टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राज ठाकरे, विजय शंकर शर्मा, जय मल्हार मालिका, स्टॉप लव्ह अंडर अम्ब्रेला, नोटा आणि एन. लोकेश
  • Fri , 10 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राज ठाकरे Raj Thackeray विजय शंकर शर्मा Vijay Shekhar Sharma जय मल्हार मालिका Jai Malhar TV Serial स्टॉप लव्ह अंडर अम्ब्रेला Stop love under umbrella नोटा Note एन. लोकेश N. Lokesh

१. मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेला मोठी हार पत्करावी लागली. गेली पाच वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जनतेसाठी भरपूर कामे केली. प्रत्येक वेळी मनसेचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या कामी आले परंतु त्यांना निवडून न देता केवळ ज्या लोकांनी पैसा वाटला, त्या लोकांना जनतेनी निवडून दिले.  : मनसेच्या ११व्या वर्धापनदिनी राज ठाकरे

राजसाहेब, असं म्हणतात की जो पडतो, तो अपयशी नसतो; आपण पडल्यानंतर जो अमक्याने ढकललं म्हणून पडलो, असं सांगतो, तो अपयशी असतो. निव्वळ पैशांच्या बळावर निवडणुका जिंकल्या गेल्या असत्या, तर सत्तेत असणारा कोणताही पक्ष कधी खालीच खेचला गेला नसता आणि आधीच्या निवडणुकांमध्ये मनसेला यशही मिळालं नसतं. आधीच्या चुका सुधारून पक्षाचं नवनिर्माण केलं नाही, तर महाराष्ट्राचं नवनिर्माण तुमच्या हातात कधीच सोपवलं जाणार नाही.

…………………………….…………………………….…………………………….

२. नोटाबंदीनंतर देशातल्या अब्जाधीशांच्या यादीतून तब्बल ११ अब्जाधीशांना स्थान गमावावं लागलं असताना पेटीएमचे संस्थापक विजय शंकर शर्मा यांना या अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळाले आहे. शर्मा यांच्याकडे १.५ अब्ज डॉलर संपत्ती आहे, असं हुरुन ग्लोबल रिच या अहवालात म्हटलं आहे. नोटाबंदीमुळे अनेक उद्योग-व्यवसाय डबघाईला आले असले तरी पेटीएम अॅपला मोठी मागणी आली.

ही सगळी जाहिरातीतल्या मॉडेलची कमाल. काही मॅस्कॉट सर्व प्रकारच्या उद्योगांसाठी शुभंकर ठरतात. पेटीएमच्या जाहिरातीत कोण होतं मित्रों? जिओची भरभराट कोणाच्या जाहिरातीमुळे झाली भाईयों औंर बहनों? आता पेटीएमने क्रेडिट कार्डाच्या व्यवहारांवर दोन टक्के शुल्क-आकारणी केली आहे. पुढच्या खेपेला प्रथम क्रमांकावरच्या जिओमालकांना खेटूनच पेटीएममालकही बसलेले आढळणार दुसऱ्या क्रमांकावर.

…………………………….…………………………….…………………………….

३. मनोरंजन वाहिन्यांवर जय मल्हार, गणपती बाप्पा मोरया, सूर्यपुत्र कर्ण, कर्मफलदाता शनी, जय संतोषी माँ, नागीन-२, बालकृष्ण, देवलोक विथ देवदत्त पटनाईक अशा पौराणिक मालमसाल्यावर आधारित मालिकांना मिळणाऱ्या रसिकांच्या पसंतीमुळे वाहिन्यांचे अर्थकारण पुरते बदलून गेले असून या मालिकांसाठी पौराणिक कथा सल्लागारांची मागणीही वाढू लागली आहे. त्याचा थेट फायदा मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागातील पौराणिक कथा-पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला झाला आहे. पौराणिक मालिकांचे लिखाण करताना मूळ कथांची उकल करून सांगण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञांची गरज भासते. ही गरज संस्कृत विभागातील हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी भागवू शकतात हे लक्षात आल्यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहिन्यांकडून कामे मिळू लागली. यामुळे या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला आहे.

काही लोकांच्या पोटापाण्याची सोय झाली, हा आनंदाचाच विषय आहे. मात्र, या मालिका पाहिल्यानंतर त्यांच्या लिखाणाला अशा काही अभ्यासाचा आधार असेल, असं वाटतही नाही. कदाचित आपण मांडतोय ती कथा मूळ पौराणिक कथेशी अजिबातच सुसंगत असता कामा नये, ही खबरदारी घेण्यासाठीच या मंडळींच्या सेवेचा वापर करून घेत असावेत.

…………………………….…………………………….…………………………….

४. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा एन. लोकेश यांनी सोमवारी विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील आर्थिक प्रगतीचा आलेख पाहून अनेक जण अचंबित झाले. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे ऑक्टोबर २०१६ मध्ये एन. लोकेश यांची संपत्ती अवघी १४.५० कोटी इतकी होती. मात्र, केवळ पाच महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांच्या संपत्तीचा आकडा थेट ३३० कोटींवर जाऊन पोहचला आहे.

अहो, भलत्या शंका कसल्या काढताय? साक्षात हनुमंताचा आशीर्वाद आहे हा. नमस्कार करा भक्तिभावाने. समर्थ रामदासांनी 'कोटीच्या कोटी उड्डाणे' असं लिहिलंय ते याच जमातीसाठी. यांच्या प्रगतीच्या 'गतीसी तुळणा नसे,' असंही म्हणून ठेवलंय समर्थांनी ते काय उगाच!

…………………………….…………………………….…………………………….

५. केरळमधील कोची येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करत मरीन ड्राइव्ह येथे बसलेल्या प्रेमीयुगुलांना हुसकावून लावले. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस आणि माध्यमांसमोर घडला. शिवसेनेची दादागिरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस उपनिरीक्षकला तत्काळ निलंबित करण्यात आले असून आठ पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांच्या हातात ‘स्टॉप लव्ह अंडर अम्ब्रेला’ असे फलक होते. व्हॅलेंटाइन डेला कोल्लम येथील अजहीक्कल बिचवर अशा प्रकारचा त्रास झाल्याने दोन युवकांनी आत्महत्या केली होती.

अरेच्चा, कोचीत काही वेगळीच शिवसेना आहे की काय? की अजून तिथे युवराजांची फेरी झालेली नाही आणि युवासेनेची स्थापना झालेली नाही? तिथले शिवसेनेचे कार्यकर्ते अजून बजरंगी मानसिकतेत कसे? बाकी छत्रीखाली प्रेम करायला या मंडळींची काय हरकत आहे, देव जाणे! कदाचित या फ्रस्ट्रेटेड आंबटशौकिनांना नीट दिसत नसेल ना सगळं लांबून.

…………………………….…………………………….…………………………….

६. होळी खेळताना खिसापाकीट नीट जपा; खिशात नोटा तर अजिबात ठेवू नका, कारण पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटांवर होळीचा रंग लागल्यास बँक त्या नोटा स्वीकारणार नाही. होळीच्या रंगात रंगलेल्या नोटा फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातच जमा करता येणार आहेत.

आधीच होळीच्या स्वस्त रंगात रंगल्यासारख्या दिसणाऱ्या या बटबटीत नोटांना आणखी रंग लागायला जागा आहे? आधीच रंगपंचमीतूनच काढल्यासारख्या दिसणाऱ्या या नोटांवर नवा रंग लागला, तर बँक कर्मचाऱ्यांना ते समजू तरी शकेल का?

…………………………….…………………………….…………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......