‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ या ग्रंथाकडे केवळ साधनसामग्री म्हणून पाहता कामा नये, हा सत्यशोधक समाजाची वाटचाल दाखवणारा राजमार्ग आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजेंद्र मगर
  • ‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 14 May 2021
  • ग्रंथनामा शिफारस रा. ना. चव्हाण R. N. Chavhan सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे सत्यशोधक चळवळ Satyashodhak Chalval महात्मा फुले Mahatma Phoole

भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील एखाद्या चळवळीचा इतिहास पद्धतशीरपणे (तटस्थपणे) लिहिण्याची परंपरा तशी दुर्मीळ आहे. इतिहासलेखनात व्यक्तिनिष्ठेपेक्षा वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. इतिहासामध्ये काही कालावधीनंतर जरी बदल होत असला तरी सद्यस्थितीत तो सत्य स्वरूपात मांडणे अपेक्षित असते. या तत्त्वाला अनुसरून महाराष्ट्रातील एक चिकित्सक, वैचारिक लेखक आपले कार्य प्रसिद्धीविन्मुख राहून करत होते- ते म्हणजे रा. ना.चव्हाण (१९१३-१९९३).

त्यांनी आयुष्यभर जी इतिहास, समाजशास्त्र आणि इतर प्रबोधनात्मक चळवळ एकहाती चालवली, त्याला तोड नाही. त्यांनी वेळोवेळी अनेक विषयांवर वस्तुनिष्ठपणे भाष्य करत, हा वैचारिक इतिहास परखडपणे लिहिण्याचे धाडस केले.

चव्हाण यांनी महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांची ‘सत्यशोधकीय चळवळ’ जवळून अनुभवली, वाढवली आणि त्याविषयी जनमानसात प्रबोधन केले. त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील स्वातंत्र्याची चळवळही पाहिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी भाषिक राज्य निर्मितीची आंदोलने जवळून पाहिली. चव्हाण अशा मोठ्या घडामोडींचे साक्षीदार होते. एवढा मोठा वैचारिक पैस असणाऱ्या व्यक्ती तत्कालीन समाजात अगदी कमी होत्या. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचे महत्त्व आपोआपच वाढते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी वैचारिक विश्लेषण करून जनमानसात वैचारिक जागरण करण्याचा व्रत स्वीकारले होते. कोणतीही मुद्रित संस्था हाताशी नसताना त्यांनी त्यांच्या संतुलित विचारांचा केलेला प्रचार आणि प्रसार अतुलनीय आहे. त्यांनी वेगवेगळ्या भागांतील वेगवेगळ्या वृत्तपत्रांत कसदार वैचारिक लेखन केले. त्यांच्या या लेखनाला एकत्रित करून पुन्हा समाजापुढे ठेवण्याचे श्रेष्ठ कार्य त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी केले आहे. यासाठी त्यांनी आजवर ४२ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

..................................................................................................................................................................

ऑनलाईन आत्मचरित्र लेखन कार्यशाळा

नोंदणीसाठी पुढे दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म भरा -

https://forms.gle/HaYhWs7Wy8Dvwbfo6

अधिक माहितीसाठी संपर्क - ७७७४०३२६८०, ९८८१९०१८२१

..................................................................................................................................................................

याच प्रबोधकीय चळवळीच्या मालेतील ‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ हा ४२वा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. सध्या जगभर पसरलेली करोनाची साथ आणि स्तब्ध झालेले जग या विपरित पार्श्वभूमीवरही एक नव्हे तर तीन-तीन पुस्तके प्रकाशित करण्याचे धाडस करणे खरोखरच अनोखे आहे.

यामध्ये प्रामुख्याने महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’शी संबंधित असणारी अस्सल कागदपत्रे विषयानुसार एकत्रित करून प्रकाशित केली आहेत. इतिहास लिहिताना अस्सल कागदाचा एक चिटोराही अतिशय मोलाचा असतो. त्यामुळे या ग्रंथातून सत्यशोधक समाजाचे प्रबोधन आणि सत्यशोधकीय तत्कालीन परिणाम, याचा आलेख पाहता येतो.

यात सत्यशोधक समाजाचे निर्माते महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या वृत्तपत्रांत आलेले श्रद्धांजलीपर लेख एकत्रित स्वरूपात आहेत. यामुळे त्या काळात महात्मा फुले यांच्या समाज परिवर्तनाचा परिणाम आणि त्यांचे श्रेष्ठत्व लक्षात येते. त्यानंतर रा.ना. चव्हाण यांनी जमवलेले, एकत्रित केलेले आणि त्यांनी स्वतः नानाविध प्रसंगी लिहिलेले लेख विषयानुसार एकत्रित करून क्रमवार दिले आहेत. हे सर्व लेख\टिपणे बाबा आढाव चालवत असलेल्या ‘पुरोगामी सत्यशोधक’ या नियकालिकातून ‘जुनी कागदपत्रे’ या सदरातून पूर्वप्रसिद्ध झालेली आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या सर्व लेखनाचे आजच्या काळात महत्त्व काय, याचा विचार केला तर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते की, सत्यशोधक समाजाच्या एकत्रित इतिहास आजपर्यंत लिहिला गेलेला नाही. याही कागदपत्रांतून संपूर्ण इतिहास समोर येतोच असे नाही. एक मात्र आहे, ज्या वेळी हा इतिहास लिहिला जाईल, त्या वेळी अस्सल साधने म्हणून सदरहू ग्रंथाचा उपयोग केल्याशिवाय अभ्यासकांना पुढे जाता येणार नाही.

फक्त अस्सल कागदपत्रे म्हणून या ग्रंथाकडे पाहता येणार नाही, कारण प्रत्येक घटना-प्रसंगामागची कारणमीमांसा संपादकांनी विदित केलेली आहे. प्रस्तावनाकार अरुण शिंदेंनी ‘महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा दस्ताऐवज’ या दीर्घलेखात ही कागदपत्रे आणि त्यांचे आजच्या काळातले महत्त्व अभ्यासपूर्णरित्या विशद केले आहे.

रा.ना. चव्हाण हे कोणत्या एका पक्षाचे वाहक नव्हते, तर ते स्वतःच्या संतुलित वैचारिक मतांचे संप्रेरक होते. त्या काळी मोठ मोठे मतप्रवाह आणि राजकीय संघटना असताना स्वतःच्या वैचारिक प्रबोधनाचा दीप त्यांनी नेहमी तेवत ठेवला. तत्कालीन समाजजीवनावर परिणाम करणारे अनेक समाजधुरीण त्या काळात सक्रिय होते. त्यांच्या ‘रुकरात रुकार’ आणि ‘नकारात नकार’ मिळवणारे रा.ना. चव्हाण नव्हते, तर ‘चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर’ म्हणायचे धाडस त्यांच्याकडे होते. म्हणूनच त्यांचा उल्लेख ‘स्वतंत्र मतांचे वैचारिक सुधारक’ म्हणून केला जातो.

या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या काही परिषदांचे अहवाल आहेत, त्यातून तत्कालीन समाजात सत्यशोधकांनी चालवलेले प्रयत्न लक्षात येतात. हे अहवाल लेखन करताना रा.ना. चव्हाण यांनी समकालीन परिस्थितीत ही चळवळ किती महत्प्रयासाने सुरू होती, याचेही विवेचन केले आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

या ग्रंथाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे महात्मा फुले यांचे सत्यशोधकीय वारसदार यांची दिलेली माहिती. यामध्ये गंगारामभाऊ म्हस्के, संतुजी लाड, विश्राम घोले, नारायण लोखंडे, जावजी चौधरी, बाबूराव यादव, वा.रा. कोठारी, नारायण चव्हाण, भाऊशास्त्री लेले, मोरो वाळवेकर, केशव जोशी, वसुदेराव बिर्जे, दिनकरराव जवळकर, रामचंद्रराव धामणसकार, भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील, बाबूराव हैबतराव, भाऊराव पाटील, विनायक भांडारकर, हरी रावजी चिपळूणकर, गोपाळबाबा वलंगकर, महर्षी वि.रा. शिंदे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा समावेश आहे.

जवळजवळ ४० भागांत हे जुने लेख आणि टिपणे देताना चव्हाण यांनी महात्मा फुले, त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज, त्याची वाटचाल, समाजाची अधिवेशने, महात्मा फुले यांचे मित्र, सत्यशोधक कार्यकर्ते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सत्यशोधक समाजासाठी असणारे भरीव योगदान, यांविषयी विस्तृत भाष्य केले आहे. यातून महर्षी शिंदे यांचे सत्यशोधक समाजासाठी असणारे योगदान स्पष्टपणे समजते.

या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात रा.ना. चव्हाण यांना आलेली अत्यंत दुर्मीळ पत्रे दिली आहेत. त्यांवरून तत्कालीन परिस्थितीत सत्यशोधक चळवळ कशा रीतीने मार्गक्रमण करत होती, याची कल्पना येते. त्याचबरोबर रा.ना. चव्हाण यांचा अनेकांशी असणारा वैचारिक स्नेहबंधही उलगडत जातो. त्याच अंगाने सत्यशोधक ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्नशील होते, याचीही कल्पना येते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या ग्रंथाकडे केवळ साधनसामग्री म्हणून पाहता कामा नये, हा सत्यशोधक समाजाची वाटचाल दाखवणारा राजमार्ग आहे. त्याचबरोबर यातून दीडशे वर्षांचा इतिहास प्रामुख्याने समोर येतो. प्रस्तावनाकार अरुण शिंदे म्हणतात त्याप्रमाणे सत्यशोधक चळवळ व बहुजन समाजाच्या इतिहासाभ्यासाचा एक विश्वसनीय दस्तऐवज म्हणून हा ग्रंथ मोलाचा आहे. त्याचबरोबर यातून महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या उत्खननाची अनेक क्षेत्रे व दिशा पाहता येतात.

रा.ना. चव्हाण यांचे सर्वच लेखन हे वैचारिक अक्षरधन आहे. त्यामध्ये समाजपरिवर्तनाची धमक आहे. वैचारिक शिस्त लावण्याएवढे त्यांचे लेखन कसदार आहे. त्यामुळे त्यांच्या समग्र लेखनाचा अभ्यास करणे, समाजहितकारक आहे.                                                                                   

‘सत्यशोधक चळवळीतील जुनी कागदपत्रे’ : रा. ना. चव्हाण                                                     

संपादक व प्रकाशक : रमेश चव्हाण                                                     

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई                                                   

पाने : ३०४, मूल्य : ३५० रुपये

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. राजेंद्र मगर महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, औरंगाबाद येथे संशोधन सहायक आहेत.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......