आमच्या मताशी जो सहमत असेल, त्यालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळेल!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 18 March 2021
  • संकीर्ण व्यंगनामा उजवे डावे लोकशाही निवडणूक अभिव्यक्तीस्वातंत्र्य देशद्रोही मेकॉले

ती. नाना,

आपल्या उजव्या लोकांची विचार करण्याची एक पद्धत असते. ती पद्धत डाव्या लोकांच्या अजिबात लक्षात येत नाही. आता हेच बघा ना! देशद्रोहाच्या कलमाचा फार गैरवापर चालला आहे, अशी सध्या बोंब उठली आहे. या टीकेमधील विकृती माझ्या पटकन लक्षात आली. तुम्ही केलेल्या वैचारिक संस्कारांची उपयुक्तता आज माझ्या लक्षात येत आहे.

तुम्ही आमच्या निरागस मनांवर संस्कार केले नसतेत, तर आज ही विकृती माझ्या लक्षात आली नसती, हे त्रिवार सत्य आहे. देशद्रोह्यांविरुद्ध या कायद्याचा वापर होत आहे. हा गैरवापर कसा होऊ शकतो? देशद्रोही लोकांविरुद्ध देशद्रोहाचा कायदा वापरला गेला, तर त्याचा गैरवापर झाला, असे कसे म्हणता येईल?! (हु हु हु!)

सरकारच्या विरोधात बोलणारे पत्रकार, शेतकऱ्यांची बाजू घेणारे विचारवंत, सरकारच्या विरुद्ध निदर्शने करणारे विरोधी पक्षांचे कार्यकर्ते एवढेच काय, अशा लोकांना देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक केल्यावर त्यांना जामीन देणारे न्यायाधीश हे सर्वच देशद्रोही असतात, हे कळायला संस्कार झालेली बुद्धी लागते. ही बुद्धी तुम्ही केलेल्या संस्कारांमुळे आम्हाला प्राप्त झाली, हे आमचे आणि देशाचे नशीब. देश तुमचा नेहमीच ऋणी राहील नाना!

या मेकॉलेच्या पिलावळीला सरळ करण्यासाठी देशद्रोहाचा कायदा वापरणे योग्यच आहे. परक्यांच्या विचारांवर चालणाऱ्या या बुद्धिजीवी जंतूंना असेच हद्दपार करावे लागेल. या मेकॉलेचा एकही विचार या भारतमातेच्या परिघात उरला नाही पाहिजे. एक डावा मला म्हणाला की, देशद्रोहाचा कायदा मेकॉलेनेच आणला होता. मी म्हणालो- होय! तो काटा होता आणि तुम्हीही काटाच आहात! तो माझ्याकडे बघतच राहिला. तुला मेकॉलेचा एकही विचार नको होता ना, एवढेच पुटपुटला. मी त्याच्याकडे बघून छद्मी हास्य केले. (हु हु हु!)

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तो म्हणाला, काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी देशद्रोहाचा कायदा वापरलेला तुम्हाला का चालत नव्हता? त्याच्या या प्रश्नावर मी खूप हसलो. त्याला म्हणालो - अरे वेड्या, काँग्रेस पक्ष देशद्रोही लोकांनी भरलेला आहे. असे देशद्रोही लोक देशद्रोहाच्या कायद्याचा वापर करू लागले तर त्याला विरोध करायलाच हवा.

यावर तो बेशुद्ध पडला. नाना, तुमच्यामुळेच आज मी एका डाव्याला बेशुद्ध पाडू शकलो. मी त्याच्या नाकाला कांदा लावून उठवले. तो उठल्यावर त्याला नीट बसवले. पाणी पाजले. नाना तुम्ही केलेले सहिष्णुतेचे संस्कार अशा वेळी पुढे येतात. सगळ्या मनाचा ताबा घेतात. मी अपरिहार्यपणे एका डाव्याला जीवदान दिले. माझे मन सहिष्णुतेच्या भावनेने भरून आले.

नाना, तुम्ही आम्हाला बुद्धीने तर प्रगल्भ बनवलेतच, पण आमच्या भावनादेखील प्रगल्भ बनवल्यात.

डावा मला म्हणाला की, सध्या बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. तिथे त्या सरकारवर तुम्ही टीका का करता आहात? तिथे तुम्हाला देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक का नाही करायची? मी ताडकन म्हटलो की, लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार दिलेला असतो घटनेने. तो चिडून म्हणाला - म्हणजे जिथे तुम्ही विरोधात आहात तिथेच फक्त घटनेने दिलेले स्वातंत्र्य अस्तित्वात असणार आहे का?

त्याला मी म्हटले की, अरे, घटना भारतभर आहे. सरकारला विरोध करायचा अधिकार देशभर आहे. जिथे आम्ही सत्तेवर आहोत तिथे तुम्ही जरूर विरोध करा. आम्ही तो खिलाडूपणे सहन करू. पण, जर तुम्ही उगीच विरोधासाठी विरोध करत असाल तर त्याला काही अर्थ नाही. भारताच्या विरोधात असलेल्या शक्तींशी हातमिळवणी करून तुम्ही जर विरोध करत असाल तर देशद्रोहाचा कायदा आम्हाला नाईलाजाने का होईना वापरावाच लागणार.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना! (हु हु हु!) नाना, तुम्हीसुद्धा गालातल्या गालात हसत आहात ना? तोंडाला आलेला फेस पुसत तो म्हणाला की - तुम्ही सत्तेत येताना घटनेने दिलेले स्वातंत्र्य वापरणार आणि नंतर सत्ता अबाधित राहावी म्हणून देशद्रोहाचा कायदा वापरून घटनेने दिलेले स्वातंत्र्य संपवून टाकणार.

मी म्हटले - हे बघ बाबा, घटनेने दिलेले विरोधाचे स्वातंत्र्य देशभक्तांना दिलेले आहे. देशद्रोह्यांना नाही. कुणी खरा देशभक्त आमच्या सरकारला विरोध कसा करू शकेल? एक लक्षात घे आमच्या राज्यात देशद्रोह्यांच्या वाट्याला देशद्रोहाचा कायदाच येणार! (नाना, उद्गारवाचक चिन्हाचा वापर तुम्ही किती सुंदर शिकवला आहे तुम्ही आम्हाला!!!)

नाना, या लोकांना लॉजिक कळत नाही. बुद्धी असेल तर लॉजिक असणार ना? एवढ्या पवित्र आणि विश्वगुरू असलेल्या देशाच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना बुद्धी आहे, असे म्हणता येईल का नाना? (हु हु हु!) (नाना, हु हु हु ला उद्गारवाचक चिन्ह लावले तर चालते ना?)

मी त्याला म्हणालो - आम्ही बंगालमध्ये निवडून आलो की, आमच्या विरोधात काम केलेल्या सगळ्या विचारवंतांना देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक करणार आहोत. सगळा प्लॅन ठरलेला आहे. तो म्हणाला की - म्हणजे निवडून येण्यापुरती तुम्हाला लोकशाही हवी आहे?

मी म्हटले, निवडून आल्यावर काय करायचे हा आमचा प्रश्न आहे. आम्ही निवडून आल्याशिवाय कुठलाही प्लॅन कृतीमध्ये उतरवत नाही. (नाना तुम्ही गालातल्या गालात हसताय ना?)

डाव्याला परत एकदा चक्कर आल्यासारखे दिसले. (हु हु हु!)

तो म्हणाला- हा लोकशाहीचा विश्वासघात आहे. ज्या तत्त्वज्ञानाचा वापर करून तुम्ही निवडून येताय त्याच तत्त्वज्ञानाचा तुम्ही घात करताय.

मी त्याला स्पष्टपणे सांगितले की - कुठलेही तत्त्वज्ञान महत्त्वाचे नाही. देश महत्त्वाचा आहे. आणि मुळात कुणाचा घात करणे, ही गोष्ट आमच्या रक्तातच नाही.

लोकांनी निवडून दिल्यावर त्या सरकारचे हुकूम पाळणे हे सगळ्यांचे कर्तव्य ठरते. त्याला जो जो विरोध करेल, त्याची जागा कुठे असेल हे आम्ही ठरवणार. आमच्या मताशी जो सहमत असेल, त्यालाच अभिव्यक्तीस्वातंत्र्य मिळेल!

तो म्हणाला- म्हणजे तुम्ही लोकशाही मार्गांना तिलांजली देऊन लोकशाही राबवणार? हे तर्कदुष्ट विधान आहे असं नाही का तुला वाटत?

नाना, मला या माणसाची दया आली. याला मी ‘किडा’ म्हणणार होतो पण असे काही बोलायचे नाही, असे तुम्ही शिकवलेले आहे. मी त्याला म्हणालो - लोकशाही ही फक्त एक चौकट आहे. चौकटीशी एकनिष्ठ राहून राज्य चालत नाहीत. देशहितासाठी चौकट थोडी वाकवली गेली तर फारसे काही बिघडत नाही. शेवटी चाणक्य म्हणाला आहे की - कुठल्याही विचारापेक्षा देश महत्त्वाचा आहे.

तो खूप चिडला. म्हणाला, असं कुठं म्हणाला आहे चाणक्य?

नाना, त्याचा चिडकेपणा बघून मला खूप राग आला. मी त्याला ताडकन म्हणालो - जा जाऊन शोध त्याच्या पुस्तकात!

नाना तुम्ही हे चाणक्याचे वाक्य सांगितले होतेत ना आम्हाला? मग पुस्तकात हे वाक्य कुठे आहे, हा प्रश्नच कुठे येतो? आणि मी म्हणतो अगदी नसले हे वाक्य पुस्तकात तर बिघडले कुठे? चुकीचे आहे का हे वाक्य? चुकीचा आहे का हा विचार?!

(नाना, प्रश्नचिन्हानंतर उद्गारवाचक चिन्ह वापरता येते असे तुम्ही एकदा म्हणाला होतात. प्रश्न हा कुणाच्या आत्म्यातून आलेला उद्गार असेल तर प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह एकदम वापरायचे असे तुम्ही म्हणाला होतात. हो ना?!)

तो परत परत म्हणत राहिला की, तुम्ही लोक पाहिजे तसे वागता आणि त्याची बिलं इतिहासातील मोठमोठ्या विचारवंतांच्या नावावर फाडता.

मला मुळात बिलं फाडणं वगैरे भाषाच पटत नाही. मला खूप संताप आला.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तो म्हणाला- तो देशद्रोहाचा कायदा राहू द्या बाजूला, तर्कद्रोहाचा कायदा आणला तर तुमच्यातला एकहीजण एक क्षणसुद्धा बाहेर राहू शकणार नाही.

मी खूप हसलो. तुम्हालाही हसू येते आहे ना नाना? या देशद्रोह्याच्या तोंडात तर्कद्रोहाची भाषा फार विनोदी वाटते आहे ना? ज्यांना आपल्या देशावर प्रेम करण्यातले लॉजिक समजले नाही, त्यांनी जीवनातल्या इतर लॉजिकवर का बोलावे?

पण नाना, त्याचा हा किरटेपणा माझ्या जिव्हारी लागला. त्याच्याशी बोलू नये असे मला वाटू लागले.

मी त्याला म्हणालो - मघाशी तू बेशुद्ध पडलास तेव्हा मी तुझ्या नाकाला कांदा लावला त्याचे दोन रुपये दे. मी सहिष्णू असलो तरी अव्यवहारी नाहीये! सहिष्णुता सहिष्णुतेच्या जागी, व्यवहाराच्या जागी व्यवहार.

मी दोन रुपये घेतले आणि निघालो. ते दोन रुपये देताना त्याच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य का आले होते, ते मला कळले नाही नाना! मी त्याच्या हसण्याचा फार विचार नाही केला. आपल्या विरोधकाचे मन आपल्याला कशाला कळायला पाहिजे? (हु हु हु!)

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......