टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मुकेश अंबानी, सीआयए, नीतिन गडकरी, कार्ती चिदंबरम आणि मुंबई महानगरपालिका
  • Wed , 08 March 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या मुकेश अंबानी Mukesh Ambani मुंबई महानगरपालिका Mumbai Mahanagar Palika कार्ती चिदंबरम Karti Chidambaram नीतिन गडकरी Nitin Gadkari सीआयए CIA

१. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला कसलाही फटका बसलेला नाही, असा केंद्र सरकारचा दावा असला तरी गोरगरिंबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच तिचा फटका बसला आहे. एका अहवालानुसार नोटाबंदीमुळे देशातील अब्जाधीशांची संख्या घटली आहे. हुरन ग्लोबल रिच या आंतरराष्ट्रीय संस्थेने देशातील अब्जाधीशांची यादी तयार केली आहे. नोटाबंदीमुळे संपत्तीत घट झाल्याने आधीच्या यादीतील ११ अब्जाधीशांना यंदा अब्जाधीशांचा यादीत स्थान मिळवता आलेले नाही. मात्र, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे अव्वल स्थान कायम आहे.

अहो, ११ जणांचं काय घेऊन बसलात, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मुकेसभाय पहिल्या नंबरवर आहेत ना, मग झालं… सगळी त्यांची दुकानं आहेत… त्यांना धक्का लागला तर ते हे दुकान बंद करून नवीन उघडतील, 'जिओ और जीने दो' असं काही नाहीये त्यांच्याकडे.

……………………………………….……………………………………….

२. अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) नागरिकांचे व्हॉटसअॅप मेसेज हॅक करते, असा खळबळजनक गौप्यस्फोट विकिलीक्सने केला आहे. विकिलीक्सने यासंदर्भातील काही कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. सीआयए एका अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीच्या स्मार्टफोनमधील माहिती चोरत असल्याचे म्हटले आहे. एखाद्याचा स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, संगणक किंवा राऊटर इंटरनेटला जोडलेला असल्यास सीआयए त्यांच्याकडे असलेल्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने यामधील माहिती पाहू शकते.

सीआयएने खरं तर हा उपक्रम भारतात राबवायला पाहिजे. कोणीतरी आपल्या मजकुरावर लक्ष ठेवून आहे म्हटल्यावर अनेक ट्रोलभैरवांचा आचरटपणा आटोक्यात येईल. अर्थात, ‘जे1 झालं का’, छापाच्या विचारणा, ‘गुडमॉर्निंग, गुडनाइट’चे बावळट मेसेज आणि नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील यांच्यापासून आइनस्टाइन, ओबामापर्यंत विविध नामवंतांच्या नावावर खपवलेले सखाराम गटणे छापाचे सुविचार वाचून सीआयएचे अधिकारी वेडे होतील, असा जो धोका आहे, तो पत्करायला हवा.

……………………………………….……………………………………….

३. केंद्रीय रस्ते महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी धडाकेबाज काम करतात. त्यांच्या धाडसी निर्णयक्षमतेने देश दिवसाला २२ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधतो आहे, अशी स्तुतिसुमने उधळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणाले, ‘घोषणा मी करतो, पण त्याचे श्रेय गडकरींचे असते.’ गुजरातमधील एका पुलाच्या लोकार्पणाच्या वेळी मोदी म्हणाले, नितीनजी ज्या पद्धतीने काम करतात, त्यामुळेच हे भव्य दिव्य काम होऊ शकले. मनमोहनसिंग सरकारच्या काळामध्ये दिवसाला फक्त दोन किलोमीटरचे महामार्ग बांधले जायचे. पण गडकरींनी धक्के देऊन ते प्रमाण प्रतिदिन २२ किलोमीटरवर आणले आहे. त्यांची कल्पकता अचाट आहे. कारण ते तुकड्यातुकड्यांमध्ये विचार करीत नाहीत.

क्षणभर नितीन गडकरी स्वत:च थापी घेऊन सिमेंट थापतायत किंवा रोड रोलर चालवतायत (रस्ता चपटा झाल्याशिवाय राहील का), असं चित्र डोळ्यांसमोर आलं ना? यानिमित्ताने मोदी यांना अमित शाह यांच्यापलीकडे फार फार तर दोनचार चेहरे लक्षात आहेत आपल्या पक्षातले, असं जे वाटत होतं, ते खोटं निघालं याचा आनंद आहे. त्यांना आपला प्रतिस्पर्धी ठरू शकेल असा एक अख्खा मंत्री ठाऊक आहे, त्याचं खातंही ठाऊक आहे आणि तोही काही काम करतो, याची कल्पना आहे, हे समजल्याने नितीनभौंनीही हरखून संत्राबर्फीचे दोन तुकडे जास्त टाकले असतील तोंडात.

……………………………………….……………………………………….

४. मुंबईच्या महापौरपदासाठी होणाऱ्या निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा विजय पक्का समजून भाजपपुढे शक्तिप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने ‘मातोश्री’ने तयारी केली आहे. पालिका मुख्यालयात येणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ शिवसैनिक आणि युवासैनिकांना पारंपरिक भगव्या वेशात गाड्यांमधून येण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

फार भयंकर भव्यदिव्य विजय मिळवला असता, तरीही असली गावंढळ शक्तिप्रदर्शनं करण्याऐवजी काही कामाच्या गोष्टी करायला हव्या होत्या. इथे तर भाजपने तोंडाला फेस आणून नंतर हा तुकडा फेकला आहे. त्याच भाजपपुढे बेटकुळ्या काढून दाखवायच्या म्हणजे रुग्णात काडीमात्र सुधारणा नसल्याचंच लक्षण. पण, तशी अपेक्षा ठेवणंच व्यर्थ होतं, नाही का?

……………………………………….……………………………………….

५. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी काँग्रेस म्हणजे ‘फॅमिली पॉपर्टी’ (कौटुंबिक मालमत्ता) असल्याचे वक्तव्य केले आहे. फक्त काँग्रेसच नव्हे तर देशातील बहुतांश सर्वच पक्षात घराणेशाहीचे वर्चस्व असल्याचे त्यांनी म्हटले. या घराणेशाहीमुळे नव्या पिढीतील नेत्यांना दरवाजेच बंद झाल्याचे सांगत देशात सध्या नव्या राजकीय पक्षाला मोठा वाव असल्याचेही ते म्हणाले. ‘जनरेशन ६७’ नावाच्या संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कार्ती यांनी आपली भूमिका मांडली. कार्ती हेच या संघटनेचे संस्थापक आहेत.

फारच नमुनेदार बातमी आहे ही. कार्ती यांची स्वत:ची ओळख काय, तर पी. चिदंबरम यांचा मुलगा, ही. तुम्ही घराणेशाहीच्या गप्पा कशा काय मारू शकता? पक्षस्थापनेपासून तुम्हाला कोणी अडवलंय का? फक्त तो पक्षही चिदंबरम यांच्या मुलाचा पक्ष म्हणून ओळखला जाणार, याचं भान ठेवा.

………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......