२०२१ साली लिहिली गेलेली, पण २१२१ साली उजेडात आलेली ‘शिरोजीची बखर’ : प्रकरण पाचवे - आर्यन खान विरुद्ध समीर वानखेडे
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • आर्यन खान, समीर वानखेडे आणि नवाब मलिक
  • Tue , 02 November 2021
  • संकीर्णस व्यंगनामा शिरोजीची बखर Shirojichi Bakhar आर्यन खान Aryan Khan शाहरुख खान Shah Rukh Khan समीर वानखेडे Sameer Wankhede नवाब मलिक Nawab Malik

२०२१च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये संपूर्ण भारताचे मीडिया विश्व एका ड्रग केसमुळे ढवळून गेले. केस तशी छोटीच होती, पण त्यामध्ये तत्कालीन सिनेमा नट शाहरूख खान यांचा मुलगा आरोपी असल्याने मीडिया आणि सोशल मीडियावर मोठे मोहोळ उठले. आज २१२१मधील वाचकांना शाहरूख खान चांगलेच माहीत आहेत. २११६मध्ये यांचे सिनेमे बघण्याची एकच लाट भारतभर उसळली  होती. यांनी केलेले सगळे गंभीर सिनेमे आज विनोदी सिनेमे म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. अवाजवी अभिनय, अतिशयोक्तीने ओतप्रोत भरलेली कथानके, पराकोटीचा सेंटिमेंटॅलिझम आणि भडक संवाद हे २०२१च्या भारतात अतिशय समरसून बघितले जात असले तरी आज २१२१च्या भारतात अत्यंत मिश्किलपणे बघितले जातात. या अत्यंत लोकप्रिय अभिनेत्याचा मुलगा आर्यन खान बोटीने गोव्याला मित्रांबरोबर निघाला असताना त्याला नार्कॉटिक कंट्रोल ब्यूरोने पकडले. तपासणीमध्ये आर्यन खानकडे कुठलेही ड्रग सापडले नाही. त्याची वैद्यकीय तपासणीसुद्धा केली गेली नाही. त्याच्या मित्राकडे सहा ग्रॅम चरस सापडल्याचा आरोप केला गेला. यावर संपूर्ण भारतभर मोठा गदारोळ माजला.

तत्कालीन भारतात गांजा, चरस वगैरे नशीले पदार्थ कायद्याखाली प्रतिबंधित असले तरी सर्वत्र सर्रास उपलब्ध होत असत. या काळात कॉलेजातील अनेक तरुण-तरुणी गांजाच्या आहारी गेलेले होते. कायद्याने निषिद्ध असलेला पदार्थ सापडला. तोसुद्धा एका सिनेनटाच्या मुलाकडे! प्रचंड गोंधळ माजला.

अजून एक गोष्ट होती, तत्कालीन समाजामध्ये मोदीभक्तांचा प्रभाव अतिशय वाढला होता. शाहरूख खान, अमीर खान, सैफ अली खान आणि सलमान खान या अति-लोकप्रिय परंतु मुसलमान नटांबद्दल या भक्तांमध्ये तिरस्काराची भावना निर्माण झाली होती. सेक्युलर वातावरणामुळे हे परधर्मीय एवढ्या शिखरावर पोहोचले अशी ही भावना होती. खरं तर हे तिघेही या ना त्या प्रकारे हिंदू धर्माशी निगडित होते. अमीर खान, सलमान खान आणि सैफ अली खान या तिघांच्याही माता हिंदू होत्या. या सगळ्यांनी हिंदू मुलींशी लग्नं केली होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

काही जहाल लोकांचा यांना विरोध असला तरी बाकी भारतानेसुद्धा त्यांना नाकारलेले होते, असे म्हणता येत नाही. त्यांच्या सिनेमांना धमाल गर्दी वगैरे जमत असे. बॉक्स ऑफिसवर त्यांच्या सिनेमांना चांगल्यापैकी पैसा वगैरे मिळत असे.

तर सांगायची गोष्ट अशी की, शाहरूख खान यांचा मुलगा ड्रग संदर्भात सापडला, हे कळल्यावर मोदीभक्तांमध्ये अतिशय आनंदाची भावना निर्माण झाली. आर्यन खानला पकडणारा अधिकारी होते समीर वानखेडे. ते या लोकांचे एका रात्रीत ‘सुपर हीरो’ झाले.

पुढच्या काही दिवसांत या सगळ्याच प्रकरणाला अत्यंत फर्सिकल वळण लागत गेले.

शिरोजीने ही सगळी धमाल, संवाद रूपात लिहून आपल्या बखरीचे पाचवे प्रकरण सिद्ध केले आहे. शिरोजी विषय जरी विनोदी अंगाने हाताळत असला तरी इतिहास लिहिण्याविषयीच्या त्याच्या निष्ठा गंभीर आहेत, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत चालले असेलच.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

शिरोजीची बखर : प्रकरण पाचवे

शाहरूख खान यांचा पुत्र आर्यन खान याला ड्रग बाळगल्याच्या प्रकरणात अटक झाल्याची बातमी आली, तशी अविनाश आणि अच्युत यांनी चहाच्या अड्ड्यावर घाव घेतली. आज आपल्या तावडीत समर आणि भास्कर चांगलेच सापडले आहेत, अशी दोघांचीही भावना होती. हे दोघे पोहोचले, तेव्हा समर आणि भास्कर बन मस्का खात होते. आल्या आल्या अविनाश म्हणाला-

ज्या ताटात खायचं त्याच ताटात छेद करायचा.

भास्कर - आम्ही काय केलं?

अविनाश - तुम्ही नाही, तुमच्या आर्यन खानने केलं आहे.

समर - आमचा आर्यन खान?

अच्युत – हो, हो तुमचा. तुम्हाला फार प्रेम आहे या लोकांचे.

भास्कर - हे बघ, जे काही झालं असेल, त्याबाबत यथावकाश कोर्ट निर्णय देईलच.

अविनाश - एक हिंदू अधिकारी जिवाची पर्वा न करता या लोकांना अटक करतो आहे आणि तुम्हाला काहीच वाटत नाही त्याचं?

भास्कर - आर्यन खानकडे शस्त्रं होती का?

अविनाश - त्याच्याकडे कशाला असायला पाहिजेत? तो ज्यांची कठपुतळी आहे, त्यांच्याकडे आहेत नं.

समर - म्हणजे कुणाकडे?

अविनाश - पाकिस्तानात बसले आहेत यांचे करविते.

भास्कर - तुला काय माहिती?

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

अविनाश - (मेसेज फॉरवर्ड करत) हा वाच मेसेज. पार पाकिस्तान-अफगाणिस्तानपर्यंत लिंक आहे शाहरूख खानची. भारताला अस्थिर करायचं कारस्स्थान आहे हे. ग्गेली अनेक वर्षे चालले आहे हे कारस्थान.

समर - कुणी पाठवला आहे हा मेसेज?

अच्युत - प्राध्यापिका वासंती साने.

समर - कोण आहेत या?

अविनाश - तुला रणरागिणी सानेकाकू माहीत नाहीत?

भास्कर – अरे, त्या काय इंदिरा गांधी आहेत का सगळ्यांना माहीत असायला?

अविनाश - तोंड सांभाळून बोल. त्या इंदिरा गांधींना सर नाही येणार सानेकाकूंची.

समर - का?

अच्युत - एकेक पोस्ट वाच त्यांच्या.

समर - सानेकाकू जबरदस्त पोस्ट लिहितात म्हणून त्या ७१चे युद्ध जिंकलेल्या इंदिरा गांधींपेक्षा मोठ्या?

अविनाश - प्रश्नच नाही. त्यांची मोदीनिष्ठा त्यांना इंदिरा गांधीपेक्षा मोठं करते.

भास्कर - (हसत) बरोबर आहे. काय करतात या?

अच्युत - एसएनडीटीमध्ये होम सायन्स शिकवतात.

समर हसून खुर्चीवरून पडतो.

अच्युत - (हसू नकोस) काय लिहिलं आहे ते वाच एकदा. सानेबाई एकेक जळजळीत पोस्ट लिहितात फेसबुकवर, तीन तीन हजार लाईक्स असतात.

भास्कर – अरे, काय लिहिलं आहे, ते सांग ना थोडक्यात.

अच्युत - सांग या देशद्रोह्याला थोडक्यात. देशभक्तीचं काही वाचवणार नाही त्याला.

अविनाश - शाहरूख खानचा मुलगा ही एक छोटी कडी आहे. या मागे दाऊद इब्राहिमचा इक्बाल तुंडा नावाचा हस्तक आहे.

(दाऊद इब्राहिम हा मुंबईतील एक गँगस्टर होता. १९९०च्या दशकामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून तो पाकिस्तानात पळाला. तिथे राहून पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या मदतीने तो भारतविरोधी कारवाया त्याच्या मृत्यूपर्यंत करत राहिला.)

भास्कर - मग?

अविनाश - हा इक्बाल तुंडा अफगाणिस्तानमधल्या गुलबुद्दीन हक्कानी नेटवर्ककडून हेरॉइन आणून शाहरूख खानच्या माणसांना देतो. भारताला बर्बाद करण्याचा डाव आहे हा? फार फार मोठं कारस्थान आहे हे. अनेक वर्षं चालू आहे.

अच्युत - हे सहा ग्रॅम चरस ‘टिप ऑफ आईसबर्ग’ आहे. वानखेडेसाहेबांची नेमणूक खुद्द मोदीजींनी केली आहे. बघ आता काय काय होतं आहे ते?

भास्कर - या बाईंना कशा कळल्या या गोष्टी?

अविनाश - अभ्यास आहे त्यांचा इंटरनॅशनल क्राइमचा.

समर - या बाईंना जे माहिती आहे, ते आपल्या मोदीजींना माहीत नाही का?

अविनाश - मोदीजींना सगळं माहीत असतं.

समर - मग शाहरूख खान मोकळा का आहे अजून?

अच्युत - मोदीजी वेळ आल्याशिवाय काही करणार नाहीत. ते मनात म्हणत असतील – ‘तेरी भी बारी आयेगी शाहरूख. तब तक कर ले मजे’.

अविनाश - हे प्रकरण आमिर खान, सलमान खान आणि सैफ अली खान यांच्यापर्यंत जाणार आहे.

अच्युत - महाराष्ट्रातले आठ मिनिस्टर लटकणार आहेत.

अविनाश - आणि विरोधी पक्षांचे चार मुख्यमंत्री.

भास्कर - सुशांत सिंग राजपूत प्रकरणातसुद्धा तू असंच म्हणाला होतास. तू म्हणाला होतास की, सुशांत सिंगचा खून झाला आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा मुलगा आत जाणार आहे म्हणून. काहीच झालं नाही तसं. उलट सुशांत राजपूतनं आत्महत्या केली असाच रिपोर्ट आला शेवटी.

अच्युत - तेव्हा चार मुख्यमंत्र्यांना अटक करण्याचे आदेश निघाले होते. मोदीजी शेवटच्या क्षणी थांबा म्हणाले.

भास्कर - तुला कसं माहिती?

अच्युत - सानेकाकूंनी लिहिलंय त्यांच्या फेसबुक वॉलवर.

समर - ही सानेकाकू त्रास देणार आपल्याला आता काही दिवस.

अच्युत - तोंड सांभाळून बोल. मोदीजी फॉलो करतात सानेकाकूंचे ट्विटर हँडल.

अविनाश - रणरागिणी सानेकाकू!

भास्कर - पण त्या जे बोलतात ते सगळं खरं असतं कशावरून?

अच्युत - मोदीजी उगीच फॉलो कशाला करतील मग त्यांना?

अविनाश - तीन तीन हजार लाईक्स असतात त्यांच्या पोस्ट्सना. त्या खरं लिहीत नसत्या तर एवढ्या लोकांनी त्यांना फॉलो कशाला केलं असतं?

भास्कर - अजून काय काय खरं बोलतात सानेकाकू?

अविनाश - समीर वानखेडे हा हिंदू हिरो आहे. मोदीजींनी त्यांना हेरलं आहे.

अच्युत - मोदीजी जेव्हा पदभार योगी आदित्यनाथ यांना सोपवून हिमालयात साधना करायला जातील, तेव्हा या हिंदू वीराला भारताचा ‘सिक्युरिटी सल्लागार’ म्हणून नेमून जाणार आहेत.

भास्कर - (हसत) ते बघू जेव्हा होईल तेव्हा.

समर - हे बघ आमचं असं म्हणणं आहे की, धर्मावरून कुणी क्रिमिनल वगैरे ठरत नाही. जे काही असेल ते कोर्ट ठरवेल.

अविनाश - (चिडून) तुम्ही धर्मांतर का करत नाही रे?

एवढ्यावर हा विषय त्या दिवसापुरता संपला.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

पुढे काही दिवस या विषयाने कहर केला. टीव्ही आणि सोशल मीडियावर दुसरा विषय नव्हता. समीर वानखेडे हे मोठे हिंदू हीरो कसे आहेत, याविषयी चवीचवीने पोस्ट लिहिल्या गेल्या. आणि एके दिवशी भक्तांवर मोठा बॉम्ब पडला. महाराष्ट्राचे तत्कालीन कौशल्य विकास मंत्री नबाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुसलमान असल्याचे जाहीर केले. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा प्रसिद्ध केला. त्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे आहे असे समोर आले. त्यांच्या आईचे नाव जाहिदा आणि बहिणीचे नाव फातिमा असल्याची माहितीसुद्धा नबाब मलिक यांनी शोधून काढली.

आता समर आणि भास्कर, अविनाश आणि अच्युत जिथे चहा प्यायला जात तिथे गेले.

समर – अरे, ते नबाब मलिक काय म्हणत आहेत? आपले समीर वानखडेसाहेब मुसलमान आहेत?

अविनाश - (चिडत) काहीतरी काय? त्या नबाब मलिकच्या जावयाला वानखेडेसाहेबांनी ड्रगसंदर्भात अटक केली होती म्हणून चिडचिड चालली आहे.

भास्कर – अरे, त्यांनी वानखेडेसाहेबांचा निकाहनामा सादर केला आहे.

अविनाश - फोटोशॉप्ड आहे तो. 

भास्कर - नबाब मलिक यांनी वानखेडेसाहेबांचे बर्थ सर्टिफिकेटसुद्धा सादर केले आहे.

अविनाश - जो माणूस निकाहनामा फोर्ज करू शकतो, तो बर्थ सर्टिफिकेट नाही का फोर्ज करू शकणार? 

अच्युत - सगळं फोटोशॉप्ड आहे.

समर – अरे, महाराष्ट्राचा एक मंत्री पत्रकार परिषद घेऊन कागदपत्र सादर करत आहे. तो जबाबदारीने नाही का करणार?

भास्कर - त्याने खोटे काही सादर केले, तर त्याचे मंत्रीपद नाही का धोक्यात येणार?

अविनाश - त्याला चांगले माहिती आहे की, हे सरकार नाहीतरी पडणारच आहे आठ दिवसांत.

भास्कर - हे सरकार येत्या आठ दिवसांत पडणार आहे असं तू गेली दोन वर्षं म्हणतो आहेस.

(तत्कालीन महाराष्ट्रात विरोधी आघाडीचे सरकार होते. ही गोष्ट मोदीभक्तांना फार खटकत होती. त्यामुळे हे सरकार येत्या आठ दिवसांत पडणार आहे, असे मोदीभक्त पाच वर्ष म्हणत होते. शेवटी २०२४ साली निवडणुका झाल्या आणि पुन्हा विरोधी आघाडीचेच सरकार आले. आता हे नवे सरकार येत्या आठ दिवसांत पडणार आहे, असे मोदीभक्त पुढे २०२९पर्यंत म्हणत राहिले. - संपादक)

समर - ते जाऊ द्या. थोडक्यात आरोप असे होत आहेत की, समीर वानखेडे हे मुसलमान आहेत. त्यांचे आजोबा दलित जातींपैकी एका जातीचे होते. पुढे ते मुसलमान झाले होते. परंतु मुसलमान झालेल्या दलितांना आरक्षणाचा फायदा मिळत नाही, हे बघून समीर वानखेडे यांनी आपण हिंदू आहोत, अशी कागदपत्रं सादर केली. त्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारावर सरकारी नोकरी मिळवली. त्यांनी खोटेपणा करून एका दलिताची संधी घालवली.

अविनाश - (संतापाने) अरे, या शाहरूख खान, आर्यन खान आणि नबाब मलिक या लोकांना तुम्ही का पाठिंबा देत आहात? या क्रिमिनल गँगचे तुम्ही मेंबर झाला आहात काय?

भास्कर - आम्ही कुठे कुणाला पाठिंबा देतो आहोत?

अविनाश - एक हिंदू अधिकारी आपल्या जिवाची बाजी लावून देशद्रोह्यांशी पंगे घेतोय आणि तुम्ही त्याच्यावर आरोप करताय तो मुसलमान आहे असे?

भास्कर - आम्ही कुठे आरोप करतोय? समीर वानखेडे यांच्यावर नबाब मलिक यांनी जे आरोप केले आहेत, ते फक्त आम्ही तुम्हाला सांगतो आहोत.

अच्युत - ते सगळं एकच!

समर – अरे, हे बघ समीर वानखेडे यांच्या लग्नातले फोटो प्रसिद्ध झाले आहेत. सगळा मुसलमानी माहौल आहे.

अविनाश - (अत्यंत रागाने) फोटोशॉप्ड, फोटोशॉप्ड, फोटोशॉप्ड! शंभर वेळा फोटोशॉप्ड!

भास्कर - हे बघ वानखेडे यांचे सासरे जाहिद कुरेशी, पहिली बायको शबाना कुरेशी आणि वानखेडे यांचा निकाह लावलेले मुअम्मिल काझी यांचे इन्टरव्ह्यू आले आहेत यू ट्यूबवर.

समर - आता या तिघांना काय थ्री-डी प्रिंट केले आहे का नबाब मलिक यांनी?

अविनाश - कशाला थ्री-डी प्रिंट करायला पाहिजे? अरे, खोटे लोक उभे केले आहेत.

अच्युत - तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.

अविनाश - तो आर्यन, तो शाहरूख आणि तो नबाब मलिक - सगळे तुरुंगात जाणार आहेत.

अच्युत - आणि मोदीजी तुम्हालाही तुरुंगात टाकणार आहेत.

भास्कर - कुठल्या आरोपाखाली?

अच्युत - कळेल तुम्हाला लवकरच.

यावर अच्युत आणि अविनाश चिडून निघून गेले.

भास्कर - फार मजा आहे.

अविनाश - अजून फार मजा येणार आहे.

यानंतर दोन-तीन दिवसांत खूप घडामोडी घडल्या. भास्कर आणि समरला राहवले नाही. ते पुन्हा अविनाश आणि अच्युतला भेटायला गेले. त्यांना फार मजा वाटत होती.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

समर – अरे, सगळीकडे बातम्या आल्या आहेत की, निकाहनामा खरा आहे. समीर वानखेडे यांच्या दुसऱ्या पत्नीने सांगितले आहे की, निकाहनाम्यावरची सही समीर वानखेडे यांचीच आहे.

अविनाश - खोट्या आहेत त्या बातम्या.

भास्कर - तो काझी म्हणतो आहे की, समीर वानखेडे मुस्लीम नसते तर मी निकाहच लावला नसता. शरियाच्या विरुद्ध झालं असतं ते.

अच्युत - तुम्हाला फार प्रेम आहे शरियाबद्दल.

भास्कर – अरे, आम्ही फक्त तो काझी काय म्हणतो आहे ते सांगतोय.

समर - ही बघ अजून एक बातमी - समीर वानखेडे यांनी त्यांची पहिली पत्नी शबाना कुरेशी हिला मुस्लिम लॉ बोर्डाच्या नियमांप्रमाणे घडस्फोट दिलाय.

भास्कर - याचा अर्थ निकाहनामा खरा आहे.

अविनाश - हे साले वर्तमानपत्रवाले काहीही छापतात.

समर - बरं ते जाऊ दे. रणरागिणी सानेकाकू काय लिहितायत या प्रकरणाबद्दल?

अच्युत - काही नाही.

समर - (हसत) का?

अच्युत - त्यांना काय हा एकच विषय आहे का लिहायला?

भास्कर - (मोबाईल पुढे करत) हे बघ वानखेडे काय लिहितायत! माझी आई मुस्लीम होती आणि तिच्या आग्रहाखातर मी निकाह केला.

अविनाश - असेल केला. एखादा हिंदू आईच्या प्रेमाखातर निकाह करू शकतो.

भास्कर - तुझ्या माहितीत असा निकाह केलेले किती हिंदू आहेत.

अविनाश - (चिडून) खूप आहेत.

भास्कर - पाच नावे सांग तुझ्या माहितीतली.

अविनाश - नावे कशाला सांगायला पाहिजेत? डोळे उघडे ठेवून बघ. सगळीकडं दिसतील उदाहरणे तुला.

अच्युत - मी काय म्हणतो, असेल केला निकाह त्यांनी, पण त्यामुळे वानखेडेसाहेब मुसलमान होऊ शकत नाहीत.

समर - का?

अच्युत - त्यांचे वडील हिंदू होते, त्यामुळे कायद्याप्रमाणे ते हिंदूच ठरतात.

भास्कर - निकाहनाम्यावर त्यांच्या वडिलांनी दाऊद वानखेडे म्हणून सही केली आहे.

अविनाश - तू गप रे! काहीतरी फालतू बडबड करू नकोस. तुला एवढंच प्रेम असेल या लोकांचं तर पाकिस्तानात राहायला जा.

अच्युत – अरे, त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानेश्वर वानखेडे आहे. त्यांनी जाहिदा वानखेडे यांच्याशी लग्न केलं.

समर - श्री ज्ञानेश्वर वानखेडे यांनी मोहतरमा जाहिदा वानखेडे यांच्याशी लग्न का केले आहे, हा विषय नाहिये. विषय असा आहे की, या ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आपल्या मुलाच्या निकाहनाम्यावर आपले नाव दाऊद वानखेडे असे का लावले?

अच्युत – अरे, त्यांचे नाव ज्ञानेश्वरच आहे. त्यांनी टीव्हीवर मुलाखतीत सांगितलं की, त्यांची पत्नी त्यांना लाडाने ‘दाऊद’ म्हणत असे.

भास्कर – हां, हे मात्र पटण्यासारखं आहे. आमच्या शेजारी एक व्यंकटेश रानडे म्हणून राहतात, त्यांची बायकोसुद्धा त्यांना लाडाने ‘खालिद’ म्हणते.

समर - हो हो, आमच्या शेजारी एक लेले म्हणून राहतात, त्यांची बायको त्यांना लाडाने ‘अब्दुल्ला’ म्हणते.

अविनाश - चेष्टा करू नका. हरामखोर!

भास्कर - आम्ही अजिबात चेष्टा करत नाही आहोत. पाहिजे तर तुझी गाठ घालून देतो रानडेकाकूंशी. तू स्वतः विचार त्यांना ‘तुम्ही रानडे काकांना लाडाने ‘खालिद’ म्हणता की नाही?’ म्हणून.

समर - पण थोडा सावध राहा विचारताना. तुम्ही रानडे काकांना ‘खालिद’ म्हणता का असं विचारलं की, रानडेकाकू हातात असेल ते फेकून मारतात.

अविनाश - विनोद करू नकोस. एवढा द्वेष चांगला नाही देशासाठी लढणाऱ्या ऑफिसरबद्दल.

भास्कर - हे बघ, आमच्या मनात कुणाहीविषयी द्वेष नाही. आम्हाला इतकंच म्हणायचं आहे की, वानखेडे यांचे वडील हिंदू असतील तर आर्यन खानची आईसुद्धा हिंदू आहे.

अच्युत - हे बघ सानेकाकूंची पोस्ट आली आहे फेसबुकवर. त्या म्हणतायत की, वानखेडे हिंदूच आहेत, फक्त त्यांची आई मुसलमान आहे.

समर - म्हणजे नबाब मलिक म्हणत होते, त्यात काहीतरी तथ्य होते तर.

अविनाश - तू गप रे!

भास्कर - हे बघ एक लक्षात घे, वानखेडे यांची आई मुसलमान असेल आणि त्यांचे वडील हिंदू असतील तर आर्यन खानचेसुद्धा वडील मुसलमान आणि आई हिंदू आहे.

अच्युत - ती वेगळी गोष्ट. कायद्याप्रमाणे पोराला बापाचा धर्म मिळतो.

अविनाश - बाप ज्या धर्माचा असेल त्या धर्माचे संस्कार होतात मुलांवर. साने बाईंनी लिहिले आहे.

भास्कर – खरं तर आपल्या समाजात मुलं आईजवळ असतात संस्कारक्षम वयात. त्यामुळे आईच्या धर्माचे संस्कार जास्त होतात मुलांवर असंही म्हणता येईल.

अच्युत - तू सानेबाईंना विरोध करायची हिंमत करू नकोस. स्वतः मोदीजी फॉलो करतात त्यांना.

अविनाश - आणि तीन तीन हजार लाईक्स मिळतात त्यांना.

समर - तू भांडतोस कशासाठी? त्या सानेबाईला मोदी फॉलो करत असतील नाहीतर अजून कुणी. तू भास्करचा मुद्दा खोडून काढ ना.

अविनाश - तुम्हाला नुसता गोंधळ घालायचा आहे आणि त्या लोकांना समर्थन द्यायचं आहे.

भास्कर - आम्हाला फक्त आमच्या मुद्द्याला उत्तर हवं आहे.

समर - एक सांग, जीन्स आणि डीएनए धर्म ओळखतात का?

भास्कर - वानखेडेसाहेबांनी आपण दलित आहोत, असा दाखला देऊन मोठी नोकरी मिळवली आहे.

अच्युत - ते खोटं बोलले असं तुला म्हणायचं आहे का?

भास्कर - ते खरं बोलत आहेत की, खोटं हे कोर्ट ठरवतील.

समर - आणि आर्यन खान दोषी आहे की नाही, हेसुद्धा कोर्टच ठरवणार आहे.

भास्कर - ए, जीन्स आणि डीएनए जात तरी ओळखतात का रे?

अविनाश - तुला काय म्हणायचे आहे? या जगातले सगळे लोक एकसारखे आहेत का?

भास्कर - एकसारखे नाहीत, पण समान आहेत असं मला म्हणायचं आहे.

अच्युत - लोक समान असू शकत नाहीत. धर्म वेगवेगळे असतात आणि त्याप्रमाणे लोक वेगवेगळे असतात.

भास्कर - आपण सत्य काय आहे ते बघायला हवे. मानवी जीवनानुभव फक्त धर्माच्या किंवा जातीच्या आयडेंटिटीवर कसा जोखता येईल?

समर - जीवन खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं नाही का तुला वाटत?

अविनाश - तुला म्हणायचे काय आहे?

भास्कर - तुझा जातीपातीवर विश्वास आहे का?

अविनाश - थोडा आहे आणि थोडा नाही.

समर - (हसायला लागतो) म्हणजे काय?

भास्कर - म्हणजे त्याला म्हणायचे आहे की, जातपात मोडून काढली पाहिजे. हिंदू एक झाला पाहिजे. सगळ्या जातींनी बीजेपीला मते दिली पाहिजेत. पण आरक्षण असता कामा नये.

अविनाश - बरोबर.

समर - (हसत) मग खालच्या जातीतील लोकांनी वर कसं यायचं?

अविनाश - यांना वर आणण्याच्या नादात भारत खाली चालला आहे.

भास्कर - आपले वानखेडेसाहेब चांगले अधिकारी आहेत की नाही?

अविनाश - प्रश्नच नाही. ही इज अ सुपरकॉप.

भास्कर - पण ते आरक्षणाचा वापर करून आले आहेत.

अविनाश - काय म्हणायचंय काय तुला?

भास्कर - आरक्षणातून वानखेडेसाहेबांसारखे लोक येत असतील, तर आरक्षणाला सरसकट वाईट नाही म्हणता येणार.

अच्युत - फालतू बडबड करू नकोस बे.

समर - तू एक काम कर अविनाश. आता तुला सत्य नाकारता येणार नाही. वानखेडेसाहेब एक तर मुस्लीम आहेत किंवा दलित आहेत, हे आपल्याला मान्य करावं लागणार आहे. ते दलित असतील तर तुझी आरक्षणाविषयीची मतं चुकीची आहेत, हे तुला मान्य करावं लागणार आहे.

अविनाश - वानखेडेसाहेबांचे वडील हिंदू आहेत आणि आर्यन खानचे वडील मुसलमान आहेत - विषय संपला…

भास्कर - म्हणजे आईचं काहीच काँट्रिब्यूशन नसतं आपल्या मुला किंवा मुलीमध्ये?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अविनाश - कायद्याप्रमाणे जनरली वडिलांचा धर्म मिळतो मुला-मुलींना. आणि दॅट इज फायनल. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. नाही तर अंदाधुंदी माजेल.

भास्कर - मग आपला कायदा, आपली घटना म्हणते आहे की, या देशातले सगळ्या धर्माचे लोक समान आहेत.

अच्युत - असं कसं असेल? जरा डोकं चालव की!

भास्कर - मग मुलगा फक्त वडिलांचा कसा असेल? जरा डोकं चालव की.

अविनाश - तुला वाटत असेल की, तू विचारवंत आहेस पण तू एक अत्यंत फालतू माणूस आहेस.

अच्युत - साने काकूंनी एक पोस्ट लिहिली होती – ‘विचारवंतांना जोड्याने मारा’.

भास्कर - विचारवंतांना जोड्याने मारा, अगदी चांगल्या प्रतीच्या विचारवंतांना पण जोड्याने मारा, पण त्या नादात चांगल्या विचारांनासुद्धा का जोड्याने मारताय?

समर - फार मोठं वाक्य बोलून गेला आहेस भास्कर तू.

यावर अच्युत आणि अविनाश समर आणि भास्करला ‘तुम्ही पाकिस्तानात राहायला जा, म्हणजे कळेल तुम्हाला धर्माविरुद्ध बोललं की काय होतं ते’ असं म्हणाले आणि तावातावाने निघून गेले.

..................................................................................................................................................................

खरंच, त्या काळी खूप लोक वैचारिक गोंधळात सापडले होते. आपल्या गैरसमजांना पकडून ठेवण्याची मानवी प्रवृत्ती, आपली आपली टोळी करून राहण्याची मानवाची प्रवृत्ती आणि २०२०च्या दशकात सोशल मीडियावर झालेला गैरप्रचार - या सगळ्या गोष्टींनी हा गोंधळ अतिशय वाढवला. २०२०च्या आणि २०३०च्या दशकात हा गोंधळ पराकोटीला गेला.

पण, ज्या सोशल मीडियामुळे हा गोंधळ वाढला, तोच सोशल मीडिया पुढे हा गोंधळ कमी होण्यास कारणीभूत झाला. योग्य विचार हळूहळू का होईना प्रसारित होत राहिले. डहुळलेल्या समाजातील गढूळ विचारांचे पाणी स्वच्छ होत गेले.

सगळ्या जाती-धर्मांनी एकी दाखवली तरच देशाचा आर्थिक विकास होतो, हा विचार २०४०पर्यंत सर्वत्र रुजत गेला. जसजसा भारताचा आर्थिक विकास होत गेला, तसतसा आरक्षणाच्या प्रश्नामुळे समाजामध्ये आलेली कटुता कमी होत गेली. कारण सरकारवर शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी अवलंबून राहणाऱ्या लोकांचे प्रमाण २०४०पर्यंत अत्यंत कमी झाले. 

मुसलमान समाज जसजसा प्रगत होत गेला, तसतसा त्यांचा बर्थ रेट २०१०च्या दशकापासून कमी होत गेला. त्यामुळे हे लोक हिंदूंना लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकतील, हा प्रचार २०४०नंतर करता येईनासा झाला.

२०८०च्या सुमारास तर हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्माच्या लोकांना आपापला बर्थ रेट वाढवा, अशी विनंती करण्याची पाळी सरकारवर आली. कारण दोन्ही धर्मातील लोकांमध्ये बर्थ रेट अत्यंत कमी झाला होता. काम करण्याच्या वयातील प्रजा कमी होऊन म्हाताऱ्या लोकांची संख्या भारतामध्ये २०७५च्या सुमारास खूप वाढली होती. 

परंतू हा शांततेचा काळ येण्या आधी खूप चर्चा झाली. २०४०च्या आधीच्या काळात या चर्चेला योग्य मार्गावर ठेवण्याचे काम भास्कर आणि समरसारखे अनेक लोक करत राहिले. या लोकांचे २१२१मध्ये राहणाऱ्या आपल्यासारख्या लोकांवर खूप उपकार आहेत. रात्रं-दिवस विरोधकांच्या शिव्या खात योग्य चर्चा जागती ठेवण्याचे काम सोपे नव्हते. भास्कर आणि समर यांनी ही चर्चा सुसंस्कृत विनोदाचे गुलाबपाणी शिंपडत जागी ठेवली. यांच्यासारख्या लोकांनी चर्चेच्या वेळी तापमान कधीही वाढू दिले नाही, ही गोष्ट लक्षात आजच्या वाचकांनी लक्षात घेण्यासारखी आहे.

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......