देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे आद्य प्रवर्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! परंतु हिंदू महासभा, गीता प्रेस परिवार यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारप्रवाह रा.स्व. संघाच्याही आधीपासून सक्रिय होता!
ग्रंथनामा - झलक
प्रमोद मुजुमदार
  • ‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ या पुस्तकाचे मुखृष्ठ
  • Wed , 20 April 2022
  • ग्रंथनामा झलक हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा Hindutvavadi Rajkarnachya Paulkhuna हिंदू इंडिया Hindu Indiya प्रमोद मुजुमदार Pramod Mujumdar गीता प्रेस ॲण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया Gita Press and the Making of Hindu India अक्षया मुकुल Akshaya Mukul हिंदू राष्ट्र Hindu Rashtra

‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ हे प्रमोद मुजुमदार यांचे पुस्तक नुकतेच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झाले आहे. भारत एक हिंदूराष्ट्र आहे असे गृहीत धरून हिंदुत्ववादी प्रवाह आपली सर्व राजकीय धोरणे आखत आहे. त्यासाठी एक व्यापक गुंतागुंतीची, विविध पातळीवर कार्यरत असलेली हिंदुत्ववादी संघटनांची वीण निर्माण करण्यात आली आहे. त्यांचा प्रभावी वापर करत एक समांतर राजकीय सत्ताकेंद्र उभे केले गेले आहे. त्याची साधार चिकित्सा करणाऱ्या या पुस्तकाला लेखकाने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

साधारण दोन वर्षांपूर्वी एका स्नेह्यांनी अक्षया मुकुल यांचा ‘गीता प्रेस ॲण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ हा हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया यांनी प्रसिद्ध केलेला इंग्रजी ग्रंथ दिला. हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचा आलेख मांडणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. भारताच्या सामाजिक-राजकीय इतिहासाचा विचार केला, तर १८५७च्या ब्रिटिशविरोधी उठावापासून स्वातंत्र्य चळवळीचा आरंभ झाला असे म्हणता येते. जागतिक पातळीवर बदलत्या आधुनिक राजकीय-सामाजिक विचारांचा प्रभाव याच काळात भारतात दिसू लागला. स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या समाजरचना या जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त झाल्या होत्या. याच उदारमतवादी लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या काँग्रेसची १८८५ साली भारतात स्थापना झाली. विसाव्या शतकाच्या पहिल्या-दुसऱ्या दशकात गांधीवाद, समाजवाद आणि मार्क्सवाद अशा आधुनिक राजकीय विचारसरणी देशात प्रभावी होत गेल्या. त्याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती-वर्णाच्या अमानुष जोखडाखाली भरडल्या जाणाऱ्या दलितांचा एल्गार पुकारला. या आधुनिक, समतावादी आणि सर्वसमावेशक विचारप्रणाली भारतात रुजत असतानाच देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाह राजकीयदृष्ट्या संघटित होत गेला.

हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या बांधणीसाठी ‘गीता प्रेस’ने सुमारे १०० वर्षे सातत्याने चिकाटीने केलेले काम नक्कीच नोंद घेण्यासारखे आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या कालखंडात आणि स्वातंत्र्यानंतर पहिली ३०-३५ वर्षे राजकीय परिस्थिती अनुकूल नसताना गीता प्रेसने भारतातील सर्व हिंदुत्ववादी विचारप्रवाह एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य केले. तुम्ही त्या विचारप्रवाहाचे समर्थक असा वा विरोधक, त्यांच्या या चिकाटीची दखल घ्यायलाच हवी. गीता प्रेसचे संस्थापक हनुमानप्रसाद पोद्दार आणि जयदयाल गोयंका यांनी मिशनरी वृत्तीने केलेल्या प्रयत्नांची आणि दूरदृष्टीची दखल घेणे अपरिहार्य ठरते!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

देशातील बहुसंख्य तरुण-तरुणींना आणि मध्यमवर्गाला (मुख्यत: उच्च आणि मध्यम जातींमधील समाज समूह) आज या हिंदुत्ववादी विचारप्रवाहाने दिलेली ‘आम्ही हिंदू’ ही अस्मिता आपली वाटत आहे. ‘आम्ही’ (म्हणजे हिंदू) आणि विरुद्ध ‘ते’ (म्हणजे मुस्लीम) हा युक्तिवाद म्हणजे प्रभावी ‘राजकीय तत्त्वज्ञान’ वाटत आहे. ते तत्त्वज्ञान आपले वाटत आहे! या हिंदुत्ववादी अस्मितेबाबत सहानुभूती असणाऱ्या लोकांशी कोणताही अर्थपूर्ण राजकीय संवाद करण्यासाठी हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांतील ही वाटचाल समजून घ्यायला हवी.

गेली अनेक वर्षे डाव्या चळवळीत काम करताना आणि विशेषत: हिंदू-मुस्लीम सलोख्याच्या प्रश्नावर काम करताना गीता प्रेसविषयी थोडेफार ऐकले होते. परंतु ‘कल्याण’ मासिक किंवा गीता प्रेसची अन्य प्रकाशने कधीच पाहण्यात आली नव्हती. त्यांच्या ऐतिहासिक कामाची माहिती तर दूरची गोष्ट. अगदी रा.स्व. संघाशी संबंधित मित्रपरिवारातही गीता प्रेसच्या कामाबद्दल फारशी चर्चा होत नसे. डाव्या आणि पुरोगामी चळवळीतील माझ्या अनेक सहकाऱ्यांनाही गीता प्रेसबद्दल अशीच जुजबी माहिती होती. डाव्या, पुरोगामी चळवळीतील विचारप्रवाहाने हिंदुत्ववादी विचारप्रणालीला पुरेसे महत्त्वच दिले नाही. या विचारप्रवाहाची जडणघडण कशी होत गेली, त्याचा पाया कसा आणि का विस्तारत गेला, संघटनात्मक बांधणी कशी झाली, याचे वस्तुनिष्ठ आकलन डाव्या, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आणि पाठिराख्यांना पुरेसे नाही. याचा अर्थ त्यांना हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या तात्त्विक भूमिकेचे आकलन नाही, असे अजिबात नाही.

सनातन वर्णाधिष्ठित, जातिबद्ध हिंदुत्ववादी तत्त्वज्ञान कसे विषमता जोपासणारे, अमानुष तत्वज्ञान आहे, याचे अचूक तात्त्विक विश्लेषण महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून डाव्या-पुरोगामी चळवळीतील अनेक विचारवंतांनी केले आहे. हिंदुत्ववादी विचारप्रवाहाने घेतलेल्या राजकीय भूमिकांचा डाव्या पुरोगामी विचारप्रवाहाने वेळोवेळी अतिशय प्रभावी प्रतिवाद केलेला आहे. सर्वसाधारणपणे डाव्या-पुरोगामी चळवळीतील प्रत्येकालाच त्याचे उत्तम राजकीय भान असते. मात्र व्यावहारिक पातळीवर हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची वाटचाल कशी होत गेली, त्याचे अंतर्गत चलनवलन, सत्ताधारी वर्गाशी असलेले संधीसाधू लवचीक नाते, याचे फारसे आकलन नसते. या पार्श्वभूमीवर अक्षया मुकुल यांचा ग्रंथ खूपच नवीन दृष्टी देतो.

हे पुस्तक आशय-विषयाचा गाभा कायम ठेऊन संक्षिप्त स्वरूपात यावे, असा अनेकांनी आग्रह केला. त्यासाठी पूर्वतयारी करत असताना चळवळीतील सहकारी प्रा.अंजली मायदेव--आंबेडकर यांनी ‘प्रबुद्ध भारत’ या पाक्षिकात या पुस्तकावर आधारित लेखमाला सुरू करावी असा आग्रह धरला. त्यानुसार एप्रिल २०२०पासून या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पाक्षिकात एक वर्षभर ‘मेकिंग ऑफ हिंद राष्ट्र’ या शीर्षकाने लेख मालिका लिहिली. या लेखमालेला चांगला प्रतिसाद मिळाला. वाचकांना ही माहिती पूर्णपणे नवीन होती. या प्रतिसादमुळे या पुस्तकाच्या कामाला गती मिळाली.

वास्तविक हा संपूर्ण ग्रंथ मराठीत आणणे आवश्यक आहे. मूळ ग्रंथाचे लेखक अक्षया मुकुल यांनीही तशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या या संशोधनाला नक्कीच ऐतिहासिक मोल आहे. परंतु ५३९ पानांचा हा मूळ ग्रंथ मराठीत आणणे हा मोठा प्रकल्प असेल. म्हणूनच या ग्रंथाचा मध्यवर्ती आधार घेत ही संक्षिप्त मांडणी केली आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

२.

‘गीता प्रेस अॅण्ड द मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ हा अक्षया मुकुल यांचा संशोधित ग्रंथ आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘गीता प्रेसने देशातील हिंदुत्वाला एकसंध मूर्तरूप देण्यात सर्वांत कळीची भूमिका बजावली आहे.’ हिंदुत्वाची एकात्मिक अस्मिता उभारताना हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या गाभ्यातील ‘सनातन हिंदू धर्मा’च्या संकल्पनांना गीता प्रेस परिवाराने अजिबात धक्का लागू दिलेला नाही. वर्ण आणि जातीय उतरंडीचे समर्थन, ‘मनुस्मृती’चे समर्थन, कुटुंबातील मुलग्यांचे आदर्श ‘हिंदु पुरुष’ म्हणून संगोपन, आदर्श पतिव्रता स्त्री अशा सर्व कल्पनांचा ठाम पुरस्कार गीता प्रेस परिवाराने केला. मुस्लीम पुरुष' म्हणजे ‘ते’, ‘अन्य’! मुस्लीम म्हणजे ‘हिंस’, ‘लिंगपिसाट’ आणि ‘विलासी’ अशी प्रतिमा सतत रंगवणे, मुस्लीम पुरुषांपासून हिंदू स्त्रियांचे संरक्षण करणे सर्व हिंदू पुरुषांचे आद्य कर्तव्य आहे, असे स्पर्धात्मक आणि वर्चस्ववादी धार्मिक जातीयवाद जोपासणारे प्रमेय हा हिंदुत्ववादी विचारपटाचा एकात्मिक भाग आहे.

गीता प्रेसच्या वाटचालीचे संशोधन करताना अक्षया मुकुल यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकापासून आजपर्यंत बदलत्या राजकीय सामाजिक घडामोडींचा हिंदुत्ववादी विचारधारेशी असलेला संबंध नेमकेपणाने उलगडून दाखवला आहे. गीता प्रेसच्या स्थापनेपासून (एप्रिल १९२३) या विचारप्रवाहाचा झालेला राजकीय, सामाजिक प्रवास या संशोधनातून उभा राहतो. तसेच गीता प्रेस परिवाराचा आणि पर्यायाने हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचा सामाजिक (वर्गीय आणि जातीय) पाया प्रथमच इतक्या स्पष्टपणे पुढे येतो.

गीता प्रेस आणि कल्याण मासिकाचा आरंभ म्हणजे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचे स्थित्यंतर होते. देशातील मारवाडी समाज १८८०-९०पासून व्यापार आणि उद्योगात अग्रणी होता. आधुनिक काळात तयार होणाऱ्या अर्थव्यवस्थेत या समाजाला कळीचे स्थान होते. तशाच प्रकारचे स्थान आपल्या समाजाला देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात स्थान मिळवण्यासाठी तो प्रयत्नशील होता.

या पार्श्वभूमीवर मारवाडी समाजाच्या पुढाकाराने आदर्श सनातन हिंदू धर्माचे पुनरुज्जीवान करण्याच्या हेतूने गीता प्रेस आणि ‘कल्याण’ मासिक सुरू करण्यात आले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकापर्यंत भारतातील हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व (आणि पर्यायाने नियंत्रण) देशातील हिंदू राजे-रजवाडे, हिंदू जमीनदार मंडळी आणि ब्राम्हण समाजाकडे होते. याचा अर्थ हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व आणि नियंत्रण ‘ब्राह्मण-क्षत्रिय’ अशा संयुक्त वर्ण-आघाडीकडे होते. गीता प्रेस सुरू होण्यापूर्वी ‘मारवाडी गॅझेट’, ‘मारवाडी सुधार’ अशी मासिके एका बाजूला समाजसुधारणा आणि त्याच वेळी सनातन हिंदू मूल्यांचा पुरस्कार करत होती. मारवाडी ज्ञाती संघटनेच्या पुढाकाराने सुरू झालेली गीता प्रेस, ‘कल्याण’, ‘कल्याण कल्पतरू’ ही मासिके आणि वर नमूद केलेली अन्य मासिके यांच्या २५-३० वर्षांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हिंदू धर्माची प्रतिमा बदलली. सनातन हिंदू धर्म मूल्यांचा नव्याने आग्रही पुरस्कार करत राहिल्यामुळे (आणि अर्थातच व्यापार उद्योगातील कळीचे स्थान यामुळे) हिंदू धर्माचे प्रतिनिधीत्व ‘ब्राह्मण-वैश्य’ या संयुक्त वर्ण-आघाडीकडे आपोआप आले. हे स्थित्यंतर हळूहळू देशभर पसरत गेले. सनातन हिंदुत्वाची सूत्रे ब्राह्मण-वैश्य समाजांच्या नियंत्रणात आली. याचे मुख्य श्रेय गीता प्रेसकडे जाते (संदर्भ : ‘दि माउथ ऑफ सनातन धर्म : द रोल ऑफ गीता प्रेस इन स्प्रेडिंग द वर्ड’, या शीर्षकाचा पॉल अर्नी यांचा प्रबंध. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ रिलिजन अॅन्युअल मीटिंग, वॉशिंग्टन, नोव्हेंबर २०-२३, १९९३मध्ये सादर झाला). या स्थित्यंतराचा प्रवास अक्षय मुकुल यांच्या ग्रंथातून आपल्या समोर येतो.

देशातील अनेक औद्योगिक घराण्यांचा हिंदुत्वावादी विचारसरणीला थेट पाठिंबा होता (आणि आहे). गांधी- नेहरू काळापासून काँग्रेससहित देशातील अनेक राजकीय पक्षातील हिंदुत्ववादी विचारांचे सहानुभूतीदार असलेल्या नेत्यांचा गीता प्रेस परिवाराशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, उघड आणि छुपा पाठिंबा होता. हे संबंध अक्षया मुकुल यांच्या संशोधनातून स्पष्टपणे दिसून येतात. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेस पक्षात असे परस्परविरोधी राजकीय भूमिका असणारे अनेक विचारप्रवाह सतत कार्यरत होते. (स्वातंत्र्यानंतरही असे विचारप्रवाह काँग्रेसमध्ये टिकून राहिले होते). याचे नेमके प्रतिबिंब अक्षया मुकुल यांच्या संशोधनात पाहायला मिळते. गीता प्रेस परिवाराने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही प्रस्थापित हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे वाहक म्हणून किती आणि कशी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे नीटपणे समजून घ्यायचे असेल तर अक्षया मुकुल यांचा हा ग्रंथ मुळातूनच वाचायला हवा.

‘दि न्यू इंडिया फाऊंडेशन’ या संस्थेच्या अभ्यासवृत्तीचा भाग म्हणून अक्षय मुकुल यांनी गीता प्रेसच्या ऐतिहासिक वाटचालीचे संशोधन केले. आदर्श संशोधनाचे सर्व संकेत, नियम पाळून सुमारे चार वर्षे अक्षय मुकुल यांनी हे संशोधन केले आहे. आपल्या संशोधनातील प्रत्येक तपशील साधार असेल याची खात्री त्यांनी करून घेतली आहे. या संशोधनासाठी मुकुल यांनी गोरखपूर, बनारस, लखनऊ या गीता प्रेस परिवाराच्या कार्यक्षेत्रात दीर्घकाळ वास्तव्य केले. गोरखपूर येथील गीता-प्रेस कार्यालयात राहून संस्थेचे ग्रंथालय आणि त्यांच्या ऐतिहासिक दफ्तरातील दस्ताऐवजांचा अभ्यास केला. गीता प्रेसचे संस्थापक हनुमानप्रसाद पोदार यांच्या ‘पोद्दार पेपर्स’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या पत्रव्यवहारांचा अभ्यास केला. पोद्दार यांचे नातू रसिंदु फोगला यांच्याबरोबर आणि गीता प्रेसचे आजचे प्रबंधक, संचालक यांच्याबरोबर संवाद साधला. अशा व्यापक प्रयत्नातून आपले संशोधन आणि निष्कर्ष अधिकाधिक अचूक केले.

गीता प्रेसच्या अधिकृत माहितीबरोबरच अक्षया मुकुल यांनी गोरखपूर आयुक्तालयाचा अभिलेख कक्ष, जिल्हा गुप्तचर विभागाचा अभिलेख कक्ष, उत्तर प्रदेश सरकारचे प्राभिलेख यातील कागदपत्रांच्या आधारे आपल्या संशोधित माहितीची खातरजमा केली. या संशोधनासाठी अक्षय मुकुल यांनी चेन्नई येथील थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया, ‘हिंदू पेपर्स’चे पुराभिलेख, दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझीयम आणि लायब्ररी इ. संस्थांतील कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. मूळ ग्रंथाच्या परिशिष्टात अशा सर्व संदर्भसूची आणि संदर्भ स्रोत सविस्तरपणे नोंदलेले आहेत. त्यामुळेच परिश्रमपूर्वक केलेल्या या संशोधनाची विश्वासार्हता आणि दर्जा वादातीत ठरतो.

अत्यंत विस्तृत असा हा ग्रंथ मूळ गाभा हरवू न देता संक्षिप्त रूपात मराठीत तयार करणे अत्यंत आव्हानात्मक काम होते. त्याचा बाज संशोधनात्मक अभ्यासाचा आहे. मराठीत त्याचे संक्षिप्त रूपांतर करताना सर्वसाधारण वाचकांना रुची वाटेल अशा पद्धतीने लिहिण्याची आवश्यकता होती. तसा प्रयत्न केला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या सजग नागरिकांचा (मग ते कोणत्याही विचारप्रवाहाचे असोत) असा समज असतो की, देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे आद्य प्रवर्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! परंतु हिंदू महासभा (स्थापना १९०५), गीता प्रेस परिवार यांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी विचारप्रवाह रा.स्व. संघाच्याही आधीपासून सक्रिय होता.

एवढेच नाही तर देशातील हिंदुत्ववादी विचारप्रवाहाचे जनकत्व आणि राजकीय सूत्रे उत्तर भारतातील याच गटांकडे जातात. ही वस्तुस्थिती अक्षया मुकुल यांच्या ग्रंथातील अनेक महत्त्वाच्या तपशीलातून पुढे येते. या तपशीलाचे सामाजिक, धार्मिक धागेदोरे मराठी वाचकांना परिचित नाहीत. म्हणूनच अशा तपशीलाचे संदर्भ स्पष्ट करण्यासाठी काही पुरक माहिती देणे आवश्यक होते. त्यानुसार अनेक ठिकाणी आवश्यक पूरक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, एकोणासाव्या शतकाच्या अखेरच्या दशकापासून पुढे विसाव्या शतकाच्या पहिल्या २५-३० वर्षापर्यंत उत्तर भारतातील मुस्लीम समाजावरील उलेमांचा मोठा प्रभाव होता. यासंबंधी अत्यंत मोलाची माहिती आमचे मित्र आणि मुस्लीम समाजाच्या सामाजिक इतिहासाचे सजग अभ्यासक सरफराज अहमद यांनी दिली. अशा पूरक माहितीचे संदर्भ त्या त्या ठिकाणी नोंदले आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

३.

या संपूर्ण लिखाणाचा उद्देश हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वाटचाल एकसंधपणे पुढे यावी हा आहे. अक्षया मुकुल यांच्या ‘गीता प्रेस ॲण्ड द मेकिंग ऑफ हिंदू राष्ट्र’ या ग्रंथातून हे उद्दिष्ट पूर्णांशाने साध्य होते. हा ग्रंथ हेच मध्यवर्ती सूत्र ठेवून या पुस्तकाचे लिखाण केले आहे. मूळ ग्रंथातील तपशील वापरताना त्यात कोणताही बदल होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. मात्र त्या तपशीलाचा आजच्या संदर्भात अर्थ लावला आहे. म्हणूनच हे पुस्तक म्हणजे मूळ पुस्तकाचा अनुवाद नाही किंवा केवळ त्या पुस्तकाचे संक्षिप्तीकरण नाही. तर मूळ ग्रंथाचा आधार घेऊन केलेली स्वतंत्र मांडणी आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

सनातनी हिंदुत्ववादी विचारप्रवाहावर टीका करताना अनेकदा ‘फॅसिस्ट’ किंवा ‘प्रतिगामी विचारसरणी’ अशी हेटाळणी दर्शक शेरेबाजी केली जाते. अशी तुच्छतादर्शक टीका निकोप राजकीय विचार-संवादाला नक्कीच पोषक नाही. अशी टीका केल्यामुळे आम नागरिकांना त्याचा फारसा उलगडा होत नाही. उलट हिंदू धर्मात जन्माला आलेल्या व्यक्तीला या यांत्रिक टीकाटिपणीमुळे ती समग्र हिंदूंवरील टीका वाटते. त्यामुळेच आम हिंदू माणसांच्या मनात अशा टीकेची स्वीकारार्हता कमी होते. आम हिंदू नागरिक अशा यांत्रिक टीकेमुळे उलट फारसा विचार न करता हिंदुत्ववादी विचारप्रवाहाकडे ओढला जातो.

हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या वाटचालीबद्दलच्या या लिखाणात आणि अक्षया मुकुल यांच्या ग्रंथात ठिकठिकाणी देशातील विविध राजकीय पक्ष, अनेक राजकीय विचारप्रवाहांतील नेते, विचारवंत यांच्या संबंधी अत्यंत वेगळा तपशील पुढे येतो. काही वाचकांना तो वादग्रस्त वाटू शकतो, न रुचणारा असू शकतो किंवा राजकीयदृष्ट्या गैरसोयीचा असू शकतो. अक्षया मुकुल यांच्या मूळ ग्रंथात हिंदुत्ववादी विचारप्रवाहाची वाटचाल आणि गीता प्रेस हेच केंद्र केले आहे. या ग्रंथाच्या मांडणीतून अक्षया मुकुल यांनी गेल्या १००हून अधिक वर्षांच्या राजकीय वाटचालीचा जणू आरसा वाचकांसमोर धरला गेला आहे. ते प्रतिबिंब आज आपल्याला कदाचित पसंत पडणार नाही. ते स्वाभाविक आहे. मात्र असे असले तरी त्याची सत्यता लक्षात घेऊन त्याचा मोकळेपणाने विचार करायला हवा. भारताला एक आधनिक समतावादी, धर्मनिरपेक्ष मानवी समाज म्हणून वाटचाल करण्यासाठी या सर्व इतिहासाकडे वस्तुनिष्ठपणे पाहायला लागेल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

भाजप आणि हिंदुत्ववादी विचारप्रवाह भारत हे एक ‘हिंदू राष्ट्र’ आहे, असे गृहित धरून आपली सर्व राजकीय धोरणे आखत आहे, राबवत आहे. जातीय उतरंड नव्याने पुनरुज्जीवित केली जात आहे, मुस्लीम आणि अन्य धार्मिक अल्पसंख्याकांवर ‘दुय्यम नागरिकत्व’ लादले जात आहे. या सर्व धोरणांची पाळेमुळे हिंदुत्ववादी विचारप्रवाहाच्या ऐतिहासिक वाटचालीत स्पष्टपणे सापडतात. स्वातंत्र्यापासून देशाने स्वीकारलेल्या संवैधानिक मूल्यांशी आणि धोरणांशी अत्यंत विपरित अशी ही वाटचाल आहे.या पार्श्वभूमीवर अक्षय मुकुल यांचे संशोधन अधिकच महत्त्वाचे ठरते.

‘सलोखा’ या धार्मिक आणि जातीय सलोख्याच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संपर्क गटात सहभागी होत असताना देशातील प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विचारप्रणालीचा हा वस्तुनिष्ठ इतिहास लोकांपर्यंत आणणे आम्हाला आवश्यक वाटत होते.

‘हिंदुत्ववादी राजकारणाच्या पाऊलखुणा : दि मेकिंग ऑफ हिंदू इंडिया’ - प्रमोद मुजुमदार,

लोकवाङ्मय गृह, मुंबई,

पाने -२३२,

मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......