रेनकोट आणि शॉवर कॅप
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Tue , 14 February 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar नरेंद्र मोदी Narendra Modi मनमोहनसिंग Manmohan Singh सोनिया गांधी Sonia Gandhi भाजप BJP

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तम वक्ते आहेत, यावर कुणाचं दुमत असू शकणार नाही. त्यांच्या याच भाषणबाजीवर खूश होऊन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी भरपूर मतं देऊन, लोकसभेत भाजपला निर्विवाद बहुमताच्या पुढे नेत, मोदींना थेट पंतप्रधानपदी विराजमान केलं.

गुजरातची सलग तीन टर्म कमांड सांभाळलेल्या मोदींनी आमदारकीशिवाय मुख्यमंत्री (नंतर आमदारकी) होण्याचा विक्रम केला, तसाच प्रथमच खासदार म्हणून निवडून आल्यावर थेट पंतप्रधानपद स्वीकारण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे!

मोदींच्या या यशात आधीच्या युपीए सरकारचा निष्क्रिय कारभार, काँग्रेससह मित्रपक्षांच्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं, मनमोहनसिंग यांचं ‘मौनी बाबा’ म्हणून हेटाळलं गेलेलं व्यक्तिमत्त्व, सोनिया गांधींचा दरबारी हस्तक्षेप, अण्णा हजारे-अरविंद केजरीवाल यांच्या आंदोलनांना माध्यमांनी दिलेलं क्रांतिकारी स्वरूप आणि नंतरची मोदींची नियोजनबद्ध, बहुआयामी खर्चिक प्रचार यंत्रणा, स्वत:ला ब्रँड म्हणून विकसित करण्यात आलेलं यश, नव्या तंत्रयुगाचा, डिजिटल माध्यमाचा आकर्षक वापर, यातून सत्ताबदल घडला. मनमोहनसिंग, सोनिया गांधी यांच्या तुलनेत नरेंद्र मोदींच्या भाषणांनी मतदारांवर छाप पाडली.

मोदींचा उत्साह, शैली, त्याला साजेसे पोशाख, मंचाची सजावट यामुळे डिजिटल माध्यमांत मोदींनी अक्षरक्ष: मोहिनी घातली. त्यात भाजपचं हिंदुत्व, संघाची रणनीती आणि युपीएच्या बुडत्या जहाजातून प्रमुख उद्योगपतींनी मारलेल्या उड्या, यामुळे मोदी ब्रँड तयार झाला. सध्याच्या बाजारकेंद्री वातावरणात प्रथमच अशा एखाद्या राजकीय नेत्याचं मार्केटिंग तंत्रानं ब्रँडिंग करून निवडणुका जिंकल्या गेल्या.

गुजरात दंगलीमुळे आपली डागाळलेली प्रतिमा या काळात मोदींनी पूर्णपणे स्वच्छ करून घेतली. त्यात भरीस भर म्हणून शपथविधीला सार्क देशांच्या प्रमुखांना, खास करून पाकिस्तानी पंतप्रधानांना विशेष निमंत्रित करणं, संसदेत प्रवेश करताना पायऱ्यांवर डोकं ठेवणं आणि नंतरचे लागोपाठ विदेश दौरे… तिथं पुन्हा तोच जोश, आवेश, आवेग आणि नाट्यमय भाषणांची रेलचेल… मंत्री, सचिव, सरकारी बाबू यांना कामाला लावल्याच्या प्रसिद्ध केलेल्या बातम्या, यामुळे मोदींचा बाजारभाव इतका वाढला की, त्यापुढे भाजप हा पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंघटनाही दिसेनाशी झाली.

या सर्व वातावरणामुळे, लोकप्रियतेमुळे मोदींचा आत्मविश्वास अति आत्मविश्वासात बदलला. भाषणबाजीचं व्यसन जडावं इतकी त्यांची भाषणबाजीची हौस वाढली. त्यात पुन्हा वाद-प्रतिवाद, चर्चा यापेक्षा एकतर्फी भाषणबाजीचा चढलेला कैफ व अडीच वर्षांनंतरही ‘मोदी मोदी’ असा स्वत:लाच ऐकू येणारा स्वनामाचा गजर यातून मोदींचा पूर्वीचा आश्वासक, आत्मविश्वासाचा स्वर हळूहळू अहंकारात बदलत गेला. लागोपाठ वादविवाद स्पर्धा जिंकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासारखा त्यांचा भाषणाचा उत्साह… सभा जिंकण्याचr, टाळ्यांची नि हंशाची व स्वनामाच्या गजराची नशा इतकी चढलीय की, त्यांना आता आपण काय व कुठे बोलतो याचं भानचं उरलं नाही. अलीकडेच संसदेत त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांवर ‘रेनकोट घालून आंघोळ करण्यात माहीर’ अशी जी टीका केली, त्याचा भाजप व मोदीभक्त वगळता सगळ्यांनीच निषेध केला. समाजमाध्यमावरही मोठ्या प्रमाणावर नापसंती व्यक्त करण्यात आली. आता तीन महिन्यांनी त्यांच्या सरकारला तीन वर्षं पूर्ण होतील, त्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा अहंकार पाहिला तर ही त्यांची आणि भाजपच्या पतनाची सुरुवात आहे. यापूर्वी ‘इंडिया शायनिंग’च्या अहंकारानं सत्ता गमवावी लागली होती, याची आठवण भाजपनं ठेवावी.

भारतीय मतदार एखाद्या नेत्याला नेतृत्व देतो, त्याचं कौतुक करतो, त्याला व त्याच्या पक्षाला भरभरून मतं देतो, सत्ता देतो. पण हे सगळं अहंकारात बदललं की, मग तो अशा अहंकाराला ‘योग्य’ जागा दाखवतो. बांगला देश युद्ध विजयानंतर इंदिरा गांधींनी वाढलेल्या अहंकारातून व सर्वसत्ताधीश होण्याच्या इच्छेतून लादलेल्या आणीबाणीचा परिणाम त्यांना १९७७च्या निवडणुकीत भोगावा लागला. याच अहंकारापोटी जनता पार्टीचा प्रयोग फसला. अनेक पक्षांची शकलं उडाली. अनेक नेत्यांची विमानं आकाशात उडाली आणि नंतर जमिनीवर आदळली. अलीकडच्या काळात प्रमोद महाजन, मायावती, जयललिता यांनीही हा अनुभव घेतला. महाराष्ट्रात याच अहंकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची पाठ जमिनीला टेकली.

हा इतिहास बघता सध्या मोदींची वेगानं ऱ्हासपर्वाकडे वाटचाल सुरू झालेली दिसते. विशेषत: नोटबंदीनंतर मोदींची भाषणबाजी तीच असली तरी देहबोलीत तो आत्मविश्वास दिसत नाही. शब्दांचं वजन जाऊन ‘और एक जुमला’ अशी बोळवण होऊ लागलीय. उत्तर प्रदेशात करिष्मा चालला नाही तर आज हलक्या आवाजात व्यक्त केली जाणारी नाराजी उघड स्वरूप घेईल. हे सरकार ‘घोषणाबाज सरकार’ आहे, अशी पक्की नोंद होईल.

समाजसेविका सिंधुताई सपकाळांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे- ‘भाषण है, तो राशन है!’ त्या अनाथ मुलांना सांभाळतात, त्यासाठी त्या भाषण देऊन (व्याख्यान नव्हे) पैसे जमवतात. म्हणून त्या जाहीरपणे सांगतात की, भाषण दिलं तरच राशन मिळेल, कार्य चालेल. याच वाक्यात थोडा बदल करून देशातले लोक मोदींना म्हणून लागलेत, ‘भाषण बहोत सुना, अब राशन दो!’ नोटबंदीनंतर तर ही भावना अधिक सार्वत्रिक होऊ लागलीय. आता घोषणा, नव्या योजना व त्यांच्या करोडोंच्या जाहिराती आणि मोदींची भाषणं, यांचं अजीर्ण होऊ लागलंय.

तरीही मोदींची भाषणबाजीची खोड काही मोडत नाही. दुसरं म्हणजे चर्चेचा त्यांना न्यूनगंड असावा. प्रश्नोत्तरं आवडत नसावीत किंवा त्यात आपण निरुत्तर झालो तर, ही भीती वाटत असावी. आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक स्पर्धा जिंकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यामध्ये ‘न जाणो आपल्याला पारितोषिक मिळालं नाही तर?’ असा भयगंड तयार होतो. जिंकण्याचं व्यसन घातकी असतं. सध्या मोदींना या व्यसनानं घेरलेलं दिसतं!

कारण संसदेत ते चर्चेला, प्रश्नोत्तरांना समोरं जात नाहीत. मी येईन, वाटल्यास थांबेन आणि मला जे वाटतंय ते बोलून निघून जाईन, हा त्यांचा खाक्या असतो. आणि बोलले की एकपात्री प्रयोगच सुरू होतो! त्यात पुन्हा कारागिरी अधिक, वस्तुस्थितीचं भान कमी, रेटून खोटं बोलण्याची मातृसंस्थेची परंपराच पुढे चालवणार. अनेकदा इतिहास, भूगोल, तपशिलांचा घोळ, तर काही वेळा हुकमी गहिवरणं, नाटकी संवेदनशीलता यांचा वापर. हे सर्व आता इतकं सवयीचं झालंय की, मध्येच उभं राहून विचारावंसं वाटतं की, ‘…पण मुद्दा काय आहे?’

कारण बाहेर कितीही भाषणबाजी केली तरी त्यांच्या सरकारला संसदेत जमीन सुधारणा विधेयक मंजूर करून घेता आलेलं नाही. जीएसटी दोन वर्षं लांबलं. त्यांनी मनरेगा योजनाला ‘काँग्रेसचं थडगं’ अशी उपमा देत लोकसभेत हंशा पिकवला, पण नंतर त्याच मनरेगाला त्यांना गुपचूप स्वीकारावं लागलं. जनधन, स्वच्छ भारत अशा योजनांचा गाजावाजा खूप झाला, पण परिणाम शून्य!

नोटबंदी हा तर सपशेल फसलेला प्रयोग. काळ्या पैशाविरुद्ध धाडसी पाऊल म्हणून नमोभक्तांसह नवश्रीमंत झालेला मध्यमवर्ग सुरुवातीला चेकाळला, पण आज जसजशी वस्तुस्थिती बाहेर येतेय तसं सर्वत्र चिडीचूप! नोटबंदीमुळे किती काळा पैसा बाहेर आला, याचं उत्तर ना सरकारकडे आहे, ना रिझर्व्ह बँकेकडे.

ते अपयश झाकण्यासाठी बँक व्यवहारांवर विविध निर्बंध, डिजिटल- कॅशलेसचं तुणतुणं, तरीही काळ्या पैशाचा आकडा जाहीर करता येत नाही म्हणून मग आता प्राप्तीकर खात्याच्या धाडी. कधी काळी या सरकारच्या लाडक्या स्टेट बँकेच्या अरुंधती भट्टाचार्य यांनी तर ‘तीन महिने मागे नेणारा व आणखी तीन महिने न सुधारता येणारा निर्णय’ असं म्हणून घरचा आहेर दिलाय. तर व्याजदरात कपात न करता उर्जित पटेलांनी स्वत:च्या अधिकाराचा वापर करत नोटबंदीच्या पापातून काही प्रमाणात सुटका करून घेतलीय. शेती, लघुउद्योग, वाहन विक्री, रिअल इस्टेट… सर्वच क्षेत्रांत मंदीसदृश वातावरण, तर काही ठिकाणी भीषण अवस्था. पण भाषणाधिन मोदींचा कैफ काही उतरायला तयार नाही!

ज्या मनमोहनसिंगांनी संसदीय समितीसमोर केविलवाण्या ठरलेल्या उर्जित पटेलांना धीर देत सहयोगी सदस्यांना भडिमार करण्यापासून रोखलं आणि आदर्श चौकशी समितीचा वस्तुपाठ घालून दिला… ज्या मनमोहनसिंगांनी अर्थशास्त्रीय व संसदीय भाषेत कुठलाही चढा स्वर न लावता या निर्णयाच्या परिणामांची जाणीव करून दिली… त्यांना ‘रेनकोट घालून आंघोळ करण्यात माहीर’ असं संबोधणारे मोदी हेच खरं तर ‘शॉवर कॅप घालून आंघोळ करण्यात तरबेज’ म्हणता येईल.

शॉवर कॅप तुमचं डोकं भिजू देत नाही, बाकी आंघोळ उरकता येते. ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ म्हणणारे मोदी बिर्ला डायरीवर बॅकफूटवर जातात; विविध प्रांतात काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, बीएसपी यांचे उमेदवार पळवतात; नामचीन गुंडांना भाजपमध्ये प्रवेश देतात… एन.डी. तिवारींसारख्या पिकल्या पानाला त्यांच्या आधी अनौरस, मग औरस ठरवलेल्या पुत्रासह भाजपमध्ये घेणारे मोदी कुठल्या तोंडानं मनमोहनसिंगांची आंघोळ काढतात?

मनमोहनसिंग निदान सर्वांग तरी वाचवतात, मोदी शॉवर कॅप घालून हमामात सुरक्षित आंघोळ करतात. वाढता दर्प व अहंकार विरोधकांना कस्पटासमान समजतो. मोदींना त्या प्रसिद्ध कव्वालीचा मुखडा नक्कीच माहीत असेल – ‘चढता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा.’

ती कव्वाली मोदींनी शांतपणे ऐकावी, काही काळ भाषणबाजी बंद करून. मोदीभक्तांनीही जरूर ऐकावी आणि रेनकोट व शॉवर कॅप यातला फरक जमला तर समजून घ्यावा!

 

लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......