टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • भाजप, नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विश्वजित राणे, मणिशंकर अय्यर
  • Sat , 18 March 2017
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP नितीन गडकरी Nitin Gadkari देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis विश्वजित राणे Vishwajit Rane मणिशंकर अय्यर Mani Shankar Aiyar

१. भारतीय जनता पक्षाने नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या विजयामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. इतकेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आखणीदेखील केली आहे.

दोन निवडणुकांच्या मधल्या काळात आखणीशिवायही बरंच काही करायचं असतं सत्ताधाऱ्यांनी, याची त्यांना कल्पना असेलच, नाही का? निवडणुकांत यश मिळालं की, आखणीचा छंद जडतो, नशा चढते; सगळं काही त्याच एका दिशेनं, हेतूनं आखलं जायला लागतं. साधी भाषणंही प्रचाराची भाषणं बनून बसतात. पण, २०१९ साली संसदीय पद्धतीने निवडणूक होणार आहे, असं सत्ताधाऱ्यांनी गृहीत धरलंय, हीच एक दिलासादायक बातमी आहे म्हणायची.

.......................................................................................

२. पक्षनेतृत्व गोव्यामध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्याची टीका करत काँग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी आमदारकी आणि पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसकडून आता कोणतीही आशा नसून त्यांनी जनतेचा विश्वासघात केला अशी घणाघाती टीका त्यांनी केली. गुरुवारी गोवा विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव भाजपने जिंकला. ४० जागा असलेल्या विधानसभेत १३ जागांवर विजय मिळवूनही भाजपने छोट्या पक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले. या घडामोडींमुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे.

सगळं काही सत्तेसाठीच करायचं असतं, अशा गैरसमजुतीतून उभ्या राहात चाललेल्या सत्तापिपासू लोकशाहीची फळं आहेत ही. विश्वजीत भाऊ, गोव्यातली त्रिशंकू सरकारं कशी चालतात, कशी फुटतात, कशी बदलतात, याची तुम्हाला अधिक माहिती असायला हवी. अल्पमतातल्या सत्ताधारी पक्षाला जेरीस आणण्याची क्षमता दाखवून प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी दवडलीत, तर लोक काय तुम्हाला आपोआप सत्तेवर बसवणार आहेत का? विसरा जुने दिवस आणि जुनं राजकारण आता.

.......................................................................................

३. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्णविराम दिला. फडणवीस यांनी महाराष्ट्रात आपली ताकद सिद्ध केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नाही, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.

बातमीत उल्लेख नाही, पण जिथे ही घोषणा झाली त्या परिसरातून ‘हुश्शSSS’ असा आवाज आल्याचं सांगतात बुवा प्रत्यक्षदर्शी. त्याच वेळी महाराष्ट्राच्या काही भागांमधून दु:खाचा सुस्काराही ऐकू आल्याचं सांगितलं जातं. खरं खोटं राम जाणे! बोला, मंदिर फिलहाल यही बनायेंगे!!!

.......................................................................................

४. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये प्रचंड बहुमताने विजय मिळवल्यानंतर गुरूवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप खासदारांना नम्रतेचे धडे गिरवण्याचा सल्ला दिला. ‘मुंह के लालों का भी शुक्रिया, जो चुप रहे’, अशा शब्दांत त्यांनी आपल्या बोलघेवड्या मंत्र्यांना टोलाही लगावला. पक्षाच्या विजयामुळे अतिउत्साही होऊ नका, विनम्र राहा, असा सल्ला देत मी स्वत: बसणार नाही आणि कोणाला बसूही देणार नसल्याचा इशाराही त्यांनी खासदारांना दिला.

बॉस असल्याचा फायदा असा असतो की, कोणालाही काहीही सांगता येतं आणि ते आपल्या आचरणातून दाखवून देण्याचं बंधन नसतं. उलट, मी असाच वागणार; तुम्ही असे वागायला स्वत:ला बॉस समजता का, असं दरडावताही येतं. नोटाबंदीसारखे वादग्रस्त निर्णय आणि आधीच्याच सरकारच्या योजनांचं स्मार्ट पॅकेजिंग करून निर्माण केलेल्या काही दिखाऊ, जेमतेम योजना यांच्यापलीकडे या सरकारच्या खात्यात काय आहे दाखवण्याजोगं?

.......................................................................................

५. भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षांची मोट बांधायला घेतली पाहिजे. प्रसंगी विरोधकांच्या या आघाडीचे नेतृत्त्व इतर कोणाकडे देण्याची तयारीही काँग्रेसने दाखवली पाहिजे. देशातील ठराविक लोकांशी संधान बांधून चालणाऱ्या भाजपचा पराभव करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी व्यक्त केले.

मणिशंकरांना ही ज्ञानप्राप्ती आताच झाली की, ते मांडण्याची धैर्यप्राप्ती आताच झाली? शिवाय या सगळ्या निखळ राजकीय मांडण्या झाल्या. भारतीय जनता पक्षाने भारतीय जनतेच्या विचारशक्तीचा ताबा घेण्याचे उद्योग सुरू केले आहेत. त्यासाठी या जनमानसाच्या आशाआकांक्षांचा अभ्यास चालवला आहे, काही अस्मितांवर जाणीवपूर्वक फुंकर घालणं सुरू झालेलं आहे. अशा वेळी या मनोवैज्ञानिक युद्धासाठी काँग्रेससकट एक तरी विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने सक्षम आहे का? ती तयारी नसेल, तर भाजप कितीही मोठ्या आघाडीला एका तडाख्यात भुईसपाट करेल, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

.......................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......