‘पंगतीतलं पान’ : ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि मानवी वर्तनातील विविधांगी रूपे समर्थपणे उकलणारी कादंबरी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘पंगतीतलं पान’ आणि ‘हिंदू’ या कादंबऱ्यांची मुखपृष्ठे
  • Fri , 19 March 2021
  • ग्रंथनामा शिफारस भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade हिंदू Hindu अविनाश कोल्हे Avinash Kolhe पंगतीतलं पान Pangtitala Paan

मानवी जीवन तर्कसंगत वर्तनाच्या चौकटीत बसवणे अतिशय कठीण आहे. विज्ञानाच्या नियमानुसार मानवी वर्तनाचा निष्कर्ष लावता येत नाही. माणसाचा स्वभाव संचारीभावाप्रमाणे क्षणोक्षणी बदलत असतो. मनातील ही गुंतागुंत शब्दांत पकडणे तर अतिशय कठीण आहे. विज्ञान व सामाजिक शास्त्रे मानवी वर्तनाचा अभ्यास करतात, पण मानवी मनातील भावनांचे विविध कंगोरे त्यात सापडणे दुर्मीळ असते. ही गुंतागुंत फक्त ललितसाहित्यातूनच व्यक्त होऊ शकते. म्हणूनच ललितसाहित्य ललितेत्तर साहित्याच्या तुलनेत वेगळे ठरते. कथा, कविता, कादंबरी, नाटक इत्यादी ललितसाहित्यात मानवी भावनांच्या वर्तनाचा शोध घेण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. अर्थात त्याकरता लेखकाजवळ सूक्ष्म निरीक्षणशक्ती, संवेदनशील मन, सभोवताली पाहण्याची व्यापक दृष्टी व लेखनाची शैली या बाबी असाव्या लागतात.

एखाद्या कादंबरीचे कथानक त्या परिसराची कहाणी सांगत असले तरी ती त्या प्रदेशापुरती सीमित न राहता मानवी मनातील विविध भावनांचे प्रतिनिधित्व करत असते. या अर्थानं अविनाश कोल्हे यांच्या ‘पंगतीतीलं पान’ या कादंबरीकडे पाहायला हवं. पत्रकार, वक्ते व अभ्यासक म्हणून परिचित असलेल्या कोल्हे यांनी या कादंबरीच्या रूपानं साहित्यिक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

मुंबईच्या मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने ज्येष्ठ कादंबरीकार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ या कादंबरीतील कोणताही एक धागा घेऊन स्वतंत्ररीत्या कादंबरी लेखनाकरता एक स्पर्धा आयोजित केली होती. ‘पंगतीतीलं पान’ त्या कसोटीला उतरली. ही प्रथम पारितोषिक विजेती साहित्यकृती असली तरी ‘हिंदू’चा आणि या कादंबरीतील आशयाचा काही संबंध नाही. ही एक स्वतंत्र कलाकृती आहे.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

विदर्भातील फुलगाव या खेड्यातील गुलाब समाधानराव धांडे पाटील यांची ही कहाणी आहे. हाच या कादंबरीचा नायक. त्याच्याविषयी कादंबरीच्या पहिल्या प्रकरणात अशी माहिती येते - ‘निपुत्रिक काशाकाकाचा मानलेला मुलगा म्हणजे गुलाब धांडे पाटील. राहणार : फुलगाव, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा.” (पृ.४) त्यांच्या काकाची इच्छा गुलाबला दत्तक घेण्याची असली तरी गुलाबच्या आई-वडिलांनी नकार दिला. तसं गुलाबला साहेबराव नावाचा मोठा भाऊ असून त्याला एक मुलगा (आदेश), एक मुलगी (संगिता) आहे. पण खेड्यातील परंपरागत मानसिकता इथं दिसून येते. घरची परिस्थिती उत्तम, पाटील असल्याने गावात मानसन्मान, सोबतच मोठ्या शहरांमध्ये घेत असलेलं शिक्षण, यामुळे नायकाला फारसं संकटांना सामोरं जावं लागत नाही. पण तो फक्त चैनी, विलासी वृत्तीचा नाही, तर देशातील प्रश्नांची त्याला उकल करावीशी वाटते. ‘अनेक महापुरुषांनी जीवापाड मेहनत घेऊनही हजारो वर्षांपासून आपल्या देशात जात कशी टिकून आहे? एखाद्या वेळेस आपणास धर्म बदलता येईल पण जात का बदलता येत नाही. चिवटपणे जात टिकून राहण्याचे मूळ कशात आहे?’ हा नायकाच्या संशोधनाचा, चिंतनाचा, जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी तो पुणे, मुंबई, दिल्ली, हाँगकाँग इथं जातो, शोधनिबंध वाचतो. पण दुर्दैवानं त्याचा हा प्रकल्प पूर्ण होत नाही. त्यामुळे भरपूर हुंडा घेऊन जातीतील मुलीशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय त्याच्या चिंतनाला दुटप्पी ठरवतो.

जात अजूनही टिकून का आहे, या प्रश्नाचं उत्तर ही कादंबरी देत नसली तरी (तसं कोणत्याही ललित कलाकृतीकडून समाजातील गंभीर प्रश्नांची उत्तरं मिळण्याची अपेक्षा ठेवणंच मुळात चुकीचं आहे. तिने वाचकाला विचार करायला भाग पाडलं पाहिजे. आणि हे या कादंबरीनं साध्य केलं आहे.) ग्रामीण समाजातील नात्यातील वीण, गुंतागुंत किती घट्ट आहे, याची प्रचिती ही कादंबरी वाचताना वेळोवेळी येते. सासरवाडीचा पाठिंबा कोणत्या कामी उपयोगी येतो, हे शहरात जन्मलेल्या व्यक्तीला कळत नाही. उदा. गुलाबचे मित्र म्हणतात, “असं बगं. आज हा सायब्या एवढ्या गमजा कशापायी कराया लागला? त्याले सासरंच बॅकिंग हाय म्हणूनच नं? मंग? तू बी असंच कर. इकडची पोरगी केली म्हणजी तुया सासरची सारी ताकद तुया मांगं उबी राहीन. मंग काई सायब्या वावरातल्या मालाले हात लावू शकनार नाई.” (पृ.९८)

हा अनुभव महाराष्ट्रातील कोणत्याही खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या पोरांना लागू होण्यासारखा आहे. सासरवाडीचा हा पाठिंबा इतका जालीम उपाय आहे की, शहरात शिकलेल्या व काही प्रमाणात पुरोगामी विचार बाळगणाऱ्या गुलाबचीही त्यातून सुटका होत नाही. हे ग्रामीण भागातील वास्तव लेखकानं अचूकपणे पकडलं आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

या कादंबरीचा आवाका मुख्यतः ग्रामीण असला तरी शिक्षणाच्या व संशोधनाच्या निमित्तानं नायक शहरातील जीवनमान, लोकांच्या प्रवृत्तीची बारकाईनं नोंद घेतो. विद्यापीठातील व्याख्याते विशेषतः प्रा. महापात्रा सर, बक्षी सर यांचे विचार नायकाच्या मनावर खोल परिणाम करतात. त्याच्यासोबत संशोधन करणारी व त्याला आवडणारी सुलक्षणा म्हणते, “गुलाब मला माहीत आहे की, मी तुला फार आवडते. मलासुद्धा तू फार आवडतोस. पण प्लीज, मी कदाचित कधीच लग्न करणार नाही. तू उगीच इन्व्हॉल्व होत जाशील व नंतर यातून बाहेर पडताना फार त्रास होईल...” (पृ.१००) शहरी संस्कृतीत वाढलेल्या सुलक्षणाला लग्नापेक्षा करिअर, संशोधन महत्त्वाचं वाटतं. पुरुषासोबत मैत्री करणं, त्याच्यासोबत रात्री झोपणं यात तिला काही वावगं वाटत नाही. थोडक्यात लेखकानं एकाच वेळी खेडे आणि शहरातील जीवनमान टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

या कादंबरीचं एक बलस्थान तिच्या भाषाशैलीत दडलेलं आहे. ही कादंबरी वाचताना पुरुषोत्तम बोरकर यांच्या ‘मेड इन इंडिया’ या कादंबरीची आठवण येते. वऱ्हाडी बोलीभाषेतील शब्द पानोपानी आढळतात. उदा. म्हेरी, येळ, याड, भौ, होवो, तुया, तुले, हुभी, मरन, उनी उनी, बुडा-बुडीचा, शैरात, तुमाले, हाय, पन, येऊन राहिलो, जाऊन राहिलो... हे शब्द जसे येतात तसे प्रसंगानुरूप हिंदी व इंग्रजी वाक्यांनी गोडी निर्माण केली आहे. “गुल गया, गुलशन गई, गई होठोंकी लाली, छोड दे पपिताका पिछा, वो होनेवाली है लायसन्सवाली” (पृ.१४१) सारखे शेर, “ओव्हरचा शेवटचा बॉल. सर्वत्र ताण. गुलाबने पवित्रा घेतला. बॉल मिडल व ऑफ स्टंपवर होता” (पृ.११७)सारखी क्रिकेटची भाषा आणि यासोबतच म्हणी, वाक्प्रचार, पत्र यांमुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कोल्हे यांनी वैचारिक लेखन भरपूर केलेलं असलं तरी ललितलेखक म्हणून ही त्यांची पहिलीच कादंबरी. त्यामुळे पहिलेपणाच्या काही खुणा जाणवतात. उदा. नायक गुलाब एकदा सकाळी साडेअकरा वाजता घरी झोपतो, तेव्हा त्याला एक स्वप्न पडतं. (पृ.६४) सकाळी साडेअकरा वाजता झोपणं व स्वप्न पडणं हे एक वेळेस समजून घेता शकतं, पण या स्वप्नातील सुसंगत घटनाक्रम व व्यवस्थित शेवट कृत्रिम वाटतो. तसंच नायक ‘जात कशी टिकून राहिली’ यासारख्या गंभीर विषयावर चिंतन करतो, पण त्याचं वागणं नीतीमूल्याला धरून नसल्याचं स्पष्ट दिसून येतं. दारू पिणं, सतत सिगारेट ओढणं, अनेक मुलींशी शारिरीक संबंध ठेवणं, हुंडा पद्धतीचं समर्थन करणं, स्वत: हुंडा घेणं, जातीतील मुलीशी लग्न जुळवणं यांसारख्या कृती त्याच्या गंभीर चिंतनाला मातीमोल करतात.

वरवर पुरोगामी वाटणारा हा नायक परंपरागत चालीरितीला विरोध करत नाही, कोणताच धाडसी निर्णय घेत नाही. कधी कधी तर त्याची विधानं वादग्रस्तही आहेत. उदा. ‘जात माणसाला जन्मतःच एक आयडेंटिटी देते, तसेच त्याला एक व्यवसायसुद्धा देते’ (पृ.५८), ‘आपण हुंड्याकडे मुलीच्या वडिलांच्या संपत्तीतला हक्क म्हणून बघितले तर चित्र बदलते’ (पृ.५९), ‘बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरजातीय विवाहाविषयीच्या विचारांचा पराभव झाला’ (पृ२४) इत्यादी. थोडक्यात हा नायक महापुरुषांच्या विचारांतली चूक सांगतो, पण आपल्या वागण्यातून ती दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत नाही.

‘पंगतीतलं पान’ ही कोल्हे यांची पहिलीच कादंबरी असूनही काही मर्यादा वगळता ती अनेक बाबतीत यशस्वी ठरली आहे. ग्रामीण भागातल्या नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि मानवी वर्तनातील विविधांगी रूपं उकलण्यात ती कमालीची उजवी ठरली आहे.

..................................................................................................................................................................

लेखक शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......