‘गनीम’ : आपल्या जगण्याच्या पद्धतीला, मोठेपणाच्या गर्वाला, परंपरागत विषमतावादी मूल्ये रुजवणाऱ्या मिथकांना उघडा पाडणारा संग्रह
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • गनीम’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Sat , 28 May 2022
  • ग्रंथनामा शिफारस गनीम Ganeem उत्तम अंभोरे Uttam Ambhore आंबेडकरवाद Ambedkarvaad

‘वाद’ ही तत्त्वज्ञानातील एक संकल्पना आहे. राष्ट्रवाद, जीवनवाद, कलावाद, मानवतावाद, हा जसा एक विचार आहे, तसंच मानवमुक्ती, समता व विश्वबंधुत्व, जाती-धर्मविरहीत माणूस म्हणून जगण्याचा मार्ग म्हणून आंबेडकरवादा\विचारधारेकडे पाहिले जाते. ‘आंबेडरवाद’ ही संकल्पना मानवी मूल्यांच्या पेरणीतून उदयास आली आहे. ही तात्त्विक संकल्पना ललितसाहित्यातून व्यक्त करणे अतिशय कठीण काम आहे. पण ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले कवी डॉ.उत्तम अंभोरे यांनी ‘गनीम’ या कवितासंग्रहाच्या निमित्ताने यशस्वी व जबाबदारीने केले आहे.

यापूर्वी अंभोरे यांचे ‘पत्ता बदलत जाणारा गनीम’ व ‘धगीवरची अक्षरं’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. प्रस्तुत ‘गनीम’ या त्यांचा तिसरा संग्रह. मानवीमुक्तीच्या विचाराला शिरोधार्य मानणारी, कुठल्याही अंधविश्वासाला, श्रद्धेला बळी न पडता विवेकबुद्धीचे सतेज ज्ञान समाजात प्रवाहीत करणारी, स्वयंप्रकाशित होण्यासाठी मर्म सांगणारी ही कविता आहे. मनोगतात अंभोरे म्हणतात, “जे वाटतं ते सगळे शब्दांत बांधता येत नाही. काव्यात बांधण्याची कदाचित माझ्यात कुवतही नाही. पण जेवढं कळतं, तेवढंसुद्धा सांगणं महत्त्वाचं वाटले म्हणून हा प्रयत्न! यातील बऱ्याचशा कविता स्वपरीक्षणाच्या, टोकदार वास्तवाच्या नि ढोंगीपणाचे बुरखे फाडणाऱ्या दिसतील. जे आहे, जे कळलं ते मांडत गेलो. स्वतःशीही भांडत गेलो.”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हा संग्रह मुखपृष्ठापासून आकर्षित करतो. पहिलं पान उघडताच एक वाक्य येतं- ‘मी माझीच कविता दुरुस्त करीत चालतो’. या वाक्याचे अनेक अन्वयार्थ मनाला स्पर्शून जातात. अजून थोडं आपण पुढे गेलो की, कवी-समीक्षक अर्जुन डांगळे यांची प्रस्तावना संग्रहाचा अर्क सांगते.

हा कवितासंग्रह पाच भागांत विभागलेला आहे. एकूण शंभर कविता या संग्रहात आहेत. वीस वीस कवितांचे पाच भाग या अर्थानं ही संख्यात्मक विभागणी केली नाही, तर ‘प रि व र्त न’ या पाच अक्षरांच्या अवकाशात सर्व कविता सामावलेल्या आहेत. काळानुरूप आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे, परंपरागत चौकटीत तयार झालेली मिथकं तपासून घेतली पाहिजेत, ही कवीची इच्छा आहे. कवितांची शीर्षकंही या अर्थानं बोलकी आहेत. ‘कविता अपरिहार्यतेच्या’, ‘अन्वयार्थ’, ‘लखलाभ’, ‘गद्दार’, ‘संभ्रमित’, ‘चळवळ : कालची आजची’, ‘अकलेच्या चड्डीचं बक्कल तुटलेल्या बुद्धीवादी’, ‘मेंदूला नाल जिभेला लगाम’, ‘समरसता’, ‘मूक इशारा’, ‘इरादा’, ‘होपलेस’, ‘रिॲक्शन कविता : भारतरत्न’... या नावातच सूचकत्व आहे.

प्रस्तावनेत डांगळे म्हणतात, ‘गनीम म्हणजे मानवमुक्तीच्या लढ्यात खोडा घालणाऱ्या प्रवृत्ती होत. असे तत्त्वज्ञान, अशा संघटना आणि त्यांची कृती ही ‘फॅसिझम’कडे झुकणारी असते. या गनिमाचा प्रतिकार करावयाचा असेल तर या गनिमाचे नेमके स्वरूप काय आहे, हे ओळखायला हवे आणि त्याबाबतची परिपूर्ण समज अंभोरे यांच्या कवितेला आहे.”

कवीला याची जान आणि भान आहे, म्हणून ते लिहितो-

“आता थोडं सावध व्हायलाच हवं

पाठीशी उभं असणारावर नि

पाठीवरून हात फिरवणाऱ्यावरही शंका घ्यायला हवी”

कारण शत्रू नव्या रूपात वावरतोय. आपण शत्रूच्या छावण्यांची पुराण ठिकाणं तीच तीच समजून आपल्याच पायावर आपण दगड मारून घेत आहेत. ‘हे रस्ते, जमीन, इमारत, झाडे, पानं, फुले आपलीच आहेत असं पिंजऱ्यात राहून फक्त हो हो म्हणायचं’ ही हवा पालटलेली लोकशाही आहे. हे कळत असूनही जर तुम्हाला कुणालाही न दुखवता मोठेपणाचं तत्व बाळगत असाल तर कवी म्हणतो-

‘तुम्हाला लखलाभ

फुल्यांच्या घोषणेतच अडकायचं असेल तर

तुम्हाला लखलाभ

भीमाच्या पुण्याईतच मानायची असेल कमाई

तर तुम्हाला लखलाभ’

गावाबाहेर आणि गावातच व्यथांचे डोंगर उभे असताना तुम्ही बुद्ध, फुले आंबेडकरांचा पीर करण्यात धन्यता मानत असाल, तर हे जगणं तुम्हालाच लखलाभ असो, असं कवी चिडून म्हणतो. पेटणारी वणवा आणि जळणारी पायवाट यांचा आपला काय संबंध आहे, असं वाटत असेल तर ‘आता आपलं चांगभलं’ असं कवी उपहासानं म्हणतो.

आज आपण एका अनाकलनीय व्यवस्थेतून वाटचाल करत आहोत आणि आपले नेते, वक्ते, समाजसुधारक, जनता या चक्रात सहज अडकले जात आहेत, ही भीती कवीला वाटते आहे. म्हणून तो उपहासानं, तर कधी उपरोधानं चिमटा काढतो. ‘वक्तापुरता वक्ता नि कालचाच तक्ता’ या कवितेत कवी म्हणतो- शत्रू नेहमीच चांगला बोलतो. आपला इतिहास, संघर्षमय गाथा शब्दाशब्दात रंगवतो. तोंडपाठ बोलणे हा त्यांचा धंदा आहे, पण वांधा आपला होतो.

‘करायचेच असेल क्रांतिपुरुषांना

बाबा

अवतारीपुरुष'

तर ते

गुलाल-नारळ फोडतील’

असे मतलबी समाजवादी कवींना सगळीकडेच दिसतात. भाजप, काँग्रेस, लाल निशाण किंवा कुठलाही गामी-आगामी-पुरोगामी-प्रतिगामी सर्वत्र याचा संचार असतो. यास आजचे विचारवंतही अपवाद नाहीत असं कवीला वाटतं. कुठल्याच दावणीला विरोध न करणारे आपण ‘जरीला’ झालोय ही खंत कवीला आहे.

‘डोळ्याला झापड

मेंदूला नाल

जिभेला लगाम

लावणं जमलं की

सारंच सुजलाम सुफलाम होतं’

सावल्या सावल्यांनीच जगायचं म्हटल्यावर उन्हात पाय कुणी ठेवायचा? चौकटी कुणी मोडायच्या, हरवलेल्या वाटा कुणी शोधायच्या? असा प्रश्न कवी विचारतो. ‘सावल्या सावल्यातच बा गेला असता, तर त्याचा बाबासाहेब झाला असता का?’ हा प्रश्न तर आपल्या मेंदूत घुसळण करून जातो.

आपणास प्रश्न पडले पाहिजे. व्यवस्थेनं लादलेल्या संकल्पना तपासून घेता आले पाहिजे. त्याचा अन्वयार्थ लावता आला पाहिजे, ही कवीची भूमिका आहे.

‘ज्ञानेशाची समाधी

तुकयाचं अवकाशगमन

चोख्याचं भिंतीखाली मरण

याचं हनन त्यांचं नमन’

याचे काय काय अर्थ असतील? हा प्रश्न कवीला सतावतो. जुनी परंपरा, चौकट शाबुत ठेवण्यासाठी नव्या रूपात, नव्या ढंगात आपल्या समोर आणले जात आहे. सातत्यानं एखादी गोष्ट खोटी, चुकीची सांगितली गेली, तर ती खरी वाटायला लागते. आपणास त्या गोष्टीची सवयच होऊन जाते. पण विवेकभान असणाऱ्यांनी ती तपासून घेतली पाहिजे, वेळप्रसंगी बंडाची गर्जना करून त्यावर प्रहार केला पाहिजे, म्हणून कवी म्हणतो-

‘नेहमी नेहमी

त्याच त्याच गोष्टी

सांगण्याची नि ऐकण्याची

सवयच झालीये आपल्याला

आता आपले कान कापले पाहिजेत नि

सांगणाराचे तोंड फोडले पाहिजे!’

पण व्यवस्था एवढी कुटील आहे की, आपण त्यांनी केलेल्या मोठेपणाला, दिलेल्या सन्मानाला बळी पडतो. ही व्यवस्थेची एक चाल असते, म्हणून कवी इ.स.पूर्व काळापासून संदर्भ देत आपल्या डोळ्यात अंजन घालतो. म्हणतो-

‘तसं त्यांचं हे गणित नवं नाही

बुद्धालाही त्यांनी असंच

अवतार चक्राचं लेबल दिलं

तुकारामाचं गोलमटोल आध्यात्मिकीकरण

राजा शिवाजीचं गोब्राह्मण प्रतिपालकत्व

नि

भारतरत्न

यात तसा

थोड्या फार फरकानेही फरक वाटत नाही

त्यांचे मोठेपच बहाल करण्याची पद्धतच

आता पटत नाही!’

आज तर या रत्नमालेत ‘लिंबू-टिंबू-लोंबडे-चोंबडे’ या रांगेत बसवून ‘रत्न’ची हवाच काढून घेतली. त्यामुळे ‘रत्न’पणाच्या गर्वानं वागण्यात काही अर्थ नाही, असं कवीला वाटतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

कवी जसा आपणास व्यवस्थेतील कुटील चाली उलगडून दाखवतो, तसे तो आम्ही जागरूक झालोय, हे प्रस्थापितांना आणि विषमतावाद्यांना प्रतिमांच्या भाषेत सांगतो-

‘तहान भागविण्याची कला

कावळे शिकलेत

खडे उचलून उचलून घामाघूम होण्यापेक्षा

पाण्याचाच नवा साठा शोधण्याच्या गोष्टी ते

कोवळ्या कावळ्याला शिकविताहेत’

अनेक मिथकांना कवीने दिलेलं उत्तर विचार करायला भाग पाडतं.

थोडक्यात, हा संग्रह आपल्या जगण्याच्या पद्धतीला, मोठेपणाच्या गर्वाला, परंपरागत विषमतावादी मूल्यं रुजवणाऱ्या मिथकांना उघडा पाडतो. आणि कविता बुद्ध, कबीर, फुले, मार्क्स, आंबेडकर यांची पायवाट रुजवतो.

‘गनीम’ - उत्तम अंभोरे

सौरव प्रकाशन, औरंगाबाद

पाने – २०८

मूल्य – २२० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते मराठीचे प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......