टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • हार्दिक पटेलचा शिवसेनेला पाठिंबा. (चित्र - सतीश सोनवणे)
  • Tue , 07 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Govind Pansare Samir Gaikwad डोनाल्ड ट्रम्प Donald Trump अनुभव मित्तल Anubhav Mittal मायली सायरस Miley Cyrus

१. भारतीय लष्करातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून लष्कराकडून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील जमिनीसाठी भाडे वसूल केल्याच्या प्रकरणी केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयची चौकशी सुरू आहे. या अधिकाऱ्यांनी तब्बल १६ वर्षे या जमिनीसाठी भाडं द्यायला लावलं आहे. २००० सालापासून लाखो रुपये या जमिनीच्या भाड्यापोटी देण्यात आले आहेत. या जमिनीचा तथाकथित मालक खरोखरच अस्तित्त्वात आहे की फक्त कागदोपत्री दाखवण्यात आला आहे, याचा तपास सीबीआय करणार आहे.

हे अधिकारी चुकून लष्करात गेले म्हणायचे. सिव्हिलियन राहिले असते तर राजकारणात, व्यापारात, व्यवसायात, उदयोगात चांगलं करिअर करू शकले असते. लष्कराला पवित्र गाय मानणाऱ्या देशभक्तांनाही आता लक्षात आलं असेल की, बेईमानीचा डीएनए गणवेषाने बदलतही नाही आणि झाकलाही जात नाही.

…………………………………………..

२. ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याने ‘सनातन’चे गोमूत्र आणि अगरबत्ती मागितली आहे. त्याला सध्या फक्त जपमाळ देण्याचीच परवानगी न्यायालयाने दिली आहे.

अगरबत्तीचा आग्रह समजू शकतो, पण गोमूत्र सनातनचंच हवं, याचं कारण काय असेल? सनातनमध्ये अभिमंत्रित गायींचं गोरज वेळेला, मुहूर्त वगैरे पाहून मूत्र गोळा करत असतील काय? या गायी देशी वाणाच्याच असतील काय? अतिशुद्ध गोमूत्र मिळवण्यासाठी या गायींना सात्त्विक चारा खाऊ घातला जात असेल काय? बिस्लरीचं पाणी पाजलं  जात असेल काय? सनातनचे परमगुरू गोमूत्राच्या शुद्धतेत काही व्यक्तिगत योगदान देत असतील काय?

…………………………………………..

३. सात मुस्लिम देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा तुघलकी निर्णय रद्द केल्याबद्दल त्यांनी अमेरिकेतील न्यायालयांवर आगपाखड केली आहे. एखादा न्यायाधीश देशाची सुरक्षा अशा प्रकारे धोक्यामध्ये टाकू शकतो यावर विश्वास बसत नाही. काही विपरीत घडलं तर त्यासाठी न्यायव्यवस्थेला दोषी धरलं जावं, बाहेरून लोक देशात येतच आहेत, हे वाईट आहे, असं ट्रम्प म्हणाले.

एखादा माणूस देशालाच काय, सगळ्या जगाला असुरक्षिततेच्या खाईत कसा ढकलू शकतो, हे ट्रम्पमहोदयांच्या कारकीर्दीच्या १३ दिवसांतच सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. त्यांच्याशी क्षुद्र न्यायाधिशाची काय तुलना होणार? ट्रम्पतात्यांचे पूर्वजही मातीत उगवलेले नाहीत, 'बाहेरून'च आलेले आहेत, हे त्यांना कोणी सांगेल का? ते स्वत: बाहेर निघून गेले, तरी अमेरिकेचं आणि जगाचं भलं होईल.

…………………………………………….

४. फेसबुकवर पोस्ट लाइक करा आणि प्रत्येक लाइकमागे पाच रुपये मिळवा अशी बनावट स्कीम सुरू करून सात लाख लोकांना तीन हजार ७०० कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कंपनीचा मालक अनुभव मित्तल याला अटक झाली आहे. नोएडामधून लोकांना गंडा घालण्याचा हा प्रकार चालू होता. आपण फसवले गेलो असल्याची माहिती मिळाल्यानंतर हजारो लोकांनी कंपनीच्या बाहेर जमा होऊन गोंधळ घातला. अवघ्या २६ वर्षांच्या मित्तलने दोन सहकारी आणि पत्नीच्या मदतीने ही कंपनी स्थापन केली होती. पाच हजारापासून ५७ हजार रुपयांपर्यंत डिपॉझिट जमा करून घेऊन ही कंपनी सदस्यांना फेसबुकच्या लिंक्स पाठवायची. त्या लिंकवर लाइक केल्याबद्दल पाच रुपये जमा व्हायचे. काही दिवसांनी हे पैसे देणं बंद व्हायचं.

फेसबुकवर लोकांना कामाला लावून त्यांच्या कंटेंटवर झकरबर्ग पैसे कमावतो, असं गमतीने म्हटलं जातं. मित्तलने फेसबुकला कामाला लावून पैसे कमावून दाखवले. फेसबुकवर पोस्टी लाइक करण्याचे खरोखरच पैसे पडले असते, तर आजपर्यंत इथे कितीजण अब्जाधीश होऊन बसले असते.

…………………………………………..

५. सोशल मीडियावर बोल्ड फोटो अपडेट करण्यासाठी प्रसिद्ध असलेली अमेरिकन पॉप स्टार मायली सायरस हिने इन्स्टाग्रामवर चक्क लक्ष्मीपूजेचे फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या घरी विधिवत लक्ष्मीपूजन केल्याचं या फोटोंमधून स्पष्ट झालं आहे.

पोरगी जरा वांड आहे, पण सश्रद्ध आहे हो, म्हणून अलाबला काढून कानसुलावर बोटंच मोडून घेतील संस्कृतीरक्षक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाल्यामुळे आपण हिंदू धर्माकडे ओढले गेलो, असं एक वक्तव्य प्रसिद्ध झालं की समजून जायचं, हिची पुढची कॉन्सर्ट भारतात होणार आहे. आपल्या सनी लिओनीनेही हा फंडा वापरून पाहायला हरकत नाही- तीही पावन करून घेतली जाईल.

………………………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......