरा समतासंगरात कशी सक्रिय बनली, याचा विश्लेषक विचारपट विस्तारत प्रा. मोरे तोच धागा डॉ. नरेंद्र दाभोलकरप्रणीत लढ्याशी जोडतात.

‘परंपरेचा अर्थ विस्तारक आणि म्हणूनच सर्वसमावेशक पद्धतीने लावायचा, की संकुचित, विभाजनवादी पद्धतीने?’ हा या सगळ्या वाटचालीदरम्यान सतत पुढ्यात येत राहिलेला कळीचा मुद्दा होय. या दोन्ही प्रवाहांचे समर्थक सर्वच काळातील समाजव्यवहारात आपापल्या परीने आपली भूमिका लावून धरताना दिसतात. न्यायमूर्ती रानडे आणि महषीं शिंदे हे परंपरेच्या सर्वसमावेशक अन्वयार्थाचे समर्थक; तर इतिहासाचार्य राजवाडे आणि चिपळूणकर हे त्याच परंपरेच्या संकुचित स्वीकाराचे पाईक! या दोन भूमिकांमधील संघर्ष मुळात झगडा होय दोन प्रवृत्तींमधील! याच दोन वृत्ती-प्रवृत्तींचे प्रतिनिधी समकालीन लोकव्यवहारात आजही दृष्टोत्पत्तीस पडतात.

महाभारत आणि विशेषतः त्यातील कृष्णनीती हा प्रा. मोरे यांच्या चिरंतन चिंतनाचा प्रांत. लोकसंग्रह आणि लोकयात्रा या दोन तर महाभारतामधील प्राणभूत संकल्पना. ऐहिक-पारलौकिक कल्याणाच्या साधनेद्वारे समाजजीवन निरामय बनायचे असेल तर लोकसंग्रहाद्वारे सामूहिक ऊर्जेचे जागरण-उपयोजन घडून येणे अगत्याचे ठरते. त्यासाठी मुळात समाजपुरुषाची प्रकृती निकोप असावी लागते. स्वातंत्र्य-समता-बंधुता यांची त्रिगुणी मात्रा त्याचसाठी समाजपुरुषाला देणे भाग पडते. हे केवळ एकदाच करून भागणारे काम नसते. अशी लोकसंग्राहक त्रिगुणी मात्रा उगाळत राहण्यासाठी प्रबोधन-परिवर्तनाच्या जोडप्रक्रियांचा पाठपुरावा जारी राखणारी लोकयात्रा गतिमान राखावी लागते. प्रस्तुत ग्रंथाद्वारे प्रकटलेल्या प्रा. मोरे यांच्या अक्षरश्रमांचा सारभूत सांगावा नेमका हाच तर होय!

‘महाराष्ट्राची लोकयात्रा : सामाजिक संघर्ष आणि चळवळी यांचा इतिहास’ - डॉ. सदानंद मोरे

सकाळ प्रकाशन, पुणे | पाने - ७२४ (मोठा आकार) | मूल्य - १२९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......