‘मागास’ चीनला ‘आधुनिक’ बनवण्याचा एक ‘ग्रँड प्रोजेक्ट’!
पडघम - विदेशनामा
सत्येंद्र रंजन
  • माओ-त्से-तुंग
  • Mon , 12 July 2021
  • पडघम विदेशनामा चीन China माओ-त्से-तुंग Mao Tse-tung कम्युनिस्ट पक्ष Chinese Communist Party

ब्रिटिश लेखक आणि पत्रकार मार्टिन जॅक्स यांनी २००९मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या ‘व्हेन चायना रुल्स वर्ल्ड’ या पुस्तकातून सांगितले आहे की, ‘‘जागतिक महासत्तेच्या रूपात चीनच्या उदयामुळे प्रत्येक वस्तूत नव्याने जीव ओतला गेला आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य देश याच भ्रमात वावरत होते की, हे जग आपलेच जग आहे, त्यांचे जे नीतिनियम आहेत, तेच या जगाचे नीतिनियम आहेत. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही.’’ जॅक्स यांनी १२ वर्षापूर्वी सांगितलेल्या या बाबी बऱ्याच अंशी खऱ्या ठरल्या आहेत.

तर आता हे स्पष्ट झाले आहे की, सर्वच दृष्टीने चीनमध्ये झालेला हा बदल युगांतरकारी ठरला आहे. या मोठ्या बदलाचा पाया १९२१मध्ये घातला गेला. त्या वर्षी १ जुलै रोजी चीनमधील काही मार्क्सवादी बुद्धिजीवी तरुणांच्या एका गटाने कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेसाठी शांघाय (जो त्या वेळी फ्रेंच शासनाच्या अखत्यारीत होता) येथे बैठकीचे आयोजन केले होते. चेन दुशिऊ आणि ली दा झाओ यांना या बैठकीचे आयोजन करण्याचे श्रेय दिले जाते. परंतु इतिहासकारांच्या मते ही तारीख केवळ प्रतीकात्मक आहे. कारण ज्या वेळेस शांघायमध्ये ही बैठक चालू होती, तेव्हा त्या बैठकीवर पोलिसांनी छापा टाकला होता. त्या कारणाने बैठकीत सामील असलेले लोक पळून गेले आणि नौकेच्या साहाय्याने ते जवळ जवळ शंभर किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी पोहोचले. तेथेच पक्षाच्या स्वरूपाला अंतिम स्वरूप देण्यात आले. परंतु हे अंतिम स्वरूप घेण्यास आणखीही बराच काळ जावा लागला. हा, एवढे मात्र निश्चित आहे की, तेथूनच पक्ष स्थापनेच्या या प्रवासाला सुरुवात झाली होती.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या प्रवासाचे काही टप्पे आहेत. त्याचे मुख्य दोन भाग आहेत. पहिला म्हणजे १९२१पासून १९४९पर्यंतच्या संघर्षाचा किंवा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या भाषेत सांगायचे झाल्यास वर्ग युद्धाचा हा टप्पा आहे. या काळातील वर्ग युद्धाच्या परिणामी १ ऑक्टोबर १९४९ रोजी शेवटी बीजिंगच्या सत्तेवर चिनी कम्युनिस्ट पक्षाने ताबा मिळवला. त्या दिवशी ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ (चीनी जनवादी गणतंत्रा) पाया रचला गेला. तेव्हापासून आतापर्यंत चीनचा कम्युनिस्ट पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणून राहिला आहे.

आपल्या संघर्षाच्या या काळात चिनी कम्युनिस्ट पक्षाला अनेक संकटातून जावे लागले. कुओ मिन टांग (एक राष्ट्रवादी पक्ष, ज्याने १९११ सालातील लोकशाही क्रांतीनंतर तेथे कम्युनिस्ट क्रांती होईपर्यंत बराच काळ चीनची सत्ता भोगली होती.) पक्षाशी सहकार्य आणि विरोध, १९२५ साली सन एत सेन यांचा मृत्यू झाल्यानंतर कुओ मिन टांग या पक्षाचा बदललेला दृष्टिकोन आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या हल्ल्यातून निघालेल्या ऐतिहासिक ‘लाँग मार्च’ची परिस्थिती, साम्राज्यवादी जपान्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर जनतेअंतर्गत असलेल्या अंतर्विरोधाचा योग्य समज घेऊन, कॉम्रेड माओ-त्से-तुंग यांच्या नेतृत्वाखाली चिनी कम्युनिस्ट पक्षाने पुन्हा एकदा कुओ मिन टांग या पक्षाला बरोबर घेऊन जपानविरोधी युद्धात सामील होणे, नंतर पुन्हा कुओ मिन टांगबरोबर संघर्ष आणि शेवटी बीजिंगवर चिनी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता स्थापना, असा या काळातील प्रमुख घटनाक्रम आहे.

चिनी कम्युनिस्ट पक्ष सत्तासीन झाल्यानंतरचा इतिहाससुद्धा ७१ सालापेक्षा जास्त आहे. चीनी प्रगतीच्या ज्या काही जमेच्या बाजू आहेत, त्याचा पाया याच काळात घातला गेला आणि याच काळात त्यांनी तो प्रत्यक्षात उतरवला. परंतु ही ७१ वर्षं सोपी नव्हती. या काळात चिनी कम्युनिस्ट पक्षाला व खुद्द चीनलाही बऱ्याच उलथापालथीतून जावे लागले. त्या सर्वांची सविस्तर चर्चा या लेखमालेतून शक्य नाही.

या काळात काही टप्पे असे राहिले आहेत की, ज्यांच्यामुळे केवळ या जगातच नव्हे, तर खुद्द चीनमध्येही अंतर्विरोधी समज निर्माण झाला. आता जेव्हा शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, तेव्हा त्यावर आणि त्याच्याशी संबंधित वाद-विवादावर एक नजर  टाकणे आवश्यक आहे.

चीनमध्ये ‘पीपल्स रिपब्लिकन’ अस्तित्वात आल्यानंतर तेथे पंचवार्षिक योजनांची सुरुवात झाली. नवीन समाज घडवण्यासाठी गावोगावी कम्यूनची स्थापना करण्यात आली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील ‘महान हनुमान उडी’चे धोरण घेण्यात आले. १९६६ ते १९७६पर्यंत सांस्कृतिक क्रांती चालवली गेली. १९७६ साली झालेल्या कॉम्रेड माओ-त्से-तुंग यांच्या निधनानंतर सत्ताकेंद्री आलेले तेंग सियावो पिंग यांचे पुनरागमन आणि तदनंतर सुरू झालेला तेंग युग आणि शेवटी शी जिन पिंग यांचा चालू असलेला आताचा काळ, हे असे टप्पे आहेत, की ज्याचा परिणाम आजच्या चीनवर झालेला स्पष्टपणे दिसून येतो.

या काळात अनेक वादग्रस्त प्रश्न निर्माण झालेत. उदा. ‘महान हनुमान उडी’चे धोरण अतिउत्साहात घेतले गेले होते? कारण त्याचे विनाशकारी परिणाम चिनी जनतेला भोगावे लागले. सांस्कृतिक क्रांती म्हणजे चिनी कम्युनिस्ट पक्षांतर्गत चालू असलेल्या सत्तासंघर्षाचा भाग होता? कारण त्याच्या भयंकर अनुभवातून चिनी जनतेची एक संपूर्ण पिढीच्या पिढी बरबाद झाली होती. आपल्या हातात सत्ता केंद्रित झाल्यानंतर तेंग यांनी माओ यांचा संपूर्ण वारसा झुगारून दिला? आणि या प्रकारे ते चीनला भांडवलशाही मार्गाने घेऊन गेले? किंवा मग त्यांच्या अशा धोरणातून जो चीन उभारला गेला, त्याने  समाजवादाचा एक आगळा-वेगळा प्रकार जगासमोर आणला आहे? त्याला सध्याचा चिनी कम्युनिस्ट पक्ष ‘चिनी वैशिष्ट्यांचा समाजवाद’ म्हणत आहे. तो काय खऱ्या अर्थाने राजकीय भांडवलशाहीवर पडदा टाकण्यासाठी योजलेला एक नवीन शब्द आहे? शी जिन पिंग यांच्या या काळात चीनने राष्ट्रवाद किंवा उग्र राष्ट्रवादाचा मार्ग अवलंबला आहे? तो हळूहळू साम्राज्यवादी स्वरूप धारण करत आहे काय?

हे असे प्रश्न आहेत, ज्यावर संपूर्ण जग मागील सहा सात दशकापासून चर्चा करत आहे. परंतु या ठिकाणी लक्ष देण्याची बाब ही आहे की, या चर्चा आणि सर्वच टीकाटिप्पणी करूनसुद्धा, चीन एक महाशक्ती म्हणून उदयास आला आहे, हे वास्तव आपणाला मान्य करावे लागेल.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

आजच्या घडीला हे समजून घेणे आवश्यक आहे की, अखेर हे कसे घडले? ते समजून घेण्याच्या क्रमात जगभरातील अनेक इतिहासकारांनी, अर्थशास्त्रज्ञांनी आणि राजकारण्यांनी केलेल्या चर्चा, वाद-विवाद यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यातून सर्वसाधारणपणे जी एक बाब समोर आली ती ही की, असे जे काही घडले, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चीनमध्ये ‘पीपल्स रिपब्लिक’ची स्थापना झाल्यानंतर, चिनी कम्युनिस्ट पक्षाने सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवूनच आपल्या विकासाचे धोरण घेतले.

माओ यांच्या काळात समतेचे मूल्य अशा प्रत्येक धोरणाचे प्रमुख मार्गदर्शक सूत्र म्हणून राहिले. या बाबींचा सामूहिक परिणाम असा झाला की, सुरुवातीच्या दशकात चीनने त्यांच्याकडे असलेल्या मर्यादित संसाधनाची गुंतवणूक, ज्याला आताच्या नवीन परिभाषेत मानवी विकास म्हटले जाते, त्यात केला होता. त्यामध्ये या सर्व धोरणांचा जोर सर्वसामान्य जनतेचे प्राथमिक शिक्षण, त्यांचे प्राथमिक आरोग्य आणि सर्वसाधारण जनतेच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील, याकडेच संपूर्ण लक्ष देण्यात आले.

याचे एक उदाहरण सांगता येईल. ते हे की, तेथे ‘बेअर फूट’ डॉक्टरांचा प्रयोग करण्यात आला. त्यात जनतेत उद्भवणाऱ्या सर्वसाधारण आजारांचा इलाज करण्यासाठी अशा डॉक्टरांना गावोगावी पाठवण्यात आले होते. अशा आजारांवर इलाज करण्यासाठी डॉक्टरांना खास शिक्षणाची गरज नव्हती. या वेळी असे डॉक्टर तयार करण्यावर जोर देण्यात आला होता की, जे डायरिया आणि सर्वसाधारण इन्फेक्शनद्वारे होणाऱ्या रोगांना स्थानिक पातळीवरच उपचार करून रुग्णांना ठीकठाक करू शकतील. अशिक्षितांची निरक्षरता दूर करून सर्वांना मूलभूत शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. गावोगावी कम्यून बनवण्यात आले. त्यांच्या अंतर्गत सामूहिक शेती आणि इतर छोटे-मोठे उद्योगधंदे चालवण्याची योजना तयार करण्यात आली. हे प्रयोग किती यशस्वी झाले, यावर वाद विवाद होऊ शकतो. याच वादविवादाशी जोडलेली ‘महान हनुमान उडी’च्या धोरणाची अयशस्विताही याच चर्चेचा भाग आहे.

‘महान हनुमान उडी’चे धोरण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत अवलंबले गेले. वेगाने औद्योगिक विकास करण्याचे त्याचे उद्दिष्ट होते. औद्योगिक विकासासाठी श्रमिकांची गरज होती. त्यासाठी असा विचार करण्यात आला की, खेडेगावातून लोकांना शहरात जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. यावर असा आक्षेप घेतला जातो की, यासाठी ग्रामीण जनतेवर जुलूम जबरदस्ती करण्यात आली. असे म्हटले जाते की, कम्युन अंतर्गत अन्नधान्याच्या उत्पादनाचे जे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते प्रत्यक्षात गाठता आले नाही. कारण कम्यूनमध्ये सामूहिक जबाबदारी होती. त्यामुळे ग्रामीण जनतेने त्यात व्यक्तिगत उत्साह आणि आवश्यक ते श्रम करण्यामध्ये आपले पुरेसे योगदान दिले नाही. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन घटले. परंतु वरिष्ठ पातळीवर याबाबतचे अहवाल मात्र प्रामाणिकपणे देण्यात आले नाहीत. पूर्ण जनतेला अन्न पुरेल इतक्या प्रमाणात अन्नधान्याचे उत्पादन होत आहे, अशा प्रकारची सरकारला चुकीची माहिती मिळत राहिली. वास्तविक परिस्थिती याच्या नेमकी उलट होती.

असे असले तरी लाखोच्या संख्येने ग्रामीण जनतेला शहरातील औद्योगिक केंद्राकडे पाठवण्यात आले. याच काळात दुष्काळसुद्धा पडला. परिणामी देशात अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. पण किती? त्याची नक्की आकडेवारी आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. पाश्चिमात्य देशातून हा आकडा दोन ते तीन कोटीपर्यंत सांगितला जातो. ज्यावरून या आकड्यांचा स्पष्ट अंदाज लावता येईल, असे विश्वसनीय आकडे चीनमध्ये अजून समोर आले नाहीत. परंतु जेव्हा तेंग यांचा कार्यकाळ सुरू झाला, तेव्हा मात्र असे मानले गेले की, ‘महान हनुमान उडी’च्या धोरणामुळे देशाला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागले.

हे धोरण अयशस्वी होण्याचा संबंध माओ यांच्या सांस्कृतिक क्रांती सुरू करण्याच्या त्यांच्या इराद्याशी जोडला जातो. माओ यांचे चिनी कम्युनिस्ट पक्षात जे अनन्यसाधारण स्थान होते, तेवढे भक्कम स्थान पक्षाच्या १०० वर्षाच्या इतिहासात इतर कुणाचेच नव्हते. ते त्यांच्या मार्गदर्शकत्वाच्या भूमिकेमुळे आणि वर्गयुद्धाच्या दीर्घकालीन संघर्षात त्यांच्या नेतृत्वाने दाखवलेल्या क्षमतेमुळे निर्माण झाले होते. पक्षाने त्यांना चेअरमनपदाचा दर्जा दिला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आजतागायत तो पक्षातील इतर कुणालाच मिळाला नाही. अर्थात ते पक्षातील सर्वमान्य नेते असल्याने ‘महान हनुमान उडी’च्या अपयशाचे खापरही त्यांच्याच माथी फोडले जाते.

त्याबाबत एक विचार असाही मांडला जातो की, या अपयशामुळे पक्षातील एक गट माओ यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लागला. त्यातून सत्तासंघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून माओ यांनी ‘सांस्कृतिक क्रांती’ची सुरुवात केली. परंतु याबाबतचा माओवादी दृष्टिकोन असा आहे की, क्रांतीच्या जवळजवळ पंधरा वर्षानंतर चिनी कम्युनिस्ट पक्षांमध्ये भांडवली अपप्रवृत्ती जोर काढू लागली होती. कम्युन व्यवस्था नष्ट करून भांडवली व्यवस्था आणण्याचे प्रयत्न केले जात होते.

माओ समर्थकांचा असा आरोप होता की, त्या वेळचे चीनचे राष्ट्रपती लिऊ शाओ ची याच विचारप्रवाहाचे प्रतिनिधित्व करत होते. अशा परिस्थितीत माओ यांनी देशातील तरुणांना क्रांतीच्या मूळ स्वरूपाला वाचवण्याचे आवाहन केले. त्यांनी ‘क्रांती अंतर्गत क्रांती’चा सिद्धान्त मांडला. यादरम्यान त्यांची मुख्य घोषणा होती की, ‘बम्बार्ड दी हेडक्वार्टर्स’ म्हणजे ‘मुख्यालयावरच हल्ला करा’. यात सर्वांत मोठे मुख्यालय होते राष्ट्रपतींचे. याच्या जोडीलाच जुनी सरंजामी संस्कृती आणि धार्मिक सत्ता केंद्रांनाही उद्ध्वस्त करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

माओ यांची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की, त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून लाखो तरुण ‘रेड गार्ड’मध्ये भरती झाले. त्यांच्यामार्फतच सांस्कृतिक क्रांतीला प्रत्यक्षात उतरवण्यात आले. ही गोष्ट खरी आहे की, त्या काळात पक्षांमध्ये माओ यांच्या लोकप्रियतेच्या जवळपास असलेल्या इतर नेत्यांचे स्थानही संपुष्टात आले. याला फक्त पंतप्रधान चाऊ एन लाय हेच अपवाद ठरले. उर्वरित शेकडो नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अभ्यास शिबिरात पाठवण्यात आले. हजारो लोकांना शारीरिक श्रम करण्यासाठी खेड्यात पाठवण्यात आले.

असे सांगितल्या जाते की, रेड गार्डनी यादरम्यान अतिउत्साह दाखवून माओ यांच्या धोरणाच्या विरोधात असलेल्या प्रत्येक व्यक्तींवर हल्लाबोल केला. यादरम्यान देशाच्या आर्थिक विकासाचे सर्वच कार्यक्रम ठप्प झाले. अर्थात काही जाणकारांच्या मते, ‘सांस्कृतिक क्रांती’ने चीनच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेला आपल्या इच्छित उद्दिष्टापर्यंत पोहोचवले. ज्याची पार्श्वभूमी कम्युनिस्ट पक्षाचे संघटन उभे करत असतानाच करण्यात आली होती.

तसे तर चीनच्या आधुनिकीकरणाच्या योजनेची सुरुवात १९११ साली झालेल्या राजेशाहीविरोधी आंदोलनातूनच झाली होती. याच आंदोलनाच्या परिणामी चीनमध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली राजेशाही नष्ट करण्यात आली होती. १९१२ साली सर्वप्रथम लोकशाही सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर तेथील बुद्धिजीवी वर्गाने चिनी समाजातील उच्च-नीचतेची असलेली विषम व्यवस्था नष्ट करण्याची मोहीम आखली होती. चिनी समाज शेकडो वर्षापासून कन्फ्यूशियसच्या तत्त्वज्ञानाने आणि परंपरेने चालत आला होता.

या तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे विषमतेच्या उच्चनीचतेचा श्रेणीबद्ध ढाचा होता. त्याच्या विरोधात १९१५ साली चीनमध्ये नव-सांस्कृतिक आंदोलनाची सुरुवात झाली होती. त्यानंतर १९१९ साली प्रसिद्ध ‘फोर्थ मे मुव्हमेंट’ (चार मे आंदोलन) झाले. त्याच्याच परिणामी वसाहतवाद विरोधी भावनासुद्धा या नव-संस्कृती आंदोलनाचा भाग बनली.

माओ यांच्या चरित्रकारांनी लिहिले आहे की, माओ यांच्यावरील पहिले राजकीय संस्कार याच सांस्कृतिक आंदोलनाच्या काळात झाले. त्यानंतर जीवनभर ते चीनला एक आधुनिक समाज आणि राष्ट्र बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेले होते. १९६६ साली जेव्हा त्यांनी ‘सांस्कृतिक क्रांती’ची घोषणा केली, तेव्हा त्यामागेसुद्धा त्यांची हीच महत्त्वाकांक्षा होती. मग भलेही सांस्कृतिक क्रांतीच्या काळात अतिरेक झाला असेल, परंतु त्यामुळे चीनमध्ये अंधश्रद्धा आणि जुन्या विचारांच्या विरोधात एका नवीन संस्कृतीला आपली पाळेमुळे घट्ट करण्यास मदत झाली.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

अर्थात परिस्थिती अशी आहे की, सांस्कृतिक क्रांतीचा काळ आधुनिक चिनी इतिहासात सर्वांत वादग्रस्त काळ ठरला आहे. तेंग जेव्हा सत्तेच्या केंद्रस्थानी आले, तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाने सांस्कृतिक क्रांती म्हणजे एक चूक होती, अशी कबुली दिली.

सांस्कृतिक क्रांतीचा काळ माओ यांच्या निधनानंतर समाप्त झाला. त्यानंतर चीनने नवीन मार्गाचा अवलंब केला. पुढील लेखातून आम्ही त्यावर विचार करू. परंतु त्यापूर्वी माओ यांच्या काळाचा आणखी जो एक महत्त्वाचा भाग आहे, त्याला समजून घेतल्याशिवाय चीनच्या पीपल्स रिपब्लिकने जी दिशा घेतली आहे, तिला समजून घेता येणार नाही. हे धडे जगातील पहिलेवहिले कमुनिस्ट प्रयोग ज्या सोवियत युनियनमध्ये झाले, त्या सोवियत युनियनपेक्षा चीनच्या वेगळेपणात आहे. अनेक इतिहासकार असे मानतात की, या घटनाक्रमाचा जागतिक कम्युनिस्ट आंदोलनावर खूपच नकारात्मक परिणाम झाला. तर हा सर्व घटनाक्रम कशा प्रकारे चालला, यावर पुढील लेखात चर्चा केली जाईल.

मराठी अनुवाद – कॉ. भीमराव बनसोड

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://www.mediavigil.comया पोर्टलवर १७ जून २०२१ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा - 

https://www.mediavigil.com/op-ed/100-years-of-chinese-communist-party-and-role-of-mao/

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा