टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे, विनोद तावडे, आशिष शेलार आणि उबर टॅक्सी
  • Thu , 16 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal अण्णा हजारे Anna Hazare विनोद तावडे Vinod Tawde आशिष शेलार Ashish Shelar उबर टॅक्सी Uber Taxi

१. निवडणुकांमध्ये भाजपच्या यशानंतर मतदानयंत्रांमध्ये (व्होटींग मशीन) फेरफार केल्याचा आरोप करून बॅलेट पेपरद्वारे (मतपत्रिकेद्वारे) मतदान घेण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मायावती यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते करत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना कडक शब्दांत सुनावले आहे. जग झपाट्याने प्रगती करत आहे आणि आपण मात्र बॅलेट पेपरची चर्चा करून मागे जाण्याचा विचार करत आहोत, असे हजारे म्हणाले.

अण्णांची अधूनमधून जागृती ही आजकाल पूर्वीपेक्षा अधिक संशयास्पद होऊ लागली आहे. ते ज्या प्रगतीची चर्चा करताहेत, त्या प्रगतीत आपल्यापेक्षा खूप पुढे असलेल्या देशांनीही ईव्हीएमवरून पुन्हा मतपत्रिकेवर जाणं पसंत केलं आहे. ज्या यंत्राचं वापराआधी प्रोग्रामिंग करता येतं, असं कोणतंही यंत्र या देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या राजवटीत अविश्वासार्ह आणि धोकादायकच ठरणार, हे अण्णांना समजत नाही की समजून उमजत नाही?

................................................................................................

२. एकीकडे मुंबईकरांना दैनंदिन जीवनात पुरेशा सुविधांअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना पालिकेची तब्बल ६१ हजार कोटींची रक्कम बँकेत पडून आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. पालिकेने तब्बल ३१ बँकांमध्ये ही रक्कम मुदत ठेवींच्या स्वरूपात ठेवली असून त्यासाठी पालिकेला वर्षाकाठी मिळणाऱ्या व्याजाचा आकडा तब्बल ४५०० कोटींच्या घरात जातो. मुंबईत अनेक सुविधांची वानवा असताना पालिकेने इतके पैसे बँकेत का अडकवून ठेवले आहेत, असा सवाल शेलारांनी विचारला आहे. मुंबईतील १ कोटी २० लाख लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक करदात्याचे ५१,२५० रूपये बँकेत फ्रीझ झाले आहेत. त्यामुळेच भाजपला पारदर्शी कारभार हवाय, असे शेलार यांनी म्हटले आहे.

सर्वप्रथम शेलार यांचं अभिनंदन. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने कुंभकर्णावर मात करून दाखवल्याचं प्रमाणपत्र युनेस्कोकडून येऊ घातलंच असेल. त्यावर नासाचं शिक्कामोर्तब ही निव्वळ औपचारिकताच आहे आता. महानगरपालिकेच्या ठेवी शिवसेनेने काल ठेवल्या का बँकेत? गेली कित्येक वर्षं युतीच्या छताखाली शिवसेनेबरोबर सत्ता ओरपत होतात, तेव्हा ही पारदर्शकता सुचली नव्हती? तेव्हा गाढ झोप लागली असणार ना यांना!!!

................................................................................................

३. आरामदायी, वातानुकूलित कॅबमधून प्रवास करताना सहवासाचे ‘चोरटे’ क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना यापुढे उबरमध्ये तसे करता येणार नाही. उबर कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उबरच्या गाड्यांमधून प्रवास करताना सहप्रवाशाला किंवा चालकाला स्पर्श करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ‘नो सेक्स, नो फ्लर्ट’ अशी भूमिका घेत उबरने प्रवासादरम्यान अशी वर्तणूक करणाऱ्या प्रवाशांना अर्ध्या वाटेत उतरवले जाईल, असा इशारा दिला आहे.

राज्य सरकारने सगळ्या फ्लीट टॅक्सींवर भगवा रंग लावायचा रंग काय घेतला, उबरने तर श्रीराम सेनेचाच अवतार धारण केला. अहो, तुमचं काम समोर रस्त्यावर पाहून टॅक्सी चालवण्याचं आहे. जोवर तुमच्या टॅक्सीत कोणी हनीमूनच साजरा करायला घेत नाही, तोवर कोणी कोणाशी परस्परसंमतीने जवळीक साधली, तर तुमचं काय जातं? अशाने कालीपिलीवाल्यांकडे वळतील हां लोक परत; ते कधीच असल्या संस्कृतीरक्षक अटीफिटी घालत नाहीत. आरसा अॅडजस्ट करतात बस थोडासा!!!

................................................................................................

४. मुंबईच्या महापालिकेत सत्ता अथवा विरोधात बसणार नाही. भाजपचे नगरसेवक पारदर्शक कारभाराचे पहारेकरी म्हणून काम करतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली तरी भाजपच्या ‘पहारेकऱ्यां’ची सत्तेच्या बाकांबद्दलची ओढ कायम आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या निवडणुकीच्या वेळी भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या नगरसेवकांसह सत्ताधारी बाकांवरच बसल्याचे आढळून आले. त्यांच्या मागून आलेल्या सेनेच्या नगरसेवकांना ‘आता आपण कुठे बसायचे’ असा प्रश्न पडला होता.

आता हा प्रश्न घेऊनच पाच वर्षं ढकलायची आहेत मावळ्यांना. या पहारेकऱ्यांना अशीही मालकावरच दमदाटी करण्याची सुसंस्कृत सवय आहे पहिल्यापासून. त्यात आता तर शिवसेनेच्या महापौरपदाचा आणि सत्तेचा सगळा डोलारा आपल्याच मेहेरबानीवर उभा आहे, हे त्यांना माहिती आहे. शिवाय, योग्य वेळी तो खाली खेचून सत्तेवर स्वारही व्हायचं आहे. आता ते लवकरच फुटबॉलमध्ये करतात तसं एकाला एक मार्किंग करून शेजारी बसू लागतील सत्ताधाऱ्यांच्या.

................................................................................................

५. ऐतिहासिक विषयाशी संबंधित असणाऱ्या चित्रपटांच्या निर्मिती करण्याआधी संबंधित घटकांशी बसून चर्चा करायला हवी, त्याशिवाय चित्रपट हे तथ्यांवर आधारित असायला हवे, असं मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

ऐतिहासिक विषयांच्या संदर्भात ‘तथ्यं’ हा शब्द इतका सैलपणे वापरू नये, मंत्रिमहोदय. कोणत्याही विषयासंदर्भात फार फार तर तज्ज्ञांशी चर्चा होऊ शकते. त्यापलीकडचे कोणतेही स्टेकहोल्डर, मग त्या विविध नावांच्या सेना असोत की, राजकीय पक्ष असोत की नुसतेच रिकामटेकडे अभिमानी असोत- त्यांच्याशी चर्चा करण्याचा संबंध काय?‌ आईनस्टाईनवर दूधवाल्याबरोबर चर्चा करून नंतरच विश्वनिर्मितीचा सिद्धान्त मांडायला सांगितल्यासारखं आहे ते. शिवाय ज्या पद्मावती सिनेमाच्या अनुषंगाने तावडे यांनी हे बोधामृत पाजलंय, त्या पद्मावतीची आख्यायिका आहे, इतिहास नव्हे, याची कल्पना दिसत नाहीये त्यांना. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला संरक्षण देण्याच्या जबाबदारीपासून पळ काढण्याचाच हा प्रकार आहे.

................................................................................................

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......