टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राज ठाकरे, सुप्रिया सुळे, रामदेव बाबा आणि मुकेश अंबानी
  • Thu , 16 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राज ठाकरे Raj Thackeray सुप्रिया सुळे Supriya Sule बाबा रामदेव Baba Ramdev मुकेश अंबानी Mukesh Ambani

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता नोटाबंदीवर बोलणे बंद केले आहे. दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घेण्यासाठी भाजपवाले पैसे देत आहेत. इतके पैसे कुठून आले त्यांच्याकडे? नोटाबंदीनंतर भाजपकडे निवडणुकांसाठी इतका पैसा कुठून आला, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.  

राजसाहेब, सगळ्याच पक्षांकडे जिथून येतो, तिथूनच भाजपकडेही पैसा येणार ना? नोटाबंदीच्या आधीच्या महिन्यांमध्ये झालेल्या व्यवहारांची खरोखरच पडताळणी झाली तर कळेल गुपित. शिवाय, भाजप सत्तेत आहे- त्यांच्याकडे नव्या नोटांमध्येही हवा तेवढा पैसा येणार, हे काही गुपितही नाही.

………………………………

२. गेल्या दोन वर्षांत महागाई खूप वाढली आहे. या महागाईने सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन नियम काढणार आहेत. तुमच्याकडे किती सोने आहे याचा हिशोब आता तुम्हाला द्यावा लागणार आहे. महागाईने आता किती लोकांकडे सोने उरले आहे हो? आता या मोदी सरकारचा लोकांच्या घरातल्या सोन्यावर डोळा आहे. : खासदार सुप्रिया सुळे

चला, ताई आता साहेबांच्या तालमीत तयार व्हायला लागल्या म्हणायच्या. पण, त्या बोलतायत, त्यातलं एक वेगळंच तथ्य समजतंय का? नोटाबंदी झाली, तेव्हा महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसला. आताही सरकारचा डोळा आहे तो सर्वसामान्यांच्या घरातल्या सोन्यावर. श्रीमंतांना आणि राजकारण्यांना असल्या नियमांची काही झळ बसत नसते, हेही त्यांनी न सांगताच सांगून टाकलंय.

………………………………

३. या वेळी देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार आहे. निवडणुकीनंतर येणाऱ्या वादळात अनेक मोठे दिग्गज नेस्तनाबूत होणार आहेत, असे विधान रामदेव बाबा यांनी केले होते. ते म्हणाले, २०१४ मध्ये मी एका पक्षाच्या बाजूने होतो. परंतु मी आता निष्पक्ष आहे.

रामदेव बाबांचं हे विधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह पाच राज्यांमधल्या भाजपच्या दिग्गजांना उद्देशून केलेलं आहे, असं विरोधकांना वाटतंय. केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी मात्र हे विधान भाजपच्या बाजूने असल्याचा दावा केलाय. योगाच्या माध्यमातून बाबांना येणाऱ्या काळात घडणाऱ्या घटनांची माहिती होते, असंही ते म्हणतात. या विधानांची संदिग्धता आणि कोणालाही आपल्या सोयीने कसलाही अर्थ काढता यावा, असा जो सैलपणा आहे, तो पाहता बाबांना भारताचे नॉस्ट्राडेमस म्हणायला काहीच हरकत नाही.

………………………………

४. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातून अमेरिकेत गेलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांविषयी घेतलेली प्रतिकूल भूमिका भारतातील माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रासाठी संधी ठरू शकते, असे मत रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले.

याला म्हणतात धंदेवाईक माणूस. तिकडे परदेशांत गेलेल्या आयटी कर्मचाऱ्यांचं काही व्हायचं ते होवो, इकडचा धंदा वाढणार याचा यांना आनंद. अमेरिकेतल्याप्रमाणे भारतात कडक कायदे, जाचक नियम आणि अटी नसल्यामुळे कमी पैशांत या कर्मचाऱ्यांना पिळून घेता येईल आणि वाट्टेल ते मार्ग वापरून सगळा उद्योग आपल्या 'मुठ्ठी में' करता येईल, याचा आनंद सर्वाधिक असणार, हे उघड आहे.

………………………………

५. नगर शहराजवळील पांगरमल येथील बनावट दारूच्या मृत्युकांडातील मृतांची संख्या वाढून सहावर गेली आहे. दोघांचा काल, मंगळवारी रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणाच्या शोधात पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या आवारातील उपाहारगृहातच बनावट दारूचा कारखाना आढळला. 

या मंडळींनी 'दवादारू' या शब्दाचा अर्थ अगदी शब्दश: घेतलेला दिसतो आहे. सरकारी रुग्णालयांची आणि तिथल्या उपचारांची एकंदर स्थिती पाहता, वेदनाशमनासाठी रुग्णांना दवापेक्षा दारूचाच आधार अधिक वाटेल, याच उदात्त भावनेतून त्यांनी हा कारखाना उघडला असणार.

………………………………

६. उपनगरीय मार्गावरील लोकल गाड्यांमध्ये अपंग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या अव्यंग प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने एक फेब्रुवारीपासून मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष लक्ष्य केले जाणार आहे. एक ते १३ फेब्रुवारी या कालावधीत तब्बल ८०० प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी ६० जण सरकारी कर्मचारी आहेत. आता या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये संबंधित विभागांना पत्र पाठवून वरिष्ठांकरवी या कर्मचाऱ्यांना समज देण्याची विनंती करण्यात येणार आहे.

हे साफ चूक आहे. अपंगांना आताच्या सरकारी भाषेत काय म्हणतात? दिव्यांग. बरोबर ना. म्हणजे त्यांच्यात काही दिव्य शक्ती आहे, असा अर्थ घ्यायचा. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये बाय डिफॉल्टच तशी दिव्य शक्ती असते, ते पदसिद्ध दिव्यांग म्हणजे दिव्य शक्तीप्राप्त अंगाने युक्त आहेत. मग त्यांनी या डब्यातून प्रवास केला तर बिघडतं काय?

………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......