या पुस्तकाचा विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा मांडणारा विभाग वाचवत नाही. एखाद्या प्रश्नाचे परिणाम किती भीषण असतात, हे ते प्रकरण वाचताना जाणवत राहते, अस्वस्थता येते. हे पुस्तक वेदनेची सनद आहे. दुःखाचा हुंकार आहे
ग्रंथनामा - झलक
हेरंब कुलकर्णी
  • ​​​​​​​‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 05 January 2022
  • ग्रंथनामा झलक ​​​​​​​विनाअनुदानितची संघर्षगाथा VinaAnudanitchi Sangharshgatha किरण चव्हाण Kiran Chavan विनाअनुदानित शाळा Un-Granted School's अनुदानित शाळा Granted School's हेरंब कुलकर्णी Heramb Kulkarni

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या व्यथा मांडणारं ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ हे किरण चव्हाण यांनी संपादित केलेलं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे. शिक्षणक्षेत्रातील एका विदारक सत्याचा पंचनामा करणारं हे पुस्तक इचलकरंजीच्या पद्मरत्न प्रकाशनानंं प्रकाशित केलं आहे. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी या पुस्तकाला लिहिलेली ही प्रस्तावना...

..................................................................................................................................................................

महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची भळभळती जखम म्हणजे विनाअनुदानित शाळांचा प्रश्न. संयमाचे एखादे नोबेल पारितोषिक असेल तर ते विनाअनुदानित शिक्षकांना द्यावे लागेल, इतकी त्यांनी वाट बघितली आहे. लोकशाहीतील उपलब्ध असलेली सर्व आयुधे त्यांनी पूर्ण क्षमतेने वापरली आहेत. उपोषणात स्वतःला पणाला लावले. एकाच प्रश्नासाठी झालेली सर्वांत जास्त आंदोलने म्हणून ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद होईल. मोर्चे काढले, संप केले, बंद केले आणि सारेच असह्य झाल्यामुळे यातील बांधवांनी स्वतःच्या जीवाची आहुती दिली.

लोकशाहीचा फायदा काय? तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नावर ओरडता येते. आणि लोकशाहीचा तोटा कोणता? तर त्या ओरडल्याचा काहीच उपयोग होत नाही, हे कटू सत्य ‘विनाअनुदानित’ या प्रश्नाने महाराष्ट्राला दाखवले. अनुदानित शिक्षकांसाठी जे ‘सरकार’ होते, ते विनाअनुदानितसाठी ‘शासन’ झाले आहे. सरकार आणि शासन हा फरक स्पष्ट आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

विनाअनुदानितचा विषय काढला की, असंवेदनशील लोक हमखास एक प्रश्न विचारतात, ‘यांनीच लिहून दिले होते ना की, आम्हाला अनुदान नको म्हणून?’ ज्या गोष्टीवर चर्चा होऊन गेल्या, ‘कायम’ शब्द काढूनही अनेक वर्षे झाली, तरी इतक्या वर्षांनंतर अजून काहीच होत नसताना पुन्हा पुन्हा चर्चा त्याच मुद्द्यावर नेली जाते. दिलेला शब्द पाळण्याची परंपरा नसलेल्या राजकीय पक्षांनी नंतरच्या काळात विचारधारा सोडून अनेक तडजोडी केल्या, अनेक आश्वासने मोडली आणि तरीसुद्धा शब्दाला जागण्याची अपेक्षा मात्र शिक्षकांकडून, हे अनाकलनीय असते.

दुसरी बदनामी अशी करतात की, हे शिक्षणसम्राटांनी उभे केलेले आंदोलन आहे. असे म्हणणाऱ्यांनी एकदा आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या कुटुंबात किंवा जिवंतपणी मरण अनुभवणाऱ्या खेड्यापाड्यातील शिक्षकांच्या घरी एकदा जाऊन यावे, म्हणजे वास्तव त्यांना दिसेल.

सर्वांत क्लेशदायक गोष्ट ही आजपर्यंतच्या एकाही सरकारने ‘आम्ही अनुदान देणार नाही’ असे म्हटले नाही व अनुदान दिलेही नाही. हे स्वप्न दाखवत झुलवत राहण्याचा जो क्रूरपणा आहे, तो अधिक अस्वस्थ करणारा आहे. आयुष्य पणाला लागले, अनेक जण सेवानिवृत्त झाले. तरीसुद्धा आज आशा दाखवली जात आहे.

सरकारकडे पैसे नाहीत, हे कारणसुद्धा अत्यंत फसवे आहे. पैसे नसल्याचे कारण कोणाला सांगायचे व कोणाला नाही, हे सरकार नावाच्या यंत्रणेला समोरचे उपद्रवमूल्य बघून कळत असते. आमदारांचा आमदारनिधी एक कोटीने वाढवायला त्यांच्याकडे पैसे असतात. उद्योजकांना सवलती देण्यासाठीही पैसे असतात. सर्व वेतन आयोग कर्ज काढून कर्मचाऱ्यांना देण्यासाठीही कोणतीच अडचण नसते. कर्मचाऱ्यांचे करोनात कापलेले पगार लगेच परत करण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे असतात. फक्त पैसे नसतात असंघटित वर्गासाठी, निराधारांच्या पेन्शनसाठी, कंत्राटी कामगारांचे मानधन वाढवण्यासाठी आणि विनाअनुदानित शिक्षकांसाठी.

शिक्षक बांधवांनी हे सारे कसे सहन केले असेल, हा प्रश्न पडतो. अनुदानित शाळांवर काम करणारे शिक्षक आणि विनाअनुदानित शाळांवर काम करणारे शिक्षक, या दोघांच्या कामात काडीचाही फरक नाही. किंबहुना विनाअनुदानित शिक्षकांना तर अधिकच अडचणी आहेत आणि काम मात्र त्याच दर्जाचे करायचे आहे. तरीसुद्धा पूर्ण क्षमतेने ही शिक्षक मंडळी काम करत राहतात. मध्यंतरी जालन्यातील एका विनाअनुदानित शाळेत गेलो होतो. तेथील एका शिक्षकाने लाकडाचा मोबाईल स्टॅन्ड बनवला व रबर बांधून त्यावर मोबाईल ठेवून ऑनलाईन क्लासेस घेत होता. ते बघितल्यानंतर गलबलून आले. एकीकडे पगार असलेला शिक्षक लॅपटॉपच्या आधारे शिकवणार आणि दुसरीकडे लाकडी स्टॅण्ड.

सरकारला काम मात्र हवे आहे, परंतु त्या कामाची किंमत मात्र द्यायची नाही. जितके दिवस प्रश्न पुढे जाईल, तितका पुढे ढकलायचा आहे.

या पुस्तकात किरण चव्हाण यांनी संकलित केलेल्या आत्महत्या केलेल्या शिक्षकांची यादी वाचली. ती संख्या आणखीही मोठी आहे, पण ती यादी वाचताना, वेदना होताना आश्चर्यही वाटत होते. याचे कारण या आत्महत्यांनी महाराष्ट्राच्या समाजजीवनावर ओरखडासुद्धा उमटवला नाही. कोणत्या तरी मंत्र्याला, राजकीय नेत्यांना अडकवण्याची उपद्रवक्षमता या आत्महत्यांत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता फक्त संख्येत मोजल्या जातात, तशीच स्थिती आज शिक्षकांच्या आत्महत्यांची झाली आहे. समाज घडवणारे शिक्षक आत्महत्या करताना, जर अपराधीभाव वाटत नसेल तर तो समाज असंवेदनशील आहे, कृतज्ञ नाही.

जोपर्यंत उभे राहता येत आहे, तोपर्यंत शिकवायचे, जोपर्यंत रडता येत आहे, तोपर्यंत आंदोलने करायची आणि सारी उमेद संपली की, स्वतःला संपवून टाकायचे. इतक्या वेदनादायक रितीने ही माणसे निघून गेली; पण शिक्षण क्षेत्रावर, सुसंस्कृत महाराष्ट्रावर त्याचा ओरखडाही उमटला नाही. ‘शिक्षक दिना’ला शिक्षक किती महत्त्वाचा घटक आहे, राष्ट्राचा शिल्पकार आहे, हेच या आत्महत्यांना अप्रत्यक्ष जबाबदार असणाऱ्या राजकीय व्यवस्थेकडून ऐकावे लागते. विरोधी पक्षाने या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा व ते सत्तेत गेले की, पुन्हा जी.आर.चा किस करत पैसे वाचवण्यासाठी अनुदान प्रश्न पुढे पुढे ढकलत ठेवायचा, अशीच सर्व पक्षीय राजकीय मानसिकता आहे. त्यामुळे आता कोणता मार्ग वापरावा, हेच कळेनासे झाले आहे.                                    

या पार्श्वभूमीवर किरण चव्हाण यांनी संपादित केलेले ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे. विनाअनुदानित शिक्षकांच्या भावना एका व्यासपीठावर आणून सर्व घटकांचा एकमेकांशी संवाद घडवला आहे. विनाअनुदानित शिक्षक मित्रांना सांत्वन देण्याचे काम हे पुस्तक करेल. आपले प्रश्न सुटत नसतात; पण आपल्या प्रेमाच्या माणसांजवळ मन मोकळं करण्यासाठी या पुस्तकाने एक व्यासपीठ निर्माण केले आहे. ‘मी एकटा नाही तर माझ्यासारख्या हजारो बांधवांच्या व्यथा एकच आहेत’ हा धीर देऊन लढण्याचे बळ हे पुस्तक नक्कीच देणार आहे.

या पुस्तकाचा विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा मांडणारा विभाग वाचवत नाही. एखाद्या प्रश्नाचे परिणाम किती भीषण असतात, हे ते प्रकरण वाचताना जाणवत राहते, अस्वस्थता येते. हे पुस्तक इतिहासाचे किंवा बखरीचे काम करणार आहे. इतिहासात किंवा बखरीत केवळ विजयाच्या नोंदी नसतात, वेगवेगळ्या काळात जनतेला काय भोगावे लागले, याचे तपशील आपल्याला मिळत असतात. नवीन शैक्षणिक धोरणाचे ढोल वाजवताना आणि सरकारची शिक्षणाप्रती बांधीलकी किती तीव्र आहे, याचे कोडकौतुक करत असताना, या देशात शिक्षक आत्महत्या करत होते, हेही वास्तव या पुस्तकामुळे इतिहासात जाईल.

शाईने नव्हे तर अश्रूने लिहिलेले असे या पुस्तकाचे वर्णन केले तर चुकीचे ठरणार नाही. हे पुस्तक वेदनेची सनद आहे. दुःखाचा हुंकार आहे. याच दुखऱ्या वेदनेला एक संघटित स्वरूपात किरण चव्हाण यांनी समाजमनाच्या चावडीवर आणून महत्त्वाचे काम केले आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पुस्तक लिहिण्याचा एक फायदाही असतो की, बोलक्या आणि विचारी वर्गापर्यंत ते प्रश्न एकत्रित स्वरूपात जातात. महाराष्ट्रातील साहित्य, कला, संस्कृती क्षेत्रात व इतर माध्यमांत काम करणाऱ्यांना अनुदान मिळत नाही अशा काही शाळा आहेत, इतकीच त्रोटक माहिती असते. त्याचे परिणाम किती भीषण असतात, किती जणांचे जीव गमावले जातात. त्या शिक्षकांचे संसार कसे होत आहेत? सरकार कशी फसवणूक करते आहे? हे तपशील बोलक्या विचारी वर्गासाठी या पुस्तकामध्ये दिले आहेत व तो वर्ग वेगवेगळ्या माध्यमातून विनाअनुदानित प्रश्नाशी जोडला जाईल.

या पुस्तकात प्रत्यक्ष कायदेशीर भाग, आंदोलनाचा घटनाक्रम व मागण्या, सरकार करत असलेली फसवणूक हा वैचारिक तपशीलही आहे व प्रत्यक्ष जगणेही तितक्याच ताकदीने आले आहे. एकाच वेळी बुद्धीने आणि भावनेने लिहिलेली ही वेदनेची बखर आहे, असेच म्हणावे लागेल.

‘विनाअनुदानितची संघर्षगाथा’ : किरण चव्हाण

पद्मरत्न प्रकाशन, इचलकरंजी

पाने : १६०

मूल्य : २७० रुपये.

..................................................................................................................................................................

लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आहेत.

herambkulkarni1971@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......