जेव्हा चिनी स्वप्नांनी मारली भरारी, तेव्हा….
पडघम - विदेशनामा
सत्येंद्र रंजन
  • चीनचा ध्वज, चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताव आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग
  • Mon , 19 July 2021
  • पडघम विदेशनामा चीन China माओ-त्से-तुंग Mao Tse-tung कम्युनिस्ट पक्षChinese Communist Party तेंग सीयाओ पिंग Deng Xiaoping हू जिंताव Hu Jintao शी जिन पिंग Xi Jinping

चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस जियांग झेमिन यांनी २०००मध्ये एक नवीन सिद्धान्त मांडला. त्याला ‘तीन प्रतिनिधित्वाचा (Three represents) सिद्धान्त’ म्हटले जाते. पक्ष आजही याच सिद्धान्तावर चालत आहे. त्यानुसार

- पक्ष प्रगत उत्पादन शक्तींच्या विकासाच्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो

- पक्ष प्रगत संस्कृतींच्या प्रवाहाचे प्रतिनिधीत्व करतो

- पक्ष चिनी जनतेतील बहुसंख्य लोकांच्या हितांचे प्रतिनिधित्व करतो

या सिद्धान्तात त्यांनी सर्वहारा या शोषित वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याची बाब सोडून दिली आहे, हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याला जनतेच्या व्यापक बहुसंख्येत सामील असल्याचे समजण्यात आले आहे. प्रगत उत्पादक शक्तींचा अर्थ उद्योगधंद्यातील वर्ग आहे, ज्याला परंपरागत शास्त्रीय कम्युनिस्ट चर्चेमध्ये ‘बुर्झ्वा’ वर्ग म्हटले जात असते. दर पाच वर्षांनी चिनी कम्युनिस्ट पक्षाचे महाअधिवेशन (काँग्रेस) होते. २००२ साली झालेल्या महाअधिवेशनात या सिद्धान्ताला मान्यता देण्यात आली. त्यानंतर बऱ्याचशा विभागांमध्ये पक्षाने मार्क्स, एंगल्स, लेनिन, स्टालिन, माओ यांच्या विचारांचा आधार असलेल्या वर्गसंघर्षाचा व वर्गावर आधारित प्रतिनिधित्वाचा मुद्दा सोडून दिला असल्याची टीका करण्यात आली.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

२००२मध्ये हू जिंताव पक्षाचे सरचिटणीस बनले. त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात पक्षांमध्ये कोणताच मोठा सैद्धान्तिक बदल झाला नाही. यादरम्यान चिनी कम्युनिस्ट पक्ष आणि चीन सर्वसाधारणपणे तेंग आणि जियांग झेमीन यांच्या मार्गावर पुढे चालत राहिले. या काळात ‘प्रगत उत्पादक शक्तीं’चा प्रभाव पक्ष आणि समाजजीवनावर वाढत होता. पण चीनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत होती, तर दुसरीकडे भांडवली आर्थिक आणि सांस्कृतिक प्रवृत्तीसुद्धा समाजात खोलपर्यंत रुजत होत्या. पण आंतरराष्ट्रीय पटलावर चीन ‘hide strength, bide time’ या सूत्राचे पालन करतच, आपली देशांतर्गत समृद्धी वाढवण्यात व्यग्र राहिला.

जेव्हा २०१२मध्ये शी जिन पिंग पक्षाचे सरचिटणीस बनले, तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाची ही दिशा आणखीच स्पष्ट झाली. शी जिन पिंग यांनी तेव्हा म्हटले होते की, ‘चीनचे स्वप्न’ (the Chinese dream) चिनी राष्ट्राचे महान पुनरुत्थान करण्याचे आहे. तेव्हा त्यांनी ‘दोन शताब्दी समारोहा’पर्यंतचे आपले उद्दिष्ट जाहीर केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, २०२१पर्यंत म्हणजे पक्षाचे शताब्दी वर्ष पूर्ण होईपर्यंत चीनचा उद्देश एक सर्वसाधारण समृद्ध समाज बनवण्याचे असेल. त्यानंतर १९४९मध्ये ‘पीपल्स रिपब्लिक’ची स्थापना झाल्याच्या शंभर वर्ष पूर्ण होईपर्यंतचा उद्देश चीनला एक पूर्ण विकसित देश बनवण्याचे असेल. चीन आता त्याच दिशेने पुढे जात आहे. २०२१पर्यंतचे लक्ष्य त्याने प्राप्त केले आहे, असे आज आपण म्हणू शकतो.

शी जिन पिंग यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचारविरोधी संघर्ष आणि लोककल्याणासारख्या धोरणावर जोर देण्यात आला. त्याला सर्वसाधारणपणे ‘सोशल डेमोक्रॅटिक कार्यक्रम’ म्हटले जाते. शी यांनी सरचिटणीस झाल्याबरोबर ‘भ्रष्ट वाघांवर आणि माशांवर’ सारख्याच पद्धतीने कारवाई करण्याची घोषणा केली होती. याचा अर्थ लहान-मोठ्या कोणत्याच भ्रष्ट व्यक्तीची गय केली जाणार नाही. मग ती व्यक्ती कितीही मोठी असो अगर लहान असो- या धोरणानुसार कम्युनिस्ट पक्षांमध्ये उच्चस्थानावर असलेल्या लोकांनाही शिक्षा देण्यात आल्या आहेत.

परंतु यामुळे खरोखरच भ्रष्टाचारावर किती लगाम लावण्यात आला आहे, हे समजण्यासाठी आमच्याजवळ कोणताच नि:पक्षपाती स्रोत नाही. सोशल डेमोक्रॅटिक धोरणांतर्गत आरोग्य आणि शिक्षणासारख्या क्षेत्रांमध्ये, सार्वजनिक क्षेत्रांची भूमिका मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. या काळात ‘समाजवादी बाजारपेठे’चा आणखी एक सिद्धान्त मांडण्यात आला. त्याचा अर्थ असा आहे की, उद्दिष्ट तर समाजवादाचेच राहील, परंतु बाजाराला त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक स्वातंत्र्याने काम करण्याची संधी देण्यात येईल. भारताच्या अनुभवानुसार हे धोरण नेहरूवादी मिश्र अर्थव्यवस्थेसारखाच एक प्रयोग असल्याचे आपण म्हणू शकू. याच विचारावर आधारित चिनी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या विचारधारेत शी जिन पिंग यांच्या विचाराला खास जागा देण्यात आली आहे.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९७६६३९८५०७

..................................................................................................................................................................

तथापि, या काळात अशा काही घटना घडल्या की, ज्यामुळे तेंग शियाओ पिंग यांचे ‘खाली वाकून चालत, आपली समृद्धी वाढवण्याचे’ जे सूत्र होते, ते कुचकामी ठरले. याचा अर्थ असा की, चीनची वाढत चाललेली समृद्धी आणि शक्ती यावर जगाचे लक्ष गेलेच. यामध्ये जगाला पहिली संधी २००७-०८मध्ये आलेल्या जागतिक मंदीतून मिळाली. त्या काळी जेव्हा संपूर्ण जगातील मोठ्या अर्थव्यवस्था खोल संकटात रुतल्या होत्या, त्या वेळेस चीनने प्रचंड सरकारी खर्च करून मंदीच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी पुढाकार घेतला. चिनी सरकारने त्यावेळेस ५८० अरब डॉलरचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले. त्यामुळे चीनमध्ये मूलभूत उद्योगाच्या विकासाच्या महत्त्वाच्या योजना सुरू झाल्या.

सोबतच जनकल्याणकारी योजनांवरही प्रचंड खर्च करण्यात आला. त्याच्या परिणामी चीनच्या मूलभूत उद्योग क्षेत्रातील उत्पादन क्षमतेमध्ये जबरदस्त वाढ झाली. त्याचा उपयोग चीनने आधुनिक मूलभूत उद्योग उभे करण्यासाठी केला. वास्तविक पाहता चीनने ज्या तीव्र गतीने उच्च पातळीवरील मूलभूत उद्योगाचा पाया   उभारला, त्यामुळेही त्याने किती मोठ्या प्रमाणात आपली आर्थिक आणि तांत्रिक प्रगती केली, ते जगासमोर  उघड झाले.

याच काळात चीनच्या आयातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याच्या परिणामी मंदीत सापडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला सांभाळण्यात या आयातीची मोठी मदत झाली. या कारणाने त्या वेळेस अनेक अर्थशास्त्रज्ञांनी चीनला ‘जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन’ म्हटले होते. भरीस भर म्हणून २००८ साली बिजिंगमध्ये जागतिक ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या आयोजनानेसुद्धा जगाला आश्चर्यचकित करून टाकले. शिवाय स्वर्णपदकाच्या मालिकेमध्ये चीन जगात प्रथम क्रमांकावर पोहोचला होता. आतापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. या सर्व घटना जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या.

असे म्हटले जाते की, या काळात चीनने मूलभूत उद्योगात मोठी गुंतवणूक केली. त्यामुळे त्याचे उत्पादन आणि मूलभूत उद्योगाचा विकास त्यांच्या घरगुती उपयोगांपेक्षाही बराच जास्त झाला. तेव्हा चीनने त्याच्या उपयोगाचा मार्ग शोधून काढला. २०१२मध्ये शी जिन पिंग पक्षाचे सरचिटणीस बनले. तेव्हा त्यांनी या क्षमतेचा वापर करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय योजना जाहीर केली. ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’च्या नावाने ती योजना ओळखली जाते. त्याअंतर्गत प्राचीन इतिहासात उल्लेख असलेल्या सिल्क रोडच्या धर्तीवर आशिया- युरोप आणि आफ्रिकेपर्यंत रस्ते, रेल्वे, जलमार्ग यांना विकसित करण्याची ही योजना सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत वेगवेगळ्या देशांमध्ये चीनच्या आर्थिक मदतीने तेथील आधुनिक मूलभूत पायाचा विकास सुरू करण्यात आला. आतापर्यंत १६७ देश या योजनेचा भाग बनले आहेत. 

या योजनेमध्ये चीनच्या बँका कर्ज उपलब्ध करून देतात. चिनी कंपन्या प्रोजेक्ट निर्माण करतात. त्यात जास्तीत जास्त चीनमध्ये उत्पादित झालेल्या सामग्रीचा वापर करण्यात येतो. अशा प्रकारे या योजनेमार्फत चीनचा अंतर्गत आर्थिक विकास आंतरराष्ट्रीय विकास योजनेशी जुळून आला आहे. अर्थात या कारणाने विशेषत: विकासशील देशांमध्ये चीनच्या प्रभावात वाढ झाली आहे, हे उघडच आहे.

एकीकडे असा घटनाक्रम घडला, तर दुसरीकडे अमेरिका आणि उर्वरित पाश्चिमात्य देश २००७-०८च्या मंदीच्या तडाख्यातून अजूनपर्यंत स्वतःला सावरू शकले नाहीत. तथापि, जरा खोलात जाऊन पाहिले तर आपल्या हे लक्षात येईल की, त्या देशांनी आर्थिक जागतिकीकरणावर जोर दिल्यामुळे १९९० आणि २०००च्या दशकात जे आपले ‘डी इंडस्ट्रीयलायझेशन’ करून घेतले, त्याचा हा परिणाम आहे. कारण, त्यांनी आपल्या मूलभूत उद्योगांना चीनमध्ये जाऊ दिले. त्यामुळे त्यांचा रोजगार आणि सर्वसामान्य जनतेचे सरासरी उत्पन्न सांभाळून ठेवण्याचे तंत्र त्यांच्या हातून निघून गेले. त्यांची पूर्ण अर्थव्यवस्था शेअर मार्केट, बँकिंग, विमा, रिअल इस्टेट आणि उच्च तांत्रिक कंपन्यांच्या कारभारामध्येच गुंतून गेली.

आज या क्षेत्रांचे मालकच खऱ्या अर्थाने त्या देशांच्या पूर्ण अर्थव्यवस्थेचे इथपर्यंत की, त्या देशांच्या राजकारणाचे पूर्ण नियंत्रकही तेच बनले आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य समाजात दुही निर्माण झाली. दुसरीकडे याच घटनाक्रमाचा परिणाम म्हणून चीनने आपल्या जनतेचे जीवनमान उंचावत आपल्या जागतिक प्रभावामध्ये वाढ करण्यात यशस्वी झाला आहे आणि हेच आज सुरू होत असलेल्या नवीन शीतयुद्धाचे मूळ कारण आहे.

प्रत्यक्षात, आताच्या परिस्थितीत ज्या मार्गाने चीन चालत आहे, त्यावरून तर हे स्पष्टच आहे की, तो मार्क्सवादी समाजवादाच्या शास्त्रीय समजाला धरून नाही. त्याचे जागतिक परिणाम पाहता, त्याच्यावर साम्राज्यवादी मार्गाने चालत असल्याचा जो आरोप केला जातो, तोही याच कारणाने. त्यामुळे पश्चिमेकडील बरेचसे डावेसुद्धा चीन आणि पश्चिमी देशांमध्ये चालू असलेल्या या संघर्षाला ‘दोन भांडवली शक्तींमधील संघर्षा’च्या रूपात पाहत आहेत. या क्रमात लेनिन यांच्या ‘साम्राज्यवाद ही भांडवलशाहीची सर्वोच्च अवस्था आहे’ या सिद्धान्ताच्या आधारावर वरील समज केला जात आहे. त्यानुसार असे मानले जाते की, भांडवली देश आपल्या अतिरिक्त उत्पादनाच्या विक्रीसाठी आणि त्यातून आपला नफा वाढवण्यासाठी विदेशामध्ये बाजारपेठेचा शोध घेत असतात. याच समजाच्या आधारावर पहिल्या जागतिक युद्धाचे मार्क्सवादी विचारवंतांनी दोन साम्राज्यवादी शक्तींमधील हितसंबंधांच्या केले होते. 

मात्र, चीनला अशा खाच्यात फिट बसवायचे असल्यास त्याच्या अंतर्गत व्यवस्थेला कसे समजून घ्यावे, असा प्रश्न निर्माण होतो. चिनी कम्युनिस्ट पक्ष आज चीनच्या व्यवस्थेला ‘socialism with chinese characteristic’ म्हणजे ‘चिनी स्वभावाचा समाजवाद’ असे म्हणतो. परंतु त्यांचे असे टीकाकार जे चीनला सरळ सरळ भांडवली म्हणण्यापासून स्वतःला वाचवू इच्छितात, ते मात्र त्यास ‘राजकीय भांडवलवाद’ (state capitalism) म्हणतात. काही तर यापेक्षाही जास्त कडक असलेले टीकाकार आपली टीका एक पाऊल आणखी पुढे नेऊन चीनला ‘अधिनायकवादी भांडवली’ देश (authoritarian capitalism) या शब्दाचा वापर करतात. परंतु जर आपण खोलात गेलो आणि सर्वच गुंतागुंतीकडे ध्यान दिले तर, अशा प्रकारचे सर्वच मूल्यमापन (characterization) म्हणजे एक प्रकारे त्याचे सुलभीकरण करण्याचाच प्रयत्न असल्याचे आपल्या लक्षात येईल.

म्हणून समाजवाद म्हणजे काय? या संबंधात आजपर्यंत सर्वमान्य होईल, असा समज जगात कुठेच उपलब्ध नाही. मार्क्सवादी चर्चाविश्वात जर या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले तर, या बाबीचा निश्चितच उल्लेख करावा लागेल की, कार्ल मार्क्स यांनी समाजवाद आणि साम्यवाद हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले आहेत. त्यांच्या चर्चाविश्वात ही एका विशेष प्रकारच्या समाजव्यवस्थेव्यतिरिक्त, एक उच्च आदर्श आणि मार्गदर्शक सिद्धान्त या स्वरूपात त्याची चर्चा केली आहे. तेथे मानव समाजाला आपल्या विकासक्रमात पोहोचायचे आहे. ही अवस्था तेव्हा येणार, जेव्हा समाजात वर्ग आणि राज्यव्यवस्था यांचा विलोप होऊन जाईल. मार्क्सच्या कल्पनेमध्ये समाजवादी/साम्यवादी अवस्था म्हणजे एक वर्गविहीन आणि राज्यविहीन समाजव्यवस्था असेल.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

इतिहासकारांच्या एका प्रवाहाचा असा समज आहे की, १८७१मध्ये पॅरिस कम्यूनला क्रूरपणे चिरडून टाकल्यानंतर मार्क्सवादी चर्चाविश्वात अशी चर्चा सुरू झाली की, ताबडतोबीने वर्गविहीन समाजव्यवस्थेचे स्वप्न साकार होऊ शकत नाही. त्यासाठी त्यापूर्वी कोणती तरी वेगळी समाजव्यवस्था असली पाहिजे. त्या चर्चेच्या परिणामी कामगार वर्गाच्या सर्वाधिकारी सत्तेचा विचार पुढे आला. याच चर्चेतून ही गोष्टही समोर आली की, क्रांतीला आपल्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याच्यानंतर राज्यव्यवस्थेला संचालित करण्यासाठी कामगार वर्गाच्या एका आघाडीच्या तुकडीची गरज असेल. या आघाडीच्या तुकडीचे व्यावहारिक रूप म्हणजेच कम्युनिस्ट पक्ष असेल.

जेव्हा १९१७ साली रशियामध्ये क्रांती झाली आणि सत्ता बोल्शेविकांच्या हातात आली, तेव्हा नवीन व्यवस्थेला कशा प्रकारे चालवावे आणि तिला काय नाव द्यावे, असा व्यावहारिक प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. या नवीन परिस्थितीत असा समज बनला की, साम्यवादाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याअगोदरची एक अवस्था म्हणजे समाजवाद होय. या समाजव्यवस्थेमध्ये वर्ग आणि राज्य दोन्ही कायम राहतील. परंतु राज्यावर नियंत्रण मात्र सर्वहारा कामगार वर्गाचे राहील. त्यामुळे सोव्हिएत संघाच्या नावाबरोबर ‘समाजवादी’ शब्द जोडण्यात आला. १९७०च्या दशकामध्ये सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाने असे जाहीर केले की, सोव्हिएत युनियनमध्ये समाजवाद निर्माण करण्याचे कार्य पूर्ण झाले.  आता साम्यवादाकडे त्याची वाटचाल सुरू झाली आहे. अर्थात ही वाटचाल आता कुठपर्यंत पोहोचली आहे, हे सर्व आपल्यासमोर आहेच.

प्रत्यक्षात मात्र चिनी कम्युनिस्ट पक्षाने १९४९ साली झालेल्या आपल्या क्रांतीला ‘समाजवादी क्रांती’ असे म्हटले नाही आणि जी नवीन व्यवस्था त्यांनी उभारली, तिलाही त्यांनी ‘समाजवादी’ शब्दाची जोड दिली नाही. येथे ही बाबसुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे की, सोव्हिएत युनियनने आणि त्यांच्या गटातील इतर देशांनी किंवा आज अस्तित्वात असलेल्या क्युबा तसेच व्हिएतनामसारख्या देशांतून अर्थव्यवस्थेचे संचालन तेथील राज्याच्याच हातात होते. अशात जो काही आधुनिक औद्योगिक ढाचा तेथे उभा राहिला आहे किंवा मग शेती व इतरही कारभाराला जे काही स्वरूप दिले गेले, त्याला सहजपणे राजकीय भांडवलशाहीच्या कक्षेत ठेवले जाऊ शकते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

शेवटी या व्यवस्थेमधील उत्पादनासाठी अतिरिक्त मूल्य कुठून ना कुठून तरी मिळवले जातेच. तरीही जे उत्पादन तयार होते, त्यांची आयात-निर्यात केली जाते. त्यामुळे चीनमध्ये जर राज्याच्या नियंत्रणाखालील एक विशेष प्रकारचा प्रयोग होत असेल तर त्याला ‘राजकीय भांडवलशाही’ म्हणून संपुष्टात आणणे, याला काही समजदारपणाची प्रतिक्रिया म्हणता येणार नाही.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, चीनची आजची व्यवस्था ‘authoritarian’ आहे, की तेथे ‘राजकीय भांडवलशाही’ने ‘साम्राज्यवादा’चे रूप धारण केले आहे? या प्रश्नावर गंभीरपणे चर्चा होण्याची गरज आहे. या लेखमालेच्या पुढच्या लेखात आम्ही त्याच्यावरच विचार करणार आहोत.

मराठी अनुवाद – कॉ. भीमराव बनसोड

..................................................................................................................................................................

या लेखमालिकेतील आधीच्या लेखांसाठी पहा -

चीन : एका देशाच्या कायापालटाची अभूतपूर्व कथा

‘मागास’ चीनला ‘आधुनिक’ बनवण्याचा एक ‘ग्रँड प्रोजेक्ट’!

सोव्हिएत युनियनशी झालेल्या संबंधविच्छेदानंतर चीनने आपला वेगळा मार्ग पत्करला!

…आणि तेंग यांनी समाजवाद म्हणजे ‘गरिबीचे समान वाटप नाही’ हा आपल्या विचाराचा प्रमुख मुद्दा बनवला

माओ यांनी मशागत केलेल्या जमिनीत तेंग यांनी समृद्धीचे बी पेरले

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://www.mediavigil.com’ या पोर्टलवर २५ जून २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा - 

https://www.mediavigil.com/op-ed/xi-jinping-took-the-batten-fronm-hu-zintao-and-chinas-dream-took-flight/

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा