गिरीश कुबेरांचं पुस्तक ‘भारतात जात्यान्तक लोकशाही क्रांती होऊ न देण्याच्या’ प्रयत्नांचाच एक भाग आहे, असंच दुर्दैवानं म्हणावं लागतं!
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
बंधुराज लोणे
  • ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि त्यांच्या ‘रेनेसान्स स्टेट : दी अनरीटन स्टोरी ऑफ दी मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 27 December 2021
  • ग्रंथनामा दखलपात्र लोकसत्ता Loksatta गिरीश कुबेर Girish Kuber रेनेसान्स स्टेट : दी अनरीटन स्टोरी ऑफ दी मेकिंग ऑफ महाराष्ट्र Renaissance State : The Unwritten Story of the Making of Maharashtra शिवाजी महाराज Shivaji Maharaj संभाजी महाराज Sambhaji Maharaj

दै. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर काही इतिहास-संशोधकही नाहीत, तरी त्यांनी ‘रेनेसान्स स्टेट : दी अनरीटन स्टोरी ऑफ दी मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक लिहिलं आहे. 

शिवाजी महाराजांच्या बदनामीची मोहीम चालवणं, हा ब्राह्मणी विचारांच्या काही लोकांचा अजेंडा आहे. जेम्सच्या पुस्तकाच्या वेळीच हे स्पष्ट झालं होतं की, दादोजी कोंडदेवचा शिवाजी महाराजांशी काही संबध नाही, तरी ‘शिवाजी आणि त्यांच्या मातोश्री कोंडदेवकडे सुरक्षित राहतील, असं शहाजीराजांना वाटलं’, असं लिहिण्याचा खोडसाळपणा कुबेरांनी केला आहे. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

जेम्सच्या वेळी बाह्या वर करून सरसावलेले मराठे कुबेरांच्या या पुस्तकाबाबतीत शांत आहेत. वसंत पळशीकर म्हणत, मराठे नेहमी ब्राह्मणांशी समझोता करून सत्ता भोगतात, ते इथं जाणवतं. शिवाय कुबेर एका मोठ्या दैनिकाचे संपादक आहेत. संपादकाच्या विरोधात कोणी जास्त बोंबाबोंब करणार नाही, ही कुबेर आणि कळपाची रणनीती यशस्वी होताना दिसत आहे.  

मी काही इतिहासकार, मोठा अभ्यासक नाही. दै. ‘महानगर’, ‘लोकमत’, ‘लोकसत्ता’, ‘कृषीवल’ आणि ‘टीव्ही 9’ अशी पत्रकार म्हणून काही वर्षं नोकरी केली आहे. मात्र चळवळीत काम करताना थोडंफार वाचन केलं आहे, काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कुबेर जे आरोप संभाजीराजांवर करत आहेत, तो खोडसाळपणा आहे, हे समजायला माझ्यासारख्यांना फार कष्ट लागत नाहीत.

कुबेरांनी या पुस्तकात सरसंघचालकांविषयी भरभरून लिहिलं आहे, पण त्याला ‘रेनेसान्स’ कसं म्हणता येईल? उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि एकूणच पुरोगामी विचार, चळवळीची साधी दखल घ्यावी असं कुबेरांना वाटत नाही.

या पुस्तकात अनेक वादग्रस्त विचार आणि निष्कर्ष आहेत. ‘शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांची संभाजीराजांनी हत्या केली’ असा शोध कुबेरांनी लावला आहे. उलट अण्णाजी दत्तोंसारख्या भ्रष्ट, कावेबाज, गद्दार ब्राह्मणाच्या षडयंत्राला बळी पडून विरोधात उभ्या राहिलेल्या आपल्या मातेला संभाजीराजांनी मोठ्या मनानं माफ केलं होतं. त्यांनी बाळराजे राजाराम आणि सोयराबाई यांना काही दिवस नजरकैदेत ठेवलं होतं, हे सत्य आहे; पण त्या काळात संभाजीराजांपुढे कुठला पर्याय होता? उलट सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी संभाजीराजांना साथ दिली नसती, तर अण्णाजी दत्तोने त्यांना अटक करून ठार केलं असतं. सख्ख्या बहिणीची साथ देऊन सख्ख्या भाच्याला गादीवर न बसवता सावत्र भाचा असलेल्या संभाजीराजांची साथ देणारा वीर हंबीरराव मोहिते कुठे आणि गद्दारी करणारा अण्णाजी दत्तो कुठे!

सोयराबाई, अण्णाजी दत्तो आणि संभाजीराजे

सोयराबाईंना संभाजीराजांनी सन्मान दिला आणि त्यांच्या राज्याभिषेकानंतर त्या वर्षभर जिवंत होत्या. त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता, हे अनेक इतिहासकारांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे. संभाजीराजांच्या हत्येनंतर महाराणी येशूबाई आपल्या मुलाला गादीवर बसवत नाहीत, तर राजारामांना हा मान देतात. आपलं आणि आपल्या मुलाचं आयुष्य संकटात आहे, याची जाणीव असूनही राजाराम आणि त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांना सुरक्षित स्थळी पाठवतात, ही छत्रपतींच्या घराण्याची परंपरा असताना कुबेर त्यांच्यावर चिखलफेक करतात. कुडाळकर बाकरेशास्त्रींना दिलेल्या दानपत्रात सोयराबाई स्फटिकाहून निर्मळ होत्या, असं संभाजीराजांनी (संदर्भ : ‘संभाजी’ – विश्वास पाटील) म्हटलं आहे.   

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

शिवाजी महाराजांसोबत काम केलेल्या काही कारभाऱ्यांची संभाजीराजांनी हत्या केली आणि त्याचे परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले, असा कुबेरांचा दावा आहे. पण वास्तवात शिवाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराला संभाजीराजांना येऊ दिलं गेलं नाही; त्यांना साधी खबर मिळणार नाही, अशी व्यवस्था केली गेली. त्यानंतर बाळ राजाराम यांना गादीवर बसवून स्वराज्य आपल्या ताब्यात ठेवण्याचा अण्णाजी दत्तोचा डाव होता. त्यासाठी ‘शिवाजी महाराजांची हत्या सोयराबाईंनी केली’ असा प्रचार करून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. त्यानंतरही संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्याच्या साथीदारांना माफ केलं होतं. पण पुन्हा औरंगजेबाच्या मुलासोबत संधान बांधून स्वराज्य मोगलांच्या ताब्यात देण्याचा डाव अण्णाजी दत्तो आणि कळपाने केला होता. संभाजीराजांवर तीन वेळा विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची खातरजमा केल्यानंतर स्वराज्यद्रोह करणाऱ्या या गद्दारांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं. त्यांना दया दाखवायला पाहिजे होती, असं कुबेरांना वाटतं का?

संभाजीराजांकडे शिवाजी महाराजांसारखा मुत्सद्दीपणा आणि संयम नव्हता, असा कुबेरांचा दावा आहे. विशेष म्हणजे, गद्दार अण्णाजी दत्तोने हाच आरोप अनेकदा केला होता. त्यांच्याकडे मुत्सद्दीपणा नसता, तर शिवाजी महाराजांनंतर त्यांना जे आयुष्य जगायला मिळालं, तेही कदाचित मिळालं नसतं. आपल्या जिवावर उठलेल्या, सतत राजद्रोह करणाऱ्या, मोगलांशी हातमिळवणी कारणाऱ्यांना माफ करणारे, त्यांना पुन्हा (सेनापती मोहिते यांचा विरोध डावलून) मानाच्या जागीच काम करण्याची संधी देणारे संभाजीराजे संयमी नव्हते?

शिवाजी महाराजांवर संत तुकारामांचा मोठा प्रभाव होता. ब्राह्मणांनी संत तुकारामांची हत्या केली. त्यासाठी शिवाजी महाराज राज्यात नाहीत, असा दिवस निवडला गेला. त्यामुळे समर्थ रामदासांना शिवाजी महाराजांचा धार्मिक गुरू करण्याचा अश्लाघ्यपणा करण्याची गरज नाही. पण कुबेरांना हे कोण सांगणार? मुळात रामदास आणि ब्राह्मण मानतात, तशा कडव्या धार्मिक विचाराचे महाराज नव्हते. ते धार्मिक होते, पण कर्मकांडांवर त्यांचा विश्वास नव्हता, ब्राह्मणांच्या चार्तुवर्ण्य व्यवस्थेला त्यांचा प्रखर विरोध होता. आपल्या मुलावर, संभाजीराजांवर हेच संस्कार त्यांनी केले होते. त्यामुळेच रायप्पा हा अस्पृश्य जातीत जन्मलेला मुलगा संभाजीराजांचा जिवलग मित्र होता.

शिवाजी महाराज आणि संभाजीराजांचं चरित्र हीच पोटदुखी

महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला फक्त नकारच दिला नाही, तर प्रखर विरोध केला होता. त्याबाबत कुबेर काही लिहीत नाहीत. केवळ तेवढंच नाही, तर अगदी सुरुवातीपासून म्हणजे बहुजन मावळे स्वराज्यासाठी जीवाचे रान करून लढत होते, तेव्हा ब्राह्मण काय करत होते? औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी शिवाजी महाराजांपुढे हार पत्करल्यानंतर त्याने राजा जयसिंगला दक्षिणेत पाठवले. त्याच्यासोबत शिवाजी महाराजांना तह करावा लागला. याच जयसिंगला विजय मिळावा आणि शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा, म्हणून ब्राह्मणांनी कोटी चंड यज्ञ केला होता. (संदर्भ : ‘शिवाजी कोण होता’ - गोविंद पानसरे, पान ३५) 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

अर्थात, सर्वच ब्राह्मण विरोधात होते असं नाही, पण एक जात आणि धर्माचा समूह म्हणून विचार केल्यास ब्राह्मण महाराजांच्या विरोधात होते, असंच म्हणावं लागेल. शिवाजी महाराज यांनी अफझलखानला ठार केलं, (तेव्हा त्यांनी वापरलेली वाघनखे मुसलमान कारागिरानं बनवलेली होती.) या प्रसंगी महाराजांवर तलवारीनं वार करणारा कृष्णाजीपंत कुलकर्णी होता. तो अफझलखानाचा वकील होता, अंगरक्षक नव्हता. त्यामुळे त्याने शिवाजी महाराजांवर तलवार चालवण्याची गरज नव्हती. महाराजांनी त्याला तंबी दिली की, ‘मी ब्राह्मणाची हत्या करणार नाही, असं समजू नकोस.’ तरीही कुलकर्णी तलवार खाली ठेवायला तयार नव्हता. अखेर महाराजांनी त्याला ठार केलं. त्याची प्रतापगडावर समाधी नाही, अफझलखान आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडाची समाधी मात्र आहे, याची कारणमीमांसा कुबेर करत नाहीत.

शिवाजी महाराज व संभाजीराजांनी तत्कालीन जातिव्यवस्थेच्या विरोधात लढा दिला. जातिधर्म न पाळणाऱ्या शाक्त धर्माच्या स्वीकारातूनच शूद्रातिशुद्रद्वेष्ट्या ब्राह्मणी धर्मातून सुटका होऊ शकते, हे संभाजीराजांनी शिवाजी महाराजांना पटवून दिलं, म्हणूनच त्यांनी आपला दुसरा शाक्त राज्याभिषेक केला, असं कॉम्रेड शरद् पाटील यांनी सिद्ध केलं आहे. शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना संस्कृत शिकण्यासाठी शाक्त केशवभट्टाकडे पाठवलं होतं. संभाजीराजांची कर्तबगारी आणि त्यागाविषयी अनेकांनी लिहून ठेवलं आहे, मात्र त्याचा आधार न घेता कुबेरांनी त्यांच्यावर चिखलफेक केली आहे.

कॉम्रेड शरद् पाटील यांच्या मते शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधानामध्ये एकच ब्राह्मणेतर होता- सरनोबत हंबीबराव मोहिते. ही त्या काळात जातीव्यवस्थेनं घातलेली मर्यादा होती. पण शिवाजी महाराजांनी  किल्ल्यांची भूमीहीन, अस्पृश्य, आदिवासी, शेतकरी शिवबंदी केली होती. त्यापुढे महाराज जाऊ शकले नाहीत. कारभाऱ्यांनी केलेल्या प्रतिचढाईमुळे त्यांना शाक्त धर्म प्रसार थांबवावा लागला, पण संभाजीराजांनी अशी तडजोड झुगारली. त्यांनी अस्पृश्य, आदिवासींमध्ये धर्मप्रसार केला. त्यामुळे जातीसंघर्ष तीव्र होत गेला. भक्ती चळवळीनं आणि शिवाजी-संभाजी या पितापुत्रांनी अनुक्रमे धार्मिक व शासकीय स्तरावरून जातिव्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला.

भाकडकथा

संभाजीराजांनी मुस्लीम होण्याच्या बदल्यात औरंगजेबाकडे त्याच्या मुलीचा हात मागितला असल्याची ब्राह्मणी लेखकांनी आजवर चावून चोथा केलेली भाकडकथा कुबेरांनी पुन्हा एकदा सांगितली आहे. या भाकडकथेचा पर्दाफाश आजवर अनेकांनी केलेला आहे. संभाजीराजांना औरंगजेबाच्या पुढे हजर केल्यानंतर काय घडलं, याची सविस्तर माहिती, कागदपत्रं उपलब्ध आहेत. इतर कोणाचं नाही, पण किमान प्रा. नरहर कुरुंदकर यांनी शिवाजी महाराजांवर केलेलं लेखन तरी कुबेरांनी चाळायला हरकत नव्हती. संभाजीराजांना ब्राह्मणी धर्म-माहात्म्याकरता वेठीला धरण्यासाठी ही भाकडकथा रचण्यात आली आहे, असं कॉम्रेड शरद् पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. खरं तर त्या वेळी औरंगजेबाच्या मुली संभाजीच्या आया शोभतील, अशा वयात होत्या, असं पाटील यांच्यासह अनेकांनी स्पष्ट केलं आहे. 

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

कुबेरांनी पुरावे म्हणून वापरलेली साधनं विश्वासार्ह नाहीत. त्यांनी ‘चिटणीस बखरी’चा आधार घेतला आहे. या बखरीचं सत्य काय आहे? संभाजीराजांची व्यक्तिरेखा मलिन आणि विपर्यस्त करण्याची सुरुवात केली मल्हार रामराव चिटणीस यांनी. ही बखर लिहिली संभाजीराजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनी. आपले पूर्वज बाळाजी आवजी आणि त्याचा पुत्र आवजी बाळाजी याला हत्तीच्या पायदळी तुडवून मारल्याचा राग मल्हाररावच्या मनात होता. थोडक्यात हे बखरलेखन हा एक सुडाचा भाग आहे. (विश्वास पाटील – संभाजी)

चारित्र्यहनन करण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य?

कुबेर फक्त शिवाजी महाराज आणि संभाजीराजांची बदनामी करून थांबत नाहीत, तर संभाजीपुत्र शाहू महाराज, राजाराम यांचीही बदनामी करतात. राजाराम महाराजांना तर दर्जाहीन ठरवण्यापर्यंत कुबेरांची मजल गेली आहे. शिवाय बाजीराव पेशवाच फक्त शिवाजीच्या तोडीचा होता, असा दावा त्यांनी केला आहे. शिवाजी महाराज आणि त्यानंतरच्या छत्रपतींच्या कार्याची, निर्णयाची, धोरणाची चिकित्सा करण्यास हरकत असण्याचं कारण नाही, मात्र एखाद्याचं चारित्र्यहनन करण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य कसं काय असू शकतं?

कुबेर यांनी धडधडीत अर्धसत्य लिहिलं आहे. व्यवस्था त्यांच्या बाजूनं आहे आणि शरद पवार यांच्यासारखे नेते ऐन वेळी कचखाऊ भूमिका घेतात. पवार म्हणतात की, कुबेरांचं पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे, त्यात काही मतभेदाचे मुद्दे आहेत, पण लोकशाहीत कुबेरांना आपलं मतं मांडण्याचा अधिकार आहे. पवारांचा पक्ष राज्यात सत्तेत असताना नेमल्या गेलेले ‘पुरके समिती’नंच दादोजीचा शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी काहीही संबध नाही, असा निर्वाळा दिला. त्यानंतर पुण्यातला लालमहालातला दादोजीचा पुतळा हटवण्यात आला. दादोजीच्या नावे असलेल्या पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं. लेखनाचे, संशोधनाचे काही संकेत पाळून कुबेरांनी लिहिलं असतं, तर कदाचित त्यावर मतभेदाला वाव होता, पण त्यांनी तसे किमान संकेत पाळलेले नाहीत.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबाबत दुमत असण्याचं कारण नाही, पण टिळक सनातनी विचारांचे होते. तेव्हा टिळकांचा उदोउदो करताना ही बाब नजरेआड करता येणार नाही. पण ब्राह्मणच श्रेष्ठ, अशी कुबेरांची धारणा असल्यामुळे ते टिळकांचा, सावरकरांचा गौरव करतात.

हिंदुत्व, हिंदूराष्ट्र या बाबतीत कुबेरांचं ज्ञान तोकडं आहे. त्यामुळेच हिंदूराष्ट्रवादाबाबत ते चुकीचं निदान करतात. राष्ट्रवाद ही संकल्पनाच मुळात गेल्या शतकातील आहे, हे अनेक इतिहासकार सांगतात. तरीही इतिहासातील धाडसी, प्रगतीशील प्रतिमा आणि प्रतिभांचा संबंध हिंदुत्वाशी जोडण्याचा खटाटोप कुबेरांनी केला आहे.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांची वैचारिक-सांस्कृतिक-राजकीय चिकित्सा होणे नितांत गरजेचे आहे!

टाटा उद्योगसमूहाची सम्यक कहाणी

पुतिन नावाच्या हुकूमशहाची (कु)कर्मकथा!

..................................................................................................................................................................

क्रांतीबा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज ते अगदी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांच्यापर्यंत कुबेर कोणाचीच दखल घेत नाहीत, यात आश्चर्य काहीच नाही. कारण हे पुस्तक त्यासाठी लिहिलेलंच नाही. मुळात ही परंपरा आणि हे योगदान नाकारण्याचा हा प्रयत्न आहे. असे प्रयत्न पूर्वीही झालेले आहेत आणि यापुढेदेखील काही लोक ते करतच राहतील. मात्र आता बहुजन या ब्राह्मणी षडयंत्राला बळी पडत नाहीत. काही प्रमाणात का होईना तेही फुले-आंबेडकरी वारसा मानायला आणि त्यासाठी संघर्ष करायला तयार आहेत. 

ज्या उच्च-मध्यम जातीच्या वतनदारांनी, ब्राह्मणांनी जातिव्यवस्था टिकवण्यासाठी शिवाजी-संभाजी या पितापुत्रांचा बळी घेतला, त्यांचे आजचे वारसदार, वतनदार, मरणासन्न जख्खड जातिव्यवस्थेला जगवून भारतात जात्यान्तक लोकशाही क्रांती होऊ न देण्याची शर्थ करत आहेत, असं परखड मत कॉम्रेड शरद् पाटील व्यक्त करतात. कुबेरांचं हे पुस्तक याच प्रयत्नांचा एक भाग आहे, असंच दुर्दैवानं म्हणावं लागतं.

.................................................................................................................................................................

लेखक बंधुराज लोणे पत्रकार आहेत. (मो. 9869197934)

bandhulone@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......